माणुसकीचा झरा
एकदा एक माणूस मॉर्नींग वॉकसाठी बाहेर पडला होता. परत येताना
त्याला रस्त्यावरील एका खांबावर एक चिठ्ठी घडी करून अडकवून ठेवलेली दिसली. त्याने कुतुहलाने
ती चिठ्ठी उलगडून वाचायला सुरवात केली. ती चिठ्ठी बर्याच वेडावाकड्या अक्षरांमध्ये
लिहिली होती. त्या चिठ्ठीतील मजकूर असा होता.
‘माझी ५०रुपयांची नोट हरवली आहे. मी एक
गरीब आणि वृद्ध महिला आहे. ही नोट इथेच कुठेतरी पडली असावी. मी ती नोट शोधायचा प्रयत्न
केला पण मला काही ती नोट सापडली नाही. ज्या कुणाला ही नोट सापडेल त्याने ती नोट खालील
पत्यावर पोचवण्याची कृपा करावी.’
त्या चिठ्ठीच्या शेवटी पत्ता दिला होता आणि ‘गणपतीच्या देवळाजवळ’ अशी खुण पण सांगीतली होती.
त्या माणसाला काय वाटले कोणास ठाऊक. तो पत्ता शोधत निघाला. हा
पत्ता एका गरीब आणि दळिद्री झोपडपट्टीतला निघाला. त्याने त्या वस्तीतील गणपतीचे देऊळ
शोधून काढले व त्या पत्यावरील घर पण शोधून काढले. ते घर म्हणजे एक चंद्रमौळी झोपडी
होती. झोपडीचे दार बंद होते. त्याने दाराची कडी वाजवली. एका जख्ख म्हातारीने दार उघडले.
त्या म्हातारीचे सर्वांग लटपटत होते. काठीचा आधार घेऊन ती कशीबशी उभी होती. शरीर खंगलेले,
चेहेरा सुरकुतलेला, गालाची हाडे वर आलेली, अंगावर फाटके कपडे पण चेहेर्याावर स्वाभीमान
असे तिचे रूप होते.
‘आजी मला तुमची ५० रुपयांची नोट सापडली!
हे घ्या तुमचे पैसे!’ असे म्हणून त्याने खिशातील 50 रुपयांची नोट काढून आजींना दिली.
‘कमाल आहे! माझी हरवलेली ५० रुपयांची
नोट देण्यासाठी आत्तापर्यंत ४० माणसे येऊन
गेली. तु ४१ वा आहेस!’ आजी म्हणाल्या.
‘तुला कोणी सांगीतले माझे पैसे हरवले
आहेत म्हणून?’ आजींनी विचारले.
‘मी ते खांबावरच्या चिठ्टीमध्ये वाचले.’
त्या माणसाने उत्तर दिले.
‘एकतर माझे पैसे मुळीच हरवेले नाहीत!
दुसरे म्हणजे ती खांबावरची चिठ्ठी मी लिहीलेली नाही. कारण एकतर मला नीट दिसत नाही त्यामूळे
मी घरातून बाहेर पडत नाही. तसेच मला लिहीता वाचता पण येत नाही. कोणीतरी खोडसाळपणाने
ती चिठ्टी लिहीली आहे. हे तुझे 50 रुपये परत घेऊन जा!’ आजी म्हणाल्या.
‘नको आजी! राहुदे हे पैसे तुमच्याजवळ!
तुम्हालाच ते उपयोगी पडतील!’ तो माणूस म्हणाला.
‘कमाल आहे! आत्तापर्यंत जो जो माणूस माझे
हरवलेले 50 रुपये परत द्यायला आला त्याला मी पैसे परत घे म्हणून सांगीतले तर प्रत्येकाने
हेच उत्तर दिले!’ आजीबाई म्हणाल्या
‘माझे एक काम करशील?’ आजीबाईंनी विचारले.
‘हो सांगाना! तुमचे काम नक्की करीन!’
त्या माणसाने उत्तर दिले.
‘अरे बाबा! जाताना ती खांबावरची चिठ्ठी
फाडून टाक. लोकांना उगीच त्रास होतो आणि भुर्दंड बसतो. मी सगळ्यांनाच ती चिठ्ठी फाडून
टाकायला सांगीतली. पण अजून कोणी ते काम केलेले दिसत नाही. बहुतकरून विसरले असावेत.
निदान तू तरी ते काम करून टाक’ असे म्हणून त्याला धन्यवाद देत त्या आजींनी त्यांच्या झोपडीचे
दार बंद केले.
परत जाताना त्या माणसाला त्या खांबावरची चिठ्ठी दिसली. ती चिठ्ठी
फाडण्यासाठी म्हणुन तो त्या खांबाजवळ आला आणि थबकला.
त्याच्या लक्षात आले की त्या एका चिठ्ठीमूळे माणुसकीचा झरा वाहू
लागला आहे. त्या चिठ्ठीमूळे अनेक लोकांची मदत त्या गरीब आजीबाईंना मिळाली आहे. आपले
५० रुपये गेले पण एका गरजू माणसाला मदत केल्याचा आनंद व समाधान आपल्याला मिळाले. असेच
समाधान त्या 40 लोकांना पण मिळाले असेल. ही चिठ्ठी जर आपण फाडून टाकली तर माणुसकीचा
झरा आटून जाईल. त्याला ती चिठ्ठी लिहिणार्याच माणसाचे कौतूक वाटले आणि तो चिठ्ठी न
फाडताच तेथुन निघुन गेला.
‘माणुसकी नाही! माणुसकी नाही!’ अशी हाकाटी
आपण मारत असतो. ‘हल्ली माणुसकी शिल्लक राहीली नाही! माणसाला माणसाची पर्वा किंवा किंमत
राहिली नाही’ अशी बोंब ठोकत आपण सगळीकडे फिरत असतो. पण समाजात माणुसकीचे असे
‘सुप्त’ झरे नेहमीच वाहत असतात. फक्त आपल्याला ते दीसत नसतात. माणुसकीचे
हे झरेच समाजाला व माणसाला जिवंत ठेवत असतात. असे झरे हेच समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण
असते.
तुम्हाला सुद्धा माणुसकीच्या अशा एखाद्या झर्याेमध्ये सामील होण्याची
संधी मिळाली तर ती जरूर घ्या. इतरांना मदत केल्यामूळे जो काही आनंद किंवा समाधान मिळते
याचा जरूर अनुभव घ्या!
अर्थात हा अनुभव घ्यायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचे..!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा