संत कबीर
चींटी चावल ले चली,*
बीच में मिल गई दाल।
कहै कबीर दो ना मिलै,
इक ले डाल॥
अर्थात :
मुंगी तांदळाचा
दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात
म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय
केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे
ती खिन्न झाली.
तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार.
तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग
करावा लागणार.'
तांदळाचा दाणा गवसल्यावर
अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद
व समाधान, डाळीने हिरावून घेतला.
माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस
आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन
क्षणात हिरावून घेतात.
साधं मोबाईलचं
उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच
त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच
संपुष्टात येतो. तो मनाशी म्हणतो, 'इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो,
तर काय बिघडलं असतं.'
पूर्वी आजोबा-पणजोबांच्या
काळातल्या वस्तुही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण
तेव्हा इतके विकल्प नव्हते (आणि ऐपतही नव्हती.)
आज असंख्य विकल्पांनी, वस्तुंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक
करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तुही भंगारात टाकू लागले आहेत.
भौतिक वस्तुंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे,
कारण माणूसही भौतिकच आहे. नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे.
देवाने माणसाला दोन हात
दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुस-या
हाताने द्यावं, यासाठी आहेत. नुसतं घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी
जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.
म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे समतोल तर टिकून
राहतोच, माणसाचं समाधान आणि आनंदही त्यामुळे टिकावू बनतो. कबीरांच्या या दोह्यात असा
मोठ्ठा अर्थ दडला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा