Pages

शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

उंबऱ्याच्या आतलं वातावरण बिघडू देऊ नका


“उंबऱ्याच्या आतलं वातावरण बिघडू देऊ नका !”

तीन-तीन वर्षं काहीही न करता, घरात बसून राहिलेली मुलं-मुली मी पाहतो, मला आश्चर्य वाटतं. चांगलं सुशिक्षित कुटुंब, बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता असं असूनही अनेक घरांमधून ही परिस्थिती आहे. दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत अंथरुणात लोळत पडणे, मग पुढे चार वाजता आंघोळ करणे, संध्याकाळी सहा वाजता जेवणे (या दरम्यान मोबाईल हाताशी असतोच), रात्री साडे आठ-नऊ च्या सुमारास घराबाहेर पडणे आणि साधारणपणे पहाटे तीन-चार च्या सुमारास घरी येणे अशा दिनक्रमात ही मुलं-मुली जगतात. “दहावीपर्यंत बरं चाललं होतं पण काॅलेज सुरू झाल्यापासून सगळीच अवस्था बिकट झाली असा सगळ्या पालकांचा सूर असतो.

ग्रॅज्युएशनच्या पहिल्याच सेमिस्टर परीक्षेत सगळ्या विषयांमध्ये नापास झालेल्या एका मुलाने मागच्या सहा महिन्यांमध्ये क्लासेसच्या नावाखाली दीड लाख रूपये पालकांकडून घेतले आणि क्लासेस न लावताच ते पैसे गर्लफ्रेंडवर खर्च केले. शिवाय पाॅकेटमनी च्या नावाखाली जवळपास ७५ हजार रूपये घेतले. पालकांनी एवढा खर्च केलाच, शिवाय काॅलेजची फी भरली, ती वेगळीच. एका मध्यमवर्गीय कुटुंबात हे घडतं, यावर आता विश्वास ठेवण्याची वेळ आली आहे. 

डोक्यावर रंगवलेल्या केसांचं टोपलं, विराट कोहलीसारखी राखलेली दाढी, छप्पन्न सेंटीमीटर (इंच नव्हे) छाती, भडक कपडे, फाटक्या जीन्स, पायात मरतुकड्या स्लीपर्स, तोंडात मावा किंवा सिगारेट धरलेली अशी तीन-तीन पोरं एकाच स्कूटरवरून मोठ्यानं हार्न वाजवत गावभर उंडारत फिरत असलेली आपल्यापैकी अनेकांना दिसत असतील. चार दिडक्यासुद्धा कमावण्याची अक्कल नाही पण तरीही गाड्या उडवत फिरणारी टाळकी सध्या उदंड झाली आहेत. अशाच एका मुलानं आज स्टंट करण्याच्या नादात एका गर्भवती महिलेला जोरात धडक दिली. त्या मुलाच्या मागे एक तंग कपड्यांतली मुलगी नको तितकी चिकटून बसलेली होती, आणि बहुतेक दोघेही भर दिवसा झिंगलेले होते. आजूबाजूची माणसं धावत येईपर्यंत दोघेही पसार झाले.

पोकर खेळणे, अनिर्बंध नाईट लाईफ जगणे, बेटींग करणे यात गुंतून पडलेली अनेक मुलं-मुली पाहण्यात येतात. एखादी वीस-बावीस वर्षांची मुलगी दिवसाकाठी पंधरा-वीस सिगारेटी व्यवस्थित ओढते, हे आता कॅज्युअल झालं आहे. हुक्का पार्लर्समध्ये १७-१८ वर्षांची मुलं-मुली दिवस घालवताना दिसत आहेत. दिवसभरात खाण्यापिण्यावर, पेट्रोलवर, व्यसनांवर दोन-तीनशे रूपये तर सहजच उडवणाऱ्या मुलां-मुलींची संख्या समाजात वेगाने वाढते आहे, यावर पालकांनी सीरियसली विचार करण्याची गरज आहे.

खरं तर सांगू नये, पण सांगतो. पालक हाॅटेलमधली जेवणं, खरेदी, वाढदिवस, परदेशी सहली यात रस घेतात, पण मुलांच्या प्रश्नांकडे जितकं आणि जसं लक्ष द्यायला हवं, तसं देत नाहीत. माझ्या ओळखीतल्या एका कुटुंबाने दुबई ट्रीपसाठी साडेतीन लाख रूपये खर्च केले, पण मुलगी सलग दोन वर्षं बारावीत नापास झाली, काॅलेजमधल्या एका मित्राबरोबर लग्न करण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला, घरातून अनेकदा पैसे चोरले, घरचे दागिने गायब केले, पण तिच्या काॅलेजमधल्या शिक्षकांना भेटायला जाण्यासाठी पालकांकडे वेळ नाही आणि काऊन्सेलरची अपाॅईंटमेंट म्हणजे वायफळ खर्च असं त्यांना वाटतं.

आपण आपल्या मुलांना गाडी, मोबाईल फोन, लॅपटाॅप, इंटरनेट, स्वतंत्र खोली, पाॅकेटमनी या गोष्टी का आणि किती प्रमाणात देतो, यावर पालक काही विचार करतात का? पुष्कळ पालकांकडे या प्रश्नांची उत्तरंच नसतात. आधुनिक आणि तथाकथित ‘सुजाण पालक होण्याच्या शर्यतीत भावना,संस्कार मागे पडतात आणि या वस्तूच पुढे जातात.
इन्स्टंट गोष्टींचा जमाना आला आहे. मुलं आणि पालक दोघांनाही सगळ्याच गोष्टी इन्स्टंट आणि रेडिमेड हव्या असतात. त्या तशा मिळत नाहीत, म्हणूनच मग शेवटी फरफट सुरू होते आणि सगळं कुटुंबच अस्वस्थ होतं. सगळ्या गोष्टींना पैशाची आणि श्रीमंतीची गणितं लागू करण्याचा प्रयत्न पालक जाणते-अजाणतेपणी करायला लागतात, तिथंच त्यांच्या मुलांमध्येही हीच वृत्ती रूजली तर, त्यात नवल वाटण्याचं कारणच नाही.

शेवटी काय, उंबऱ्याच्या आतलं जग बिघडलं की, सगळंच बिघडतं..! वेळीच शहाणपण आलेलं l


शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८

"बाप"


"बाप"


मॅक दाते नावाची एक अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट मयुरेशनी फेसबुक वर एक्सेप्ट केली. रोजचे बोलणे चालू झाले.
हाय- हॅलो चे बोलणे काही दिवसातच पर्सनल प्रॉब्लेम्स शेअर करण्यापर्यंत वाढले आणि फेसबुकवर एक घट्ट नाते मयुरेशला मिळाले.

मयुरेश - साधारण विशी - बाविशितला मुलगा. खूप काही करण्याची तडफड, जिद्द पण त्याच बरोबर काहीसा उद्धट. सोशल जग एवढं की घर आणि कुटुंब ह्यांना वेळ न देऊ शकणारा. बापाला कधीही समजून न घेणारा. सतत आरे ला कारे करणारा हा तरुण.

मॅक दाते - ५०शितला एक पुरुष पण तरीही आजच्या तरुण पिढी प्रमाणे सोशल असणारा. इन्फोसिस मध्ये टॉप चा इंजिनिअर.

कदाचित ही वयातली तफावत सुद्धा मयुरेशला त्याच्या जवळ खेचत असेल. मॅकला मयुरेश समजायला मदत करत असेल. कारण काहीही असो; अल्पावधीत ते दोघे खास झाले हे मात्र खरे!

मयुरेशला काहीही नवीन करायचे असो; तो पहिले मॅकशी चर्चा करणार मग घरी वडिलांकडे पैसे मागणार. मग ते जिम असो, चेसचा क्लास, मुवी की अगदी एखादी पार्टी असो.

फेसबुकच्या फ्रेंडशी मॅकशी बोलणं झालं की बाबाही पटकन होकार देतात हे मयुरेशला कळु लागलं परिणामी तो मॅक शी अजून जास्त जवळीक साधू लागला.

११ फेब, २०१७ चा दिवस. संपूर्ण जग आपापल्या व्हॅलेंटाईन बरोबर १४ फेब प्लॅन करत असते. एखादीला विचारावे कसे हा प्रयत्न करत असते तेंव्हा मयुरेश मागे कसा असेल???

त्याने ही गोष्ट मॅकला सांगायचे ठरवले. ठरल्या वेळेला फेसबुकवर येऊन मयुरेश मॅक शी गिरिजा बद्दल सांगितले. पहिले खूप वेळ काहीच रिप्लाय आला नाही. बिझी? बिझी? म्हणून ४ मेसेज गेले तेंव्हा कुठे मॅक चा रिप्लाय आला.

गो अहेड. घाबरु नको. दिल खोलके रख मेरे शेर. वर एखाद दोन कॅफे ची नावेही सजेस्ट केली. दिल खुष. थॅन्क्स म्हणून; गिरिजाला विचारायचा निर्धार करून मयुरेश ऑफ लाईन जातो.

दुसऱ्या दिवशी बाबांना व्हॅलेंटाईन डे साठी पैसे मागतो तोच बाबा म्हणतात; काय गरज?? अभ्यास करा.. फालतू पार्ट्या. कसली प्रेम करता?? कोण आहे मुलगी सांग.. घरी घेऊन ये. हे असले बाहेर भटकणे बरोबर नाही.

तोच एक भडका उडतो. "काय बाबा; फालतू आहात तुम्ही. आमचं वय आहे सगळं एन्जॉय करायचं. इथे एक गोष्ट मिळत नाही प्रेमाने .. लगेच.."
"हो ना; चेस, जिम साठी भिकाच मागतोस ना जसा. या घरात राहीचे असेल तर नीट बोलायचे"
"जातो हे घर सोडून. तुमच्यापेक्षा तो मॅक बरा. तुमच्याच वयाचा. पण बघा कसे फेसबुक वापरतो. एंकरेज करतो. सतत नाही नाही म्हणत. नाहीतर तुम्ही. पिढी बरोबर चालणे माहीत नाही का काही नाही... हाड!"
"हो??? कसा दिसतो रे हा मॅक? काय करतो काय??
मयुरेश एकदम ऐटीत सांगतो; "इन्फोसिस ला आहे. प्रोफाइल पिक्चर नाही ठेवला आहे सो माहीत नाही कसा दिसतो. पण विचार जुळतात. विचार जुळायला चेहरा माहीत असणं गरजेचं थोडी असते.. काय?"
बाबा शांत होऊन; " हो तर, ते पाहतोच आहे की. पोटचा गोळा पण एक विचार जुळतो आहे का बघ. काय आडनाव या मॅक चे? ख्रिसचन वाटतो."
"नाही, कोकणस्थ आहे. दाते आहे. आपलाच. सेम आडनाव... मॅक दाते. "
"दाते असून, पन्नाशीच्या आसपास असून हे असले विचार? फुस लावतो तुला??"
"तुम्हाला फुस च वाटणार. पिढी बरोबर बदलणे आहे अहो ते. सगळ्यांना नाही जमत..."
"काय पिढी पिढी बोलतो आहेस रे सारखा. आम्ही जन्माला घातलं म्हणून आली ही तुमची पिढी. त्याचीच भीती दाखवतो सारखा? आहे काय तुमच्या पिढीत?? सतत अर्ध्या चड्या घालून हिंडायचे, हा मित्र - तो मित्र. घरात पाय टिकतात का तुमचे??
"झाले चालू.." " हो.. ऐक. घरात चकार शब्द बोलायचा नाही. सतत मोबाईल, प्रोजेक्ट, मित्र. सतत बाहेरचे लोक. ह्यात तू; तुझी पिढी एवढे गुरफटला आहात की घरच्यांना काय हवं आणि नेमके तुम्हाला काय हवे कळणार कसे रे??? तो मॅक ढीग गप्पा मारेल. पैसे घ्यायला तर बाप लागतो ना?? आणि एवढा मूर्ख झाला आहेस तू ह्या बाहेरच्या जगात सतत राहून की लोकांच्या गर्दीत घरच्यांनाही ओळखत नाहीस तू..."
"काहीही बाबा. डोळे दिलेत मला देवांनी.. ओळखणार कसा नाही.. मुळात.."
"हो? डोळे दिलेत?? मग ओळखले मॅकला? मॅक दाते.. आपल्यातलाच.. सेम आडनाव. इन्फोसिस. पन्नाशीच्या आसपास.. वर तोंड करून सांगतोस.."
मयुरेश आवाक होऊन; "बाबा....!"
एका क्षणात डोळे पाणावतात. " काय सांगू? अवाक्षर बोलत नाहीस घरात. बाप वडीलधारी असला तरी मित्र ही असतो. एवढी तर तुमची पिढी माहीत आहे मला. अंगीकारले आहे मी. पण तू नवी पिढी करत ह्या मित्राला विसरलास.. काय करणार मग?? केलं लॉग इन फेसबुकला. म्हंटले इथून जाणून घेऊ मुलाला. तू एवढेही डोके नाही लावले की आपण जेंव्हा जेंव्हा लॅपटॉप उघडतो तेंव्हा तेंव्हा वडील मोबाईल घेऊन बसतात. तेवढेही निरीक्षण नाही घरच्यांचे. सगळी उमेद दिली. आवडले मुलाचे विचार. गिरिजा बद्दल सांगितलस तेंव्हा आधी तिची प्रोफाइल चेक केली. काय करते मुलगी; कशी दिसते. मग तुला रिप्लाय दिला. काय दुर्दैव आहे हे की मुलाचा वेळ मिळायला फेसबुकचा आधार घ्यावा लागला... "
मयुरेश रडू आवरत; " सॉरी बाबा. "
प्रेमाने जवळ घेत बाबा एकच सांगतात मयुरेश ला -
"बेटा, कोणीही बाहेरचं तुला समजून घेणार नाही का नवी उमेद देणार नाही. जगात फक्त दोनच व्यक्ती ते काम आपलं समजून करतात एक गुरू आणि दुसरं .... ' घर '!!!"
मयुरेश मिठी मारत " मी नेहमी लक्षात ठेवीन बाबा."
बाबा हसत; " बाकी काही नाही एवढं लक्षात ठेव... ' हम तुम्हारे बाप हैं!"...

दोघं हसत हसत गिरिजाचे फोटो बघतात. फेसबुकवर नाही. मयुरेश च्या मोबाईल मधले...!

- अनुराज.


क्षणीक मोह


क्षणीक मोह

एका नगरात एक पुजारीबाबा राहत होते. शेजारच्या गावातील पुजाऱ्याचे अकस्मात निधन झाल्याने या पुजारी बाबाना त्या गावात पुजारी म्हणून नियुक्त केले गेले. त्यानंतर एकदा त्या गावी जाण्यासाठी पुजारी बाबा बसमध्ये चढले, त्यांनी कंडक्टरला पैसे दिले आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले.
कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम पुजारीबाबाना परत केली तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले कि त्यात १० रुपये जास्त आले आहेत. पुजारीबाबानी असा विचार केला कि आता कंडक्टर घाईत आहे तेंव्हा त्यांना थोड्या वेळाने पैसे परत करू या. काही वेळ झाला कंडक्टर अजूनही त्याचे तिकिटे देण्याचे काम करतच होता.
पुजारीबाबांच्या मनात एक विचार आला कि आता तर कंडक्टर इतका घाईत आहे कि त्याला ते १० रुपये परत केले काय आणि नाही केले काय काय फरक पडणार आहे. सरकारी बस कंपनी इतके पैसे मिळवते प्रवाशांकडून मग इतक्या छोट्या रकमेने त्यांना काय होणार? लाखो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून हे १० रुपये आपल्या सारख्या पुजाऱ्याला भेट मिळाले असेच आपण समजू. आपण याचा काही तरी सदुपयोग करू शकू.
पुजारीबाबांच्या मनात असे विचार चालू असतानाच त्यांचे उतरायचे ठिकाण आले. बसमधून उतरताना अचानक त्यांचा हात खिशाकडे गेला व त्यातून ती दहा रुपयाची नोट त्यांनी बाहेर काढली व कंडक्टरला परत दिली व म्हणाले, "भाऊ...!!"
तुम्ही मघाशी मला तिकिटाचे पैसे परत करताना घाईगडबडीत हे दहा रुपये जास्त दिले आहेत."
कंडक्टर हसून म्हणाला,"महाराज! तुम्हीच या गावाचे नवे पुजारी आहात का?" पुजारीबाबा हो म्हणाले.
त्यावर कंडक्टर पुन्हा बोलू लागला," महाराज, माझ्या मनात तुमचे प्रवचन ऐकण्याची खूप इच्छा होती. तुम्हाला बसमध्ये चढताना पाहिले आणि मनात एक विचार आला कि चला आपल्याला या कामामधून वेळ मिळत नाही आणि तुमची भेट घडून येत नाही तेव्हा तुम्ही जसे प्रवचनात उपदेश करता ते आचरणात आणता काय याचा पडताळा घ्यावा म्हणून मी ते दहा रूपये तुम्हाला मुद्दाम जास्त दिले होते. पण मला आता कळून चुकले आहे की तुम्ही जसे बोलता तसेच तुमचे पवित्र आचरण आहे. महाराज मला क्षमा करा.'' एवढे बोलून कंडक्टरने
गाडी पुढे जाण्यासाठी बेल वाजवली.
पुजारीबाबांना आता घाम फुटला होता, ते घाम पुसत आकाशाकडे पहात म्हणाले,'' प्रभो, तुझी लीला अपरंपार आहे, दहा रूपयांचा मोह मला आत्ता किती महागात पडू शकला असता पण तुम्ही मला त्यातून वाचवले. देवा तू खरंच दयाळू आहेस. अचानक का होईना त्या दहा रूपयांच्या मोहातून तू मला बाहेर काढले व समाजात होणारी माझी बदनामी थांबवली.''
🌀 तात्पर्य ::~
स्वार्थ,मोह हा वाईट असतो*, ज्याक्षणी मोहाने मन ग्रासते त्याक्षणीच मानव प्रगतीकडून अधोगतीकडे प्रवास करू लागतो.त्यामुळे नेहमी प्रामाणिक रहा.


सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८

सकारात्मक विचार

सकारात्मक विचार

मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात.
यातील 60 ते 70%  विचार हे नकारात्मक असतात.
 नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते.

सकारात्मक विचार आपली शक्ती,
आत्मविश्‍वास,
मनोबल वाढवतात.

नकारात्मक विचारांना -
सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!

थॉमस् अल्वा एडिसनने 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?

थॉमस म्हणाला 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. (सकारात्मक दृष्टीकोन)

नेपोलियन समुद्र किनार्‍यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला,
छाती चिखलाने माखली. 
तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं.
आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार,
आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले.
नेपोलियनने ही बाब हेरली.

तो उठताना छातीत झटकत म्हणाला,  ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार,
जिथे जिथे आपण जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे -
मी तुझी आहे,
मी तुझी आहे.... ...

मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. 
हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे.

टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे.
जर असा विचार केला की,
अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं.
पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं.

सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्‍वास वाढतो.

नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो.
परिणामी कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.

गौतम बुध्दाजवळ एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला भगवान ‘‘मला गावकर्‍यांनी शिवी दिली.’’

बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’’

तो म्हणाला ‘‘भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुध्दा’’  भगवान म्हणाले ‘‘या मारामुळे तुला काही जखम झाली का ?’’, शिष्य म्हणाला ‘‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’’ गौतम बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं - तुझा मृत्यू झाला नाही.’’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुध्दाच्या चरणाजवळ शांत बसला,

बुध्दांना हेच सांगायचे होते की, जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा.

मी अस्वस्थ आहे,
पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीक अस्वस्थता बर्‍याच प्रमाणात नियंत्रीत करतो.

माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.

काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते.
म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.

कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत
डोळे उघडून बघा-प्रत्येकाला उडण्यासाठी-फुलपाखरासारखे पंख आहेत ....😊
👍 So Be Positive !

बिरबलाची चातुर्यकथा


बिरबलाची चातुर्यकथा



- एकदा एक चित्रकार दरबारात आला. त्याने एक सुंदर व्यक्तिचित्र सोबत आणले होते. बादशाहने दरबाराचा सल्ला मागितला. काही विघ्नसंतोषी मानकरी सल्ला देते झाले की, "हे चित्र शहराच्या चौकात ठेवून दवंडी पिटावी. जनतेला चित्रात ज्या चुका वाटतील तिथे खुण करावी." झाले! संध्याकाळपर्यंत संपूर्ण चित्र लोकांनी खुणा करून विद्रूप केले होते. चित्रकार बिचारा रडकुंडीला आला. त्याने बिरबलाला गाठले. बिरबल महाशयांनी त्याला एक सामान्य चित्र काढायला सांगितले. ते चित्र चौकात ठेवून पुन्हा दवंडी दिली गेली की, "ज्या कुणाला या चित्रात चूक आढळेल ती त्यांनी दुरुस्त करावी." त्या दिवशी त्या चित्राच्या जवळपास कोणी फिरकले नाही.

उपयुक्त माहिती


उपयुक्त माहिती 

1. मीठाचा वापर
हा फार छान त्वरित results देणारा उपाय आहे. बाजारात खडा मीठ (sea salt) मिळतं.  अतिशय स्वस्त असतं आणि सहज उपलब्ध आहे. नाहीच मिळालं तर साधं मिठ सुधा चालेल.
मिठामधे नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची मोठी शक्ती आहे.  घरात खूप कलह, वादविवाद चाललेत, आजारपणं संपत नाहीयेत, नकारात्मकता जाणवतेय, अडचणी येतायत, किंवा यापैकी काहीही नसल्यास प्रतिबंधात्मक म्हणून रोज सुद्धा.. हे मीठ काचेच्या छोट्या छोट्या बाऊल्स मधे भरून घरात/ ऑफिसमधे प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात ठेवा. आजारी माणसाच्या उशाशी, पायाशी ठेवा. जर नकारात्मक ऊर्जा असेल तर मिठाला लगेच पाणी सुटेल, ते काळं पडेल, किंवा खराब होईल. आशा वेळेस ते इतरत्र कुठेही न सांडवता टॉयलेट मधे टाकून द्या. कमीतकमी 3 महिने हा उपाय सतत करत राहावा. मिठाच्या पाण्याने रोज लादी ही पुसू शकता.

जेव्हा कधी खूप depress किंवा अकारण उदास, दुःखी, एकटेपणा, भीती, किंवा कसलं वाईट वाटत असेल त्या वेळेस दोन्ही मुठीं मधे खडा मीठ घ्या, आणि दोन्ही पाय साधारण गुडघ्यांपर्यंत (खडा मीठ घातलेल्या) गरम पाण्यात बुडवून डोळे बंद करून 10 मिनिट बसा. मनातल्या मनात "माझं तेजोवलय पूर्णपणे शुद्ध झालं आहे आणि सर्व नकारात्मक ऊर्जा ह्या मिठात आणि पाण्यात उतरून निघून गेली आहे" असं म्हणत राहा.. आणि फरक बघा. वर सांगितल्या प्रमाणे, हे पाणी आणि मीठ त्वरित टॉयलेट मधे फेकून द्यावे.

खूपच negative वाटत असेल, किंवा कधी अशा negative वातावरणात जायची, किंवा अशा लोकांशी interact करायची वेळ आली, तर घरी आल्यावर स्नानाच्या अर्धी बादली पाण्यात मूठभर मीठ टाकून त्याने स्नान करावे. मनात वर सांगितलेले intention म्हणावे आणि  नंतर नेहेमीसारखे साबण लावून स्नान करावे. हा पण खूप परिणामकारक उपाय आहे.. फक्त ज्यांची त्वचा sensitive आहे त्यांनी रोज करू नये.
अशा लोकांनी मिठा ऐवजी पाण्यात apple cider vinegar चा वापर करावा.

2. ध्यान (meditation)
ध्यानाचे फायदे अपरिमित आहेत. याने तुमचे तेजोवलय तर नेहेमी शुद्ध (clean) आणि strong राहतेच, पण तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. ज्यांनी ध्यान आधी केलं नाहीये, किंवा ध्यानाबद्दल माहिती नाही, त्यांच्या साठी अतिशय powerful "1 minute meditation" काल ग्रुपवर पोस्ट केलं होतं.

3. सकारात्मक विचार
ईश्वराने माणसाला विचार करण्याची फार मोठी शक्ती दिली आहे ज्याने तो आपल्या जीवनाचं शिल्पं हवं तसं घडवू शकतो. पण बहुतेक वेळा आपण ही शक्ती नकारात्मकते मधे वाया घालवतो.  घडणाऱ्या घटना, आजूबाजूची माणसं, किंवा बाह्यपरिस्थिती कशीही असली तरी आपण बाह्य जग बदलू शकत नाही. आपण फक्त स्वताला बदलू शकतो.  सकारात्मक विचारांनी  तुमचं तेजोवलाय नुसतं शुद्धच होत नाही तर ते अधिकाधिक strong होत रहातं आणि त्याला natural protection मिळत राहात.  हा माझा स्वतःचा अनुभव आहे, की समोरची माणसं त्यांच्या विचारातून, बोलण्यातून कितीही नकारात्मकता तुमच्यावर फेकत असली, तरी तुमच्या सकारात्मक विचारां मूळे,  तुम्ही त्याने प्रभावित होत नाही.  सततच्या सकारात्मक (positive) विचारां मुळे बाह्य परिस्थिती सुद्धा हळूहळू बदलत जाते.

4. संगत
आपण नेहेमी नकारात्मक लोकांच्या संगतीत राहतो का.. कोणाशी बोलुन ती व्यक्ती निघून गेल्यावर अचानक आपल्याला मरगळ, उदासी, दुःखी, एकटं, किंवा depress वाटतं का.. तसं असेल तर आपली ऊर्जा त्या व्यक्तीने नकळत शोषून घेतलेली आहे.  जवळच्या नात्यात अशी व्यक्ती असेल किंवा अशा व्यक्तींशी टाळता येत नाही असा रोजचा संबंध येत असेल तर त्यांच्याशी बोलताना त्यांच्या negative emotions ना बढावा देऊ नका, त्यांच्या बरोबर त्यांचं दुःख हलकं करताना तुम्ही रडू नका..  किंवा दुःखाशी स्वतःला relate करू नका. नाहीतर तुमची ऊर्जा ते नकळत शोषुन घेतील आणि तुमच्याशी बोलून गेल्यावर त्यांना खूप बरं वाटलं आणि तुम्ही मात्र down व्हाल.

काहीवेळेस आपण काही समूहांशी विविध कारणांनी जोडलेले असतो. यात फेसबुक वरचे virtual समूह सुद्धा आले बरं का.
जर समूहात काही लोकं नकारात्मक विचार प्रसारित करत असतील, किंवा सतत बोलत असतील तरीही सावध.   अमेरिकेत तिथल्या निवडणुकीनंतर राष्ट्राध्यक्षां विरुद्ध असे खूप virtual आणि प्रत्यक्ष समूह बनवले गेलेत. आपला त्यावर चांगले किंवा वाईट बोलण्याचा विषय नाही. पण Mass influence खाली येऊन लोकं अप्रत्यक्ष पणे ही नकारात्मकता स्वताच्या आयुष्यातही आमंत्रित करतात हे त्यांना समजतच नाही.

आपल्या मनात विचार हे  बाहेरील विचारविश्वामधून येत असतात.. आपल्याला वाटलं की मी हा विचार केला तरी आपण ज्या vibrations वर आहोत त्यांच्याशी मिळतेजुळते विचार आपल्या पर्यंत बाहेरून येतात आणि आपण ते ग्रहण करत असतो. जर तुम्ही सतत नकारात्मक संगतीत राहिलात, तर कुठले विचार घ्याल हे तुम्हीच ठरवा.
पूर्वीं लोकं यासाठीच म्हणत "सुसंगती सदा घडो".

5. नामस्मरण (mantra chanting)
आपल्या ऋषी मुनींनी तप साधनेच्या बळावर कुठले स्वर, शब्द रचना एकत्रित करून विशिष्ठ संख्येत म्हटल्या की त्याचा काय परिणाम आपल्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरावर, वातावरणावर, विशिष्ठ कारणासाठी होतो हे शोधून मंत्र शास्त्र विकसित केले.  नामस्मरण किंवा एखादा विशिष्ठ मंत्र जेव्हा आपण विशिष्ठ संख्येत रोज म्हणतो, तेव्हा तो तुमच्या तेजोवलयाला शुद्ध आणि strong करत रहातो. Natural protection देत रहातो. आधुनिकतेच्या नावाखाली आपण नामस्मरणाकडे दुर्लक्ष करतो पण याचे प्रचंड फायदे आहेत.

6.  पवित्र स्थळे/ तीर्थक्षेत्रे
काही जागांची स्पंदनं चांगली नसतात.  स्मशान, मद्यालये, किंवा तत्सम इतर वाईट कृत्ये होत असणाऱ्या जागा.  या ठिकाणी आपले तेजोवलय पटकन संक्रमित किंवा दुषित होऊ शकते. याउलट काही जागा अतिशय पवित्र आणि उच्च स्पंदने असलेल्या असतात. पृथ्वीच्या पाठीवर अशी 7 मुख्य ठिकाणे (power spots) आहेत ज्याना पृथ्वीची सप्तचक्रे म्हणतात. भारतात हिमालयात कैलास पर्वत हे असे ठिकाण आहे की जिथे उच्चतम सकारात्मक स्पंदने आहेत आणि त्याला पृथ्वीचे सहस्त्रार चक्र म्हणतात.  जागांची स्पंदने विचारात घेऊन पूर्वजांनी मंदिरांची स्थापना केली. प्राचीन काळी तीर्थयात्रेला जायची प्रथा याचसाठी होती की आपले तेजोवलय शुध्द व्हावे.  तुमच्या घराजवळ असलेल्या मंदिरात जाण्याचा नेम ठेवा.

7. प्राणायाम/ योगासनं/ व्यायाम.
प्राणायाम हा तेजोवलय clean आणि स्ट्रॉंग ठेवण्याचा अतिशय परिणामकारक उपाय आहे. पण तज्ञानकडून शिकून मगच करावा.
योगासने आणि त्यातही सुर्य नमस्कार हा ही अतिशय प्रभावी आहे.

8. पौष्टीक आहार, rest आणि पूर्ण झोप
याबद्दल वेगळे सांगायची गरज एव्हढ्याचसाठी की ह्या तीन अतिशय basic गोष्टी सुधा आपण आजकाल न पाळल्यामुळे तुमचे तेजोवलय weak होऊ शकते.

9.  निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे
आपण सर्व निसर्गातील पंचतत्वातून जन्मलो आणि परत तिथेच जाणार आहोत. निसर्गातून, झाडं, हिरवळ, डोंगर, नद्या, यातून प्राणशक्तीचा खजिना आपल्याला मिळत असतो. आपले तेजोवलय नैसर्गिक रित्या clean आणि strong
ठेवायला निसर्ग खूप मदत करतो.

वर दिलेले जास्तीत जास्त उपाय रोजच्या रोज आपल्या आचरणात ठेवले तर आपले तेजोवलय आपण रोजच्या रोज शुध्द ठेऊ शकतो. पण काही कारणाने जर तेजोवलय खूपच damage झाले असेल आणि मोठ्या प्रमाणात त्याची लक्षणं दिसत असतील तर खालील उपाय तज्ञ व्यक्तीकडून करून घेतल्यास खूप फायदा होतो.

10.  Holistic healing methods..
1. रेकी किंवा इतर ऊर्जा उपचार
2. Crystal थेरपी
3. Sound थेरपी
4. Aroma थेरपी
5. Flower थेरपी

पूर्वी आपली आजी किवा आई, आपल्याला काही झालं की ..किंवा शुभकार्यानंतर दृष्ट काढायची, आठवतं..? तेजोवलय स्वच्छ किंवा शुद्ध करण्याचाच तो प्रकार आहे. मीठ आणि मोहोरी या दोन्हीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची ताकद आहे.  तसेच बाहेरून घरी आल्यावर चप्पल घराबाहेर काढून बाहेरच विहिरीवर डोक्यावरुन आंघोळ करून मग घरात यायचं अशी पद्धत होती.. त्यांचं कारण लक्षात आलं..?
बाहेरील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन आपल तेजोवलय शुद्ध रहावं..  जेवायच्या आधी जेवणाच्या ताटाला नमस्कार करून एखादा श्लोक म्हणून जेवायची पद्धत.  जेणेकरून जेवण बनवणाऱ्याची नकारात्मक विचारस्पंदन निघून जावीत.  या खूप लहान गोष्टी आहेत पण तेजोवलय शुद्ध ठेवायला खूप मदत करतात.आता सुद्धा आपण यातलं जेवढं पाळता येईल तेवढं पाळायचं.

गौतम बुद्धांचे तेजोवलय त्यांच्या शरीरासभोवती 3 मैल पसरलेलं असायचं.  ज्या यशस्वी प्रभावी व्यक्ती आपल्याला इतरत्र दिसतात, त्यांचे तेजोवलय सुद्धा अतिशय strong असते.  तेजोवलय हे साध्या डोळ्यांना दिसत नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा अविश्वास दाखवतो. पण त्याचे सखोल ज्ञान घेऊन आपणही आपले आयुष्य यशस्वी आणि प्रभावी बनवू शकतो.

आशा आहे की ह्या ज्ञानाचा उपयोग सर्वाना होऊन आपले आयुष्य आनंदी, आणि यशस्वी होईल.


समृद्ध जीवनाचा कानमंत्र


समृद्ध जीवनाचा कानमंत्र


सोलोमन बेटावर आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे. ते आदिवासी लोक प्रथेनुसार झाडे तोडणे अपशकुनी समजतात.

एखादे झाड तोडायचे असेल तर एकत्र येऊन दररोज झाडाभोवती वर्तुळाकार तास न तास बसून झाडाला नकरात्मक लहरींनी (negative destructive frequency) घायाळ करतात. आश्चर्याचा भाग म्हणजे काही आठवड्यात ते झाड शुष्क होऊन उन्मळून पडते. 
हे उदाहरण कोणालाही पचनी पडणे अवघड आहे. 
ते अविश्वसनीय वाटणे स्वाभाविक आहे. अदृश्य, न दिसणारे, नकारात्मक मन, चिन्तन करणारे विचार, एका झाडाचे अस्तित्व नष्ट करू शकतात का? 
तुम्हाला जर ब्रुस लिप्टनचे पुस्तक The Biology of Belief वाचण्याची संधी मिळाली तर तुम्ही सोलोमन बेटावरील गोष्टच नव्हे तर तुम्ही तुमच्याबद्दल आणि ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्या विषयी नकारात्मक बोलण्यावेळी हजार वेळेस विचार कराल. 
लिप्टन यांनी या पुस्तकात जागृत (conscious) आणि सुप्त मनाच्या (subconscious mind) ताकदीवर विस्तृत विवेचन केले आहे. 
 सुप्त मनाची ताकद ही जागृत मनाच्या ताकदीपेक्षा दशलक्ष पटीने जास्त असते. 
 दैनंदिन जीवनात सुप्त मनाचा नकळत प्रचंड प्रभाव असतो. 
पुष्कळ वेळा आपण आपल्या वाईट सवयी अथक प्रयत्न आणि इच्छाशक्ति असताना सुद्धा सोडू शकत नाही. त्याचे मुख्य कारण ह्या वाईट सवयी सुप्त मनामध्ये प्रभावीपणे प्रोग्राम केल्या जातात आणि ते आपले सर्व प्रयत्न निष्क्रिय करतात. 
 जागृत मन (Conscious mind) ही सुप्त मनाची (Subconscious) केवळ सावली असते. 
सोलोमन बेटावरील आदिवासी हे प्रभावीपणे नकारात्मक लहरींनी झाडाच्या संवेदनेवर (emotion) आघात करतात. झाडांना संवेदना असतात हे ही तितकेच खरे आहे.
काही दिवसांनी त्या आघाताने त्या संवेदना झाडाच्या एक अंगीभूत भाग होऊन जातात आणि त्यामुळे झाडाची अणुरचना ढासळते. झाड आतूनच मरणासन्न होते. 
त्या पुस्तकात जागृत पालकत्वावर स्वतंत्र प्रकरण आहे. 
त्यात मुलावर सतत नकारात्मक बोलण्यामुळे, त्याच्या जडणघडणीवर विपरीत परिणाम  होतात. 
याउलट सकारात्मक विचार, मुलाचे जीवनात उपयुक्त पडतात. 
 तेच तेच सारखं बोलत राहणे सुप्त मनावर पगडा करते आणि तसेच घडत जाते याची प्रचिती दिसून येतेच. 
म्हणूनच रोज असे म्हणा_ 
"मी सुखी आहे, 
मी सर्व गुणसंपन्न आहे, 
माझ्याकडे भरपूर पैसा, उत्तम आरोग्य, उत्तम नाती, उच्चकोटीचा समाज, असे सर्वांगीण सुख स्मृद्धाने परिपुर्ण जीवन मी जगत आहे. 
 जे होत आहे आणि होणार आहे ते सर्व चांगलेच होणार आहे!" 
नेहमी असेच विचार मनात सतत असू द्या. 
हाच आपल्या सगळ्यांसाठी समृद्ध जीवनाचा कानमंत्र आहे !


A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा