Pages

गुरुवार, २५ एप्रिल, २०१९

लोक तूम्हाला बोलणारच!



लोक तूम्हाला बोलणारच!

तुम्ही लोकांपासून दूर रहाल तर लोक म्हणतील तुम्ही खुप गर्विष्ठ आहात. तुम्ही खुप खर्च कराल तर लोक म्हणतील, तुम्ही उधळ्या आहात. तुम्ही खर्च कमी कराल तर लोक म्हणतील , तुम्ही चेंगटच आहात.तुम्ही सतत खरे बोलाल तर लोक तुम्हाला फटकळ म्हणतील, तुम्ही इतराची स्तुती कराल तर लोक तुम्हाल. संधी साधू म्हणतील. तुम्ही विरोध करु इतरांच मताचे खंडण कराल तर लोक तुम्हा उर्मठ म्हणतील. तुम्ही इतरांच सहन कराल तर लोक भित्रा म्हणतील. लोकांना निरपेक्षपणे मदत कराल , तर लोक तुम्हाला बावळट म्हणतील. जर तुम्ही प्रमाणिक वागलात तर लोक तुमचा वापर करतील. पण तूम्ही खंबीर राहीलात तरच तुम्हाला लोक सलाम करतील. एक वेळ कलंदर बनून जगा। जग हे काही तरी म्हणणारच आहे.
पत्नी पतीला म्हणते,..
एखादी वस्तू स्वस्त आणल्यास...  तुम्हाला सगळे फसवतात... महाग आणल्यास...
 तुम्हाला कुणी आणायला सागितलं होत?
 जेवणाचं कौतुक केल्यास,  मी दररोजच करते.
  नावं ठेवल्यास...
 तुम्हाला मेलं माझं कौतुकच नाही कशाचं...
 एखाद काम केल्यास...
  एक काम कधी धड करत नाही...
  ते न केल्यास...
  तुमच्या भरवशावर राहिले तर एकही काम होणार नाही...
आणि शेवटच

मी आहे म्हणून टिकले नाहीतर दूसरी असती तर पळून गेली असती
   शांत रहाण्याचा प्रयत्न करा.

तुमच जीवन तुमच्यासाठीच जगा. जीवन खुप सुंदर आहे. पण ते तुम्हाला कळाले तर.
आनंदी जगा, लोक काय तरी म्हणणारच!
म्हणून लोकांचा विचार सोडा. मजेतच जगा!

सकारात्मक रहा.........................



सकारात्मक रहा.........................

आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते.

अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो.
एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो.त्यामुळे काहीजण जिवंतपणे मरून जगतात.

खरतरं हीच वेळ असते उठायची, आणि आयुष्यासोबत स्पर्धा करायची. एक वादळ होऊन थैमान घालायची. कष्ट करायची. हव्या असलेल्या एका ध्येयासाठी कित्तेक गोष्टींचा त्याग करायची..
एक अशी वेळ,
ज्या ज्या लोकांकडुन तुम्हाला त्रास होत आला आणि होतोय त्या लोकांची परतफेड करण्यासाठी कधीच त्यांच्यासारखं न वागता "तुझा सुड घेण्याइतकी तुझी पात्रता (लायकी) नाही" अस म्हणुन त्यांना सोडुन द्यायची.

अशा वेळी ह्याच्या-त्याच्या सांगण्यावरून चुकीचे चार निर्णय घेण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने एकच योग्य निर्णय घ्यावा.

एक वाट धरावी, एक ध्येय धरावं आणि भावनांच्या बाजाराला लाथ मारून एकट चालावं.नव्या माणसांना भेटत राहावं. त्यांच्याकडुन जे चांगलं ते घ्यावं. भावनांमधे न अडकता पुढे जात राहावं. आपली कदर कोणाला आहे-नाही ह्याच्यापेक्षाही स्वतःची स्वतंत्र सिद्धता स्वतःलाच दाखवण्यात आयुष्याचं सार्थक करावं.

ज्यांना तुमचं रडणं ऐकु नाही गेलं त्यांचे कान तुमच्या चर्चेने बहिरे होतील. ज्यांना तुमच्या वेदना दिसल्या नाहीत त्यांचे डोळे तुमच्या तेजाने आंधळे होतील. आणि तेव्हा तुम्हाला त्यांची किंचितही फिकीर नसेलं.

त्यामुळे सुडबुद्धीने स्वतःच अस्तित्व खराब करण्यापेक्षा जिथे आपल्या अस्तित्वाला जाण नाही तिथे ते ठेऊच नका. आणि जिथे आपलं अस्तित्व नाही तिथे ते अस निर्माण करा की तुम्ही थांबाल तेव्हा लोकांची आयुष्य थांबतील..

तुमच्या वेदनांमधे इतकी शांतता ठेवा की तुमच्या आनंदात सगळीकडे आनंदोत्सव होईल

प्रसिद्ध व्यक्तींचे सुविचार:





प्रसिद्ध व्यक्तींचे सुविचार:
=====================

 नदी वाहून गेल्यावर पाय न भिजविता पलिकडे जाऊ या मूर्खपणाच्या आशेवर थांबून न बसता पाण्यात उडी घालून आणि प्रवाह तोडून पलीकडे चला.
स्वामी विवेकानंद

तुमच्याने पुढे जाता येत नसेल तर पुढे जाऊ नका पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका.
लोकमान्य टिळक

सत्य असेल तर काळाच्या ओघात ते टिकेल, असत्य असेल तर ते अदृष्य होईल.
साने गुरुजी

दिवसभरात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात, असे समजावे.
स्वामी विवेकानंद

सर्वच प्रश्न सोडून सुटणारे नसतात, काही प्रश्न सोडून दिले की सुटतात.
विनोबा भावे

आत्मविश्वास हे कर्तृत्ववृक्षाचे मूळ आहे, वृक्षांची मुळे जो जो भूमीत खोल जातात तो तो वादळाशी झुंजण्याचे त्याचे सामर्थ्य वाढते; आयुष्यातील नानाविध संकटाशी टक्कर देण्याला आत्मविश्वासही असाच उपयोगी पडतो.
वि.स.खांडेकर

घर ही गोष्ट दगडविटांनी बांधले जात नाही, जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधले जाते तेच खरे घर.
वि.वा.शिरवाडकर

इतरांपेक्षा स्वतःला जास्त ओळखा, ईतरांपेक्षा जास्त काम करा आणि इतरांपेक्षा कमी अपेक्षा करा, या तीन गोष्टी यश मिळविण्यासाठी महत्वाच्या आहेत.
विल्यम शेक्सपिअर

यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.
विश्वनाथन आनंद

मुलांना मनासारखं करु द्यायला हवं, त्यांची अभिरुची विकसित होत जाईल. आपण काही लादू नये, फक्त प्रोत्साहन द्यावं. मुलं निसर्गाच्या संवेदनांचा शोध घेतील.
विष्णु चिंचाळकर

सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड करणे.
सुभाषचंद्र बोस

मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.
सर्वपल्ली राधाकृष्णन

गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा होय.
सरदार वल्लभभाई पटेल

श्रद्धा हा असा पक्षी आहे जो पहाटेच्या गर्द काळोखात त्याला प्रकाशाची चाहूल लागून तो गाऊ लागतो.
रवींद्रनाथ ठाकूर

निर्बुद्ध लोक दुसऱ्यावर हसतात आणि बुद्धीवान स्वतःवर.
ओशो

जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.
एन.आर.नारायणमूर्ती

ज्या दिवशी आपली थोडी सुद्धा प्रगती झाली नसेल, तर आपला तो दिवस फुकट गेला असे समजावे.
नेपोलियन बोनापार्ट

समाजावर जर काही प्रभाव पाडायचा असेल तर आपण आपले लक्ष बालकांकडे वळविले पाहिजे. हे सत्य मान्य केले तर शिशुविहारांचे महत्त्व समजते. ही बालकेच आपल्या भविष्याला आकार देणार आहेत आणि आपण जे साहित्य, शिक्षण त्यांना देऊ त्यावरच त्या आकाराची घडण अवलंबून असणार आहे.
मारिया मॉंटेसरी

पूर्ण नम्रताभाव अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही.
महात्मा गांधी

प्रत्येकजण जग कसे बदलेल याचा विचार करत असतो मात्र कुणीही स्वतःला कसे बदलता येईल याचा विचार करत नाही.
ल्येव तल्स्तोय

पैसा हा खतासारखा आहे; तो साचवला की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.
जे.आर.डी.टाटा

माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
आयझॅक न्यूटन

परिस्थिती मानसाला घडवत नसते तर ती त्याला प्रकट करते.
जेम्स अ‍ॅलन

रडू नकोस, रडायला वेळ तरी कुठे आहे? स्वतःच्या अंतरंगात दीप चेतव. त्या दीपाच्या प्रकाशात निर्वाणपद प्राप्त करण्याचा मार्ग शोध.
बुद्ध

चुका दाखवितांना त्या कमी कशा करायच्या हेही सांगितले तर त्याचा परिणाम चांगला होतो.
बिल गेट्स

जीवन केवळ दीर्घ नव्हे तर महान असावे.
डाॅ बाबासाहेब आंबेडकर

पहिले यश मिळाल्यानंतर स्वस्थ बसू नका कारण दुसर्‍या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणेल की पहिलं यश केवळ नशीबाने मिळाले होते.
ए. पी. जे. अब्दुल कलाम

जेव्हा एखाद्याला वाटत असेल की त्याने आयुष्यात एकही चूक केली नाही तेव्हा त्याने एकही नवी गोष्ट करुन पाहिली नाही असे समजावे.
अॅल्बर्ट आइन्स्टाइन

प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.
अब्राहम लिंकन

अपयशी झाल्यावर आपल्याला अपयशका आले? याचे स्पष्टीकरण द्यावे लागते, मात्र यशस्वी झाल्यावर एका शब्दाचेही स्पष्टीकरण द्यावे लागत नाही.
ॲडॉल्फ हिटलर

माणुसकीचा झरा


माणुसकीचा झरा

एकदा एक माणूस मॉर्नींग वॉकसाठी बाहेर पडला होता. परत येताना त्याला रस्त्यावरील एका खांबावर एक चिठ्ठी घडी करून अडकवून ठेवलेली दिसली. त्याने कुतुहलाने ती चिठ्ठी उलगडून वाचायला सुरवात केली. ती चिठ्ठी बर्‍याच वेडावाकड्या अक्षरांमध्ये लिहिली होती. त्या चिठ्ठीतील मजकूर असा होता.

माझी ५०रुपयांची नोट हरवली आहे. मी एक गरीब आणि वृद्ध महिला आहे. ही नोट इथेच कुठेतरी पडली असावी. मी ती नोट शोधायचा प्रयत्न केला पण मला काही ती नोट सापडली नाही. ज्या कुणाला ही नोट सापडेल त्याने ती नोट खालील पत्यावर पोचवण्याची कृपा करावी.’

त्या चिठ्ठीच्या शेवटी पत्ता दिला होता आणि ‘गणपतीच्या देवळाजवळ अशी खुण पण सांगीतली होती.

त्या माणसाला काय वाटले कोणास ठाऊक. तो पत्ता शोधत निघाला. हा पत्ता एका गरीब आणि दळिद्री झोपडपट्टीतला निघाला. त्याने त्या वस्तीतील गणपतीचे देऊळ शोधून काढले व त्या पत्यावरील घर पण शोधून काढले. ते घर म्हणजे एक चंद्रमौळी झोपडी होती. झोपडीचे दार बंद होते. त्याने दाराची कडी वाजवली. एका जख्ख म्हातारीने दार उघडले. त्या म्हातारीचे सर्वांग लटपटत होते. काठीचा आधार घेऊन ती कशीबशी उभी होती. शरीर खंगलेले, चेहेरा सुरकुतलेला, गालाची हाडे वर आलेली, अंगावर फाटके कपडे पण चेहेर्याावर स्वाभीमान असे तिचे रूप होते.

आजी मला तुमची ५० रुपयांची नोट सापडली! हे घ्या तुमचे पैसे!’ असे म्हणून त्याने खिशातील 50 रुपयांची नोट काढून आजींना दिली.

कमाल आहे! माझी हरवलेली ५० रुपयांची नोट देण्यासाठी आत्तापर्यंत ४०  माणसे येऊन गेली. तु ४१ वा आहेस!’ आजी म्हणाल्या.

तुला कोणी सांगीतले माझे पैसे हरवले आहेत म्हणून?’ आजींनी विचारले.

मी ते खांबावरच्या चिठ्टीमध्ये वाचले.’ त्या माणसाने उत्तर दिले.

एकतर माझे पैसे मुळीच हरवेले नाहीत! दुसरे म्हणजे ती खांबावरची चिठ्ठी मी लिहीलेली नाही. कारण एकतर मला नीट दिसत नाही त्यामूळे मी घरातून बाहेर पडत नाही. तसेच मला लिहीता वाचता पण येत नाही. कोणीतरी खोडसाळपणाने ती चिठ्टी लिहीली आहे. हे तुझे 50 रुपये परत घेऊन जा! आजी म्हणाल्या.

नको आजी! राहुदे हे पैसे तुमच्याजवळ! तुम्हालाच ते उपयोगी पडतील!’ तो माणूस म्हणाला.

कमाल आहे! आत्तापर्यंत जो जो माणूस माझे हरवलेले 50 रुपये परत द्यायला आला त्याला मी पैसे परत घे म्हणून सांगीतले तर प्रत्येकाने हेच उत्तर दिले!’ आजीबाई म्हणाल्या

माझे एक काम करशील?’ आजीबाईंनी विचारले.

हो सांगाना! तुमचे काम नक्की करीन!’ त्या माणसाने उत्तर दिले.

अरे बाबा! जाताना ती खांबावरची चिठ्ठी फाडून टाक. लोकांना उगीच त्रास होतो आणि भुर्दंड बसतो. मी सगळ्यांनाच ती चिठ्ठी फाडून टाकायला सांगीतली. पण अजून कोणी ते काम केलेले दिसत नाही. बहुतकरून विसरले असावेत. निदान तू तरी ते काम करून टाक असे म्हणून त्याला धन्यवाद देत त्या आजींनी त्यांच्या झोपडीचे दार बंद केले.

परत जाताना त्या माणसाला त्या खांबावरची चिठ्ठी दिसली. ती चिठ्ठी फाडण्यासाठी म्हणुन तो त्या खांबाजवळ आला आणि थबकला.

त्याच्या लक्षात आले की त्या एका चिठ्ठीमूळे माणुसकीचा झरा वाहू लागला आहे. त्या चिठ्ठीमूळे अनेक लोकांची मदत त्या गरीब आजीबाईंना मिळाली आहे. आपले ५० रुपये गेले पण एका गरजू माणसाला मदत केल्याचा आनंद व समाधान आपल्याला मिळाले. असेच समाधान त्या 40 लोकांना पण मिळाले असेल. ही चिठ्ठी जर आपण फाडून टाकली तर माणुसकीचा झरा आटून जाईल. त्याला ती चिठ्ठी लिहिणार्याच माणसाचे कौतूक वाटले आणि तो चिठ्ठी न फाडताच तेथुन निघुन गेला.

माणुसकी नाही! माणुसकी नाही!’ अशी हाकाटी आपण मारत असतो. ‘हल्ली माणुसकी शिल्लक राहीली नाही! माणसाला माणसाची पर्वा किंवा किंमत राहिली नाही अशी बोंब ठोकत आपण सगळीकडे फिरत असतो. पण समाजात माणुसकीचे असे ‘सुप्त झरे नेहमीच वाहत असतात. फक्त आपल्याला ते दीसत नसतात. माणुसकीचे हे झरेच समाजाला व माणसाला जिवंत ठेवत असतात. असे झरे हेच समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण असते.

तुम्हाला सुद्धा माणुसकीच्या अशा एखाद्या झर्याेमध्ये सामील होण्याची संधी मिळाली तर ती जरूर घ्या. इतरांना मदत केल्यामूळे जो काही आनंद किंवा समाधान मिळते याचा जरूर अनुभव घ्या!

अर्थात हा अनुभव घ्यायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचे..!!

“अति ई” म्हणजे ईऽऽऽऽऽऽऽऽ!


 “अति ई म्हणजे ईऽऽऽऽऽऽऽऽ!

गेल्या पाच-सहा वर्षांत ‘काॅपी-पेस्ट ही अभ्यासाची एक नवी पद्धत रूढ झाली आहे. शाळेपासूनच मुलांना विविध विषयांवरचे प्रोजेक्ट्स दिले जातात. विद्यार्थ्यांचं प्रत्यक्ष ज्ञान वाढावं, त्यांनी पाठ्यपुस्तकाबाहेर पडून माहिती मिळवावी, ती व्यवस्थित मांडणं, सादर करणं याकरिता खटपट करावी, त्यातून त्यांचं अवांतर वाचन वाढेल, नव्या गोष्टी समजतील, त्यांचं लेखनही सुधारेल आणि अर्थातच, यातून त्यांना आनंद मिळेल.. असा एक चांगला आणि शुद्ध हेतू समोर ठेवून प्रकल्पाधिष्ठीत शिक्षण सुरू झालं. पण, याची दुसरी बाजू गंभीरपणे विचारातच घेतली गेली नाही. म्हणूनच, या प्रकारामुळे फायदा होण्याऐवजी नुकसानच पदरी पडायला लागलंय.

अनेक घरांमधून या प्रकल्पांकरिता इंटरनेट वापरलं जायला लागलंय. शाळेतून प्रोजेक्ट चा टाॅपिक मिळाला की, इंटरनेटवरून माहिती डाऊनलोड करायची, ती आपल्या मेंदूला काहीही ताण न देता सरळ लिहून काढायची, तो प्रोजेक्ट आणखी आकर्षक व्हावा म्हणून इंटरनेटवरूनच फोटो किंवा चित्रं डाऊनलोड करायची आणि प्रिंट्स काढून चिकटवायची. जास्तीत जास्त एका तासाभरात आठ-दहा पानांचा प्रोजेक्ट तयार ! यात पालकांचीच ‘शिक्षकांनी उरावर बसवलेली ही नसती ब्याद उरकण्याचीच केविलवाणी धडपड मला दिसते. आता एखादी गोष्ट कशीही करून उरकायचीच असेल तर मग काय? - हपापा चा माल गपापा !

दहावीत गेलेल्या एका मुलाला त्याचं शुद्धलेखन चुकतंय म्हणून शिक्षकांनी संस्कृतमधली काही सुभाषितं प्रत्येकी दहावेळा लिहून आणायला सांगितली. तर, ती सुभाषितं त्याची आईच सकाळपासून लिहीत बसलीय ! त्या मुलाच्या इतिहास-भूगोलाच्या वह्यासुद्धा आईनंच पूर्ण करून दिल्या. धन्य ती माऊली...!

आपल्याला प्रत्येक गोष्ट इन्स्टंट मिळवण्याची सवय अंगवळणीच पडली आहे. मागच्या वर्षी कोजागिरीच्या निमित्तानं काही मित्रमंडळींना घरी बोलावलं होतं. बायकोनं स्वयंपाक घरीच केला होता आणि दूधही आटवलं होतं. घरी आलेल्या तिच्या मैत्रिणींनी तिला वेड्यातच काढलं. त्यांच्या मते, एवढा उपद्व्याप करत बसण्यापेक्षा जेवण आणि दूध सरळ बाहेरूनच मागवायला हवं होतं. तिच्या एका मैत्रिणीने तर कैरीच्या डाळीची सुद्धा बाहेर आॅर्डर दिली होती आणि पन्ह्याचा अर्क आणून त्यात पाणी मिसळून ‘रेडीमेड पन्हं दिलं होतं. जर पालकच इन्स्टंट गोष्टींच्या मागे लागलेले असतील तर मुलंही तशीच तयार होतील. त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे?

पण यामुळंच, एकूणच पहायला गेलं तर आळशीपणा वाढून खऱ्या विकासाला खीळ बसतेय की काय, असं वाटायला लागलं आहे. एकीकडे विनाकष्ट, विनासायास, बसल्याजागी सगळं अगदी सहज मिळावं ही वृत्ती विद्यार्थीदशेपासून आपणच आपल्या मुला-मुलींमध्ये विकसित करायची आणि दुसरीकडे ‘सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे कष्टांना तरणोपाय नाही हे पालुपद आपणच आळवायचं, हे आता नित्याचंच झालं आहे. त्यामुळेच पालकांचीच ‘शिक्षण आणि त्यातून अपेक्षित असणारा विकास या विषयीची कल्पना पुरेशी स्पष्ट नाहीय, असं जाणवतं. पण एक मात्र नक्की आहे की, असं दोन्ही डगरींवर एकाच वेळी चालणारं पालकत्व १००% महागात पडतंच.

अगदी हौसेनं मुलांना महागड्या, पाॅश, ब्रॅन्डेड शाळा-काॅलेजांमध्ये घालायचं, पण घरातून मात्र मुलांना इंटरनेट वापरून रेडीमेड अभ्यास उरकण्याला प्रोत्साहन द्यायचं, असा पालकांचा कल दिसतो. शिक्षण पूर्वीसारखं राहीलेलं नाही, बराच बदल झाला आहे, पुढंही होईल. पण माझ्या दृष्टीनं खरा बदल झाला तो पालकवर्गात. ३०-४० वर्षांपूर्वीच्या पालकवर्गात उच्चशिक्षित पालकांचं प्रमाण अगदीच नगण्य होतं. आता मात्र बहुतांश पालक शैक्षणिकदृष्ट्या स्वत: पदवीधर आहेत. आई आणि वडील हे दोघेही उच्चशिक्षित असण्याचंही प्रमाण आता बरंच वाढलंय. पण मग तरीही कुठंतरी पाणी मुरतंच आहे.

नुकताच मी पालकांचा व्हाॅट्सॲप ग्रुप पाहिला. वर्गशिक्षक शाळेतला गृहपाठ पालकांना व्हाॅट्सॲप ग्रुपवर पाठवतात. ही झाली सोय ! पण, या आई पालक फारच हुशार.. त्यांनी सर्व पालकांचा आणखी एक ग्रुप तयार केला, ज्यात वर्गशिक्षक नाहीत. या आया गृहपाठातले प्रश्न वाटून घेतात आणि त्याची उत्तरं स्वत: तयार करून ग्रुपवर शेअर करतात. बाकीच्या आया ती उत्तरं आपापल्या मुलांकडून झकासपैकी काॅपी करून घेतात. सगळ्या आया उच्चशिक्षित आणि चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत, कुणाकुणाचे स्वतंत्र व्यवसाय आहेत. पण, कळत-नकळत, जाणते-अजाणतेपणी यापैकी काहीही म्हणा, मुलांचं काॅपी-पेस्टींग चं शिक्षण मात्र घरातून जोरदारपणे सुरू आहे. टेक्नाॅलाॅजीचा असा उपयोग करून आपण आपल्या मुलांचं नुकसानच करतोय, हे या आयांच्या लक्षात येत नाहीय का?

इतकंच काय पण शाळेत जाणाऱ्या मुलांचेही व्हाॅट्सॲप ग्रुप्स आहेत.त्यावरूनही अशी आणि या व्यतिरिक्तही बरीचशी देवघेव चालते. मुलं अख्खं जर्नल सुद्धा स्मार्टफोन्समुळे काॅपी करून शेअर करायला लागली आहेत. आता यात काय गैर आहे? असं अनेकांना वाटेल. पण, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, या फोन्सच्या वापराचे भरपूर दुष्परिणाम आता विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये जाणवायला लागले आहेत. स्मार्टफोन्सचा वापर करणाऱ्या मुलांमध्ये लिखाणाचा कंटाळा आणि आळस वाढायला लागला आहे. इतकंच काय, केवळ तर्जनीचाच अधिक वापर करत राहण्याच्या सवयीमुळे त्यांचं हस्ताक्षर बिघडायला लागलं आहे. आकृत्या काढण्यातला सफाईदारपणा कमी होत चालला आहे. पुष्कळशा मुलांना साधी-साधी सोपी वाक्यंसुद्धा नीट लिहीणं जमत नाहीय. हात थरथरायला लागतो, बोटं आखडतात, एका सरळ रेषेत लिहीणंच जमत नाही. तर्जनी अधिक कठीण झाली की, पेन किंवा पेन्सिल पकडण्यातच अडचणी यायला लागतात. साहजिकच, लेखन म्हणजे कंटाळवाणं, नीरस, रूक्ष, बिनकामी खर्डेघाशी इ. वाटायला लागतं. म्हणूनच, स्क्रिन्स सर्फिंगवर जास्त वेळ घालवणाऱ्यांच्या लेखनात, हस्ताक्षरात समस्या असण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय.

स्क्रिन्सच्या अतिवापराचा आणखी एक परिणाम म्हणजे एकाग्रतेच्या समस्या बळावणे. एकाग्रतेच्या प्रचंड समस्या असलेली मुलं-मुली तुम्हाला तुमच्या आसपासच्या परिसरात विपुल संख्येने दिसतील. “स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, आयपॅड, लॅपटाॅप आणि टीव्ही यांचा वाढता वापर हा एक समान धागा यापैकी बहुतांश मुलांमध्ये दिसेल. स्क्रिन्सवर वेळ घालवताना डोळ्यांवरही विलक्षण ताण येतो. त्यातही स्क्रिन जितकी ब्राईट असेल तितका हा ताण वाढतोच. फटाफट स्क्रीन्स सरकवत राहण्याची सवय बोटांना जडली तरी स्कीनवर केवळ सेकंदभरासाठी लक्ष केंद्रीत करणं डोळ्यांना झेपलं तरी पाहिजे ना. पण, डोळ्यांवर प्रचंड ताण येत असतानाही मुलं अख्खी रात्र-रात्र सुद्धा या स्क्रीन्सच्या सहवासात घालवतात. मग, ताळतंत्र बिघडणं आणि अस्वस्थता येणं स्वाभाविकच आहे.  प्रचंड वेगाने सतत सर्फिंग करत राहिल्यामुळे वेळेचं भान तर राहत नाहीच, शिवाय मानसिक क्षमतांमधली चंचलता वाढते ती वेगळीच.

चा अतिवापर मुलांच्या वाचन-लेखन कौशल्यातला मोठा अडसर ठरतोय. उत्तम शब्दरचना करता येणं, यमक साधता येणं, भाषांमधला व्याकरणाचा पाया पक्का असणं, एखाद्या गोष्टीचा सारांश उत्तमरित्या मांडता येणं, एखाद्या कल्पनेचा विस्तार चांगला करता येणं, एखाद्या कवितेचं किंवा कलाकृतीचं रसग्रहण करता येणं, एका शब्दाकरिता अनेक शब्द योजणं किंवा अनेक शब्दांकरिता एक शब्द योजणं अशा अनेक क्षमतांमधली घसरण सुरू झाली आहे. लालित्य उतरणीला लागलंय. भाषिक कल्पनाशक्तीच्या विकासात अडथळे यायला लागलेत. हा निसर्गानं आपल्याला फुकटात बहाल केलेल्या सुंदर क्षमतांचा अपमानच आहे.

आता आपल्यालाच आपल्या क्षमतांची किंमत नसेल आणि आपलं नुकसान आपल्यालाच कळत नसेल तर, चक्रीवादळात भिरभिरणाऱ्या पानासारखी आपली गत होईल. त्यापेक्षा वेळीच सावध होऊन अतिरेक टाळलेला बरा.. नाही का?

©मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख,
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

मंगळवार, २३ एप्रिल, २०१९

सहज थोडंसं....*



सहज थोडंसं....*

तिचं makeup करणं , ब्रँडेड कपडे घालणं  , सण समारंभात मुरडणं सारं सारं बंद होतं ...

 अन् अचानक ती सर्वांना "गबाळी भासू लागते. तरीही ती त्याकडे लक्ष देत नाही कारण तिचं मातृत्व तिला तसं करू देत नाही...  अजूनही तिला मुलांची जबाबदारी असते....!!!!

हळूहळू पुरुषवर्गाला अशी गबाळी बायको माहेरी जाण्यात सुख वाटू लागत....

  तिचं साधेपणही खुपायला लागतं...काही मंडळींना इतर बायका सुंदर वाटायला लागतात... अन कर्तव्य बजावणारी बायको आणि मुक्त फिरणाऱ्या बायका यात तुलना सुरू होते... 

  पण तरीही ती याकडे दुर्लक्ष करून मुलांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करते... आतून ती मनाला काळजीने स्वतःच वाळवी बनुन पोखरत असते....     !!

आणि तिची पस्तिशी उलटते अन् अचानक ती अतिशय सुंदर भासू( ?)  लागते....

तिचे टॅलेंट नजरेत दिसू लागते.., तिचं आधुनिक राहणीमान , सुरेख hairstyle , नितळ त्वचा , मनमोकळं हसणं  ,

 वागणं ,घरातला सहज सुंदर वावर.., विविध स्पर्धा जिंकणं , रेसिपीत आवड निर्माण करणं,   सर्वात मिसळणं... सारं सारंच सुंदर वाटू लागतं..! 

पण खरंच ती चाळिशीतच सुंदर दिसते का???? 

खरं तर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना होणारी तिची फजिती कमी होते,  बाळाच्या शी शु तुन ती मुक्त होते ... ,टोमण्यांना उत्तर देण्याची धमक तिच्यात येते , सारं गेलेलं आयुष्य नव्याने उभारण्याची इच्छा जागृत होते ... अन् मनापासून तिला स्वतः साठी जगावसं वाटतं...!!!

पुनः तरुण व्हावंसं वाटतं...ती गबाळी, गावंढळ कधीच नसते फक्त कर्तव्य पार पाडायला प्राधान्य दिलं होतं हे तिला कळून चुकतं अन् “ती कात टाकते... . इतकं सहज सोपं गणित आहे ते.... 

मला वाटतं ... नवं
स्त्री जातक बाळ ते वयस्कर आजी सर्वच सुंदर असतात ... होतो तो आजूबाजूच्या दृष्टीकोनात बदल ...!

कॉलेज ची अल्लड तरुणी सुंदर नसते का??

पतींची वाट बघत असणारी घायाळ हरिणी सुंदर नसते का???
चंदेरी बट * सावरीत अन तोल जाऊ नये म्हणून तुरुतुरु चालणारी आजीबाई सुंदर नसते का???  
 
झाडाला फुल येण्यासाठी सुद्दा काही काळ जाऊ द्यावा लागतो ..  मग इतक्या प्रचंड बदलातून जाणारी स्त्री एका रात्रीत कशी बरं बदलेल??? 

 आणि तिने स्वतः च्या दिसण्यावरच भर दिला तर बाळाचं संगोपन तितकं चांगलं होइल का??
म्हणूनच बायको गेली माहेरी वगैरे फालतू , रिकामटेकडे जोक्स तर तिच्या बाईपणाचाच अपमान आहेत....त्यातून शरीरातील कमी होणारे कॅलशियम, hermonal changes अन् बदलते moods सांभाळून ती बदलून घेते स्वतःला ...

चाळीशीत *
तिचा आत्मविश्वास वाढलेला असतो म्हणून ती या वयात छान दिसते .. पण दृष्टी स्वच्छ असेल तर ती all time smart दिसते ..

माझ्या सर्व smart*मैत्रिणींना व त्यांना समजून घेणाऱ्या मित्रांना सलाम

नावात काय आहे ?



नावात काय आहे ?

 लक्ष्मीपूजनाची वेळ आली . सर्व उत्सुकतेने वाट पाहत होते की नवीन नवरीचे काय नाव ठेवण्यात येते. खरं तर नुकतीच पंचविशी गाठलेल्या कुमारी निशा गोरेचे लग्न श्रीयुत  रवि काळेबरोबर होणे हे काही ' लव्ह मेरेज ' वगैरे नव्हते . नावात आणि आडनावात कितीही विरोधाभास असला तरी हे लग्न दोघांच्याही घरच्यांच्या संमतीने व पसंदीने ठरलेले , ' अरेंज्ड मेरेज ' होते . ठरल्याप्रमाणे सर्व सुरळीत चालले होते व आता शेवटचा  अंक रंगला होता.

सौ.कां. कुमारी निशा गोरे म्हणजे शिक्षणात खूप हुशार अशी आपल्या आई वडिलांची एकुलती एक लाडकी लेक होती . लहानशा खेड्यातली राहणारी सुंदर , देखणी , आणि नाजूक सौ .कां . कुमारी निशा गोरे , पुणे शहरात एका मल्टीनेशनल कंपनीत कामाला होती . आई वडील खेड्यातले असले तरी त्यांनी सौ.कां .कुमारी निशा गोरेची प्रत्येक हौस पुरविली होती , या मुळे सौ . कां . निशा गोरे थोडी जास्तच लाडावलेली होती . गांव खेड्यातून आली असली तरी पुण्याचं हवामान तिला बरंच मानवलेल होतं , आणि शहरातल्या रंगात रंगायलाहि तिला फारसा वेळ लागला नाही .  - तर अशा या सौ . कां . निशा गोरेची लग्नापूर्वी आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी म्हणजे श्रीयुत रवि काळेशी जेमतेमच भेट झाली होती . सकाळी बघण्याचा कार्यक्रम झाला व संध्याकाळी साखरपुडा उरकला गेला , आणि मुलगा लगेच परदेशात जाणार म्हणून दहा दिवसातच लग्नाचा बेत ठरला . साखरपुड्याच्या दिवशी सतत तिला कोणी न कोणी घेरूनंच होतं म्हणून तिला  श्रीयुत रवि काळेशी धड बोलताहि आलं नव्हतं . त्या दिवशी तिला श्रीयुत रवि काळेला बरंच काहीं विचारायचं होतं . तिच्या बऱ्याच अटी तिला श्रीयुत रवि काळेला सांगायच्या होत्या . म्हणजे जसं  स्वयंपाक करणार नाहीं , धुणं धुणार नाहीं , केर वारा , जागा पुसणे , व कोणतेही घर काम करणार नाहीं . सासूसासऱ्यांची सेवा करणं जमणार नाहीं . वगैरे वगैरे . या शिवाय तिला एक दुसऱ्यांच्या आवडी निवडी , आणि एक दुसऱ्यांच्या स्वभावाबद्धल पण सविस्तर बोलायचं होतं . पण हे शक्य न झाल्याने ती थोडी फार नव्हे तर जास्तचं अस्वस्थ होती आणि  तिच्या मनात सारखी एक हुरहूर होती . बरं , लग्नसोहळा गावांत करण्याचे ठरले असल्यामुळे , तयारी करण्यासाठी ,लगेच पंधरा दिवसाची रजा काढून तिला आई वडिलांसोबतच  गावाला जावेच लागले . या सगळ्या बाबतीत विरस झाल्यामुळे,एकूण काय सौ . कां . निशा गोरेच्या चेहऱ्यावर , लग्नमंडपात एकाच वेळी अनेक भाव तरंगत होते .

आई वडिलांच्या लाडात वाढली असली तरी सौ कां निशा गोरे ही फार स्वाभिमानी मुलगी होती . वयाच्या इक्विसाव्या वर्षीच नोकरी करून आत्मनिर्भर झाली व आत्मविश्वास आणि स्वाभिमान जास्तच वाढला . पण इतकं असूनही अद्याप तरी  ती आईवडिलांच्या धाकात होती .म्हणून पटकन लग्नालाही तयार झाली . पण असं असलं तरी तिचं आपलं स्वतंत्र जग होतं , स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं , स्वतंत्र अस्तित्व तर होतचं . आणि विशेष म्हणजे ती आपल्या मतांवर ठाम असायची .  - मैत्रिणीशी कधी चर्चा होत असता मैत्रिणींना तिचे विचार कळायचे . एकदा शाळेत असताना  , ' स्त्री मुक्तीसाठी स्त्रियांनीच पुढाकार घ्यायला हवा ' या विषयावर स्पर्धेत निशा गोरेनी भाग काय घेतला , व तिला बक्षीस काय मिळाले , तिचा पुरुषांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला .पुढे महाविद्यालयात देखील ती स्त्री मुक्तीचा झेंडा फडकावू लागली . स्त्रियांवर अत्याचार हा आता तिचा आवडताविषय होत चालला होता . पुढे ती स्त्री चळवळीच्या क्षेत्रात कार्यरत अनेक संगठनांबरोबर जुळली . - कु . निशा गोरेचे विचार मैत्रिणींमध्ये वेगवेगळ्या चर्चेचे विषय असायचे . मग वाद हि व्हायचे .  ' तुझ्या  इतक्या प्रयत्नानंतर देखील खऱ्या अर्थाने स्त्रियां अद्याप हि स्वतंत्र व विकसित नाही , मग तुझा काय उपयोग ? 'असे म्हणून तिच्या मैत्रिणी तिला सारख्या चिथवत असे . मग कु.निशा गोरे अगोदर चिडायची , मग भडकायची , पण शेवट मात्र सर्वाना समजविण्याने आणि गोडी गुलाबीने व्हायचा . मग चर्चा परत आणखीनच रंगायची , सर्व विषयांना वेगवेगळे फाटे फुटायचे, व कु. निशा गोरे आपले विचार ठामपणे मांडायची . ' स्त्रियांना पुरुषांच्या कचाट्यातून स्वत:च मोकळं व्हावं लागेल . स्वत:चे  स्वातंत्र्य बळकवावे लागेल . हे स्वातंत्र्य किती टक्के आणि कितपत  हवे आहे , जेणे करून प्रत्येक स्त्रीला समाजात सन्मानाने जगता येईल याचा सारासार विचार प्रत्येक स्त्री ने खुद्द  आपल्या पुरता करावा . ' ती सर्वाना सतत सांगायची-  एकदा एका मैत्रिणी बरोबर कु. निशा गोरेचा असाचखूप वाद झाला . त्या मैत्रिणीनी तिला चिडून विचारले , " काय ग निशा , सारख्या सारख्या स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी काय करत असते तू ? प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते . तुझा आपला एकच पाढा . कंटाळा आला आहे तुझ्या एकाचएक गोष्टीचा . अग मला सांग , लग्नानंतर तू कुठं स्वतंत्र राहणार आहे ? तुझं अस्तित्वच बदलून टाकेल तो पुरुषांचा समाज , ती पुरुषांची  सत्ता आणि पुरुषी अहंकार . अग तुझ तर नाव सुद्धा बदलून टाकतील ते सर्व . ओळख हि बदलून टाकतील . तुझी स्वत:ची अशी वेगळी ओळखंच राहणार नाही . मग तेव्हा काय करणार आहेस तू ? "- बस झालं . त्या दिवशी पहिल्यांदाच कु. निशी गोरेला रात्रभर झोप लागली नव्हती . त्या रात्री पहिल्यांदाच तिच्या मनात लग्नाचाही विचार आला . पुरुषाचे महत्व जास्त कां  स्त्रीचे महत्व जास्त ? असलं  द्वंद रात्र भर सुरु होतं . मनातलॆ विचार मंथन काही केल्या थांबेच ना . अनेक प्रश्न मनात निर्माण होत होते , आणि उत्तर तिला सापडत नव्हते . लग्न झाल्यावर मुलीच सासरी कां जातात ? ईश्वराने स्त्रियांनाच मात्रत्वाच्या यातना कां दिल्या ? स्त्रीनेच चूल आणि मुल कां सांभाळावे ? पुरुषांच्या वाट्यात हे सगळे का नसावे ? समाज पुरुष सत्तात्मकचं का आहे ? सर्व महत्वपूर्ण निर्णय पुरुषचं कां घेतात ? मुलांना बापाचे नावंच का दिले जाते ? लग्न म्हणजे स्त्रीचं अस्तित्व व स्वातंत्र्य संपणं असतं का? लग्न म्हणजे स्त्रीची ओळख कायमची पुसली जाणं असतं कां ? माझ्याहि बरोबर हे सर्व असचं घडणार आहे कां ? जर पुरुषाची ओळख समाजात  तीच राहते , तर मग लग्न झाल्याने स्त्रीची ओळख का बदलली जाते ? तिचं तर नाव सुद्धा बदलतात . नाही नाही हा स्त्रीचा अपमान आहे . असं चालणार नाही . मी असं होऊ देणार नाही . कु. निशा गोरे चवताळली , ' लग्नानंतर मी माझं  नाव बदलू  देणार नाही .' कु .निशा गोरेनी सूर्योदयाच्या अगोदर जणू शपथचं घेतली , ' वेळ आलीतर नवऱ्याला त्याचे नाव बदलायला भाग पाडेन .' हा निर्धार झाल्यावरच कु. निशा गोरेला  पहाटे का होईना स्वस्थ झोप आली .  

श्रीयुत रवि काळेच्या हातात अंगठी होती . चांदीच्या ताटात असलेल्या तांदुळात , त्यानं ठरविल्या प्रमाणे त्याचे आवडते नाव तो अंगठीने कोरणार होता . तेवढ्यात सौ . कां . निशा  गोरे ( भावी काळे ) त्याला म्हणाली , " थांब . "- श्रीयुत रवि काळेनं  एक क्षण सौ . कां . निशा  गोरेकडे बघितलं . - " माझं नाव बदलायचं नाही . "- श्रीयुत रवि काळे गोंधळला . - " चांगलं गोरे आहे . काळे करण्याची गरज नाही . " सौ . कां . निशा  गोरेने लग्न मंडपात जणू एकादा बॉम्बच फोडला .- श्रीयुत रवि काळे चपापला . त्यानं आपला हात मागे घेतला आणि आपल्या आईकडे बघितलं . - " काय म्हणते सुनबाई तू ? अगं, लग्नानंतर तर प्रत्येक मुलीला आपलं नाव बदलावचं लागतं . " सासूबाईना वाटलं हत्ती गेला अनं शेपूट राहिली . - " मला माझी ओळख बदलता येणार नाही . मला लोकांनी  निशा गोरे म्हणूनचं ओळखायला हवं . " सौ . कां . निशा गोरेला एका पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी  घेतलेली आपली शपथ आठविली . - " म्हणजे ? " आता श्रीयुत रवि काळे थोडा गोंधळला  .- " म्हणजे , माझं नाव बदलायचं नाही . " न घाबरता  सौ . कां . निशा गोरे म्हणाली . - " आणि आडनावं ? " सासूबाईला आता राग आला होता . - " तेहि बदलायचं नाही . " तितक्याच ठामपणे शांत गंभीर स्वरात सौ . कां . निशा गोरे म्हणाली .- " हे कसं शक्य आहे ? " आता श्रीयुत रवि काळेच्या आईनी सौ.कां .निशा गोरेच्या आईकडे बघितलं . - " अगं पोरी तू हे काय म्हणते ? " आता सौ . कां . निशा गोरेचे वडील पुढे आले .  - " बरोबर आहे बाबा . मी माझं नाव आणि आडनाव बदलणार नाही . लग्न नावाचे नावाशी नाहीं , आणि आडनावाचे आडनावाशीहि नाहीं . लग्न एका मुलाचे एका मुलीशी होत आहे . " सौ .  निशा गोरेने वडिलांनाहि तेच उत्तर ठामपणे दिलं . - " हा काय नवीन प्रकार आहे ? " आता गुरुजी मध्ये पडले , " अगं पोरी लग्न म्हणजे दोन घराण्यांचे संबंध जुळतात . कुटुंबाचे कुटुंबाशीच नाती जुळतात ."- " ते सर्व जुनं . " सौ . कां . निशा गोरेहि माघार घ्यायला तयार नव्हती , " असं असेल तर मग मुलालाच नाव बदलायला सांगा . "- " आता अति होतंय बरं . " सौ . कां . निशा गोरेची आईआपल्या मुलीला रागे भरली . - " अगं आई , आता जग बदललं . काळहि बदलला . संसार दोघांना करायचा आहे . मग एकाचेच नाव का बरे बदलायचं ? दोघांच्याही नावाने आमची ओळख व्हायलाहवी. मुलीनेच आपली ओळख कायमची का पुसून टाकायची?तिनंच आपलं अस्तित्व का संपवून टाकायचं ? काही असो , मी वाहून जाणाऱ्यांपैकी नाही आणि प्रत्येक गोष्टीला होकार देणारी सुद्धा नाही .

श्रीयुत रवि काळे हे सर्व चुपचाप ऐकत होता . आता तोहि मध्ये पडला , " माझं नाव आणि आडनाव तुला बदलायचं आहे ? मग घे ही अंगठी आणि तुझ्या आवडीप्रमाणे ठेव माझे नाव . अगदी सहज  सरळ भाषेत श्रीयुत रवि काळे म्हणाला आणि त्याने सौ . कां . निशा गोरेच्या हातात अंगठी दिली . - आता दचकण्याची वेळ सौ . कां . निशा गोरेची होती .- " बरं मला सांग  ओळख म्हणजे नक्की काय ? " श्रीयुत रवि काळेने सौ . कां . निशा गोरेला  विचारले . - आता पाहुण्यांनाहि या प्रकरणात मौज वाटू लागलीहोती . प्रकरणाचा छडा काय लागतो याची सर्वाना उत्स्कुता होती .  - निशा गोरे अजूनही हातात अंगठी घेऊन होती . श्रीयुत रवि काळेकडून तिला ही अपेक्षा नव्हतीच. तिचा अंदाज होता की श्रीयुत रवि काळे तिचा विरोध करेल. मग वाद होतील . आणि ती पुन्हा एकदा सर्वांना पटवून देईल की स्त्रियांचे स्वातंत्र्य किती गरजेचे आहे. पण हे असं काही झालचं नाही , उलट श्रीयुत रवि काळे तिला शांतपणे प्रश्न विचारात होता , आणि या नव्या उद्भवलेल्या परिस्थिती मुळे ती गांगरली . - "अगं सांग ना ओळख म्हणजे काय ? " श्रीयुत रवि काळेने तिला पुन्हा विचारले . सर्व मंडळी या दोघांकडे आश्चर्याने बघत होती  . सर्वांना निकालाची उत्सुकताही होतीच . - सौ . कां . निशी गोरेला असं वाटलं की तिच्या स्त्री स्वातंत्र्याच्या मोहिमेला आणि  लढा देण्याच्या वृत्तीला पूर्ण समाजचं जणू आव्हान देत आहे . पण सर्वांच्या समोर दोनदा विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आता तिला देणे  भाग होते . नाही तर स्त्रियांच्या लढ्यात तिनं माघार घेतली असं तिच्या मनाने सतत तिला दोष दिला असता . - " ओळख म्हणजे , जशी मी ' निशा गोरे ' च्या नावाने ओळखली जाते . " तिनं प्रश्नांचे उत्तर दिले . -नवीन नवरी बोलली म्हणून सर्वांनी जोराने टाळ्या वाजवून तिचे अभिनंदन केले . - " ते झालं तुझ्यासाठी संबोधन . याला एक प्रकारची आपण खूण म्हणू शकतो . पण या जगात निशा नावाच्या अनेक मुली असतील आणि निशा गोरे नावाच्याहि काही मुली सापडतील . मग तुझी ओळख नक्की काय ? "श्रीयुत रवि काळेने तिला विचारले ," तुझं नाव , तुझा चेहरा , तुझं शिक्षण , तुझी नोकरी , तुझी आवडनिवड , तुझा स्वभाव , तुझा व्यवहार , नक्की कशाने आम्ही तुला ओळखावं , अशी तुझी अपेक्षा आहे ?- आता सौ .कां .निशा गोरे चपापली .तिनं श्रीयुत रवि काळेकडे बघितलं, तो शांत होता . तिच्या मनात विचार आला , ' श्रीयुत रवि काळे  जाम भारी आहे . दिसतो तेव्हढा बावळट नक्कीच नाही .' पणआता काय करायचं ? माघार कशी घ्यायची ? हे प्रकरणवाढत चाललंय . तिच्या स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळीचा असा अंत होणार का ? ' नाही नाही , हे होता कामा नये .' मनातल्या एका कोपऱ्यातून आवाज आली , ' तर्क करता येत नाही म्हणून लगेच हार मानण्याचे काहीच कारण नाही ' . - " आश्चर्य वाटतंय  ? " श्रीयुत रवि काळे तिला म्हणाला आणि तिची तन्द्रा भंग झाली .- " अगं , नाव म्हणजेच नुसती ओळख नसते . हे म्हणजे आधारकार्डसारखे आहे . आता येणाऱ्या दिवसांमध्ये सर्व लोक आधारकार्डनेच ओळखले जाणार आहे . यालाच तुझ्या म्हणण्याप्रमाणे ओळख म्हणता येईल कां  ?"-सौ . कां . निशा गोरे हळूहळू निरुत्तर होत चालली होती . काय बोलावे आणि काय करावे हे तिला समजत नव्हतं . - " अगं , ओळख म्हणजे माणसाचे संपूर्ण व्यक्तिमत्व . यात सर्व आलं , नाव, चेहरा , गुण , योग्यता , संस्कार , आवडनिवड , वागणूक , वगैरे वगैरे .हेच सर्व गुण माणसाची खरी ओळख .कोणताही अन्याय होणार आहे या कल्पनेने  व भीतीपोटी त्या गोष्टीचा विरोध करणे याला कोणाच्याही मुक्तीसाठी चळवळ म्हणता येत नाही . स्त्री आणि पुरुष ईश्वराची अमुल्य देणगी आहे . एक दुसऱ्याचे पूरक आहे . एक दुसऱ्याचे वैरी नाही .  खरं तर कोणीही कोणावर अन्याय करता कामा नये . उत्तम आणि योग्य व्यवस्थेच्या द्रष्टीने समाजानेच विवाहसंस्था बनविली . नंतर आयुष्य सुरळीत जावं , आणि येणाऱ्या घरात निष्ठा वाढावी  म्हणून  मुलीचं नाव बदलण्याची परंपरा पडली . पण नाव बदलणं  हा कोणताही मुद्दा होऊच शकत नाही .यात फक्त सोयीचाच विचार झाला असावा आणि नंतर हि प्रथा झाली असावी . "- श्रीयुत रवि काळे जणू न थांबता प्रबोधनच करत होता . आणि सौ .कां .निशा गोरेला   आश्चर्याचे धक्के देत होता . "- "  तुम्ही दोघं का स्पर्धेत भाग घ्यायला बसला आहात कां ? " आता गुरुजी भडकले , " अहो लवकर करा , लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त निघून जाईल . "- सौ . कां . निशा गोरेनी चुपचाप श्रीयुत रवि काळेच्या हातात अंगठी ठेवली .- श्रीयुत रवि काळेनी अंगठीने ताटातल्या तांदुळात नाव कोरले - ' निशा '  - आता मात्र निशा गोरेला आश्चर्याचा धक्का बसला .- सर्वांनी टाळ्या वाजविल्या . दोघांनी सर्वांनापेढे वाटले . मग ' उखाणा घ्या उखाणा घ्या ' असं एक स्वरात सर्व म्हणाले . श्रीयुत रवि काळेनी उखाणा घेतला . -- आम्हीं दोघे , आमचा विश्वास , आमचीच आशा सर्वे ऐका आज पासून आमचे आडनाव ' रविनिशा '- हा उखाणा घेतल्यानंतर श्रीयुत रवि काळेनी सौ . कां . निशा ' गोरेकाळे ' च्या तोंडात पेढा भरविला .- सर्व मंडळी टाळ्या वाजवीत होते . -- श्रीयुत रवि काळेचे आईवडील मात्र आपल्या मुलाच्या ,आडनाव बदलण्याच्या या अनपेक्षित निर्णयाला आश्चर्याने सामोरे जाण्याचा प्रयत्न करीत होते .     

( पुरूषप्रधान मानसिकतेला स्त्रीप्रधान मानसिकता हे उत्तर होऊ शकत नाही. परस्पर सामंजस्यानेच हा प्रश्न सुटू शकतो.

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा