"काहीच कसं येत नाही गं तुला?" मिहिकाने तिसऱ्यांदा
बेरीज चुकवली तेंव्हा मी जराशी चिडलेच. मीच ठरवलं होतं जास्तीतजास्त दोनदा समजावल्यावर
तिला यायला हवं. तिचं लक्षच नव्हतं. तिला बाहेरून
येणारे मांजरांचे आवाज जास्त आवडत होते. मांजरी
एकमेकीशी काय बोलतायत ह्यांत तिला जास्त इंटरेस्ट होता. माझं काम सोडून मी बसलेय आणि
हिचं लक्ष नाही. "तीन वेळेस सांगूनही कळत कसं नाही तुला? काहीच येत नाही."
मी वैतागून बोलले. मी वैतागले कि तिला तिच्या बाबाची आठवण येते. ती बाबाकडे गेली. त्याला
म्हणाली, "आईला काहीतरी सांग. खोटं बोलतेय. " मी कान देऊन ऐकू लागले. पुढे
म्हणाली, " मला खूप गोष्टी करता येतात. चित्र काढता येतं,कागदाचं butterfly बनवता
येतं, सायकल चालवता येते, कोशिंबीरसुद्धा करता येते आणि आई म्हणते कि मला काहीच येत
नाही. "
मी खजील झाले. कित्येकदा, मुलांना काय येत नाही हे पाहण्यात आपण
एवढे गुंतलेलो असतो, कि त्यांना काय येतं हे आपण पहातच नाही. सरळ judgment देऊन मोकळे
होतो. असं बरंच काही आपण बोलत असतो. तो त्यांच्या
स्वत:बद्दलच्या विचारांचा एक भाग बनतो. आपण मुलांशी जे बोलत असतो तेच ती स्वत:शी बोलत
असतात. तसाच विचार करत असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा