Pages

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

प्रेम

ही गोष्ट आहे एका अमेरिकन आई आणि तिच्या जुळ्या मुलींची ...ही आई स्वभावाने अत्यंत प्रेमळ, उदार, सतत इतरांचा विचार करणारी, देणारी.. तिला जुळ्या मुली झाल्या.. वेळेआधी प्रसूती झाल्यामुळे दोघीही अत्यंत अशक्त होत्या.. डॉक्टरांनी सांगितले होते की त्यांची  जगण्याची शक्यता खूप कमी आहे.. पण हार मानेल ती आईच नाही.. या आईने पण आपल्या मुलींच्या जीवन रक्षणासाठी कंबर कसली आणि जणू साक्षात अमृत पाजून त्यांना मृत्यूच्या दाढेतून खेचून काढले.. दोघी मुली जगल्या,शिकून मोठ्या झाल्या आणि आपल्या आपल्या मार्गी लागल्या.. वडिलांच्या निधनानंतर आई एकटीच, स्वयंपूर्ण स्वावलंबी जीवन जगत होती.. परोपकारी असल्याने अनेक जणांना आपल्या मदतीने .. सल्ल्याने आपले करत होती.. जुळ्या मुलींपैकी एक मुलगी मोठी होऊन डॉक्टर, मनोविकार तज्ञ झाली.. डॉक्टर असल्यामुळे ती बरेचदा काळजीपोटी आईला म्हणायची की आता उतारवयात एकटी राहण्यापेक्षा तिने मुलीसोबत राहायला यावे.. पण आईला काही ते पटायचे नाही.. तिचे म्हणणे मला कोणावर ओझं नाही व्हायचं.. अशीच काही वर्ष सरली आणि वार्धक्यामुळे  आई आजारी पडली आणि नाईलाजाने का होईना या डॉक्टर मुलीकडे राहायला आली.. मुलीने अत्यंत प्रेमाने तिची सेवा, उपचार सुरु केले.. मात्र जवळ जवळ दोन वर्ष बिछान्यावर राहून खूप हाल होऊन शेवटी या आईचा मृत्यू झाला..

मुलीला साहजिकच खूप वाईट वाटले.. कालांतराने जरी ती रोजच्या व्यवहाराला लागली तरी राहून राहून तिच्या मनात एकाच प्रश्न येई की आपल्या आईने जन्मभर इतरांना काही ना काही दिले, इतकी सेवा केली .. तरीही तिच्या वाट्याला  असे अगतिक मरण का यावे?? खूप बेचैन होई ती या विचाराने आणि तिच्या देवावरील श्रद्धेलाही कुठेतरी तडा जाऊ लागला.. देवाला ती एकच प्रश्न विचारी की माझ्या आईसोबत तू असा अन्याय का केलास??असेच दिवस सरत होते. एकदा तिची बेचैनी बघून कोणीतरी तिला सुचवले की तुम्ही ध्यान करायला शिका.. ध्यानावस्थेत माणसाला त्याच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात.. हे ऐकुन तिने ध्यान करायला शिकण्याचे ठरवले आणि तसे केले.. त्यानंतर ती नियमितपणे ध्यान करू लागली आणि काहीच दिवसांत बरीच शांत झाली.. तरीही तिच्या मनातील प्रश्न अजून अनुत्तरितच होता..

मात्र एके दिवशी ती ध्यान करायला बसली आणि खोल ध्यानावस्थेत तिला एक ज्ञान रुपी संदेश मिळाला..तिला जाणवले की जणू कोणीतरी तिच्या प्रश्नाचे उत्तरच देत आहे.. काय होते ते ज्ञान रुपी  उत्तर?? तिला समजले की तिच्या आईने आसपासच्या सर्वांना खूप प्रेम दिले ..प्रेम म्हणजे देणे... हा धडा तिने चांगलाच आत्मसात केला. पण प्रेमाचा तितकाच महत्वाचा धडा म्हणजे इतरांच्या प्रेमाचा कृतज्ञतापूर्वक  स्वीकार करणे,जो ही आई सतत नाकारत राहिली. अगदी स्वतःच्या  मुलीकडून सुद्धा.. आणि म्हणूनच या जन्मातील प्रेम घेण्याचा हा धडा तिने पूर्णपणे

शिकावा म्हणून आयुष्याची शेवटची वर्ष तिने इतरांचे प्रेम आणि सेवा घेत घालवली.

ही गोष्ट वाचल्यावर मलाही माझ्या आयुष्यातील अनेक असे प्रसंग आठवू लागले. जेव्हा मी माझ्या अज्ञानापोटी, अहंकारापोटी  इतरांचे प्रेम नाकारत होते, त्याचा अव्हेर करत होते, त्यांना दुखवत होते.. मला चांगलेच कळले होते की प्रेम करणे, प्रेम देणे जशी कला आहे तसेच प्रेमाचा सन्मानाने स्वीकार करणे ही पण त्याला पूरक कला आहे.. आणि विचारातला  हा बदल कृतीत जसा येऊ लागला, कुणाकडून मदत मागताना पूर्वी येणारे अवघडलेपण नाहीसे होऊ लागले, नाती जास्त खोल ,जास्त समृद्ध होऊ लागली आणि जीवन जास्त सोपं... जास्त आनंदी आणि सार्थक होऊ लागले.. मी भरभरून देईन पण घेणार मात्र नाही, हा माझा अहंकार आहे.. कोणी कितीही म्हटले की माझे कोणा वाचुन काही अडत नाही, मला कोणाची गरज नाही तरीही हे जग परस्पर अवलंबन याच तत्त्वावर  चालले आहे, म्हणूनच त्याला जीवनचक्र म्हटले जाते.. आणि चक्रातील प्रत्येक बिंदू केंद्राशी जोडलेला आहे.. तसेच या सृष्टीत सुद्धा प्रत्येक कण हा त्या वैश्विक चेतनेचा अंश आहे आणि त्याचे काही विशिष्ट प्रयोजन आहे.. मुळात या सृष्टीची निर्मिती ही त्या सर्वोच्च शक्ती च्या प्रेमाचा आविष्कार आहे.. त्याच्या आपल्यावरील प्रेमाचा आदराने स्वीकार करूया आणि हे प्रेम जास्तीत जास्त उधळूं या प्रत्येक कणावर....प्रत्येक क्षणी..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रत्नदुर्ग किल्ला व त्यावरील शिवसृष्टी रत्नागिरी जिल्हयात पर्यटनासाठी एक छान स्पॉट

  रत्नदुर्ग किल्ला व त्यावरील शिवसृष्टी रत्नागिरी जिल्हयात पर्यटनासाठी   एक छान स्पॉट     Ratnadurg Fort, Bhagvati port, Ratnagiri        ...

आणखी पहा