Pages

मंगळवार, २३ एप्रिल, २०१९

माझी निवड चुकली तर नाही ना ?


माझी निवड चुकली तर नाही ना ?

एका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, "मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल?". वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला, "तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय?" अत्यंत गंभीरपणे तिने उत्तर दिले," तुम्ही कसे काय ओळखले?" वक्ते महाशय उत्तरले,"तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे दिसतेय. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे.

प्रत्येक नात्याचे एक चक्र (सायकल) असते. सुरूवातीला तुम्ही तुमच्या साथीदाराच्या प्रेमात पडता. तुम्ही त्याच्या फोन्सची वाट पाहता, त्याच्या स्पर्शाची इच्छा धरता, त्याच्या आवडींवर सवयींवर प्रेम करता. प्रेमात पडणे मुळीच कठीण नसते. खरं तर तो एक पूर्णपणे नैसर्गिक आणि उत्स्फूर्त असा अनुभव असतो. प्रेमात पडण्यासाठी तुम्हाला वेगळे असे काही करायचेच नसते. म्हणून तर त्याला प्रेमात 'पडणे' असे म्हणतात. प्रेमात असणारी माणसं त्यांच्या अवस्थेचं वर्णन करताना कधी कधी म्हणतात, "I was swept off my feet" हे जे वर्णन आहे ते जरा दृश्य स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करून बघा. त्याचा अर्थ असा लागतो की तुम्ही आपले तुमचे तुमचे उभे होता, काहीही न करता आणि अचानक तुमच्या बाबतीत काही तरी घडले.

प्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण परस्परांसोबत काही महिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. प्रत्येक नात्याचे हे असेच नैसर्गिक असे सायकल असते. हळूहळू फोन कॉल्स (अद्यापही येत असतील तर) कंटाळवाणे वाटू लागतात. स्पर्श हवाहवासा वाटेनासा होतो. तुमच्या साथीदाराच्या सवयी-आवडी, ज्या तुम्हाला सुद्धा आवडत असत, आता तुमचे डोके उठवू लागतात. नाते या अवस्थेला पोहोचल्याची लक्षणे प्रत्येक नात्यागणिक वेगवेगळी असतात. तुम्ही जेव्हा प्रेमात पडला त्या वेळेची अवस्था आणि नंतरची किंवा सध्याची ही कंटाळवाणी किंवा संतापजनक अवस्था - या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचे तुम्हास जाणवते. या ठिकाणी कदाचित तुमच्या किंवा तुमच्या साथीदाराच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की माझी निवड चुकली तर नाही ना? तुम्ही अनुभवलेली प्रेमाची धुंदी तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा, अन्य कोणाबरोबर का होईना, पण आपल्याला ती नशा पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी असे तुम्हास वाटू लागते. आणि ह्या वेळी नाती तुटायला लागतात.

नात्यात यशस्वी व्हायचं असेल किंवा ते शाबूत ठेवायचं असेल तर त्याची एकच गुरुकिल्ली आहे. नात्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे ही ती गुरुकिल्ली नव्हे. तर जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावर प्रेम करणे ही ती गुरूकिल्ली आहे.

The key to succeeding in a relationship is not finding the right person; it's learning to love the person you found.

आपण दु:खात आहोत याला जवाबदार आपला जीवनसाथी आहे असे लोक समजतात आणि वैवाहिक संबंधांच्या बाहेर आनंद शोधायला जातात. विवाहबाह्य संबंध हे सर्व रंगा रुपांत बघायला मिळतात. अनैतिक संबंध हे त्याचे एक सर्वात कॉमन रूप आहे. पण बरेचदा लोक अन्य मार्गांकडेही वळतात.

स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.

कारण (हे लक्षपूर्वक ऐका) : एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली - जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे -
हीच आहे !!

प्रत्येक 'स्त्री' ने वेळ काढून वाचावा असा लेख


प्रत्येक 'स्त्री' ने वेळ काढून वाचावा असा लेख


पाऊस येतोय म्हणून तो थांबेपर्यंत शाळेत थांबण्याची वेळ माझ्यावर कधीच आली नाही.. कारण मी पाऊस येतोय म्हणून कधी थांबलेच नाही.. उलट पाऊस थांबायच्या  आत आपण घरी निघायला हवं अशाच प्रयत्नात मी असायचे.. कारण माहित होतं की असं पावसात भिजून घरी गेलं म्हणजे मस्त गरम गरम ओवा अन मोहरीच्या तेलाची गेल्या गेल्या मालिश मिळणार.... आणि ती ही न चुकता,प्रत्येक वेळी..मिळतच असे.... भिजु नको, असं सांगीतलेलं असताना जरी भिजले तरी.. बोलणे बसायचे ... अन त्या सोबत हे तेलही हजर असायचं..

नंतर जेव्हा घरापासून लांब राहू लागले तसतसं पावसात भिजणंही हळूहळू कमी होत होत बंदच झालं.असं नव्हतं की जीवनात, आजुबाजुला माणसं नव्हती...पण तेव्हा कोणाच्याच हे लक्षात हे कधीच नाही आलं की पावसात भिजलेल्या मुलीच्या तळपायांना छान कोमट कोमट मोहरीच्या तेलानं मालिश करावं..कधीच नाही....

अशा शेकडो -हजारो गोष्टी आहेत, की ज्या आई नेहमी करायची, पण आईपासून लांब गेल्यावर कोणीच नाही केल्या...

तःयानंतर कोणी कधी डोक्याला तेल लावून मालिश नाही करुन दिलं.आज एखादा दिवस जरी आईकडे गेलं तरी आई डोक्याला तेल लावून मालिश जरुर करुन देते....
लहानपणी स्वयंपाक आवडीचा नसेल तर आई दहा ऑप्शन द्यायची..गुळतूप पोळी खा,मेतकुट भात खा,थालीपीठ करुन देऊ का? दही साखर पोळी खातेस का,शिकरण पोळी देते...असे एक ना अनेक....आई असे शेकडो नखरे सहन करायची.....आणि तरी भांडण पण तिच्याशीच व्हायचं..

पण नंतर कोणी तिच्याइतके लाड नाही केले....मी पण मग हळूहळू सगळ्या भाज्या खायला लागले...

माझ्या आयुष्यात आई एकच आहे.... परत नंतर कोणीच आईसारखी नाही आली.... मी मात्र मोठी होऊन आई झाले.... मुली होतातच नं आई आपोआप.....

प्रियकर,नवरा --कधी कधी छोटं मुल होतात..कधीकधी त्याच्यावर आपण खुप खुप प्रेम करतो... आपल्या ते लक्षातही येत नाही.... त्यांच्या डोक्याला मस्त गरम तेलाने मालिश होते, त्यांच्या आवडीचे पदार्थ बनतात.... त्यांचे सगळे नखरे आपण नकळत सहन करायला.. पुरवायला लागतो.. स्वतःला विसरून...

मुलांच्या... पेक्षा पुरुषांच्या जीवनात अनेक रुपात आई येते.. बहिण पण आई होते, बायको तर आई असतेच... काही काळानंतर मुलीही बाबांची आई बनतात.. पण.... पण..... मुलींजवळ फक्त एकच आई असते... मोठं झाल्यावर त्यांना आई नाही मिळत.. ते प्रेम, ते नखरे,तो हट्टीपणा आईशिवाय कोणीच नाही सहन करत.. आई परत फिरुन कधीच येत नाही....

मुलींच्या जीवनात आई फक्त आणि फक्त एकदाच येते..




वेळ ?



वेळ ?

वेळ आली, वेळ झाली, वेळ गेला असं आपण म्हणतो. पण कधी विचार केलाय हा वेळ किंवा ज्याला आपण काळ म्हणतो, म्हणजे नेमकं काय ? घड्याळ थांबतं पण वेळ थांबत नाही. कधी वेळेला नियंत्रणात आणता आलं तर काय धमाल येईल नाही का ?
पण वेळ म्हणजे नक्की काय संकल्पना आहे?

वेळ हि अद्भुत संकल्पना आहे. आपण त्रिमितीय अस्तित्व (3D existence) किंवा अवकाश (space) लांबी, रुंदी आणि उंची ह्या परिमाणांचा वापर करून मोजतो. पण वेळ म्हणजे अस्तित्वाची हालचाल किंवा अस्तित्वातले बदल मोजण्याची मिती. याला आपण चौथी मिती पण म्हणू शकतो (Fourth dimension). लांबी असल्याशिवाय रुंदी असू शकत नाही. लांबी आणि रुंदी असल्याशिवाय उंची असू शकत नाही. आणि लांबी-रुंदी-उंची असल्याशिवाय वेळ असू शकत नाही. आता हे काय भलतंच ?
पण थोडा विचार करा.

तुमच्या समोर एक वस्तू आहे. तिचं अस्तित्व आहे. कारण त्याला काहीतरी लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची आहे. आता पुढे कल्पना करा, ती वस्तू १० मिनिटांपासून तुमच्या समोर आहे. १० मिनिटांपासून आहे, म्हणजे तिचं अस्तित्व आहे, बरोबर? आता कल्पना करा, ती वस्तू १ मिनिटांपासून तिथे आहे. तरीपण तिचं अस्तित्व आहे. पण समजा ती वस्तू शून्य (०) मिनिटांपासून तिथे आहे. म्हणजे तिचं अस्तित्व शून्य आहे. याचा अर्थ तिचं अस्तित्वच नाही. वेळ आहे म्हणून तिचं अस्तित्व आहे. आता समजा, ती वस्तू ज्या जागेवर आहे, तिथून ५ इंच पुढे जाते. म्हणजे काहीतरी हालचाल होते. ती हालचाल जरी काही तरी एका सेकंदात झाली असेल, पण तरी काही वेळ लागला तेव्हा आपल्याला सांगता येतं की हालचाल झाली. जर ती हालचाल शून्य सेकंदात झाली तर, हालचाल झाली असे सांगता येईल काय ?

आईनस्टाईनच्या सिद्धांतानुसार वेळ आणि अवकाश या दोन्ही गोष्टी परस्परसलंग्न आहेत. वेळ आहे म्हणून सर्व आहे, आणि सर्व आहे (तीनही मिती आहेत) आणि त्यांची हालचाल आहे म्हणून वेळ आहे.

जर काहीच नाही, तर वेळ असेल का ? विश्वनिर्मितिच्या आधी वेळ ही संकल्पना होती का ? वरील तर्क विचारात घेतल्यास विश्व निर्माण व्हायच्या आधी वेळच नव्हती असा निष्कर्ष निघतो. विश्वनिर्मिति च्या वेळेस उर्जा, वेळ आणि अवकाश तयार झाले असं मानतात. पण विश्वनिर्मिती ही एक घटना आहे. आणि घटना घडली असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वेळ ही संकल्पना आलीच..!

सोमवार, २२ एप्रिल, २०१९

सुधा_मूर्ती

सुधा_मूर्ती

"इन्फोसिस फाउंडेशन'च्या प्रमुख आणि "गेट्‌स फाउंडेशन'च्या सार्वजनिक आरोग्यविषयक उपक्रमाच्या सदस्य या पदांवरून त्यांनी केलेले कार्य स्तिमित करणारे आहे. खरेतर, "इन्फोसिस' या आज जगविख्यात असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीची उभारणी सुधाताईंनी एक गृहिणी या नात्याने केलेल्या सुमारे दहा हजार रुपयांच्या बचतीतून झालेली आहे. नारायण मूर्ती हे आवर्जून अनेकदा या बाबीचा उल्लेखही करतात.

सुधा कुळकर्णी-मूर्तींचा जन्म १९ ऑगस्ट, इ.स. १९५० ; शिगगाव, कर्नाटक येथे झाला.त्या एम.टेक.आहेत. टेल्को या कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या. कॅलटेक (अमेरिका) ह्या प्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञ श्रीनिवास कुळकर्णी यांच्या, तसेच जयश्री कुळकर्णी-देशपांडे (प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक गुरु राज देशपांडे यांच्या पत्नी) ह्यांच्या भगिनी आहेत. त्यांना रोहन व अक्षता ही अपत्य आहेत.

सुधा मूर्ती यांनी नऊपेक्षा अधिक कादंबर्‍या लिहिलेल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह आहेत.त्यांच्या 'ऋण ' या कानडी कथेवरील पितृऋण हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

सामाजिक कार्य करताना सुधाताईंनी प्रपंचही नेटका केला आहे. त्यांची जीवनशैली कमालीची साधी आहे. मध्यंतरी त्या कोल्हापुरात आल्या, तेव्हा  सहकाऱ्याबरोबर महालक्ष्मीच्या दर्शनाला गेल्या होत्या. येताना त्यांनी देवळाबाहेर बसलेल्या बाईकडून आठ आण्याचे आवळे आणले! नारायण मूर्ती हे आवर्जून विचारले, "हे काय! एवढीच खरेदी?' त्या हसून उद्‌गारल्या, "मी शॉपिंग करतच नाही!' काही वर्षांपूर्वी हरिद्वारला गंगास्नानासाठी त्या गेल्या होत्या. प्रिय वस्तूचा त्याग करावा, असा संकेत तेथे असतो. सुधाताईंनी त्याक्षणी शॉपिंग बंद केले ते कायमचेच.
साधी पांढऱ्या रंगाची साडी त्या परिधान करतात.
रंगीत कपड्यांची त्यांना आवडच नाही.

सुधा मुर्ती ह्या प्रसिध्द अशा १०,००० कोटीचा व्याप असलेल्या इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा असुन दरवर्षी त्या २५० कोटी पेक्षा जास्त रक्कम देणगी म्हणून दान करतात. तरीही अतिशय साधी राहणी ठेवण्याकडे त्यांचा खास कटाक्ष असतो...
सुधा मुर्ती नेहमी ज्या साड्या घालतात.
त्या साड्या कमी किंमतीच्या असतात...
पर्स २०० ते ४०० रुपयाची असते..
मनगटी घड्याळ वेळ बघता अाली म्हणजे फार झाले म्हणून घड्याळही साधे सुधे ८००९०० रुपयाचे असते.
मोबाईल ७ ते ८ हजाराचा ..
फेसबुक, व्हाटसअॅप मध्ये १५१५ दिवस लक्ष घालत नाही.
पायातील चप्पल सुध्दा महागडी नसते.
कोणत्याही ब्रॅन्डेड वस्तु वापरत नाही.
घरातील सर्व कामे स्वत:च करतात.
नातेवाईक व मित्रपरिवार यांचे घरातील सर्व लग्न व
दु:खद प्रसंगी हजर राहतात.

सुधा मुर्तींचा जेथेही प्रवेश होतो.
तेथील अहंकारी नजरा क्षणार्धात लाजेने खाली झुकतात..
हजारो कोटीची सम्राज्ञी असलेल्या सुधा मुर्तींचा साध्या राहणीमानातला वावर सर्वांना अचंबित करुन सोडतो,
अापण कोण अाहे हे विसरुन इतरांना मोठेपणा देत ही बाई जेव्हा सर्वांची स्वत:हून पुढे जाऊन अास्थेने चौकशी करु लागते तेव्हा मी मी म्हणणार्‍यांचा अहंकार क्षणार्धात गळून पडतो..!

राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कारासाठी प्रसिद्ध साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांची झालेली निवड अत्यंत उचित अशीच आहे. शिक्षण, विज्ञानप्रसार, साक्षरता प्रसार, आरोग्य अशा विविध क्षेत्रांत झोकून देऊन सातत्याने कृतिशील राहिलेल्या सुधाताई हे विलक्षण चैतन्याने भारलेले व्यक्तिमत्त्व आहे. मराठी-कन्नड-इंग्लिश भाषांतील असंख्य अप्रतिम पुस्तकांच्या वाचकप्रिय लेखक म्हणून त्या प्रसिद्ध आहेतच; पण त्याहून अधिक मोलाचे त्यांचे सामाजिक कार्य आहे. सुधा मूर्तींनी सामाजिक कार्याचे जे टोलेजंग डोंगर उभे केले आहेत, ते पाहिल्यावर "साहित्यिक सामाजिक कार्यात उतरत नाहीत' असे बोलण्याची हिंमत कुणाला होणार नाही.

कर्नाटकात त्यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागांतील शाळांमध्ये तब्बल १०१५० ग्रंथालयांची निर्मिती झाली आहे. सर्व शाळांमध्ये कॉम्युटर उपलब्ध करण्याचे त्यांचे कार्य इतिहासाने नोंद घ्यावी असेच आहे. असंख्य अनाथालयांची उभारणी त्यांनी केली आहे. जलसंधारण योजना, माध्यान्ह भोजन योजना, हजारो स्वच्छतागृहांची उभारणी, महिलांसाठी वसतिगृहे, पूरग्रस्तांसाठी घरांचे बांधकाम, शाळा इमारतींचे बांधकाम, सैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार, झोपडपट्टी, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी आरोग्य सुविधा, अशी असंख्य समाजोपयोगी कामे त्यांनी कमालीचे कष्ट घेऊन साध्य करून दाखविली आहेत. मुख्य म्हणजे हे सारे करताना "माझ्यामुळे ते झाले, मी केले' असा सुधाताईंचा आविर्भाव कधीच नसतो. समाजातील सर्व थरांतील नागरिकांना जोडून घेऊन त्यांच्या माध्यमातून विविध कामे लीलया मार्गी लावणे, ही त्यांची खासीयत आहे

९०/१० तत्व



९०/१० तत्व

फक्त १०% जीवन हे आपल्या सोबत काय घडलंय यावर आहे, आणि ९०% जीवन हे त्यावर आपल्या प्रतिक्रियावर अवलंबून आहे.
जे घडतंय त्या १०% वर आपला काहीही ताबा नसतो.
उदा. गाडी बंद पडणे, ट्रेन, विमान, बसला उशीर होणे, मुलांना यायला उशीर होणे, अचानक काहीतरी घडणे, आधीच उशीर झालाय आणि आपण जाण्या आधीच लाल सिग्नल पडणे वगैरे वगैरे.
या १०% गोष्टींसाठी आपण काहीही करू शकत नाही. पण आपण त्यावर कसे वागतो यावर पुढचं ९०% अवलंबून आहे.
उदाहरण द्यायचे तर, तुम्ही कामावर जाण्यासाठी पेहराव करून बसलात आणि चहा देण्यासाठी कन्या आतून आली, तिला ठेच लागली आणि कपातला चहा तुमच्या शर्टावर सांडला.
हे फक्त १०% झालं.
यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर पुढचं ९०% रामायण अवलंबून आहे.
तुम्ही चिडलात, तिला ओरडलात, ती दुःखी झाली, रडायला लागली. आता तुम्ही तुमचा मोर्चा पत्नीकडे वळवलात, "हे सगळं तुझ्या लाडामुळे झालंय, मुलांना अजिबात वळण लावलं नाहीस" असं म्हणून पत्नीलाही ओरडलात. तसंच घसरणारा ट्रे विकत आणतांना लक्ष दिलं नाही म्हणून तिला ऐकवलेत.
तुम्ही बेडरूम मध्ये जाऊन कपडे बदललेत. नंतर परत हॉल मध्ये आलात तर, मुलगी अजूनही रडतेच आहे. आत्तापर्यंत तिने न्याहारी करून शाळेला जाण्यासाठी तयार व्हायला हवे होते. उशीर झाल्यामुळे तिची स्कुलबस निघून गेली.
तुमच्या पत्नीलाही ताबडतोब कामावर जायला हवे.
तुम्ही कार बाहेर काढलीत आणि मुलीला शाळेत सोडायला गेलात. उशीर झाल्यामुळे तुम्ही गाडी वेगात चालवताय. नियम तोडल्यामुळे पोलिसांना दंड देऊन तुम्ही १५ मिनिटे उशिरा शाळेत पोहोचलात.
तुमची मुलगी तुम्हाला टाटा न करताच शाळेत पळत गेली.
२० मिनिटे उशिराने ऑफिसला पोहोचल्यावर बॅग घरीच विसरल्याचं तुमच्या लक्षात आलं.
तुमचा दिवस असा ताण तणावाने सुरू झाला.
दिवसभरात अशाच अजून काही घटना घडल्या आणि त्यामुळे  संध्याकाळ पर्यंत वातावरण अजून वाईट झाले.
आता तुम्ही घरी आलात. घरात आल्यावर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, ती म्हणजे तुमच्या पत्नीशी आणि मुलीशी असलेल्या नात्यात थोडी दरी निर्माण झालीय.

का ?

कारण तुमचा सकाळचा प्रतिसाद.
तुमचा दिवस वाईट का गेला?
त्याला कारण कॉफी होती?
त्याला कारण मुलगी होती?
त्याला कारण पोलीस होते?
त्याला कारण तुम्ही स्वतः होता?

उत्तर

तुम्ही स्वतः

कॉफीचं काय झालं यावर तुमचं कसलंही नियंत्रण नव्हतं.
त्या ५ सेकंदात तुमचा जो प्रतिसाद होता त्यामुळे तुमचा दिवस खराब गेला.

काय करायला हवे होते ?

कॉफी तुमच्या शर्टावर सांडली, तुमची मुलगी घाबरून रडू लागली.
तुम्ही म्हणाला असतात "बेटा, आत्ता असुदेत. पुढच्या वेळी असं होऊनये यासाठी लक्ष दे"
आणि तुम्ही शर्ट बदलला असतात तर, तुमच्या मुलीला शाळेत जातांना हसतमुखाने तुम्हाला निरोप देता आला असता.
मुलीनेही नेहमीप्रमाणे हसतमुखाने निरोप घेतला असता.
तुम्हीही ५ मिनिटे आधी ऑफिसला पोहोचला असतात.

फरक पहा....

दोन वेगवेगळे प्रसंग. दोन्ही एकाच गोष्टी मुळे सुरू झाले. शेवट मात्र वेगवेगळा.

खरच, काय घडतंय त्या १०% प्रसंगांवर आपला काहीही ताबा नसतो.
उरलेलं ९०% मात्र आपण त्यावर काय प्रतिसाद देतो त्यावर अवलंबून असतं.

९०/१० तत्वज्ञान कसे वापरावे ?

जर कुणी तुमच्याबद्दल वाईट बोललं तर तुम्ही ते मनावर घेऊ नका,
पालथ्या पातेल्यावर पाणी पडले तर काय होते, त्याप्रमाणे वागा.
त्यांच्या वाईट बोलण्याचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका.
तुम्ही चांगला प्रतिसाद देऊन तुमचा दिवस चांगला जाऊ द्या.
चुकीचा प्रतिसाद दिल्यास शब्दाला शब्द वाढेल आणि त्यामुळे  मित्र किंवा जवळची व्यक्ती गमावू शकते.

रस्त्यात कुणी आपल्या गाडीच्या आडवी गाडी मारली किंवा कट मारला किंवा चालतांना तुमच्या पुढे कुणी गेले किंवा तुमच्या कुणी आडवे गेले तर तुम्ही काय करता?*
तुम्हाला राग येतो?
तुम्ही दात ओठ खाता?
स्टीअरिंग वर जोरजोरात हात आपटता?
मुठी आवळता?
भांडायला जाता?
तुमचा श्वासोश्वास वाढतो?

तुम्ही २-५ मिनिटे उशिरा पोहोचलात तर काय फरक पडणार आहे ?

९०/१० तत्वज्ञान आठवा आणि सोडून द्या. त्या प्रसंगा आधी जसे होतात तसेच आनंदी रहा.

तुम्ही उद्यापासून येऊ नका असे बॉसने तुम्हाला सांगितले, किंवा तुमची हक्काचे काम तुम्हाला न मिळता दुसऱ्याला दिले आहे असे तुम्हाला कळले तर ?

मन अशांत करून झोपमोड करून घेऊ नका
तुमची काळजी घेणारी शक्ती कामाला लावा आणि तिचा दुसरे काम शोधण्यासाठी वापर करा.

बस, कॅब, विमान, रेल्वे उशिराने येणार आहे असे तुम्हाला कळले तर ?

संबंधित कर्मचाऱ्यांना ओरडून काहीही होणार नाही कारण जे घडलंय त्यावर ते काहीही करू शकत नाहीत.
  पण तुमच्या दिवसाच्या नियोजनात त्यानुसार बदल करता येणार आहे
वाट पाहण्यातला वेळ वाचनात, महत्वाची कामं फोनवर करण्यात घालवा
आजूबाजूला असलेल्या माणसांच्या ओळखी करण्यात घालवा

मित्रांनो ९०/१० तत्वाचा वापर करून आपण आपले जीवन ताणतणाव मुक्त जगुयात

ताणाताण......... मनाची.



ताणाताण......... मनाची.

      बापरे.......... कधी काय बातमी समोर येईल काही सांगताच येत नाही.......आज आल्या आल्या टि. व्ही. लावला तर भय्युजी महाराजांच्या आत्महत्येची बातमी ऐकली.........
त्यांना प्रत्यक्ष कधी बघितल नव्हतं.... पण एकुन होते........ कितीतरी राजकारणी लोकांचे आणि अनुयायांचे अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेले, समाजकार्यात अग्रणी एक लोकप्रिय व्यक्तीमत्व........... बातमी बघितल्या बघितल्या पहिला प्रश्न मनात आला... तो म्हणजे असं का केलं असेल बरं.......???? कशाचा एवढा ताण असेल.....??? किंवा कोणता असा प्रश्न असेल ज्याचं उत्तर "जीवनाचा शेवट" हेच असावं......... का माणूस ईतकं टोकाचं पाऊल उचलत असेल....???? . आणि जेंव्हा हे पाऊल उचललं जातं त्या वेळची मनस्थिती किती भयानक असेल....................ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...... मन खुप खिन्न झालं.. ते तर खुप लोकप्रिय व्यक्ती होते.... असो आपण यातुन धडा घेऊन आपल्या बद्दल बोलुया.......
        
              लोकहो सामान्य माणसाचं जगणं सध्या अ$$$$$तिशय कठिण झालेलं आहे.... असंख्य कधिही खरे न होणारे स्वप्न..... फॅमिली मेंबर्सच्या एकमेकांबद्दल च्या सत्य परिस्थीती लक्षात न घेता केलेल्या अपेक्षा... शिक्षणासाठी लागणारा लाखो रुपयांचा अवास्तव खर्च करतानाची कुतरओढ........... एक गोष्ट मिळाली की दुसर्‍या गोष्टींचा हव्यास........ कोणतेही संस्कार न करुन घेणाऱ्या तरुण पिढीला हाताळताना येणारा प्रचंड ताण...... डिलक्स लाईफच्या नावाखाली केली जाणारी चैन.. त्या साठी वाट्टेल त्या मार्गाने पैसे कमावणारे लोकं............ आणि आपलं या अशा जगात भविष्यात कसं होणार......??? या प्रचंड भितीचा ताण माणसाला आला कि मग तो असं काहीतरी टोकाचं करत असावा.......... न आपण रहाणार....... न समस्या.........

          किती टोक आहे हे.......... थोडं स्वतःचं जग छोटं करा बघा किती सुंदर आहे सगळं.... तिने हिरा घेतला...... नी त्यानी मर्सिडिझ    घेतली..... अरे घेऊ दे ना........... तिचं तीला नि त्याचं त्याला लखलाभ.......... तुझ्या बुद्धीमत्तेचाच अलंकार घाल की........काहीही इथुन नेता येणार नाहीये....... गेल्यावर लवकर स्मशानात पोचवण्याचीच पडते सगळ्यांना......
तु केलेलं कामच फक्त मागे रहाणार आहे...... तुझी ओळख म्हणून............ थोडं आपल्या अपेक्षांचं ओझं कमी करा मिञांनो......पैसा कमावण्यासाठी.........तुमच्या कुटुंबियांना पणाला लावु नका..... घट्ट मिठी मारा तुमच्या छोट्या मुलांना.... आई वडिलांना...तुमच्या साथीदाराला...... बघा कशी पॉझिटीव्ह एनर्जी मिळेल..... जगातला कोणताही ताण असुद्या.... तो घेऊन आईवडिलांन कडे जा......अरे काय घाबरतोस...... मी आहे तुझ्या पाठीशी........ईश्वरावर विश्वास ठेव..... एवढच ते म्हणतात पण त्यातुन दहा हत्तींच बळ देऊन जातात.........
          
         सकारात्मक विचार,जे मिळालं आहे त्यात समाधान आणि आनंद मानुन प्रगती कडे वाटचाल करत रहाणे.........अपेक्षांच ओझं कमी करुन साहित्य, कला, छंद जोपासुन....... वेगवेगळ्या महान व्यक्तीमत्वांचे आत्मचरित्र वाचुन.......... वखवखलेल्या आयुष्यात शांतता निर्माण करणे.............. तुम्ही पळताना तुमच्या मुलांचं बालपण, तुमच्या साथीदाराची स्वप्न...... हि देखणी स्टेशनं मागे सोडून पळु नका मिञांनो.. नाहीतर तुम्ही डेस्टिनेशनला तर पोचाल पण तिथे एकटेच असाल.......... असं होता कामा नये........ सगळ्यांना सोबत घेऊन चला..... मंजिल थोडी नजदीक भी हो तो कोई बात नही.... हाथ तो हाथ मे है....
         
          खालचे दोन्ही परीच्छेद आपल्या सारख्या सामान्य लोकांसाठी आहेत मिञांनो.......... श्री श्री रविशंकर म्हणतात तसं..... नफरत और तणाव को मुझे गुरुदक्षिणा मे दे दो...............
खरच देऊन टाकायचं आणि छान सुंदर, तणाव मुक्त जीवन जगायचं.........ताण आला कि रेडिओ लावुन छान मोठ्ठ्या आवाजात गाणे ऐकायचे.............. डोळे गच्च बंद करायचे आणि विहार करुन यायचा...... मस्त गुलाबांच्या बागेत..............
तिकडे देवानंद म्हणतच असतो....

मै जिंदगी का साथ निभावता चला गया...
हर फिक्र को धुवे मे उडाता चला गया.....

वृत्तपत्र वाचन का आवश्यक आहे !




वृत्तपत्र वाचन का आवश्यक आहे !

एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा रोज एक तरी पान वाचत जा !

श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नसुन वाचन करणारेच श्रीमंत होतात जसे शरीरासाठी दिवसातून दोन वेळा जेवण आवश्‍यक असते तसे उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे आवश्यक असते. दररोज वाचनामुळे माणूस भानावर येतो.

जगाचा आतापर्यंत जो विकास झाला आहे तो वाचनामुळे आणि जगाचा आता र्‍हास होणार आहे तो टी.व्ही मोबाईलमुळे.

पुस्तक वाचनारा माणूस कधीही व्यसन करत नाही आणि टी.व्ही मोबाईल हेच मुळी व्यसन आहे.

वाचनामुळे ज्ञानात भर पडते, टि.व्ही मोबाईल मुळे माणूस Adicted होतो.

टी.व्ही साठी मोबाईल साठी नेटवर्क लागते, वाचनासाठी फक्त माणूस जागेवर लागतो.

वाचन करणारी माणसं मनाने विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात.

वाचन करणारा माणूस शांत असतो त्यामुळे त्याला रक्तदाब वाढणे, हृदय विकाराचा झटका येणे अशा गोष्टी संभवत नाहीत. या उलट जास्त टी.व्ही. मोबाईल वापरणारेच विविध रोगांना बळी पडत असल्याचे समोर येत आहे.

टी.व्ही मोबाईलमुळे मन शांतीचा भंग होतो तर वाचनामुळे भंग झालेली मनस्थिती शांत होते.

वाचन करणारा माणूस लवकर झोपतो लवकर उठतो. टी.व्ही मोबाईल चक्कर मध्ये अडकणारे उशिरा झोपतात नी उशिराच उठतात. परिणामी शरीर संपदेसह श्रीमंतीही नष्ट होते. लवकर निजे लवकर उठे अशी एक म्हण प्रचलित आहे.

वाचन करणारा पुढे उद्योजक होतो तर वाचन न करणारा नोकरीवरच थांबतो.

वाचन करणारा चार तासच काम करून करोडपती होतो तर वाचन टाळणारा बारा तास काम करून गरिबीतच मरतो.

काही महाभाग तर नोकरी लागली की, जगातील मी एकटाच सिकंदर, आता मलाच सारे काही कळते, अशा  नंदनवनात वावरून वाचनच बंद करतात.

वाचनामुळे माणूस नम्र होतो तर टी.व्ही मुळे माणूस भांडखोर नी मोबाईलमुळे आत्मकेंद्री होतो.

जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते तेच खरे पुस्तक आणि जे कृती करायला लावते तेच खरे वाचन.

आपल्या आयुष्यात दोन गोष्टींचा प्रभाव पडतो एक मित्र आणि एक पुस्तक, पुस्तकालाच आपला मित्र बनवा.

टी.व्ही बघणारे प्रवास करतात, तर वाचन करणारे ध्येय गाठतात. टी.व्ही मोबाईलमुळे थकवा येतो तर वाचनामुळे तरतरी.

जिथे वाचन होते तेथे विचार होतात आणि जेथे विचारांचे स्वातंत्र्य नाही तेथे गुलामी येते. वाचनामुळे ध्येय ठरवीता येते आणि गाठताही येते.

तुमच्या ध्येयावरून तुमची लायकी पारखली जाते आणि तुम्ही किती मोठे ध्येय ठरविता ते तुम्ही कोणते पुस्तक वाचता यावर अवलंबून असते.

ज्यांना आयुष्यात कोणतेही ध्येय नसतं तेच लोक पुस्तक वाचत नाहीत आणि ध्येयाविना जगणे म्हणजे बिगर पत्त्याचे पत्र पोस्टात टाकणे होय. पुस्तक चाळणे वेगळे आणि वाचनं वेगळं.

जगात जेवढे  लोक उपास मारीने मेलेत त्यापेक्षा जास्त लोक पुस्तक वाचन न झाल्यामुळे मेलेत. पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातुन संपत्ती निर्माण होत असते.

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा