Pages

शुक्रवार, २९ मार्च, २०१९

कृतज्ञतेची शक्ती


कृतज्ञतेची शक्ती

एका श्रीमंत म्हाताऱ्याला वाटत माझा सांभाळ करणारी मुलं आज माझ्याकडे असती तर...
एका गरीबाला वाटत या म्हताऱ्या सारखा मी श्रीमंत झालो तर...
एका जाड्या स्त्रीला वाटत की आपण समोरच्या मुलींसारखं झिरो फिगर असतो तर...
झिरो फिगर असणाऱ्या मुलीला वाटत त्या स्त्रीच्या गळ्यात असणाऱ्या हिऱ्याचा हार माझ्या गळ्यात असता तर...
केस नसणाऱ्या टक्कल पडलेल्या माणसाला वाटत मला छान केस असते तर...
त्या स्त्री सारखी बायको मला बायको म्हणून मिळाली असती तर...

असे किती तरी जर तर आपण रोज आपण अनुभवत असतो आणि स्वतःला नाराज करून घेत असतो,दिवसाच्या शेवटी फक्त आपल्याला पाहिजे ते न मिळाल्याची नाराजी छळत असते.सुखी जीवनात ही अशी असमाधानाची बेट उगवत राहिली की मग आहे हेही गोड लागत नाही, सतत लक्ष जे आपल्याकडे नाही अशा गोष्टीवर केंद्रित होत. मग हळूहळू मनःशांती भंग होत जाते.

जर आपण एखाद्याला विचारलं की मनःशांती मिळविण्यासाठी तुम्ही काय कराल तर बऱ्याच जणांचं उत्तर असेल परदेशी दौऱ्यावर जाईल किंवा मला हवी ती गोष्ट करील.परंतु खर तर कोणत्याही तात्पुरत्या उपायाने कोणालाच मनःशांती मिळू शकत नाही.नवी गाडी घेतली,बंगला घेतला किंवा परदेशी टूरला जाऊन आलात तर खरंच आपण आनंदी असतो का? अशा गोष्टीने खरंच मनःशांती मिळते का? तर उत्तर असेल तात्पुरती. कारण ही सर्व क्षणिक सुख आहेत,जोपर्यंत  उपभोगतो तोपर्यंत समाधानी एकदा संपली की परत "येरे माझ्या मागल्या".

खरी मनःशांती मिळविण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगणं.जे काही तोडक मोडक तुमच्या जवळ असेल त्याबद्दल समाधानी असलं की मग दुःख दूर असतात.आहे ह्या क्षणाला मी श्वास घेतोय,दोन्ही डोळ्यांनी हे जग बघू शकतोय, पोटभर अन्न पोटात जातंय यासारखं आणखी कोणतं वेगळं सुखं मला श्रीमंत होण्याने, किंवा सर्व गुण संपन्न असण्याने मिळणार आहे? त्यामुळे जे आपल्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगली तर कोणीही आपली मनःशांती भंग करू शकत नाही.जास्तीत जास्त गोष्टी मिळवल्याने कधीच मनःशांती लाभत नसते उलट जास्तीच्या मागण्या वाढतात हे मात्र नक्की.

जी साधन ,माणस, मित्र व संपदा आपल्या जवळ आहे त्याबद्दल निःसंकोचपणे कृतज्ञता ठेवली तर आपण आपल्या अपेक्षा व इच्छाना मुरड घालतो ज्यामुळे अनावश्यक हव्यास गळून पडतो, जो कुठे तरी मागणी पुरवठा या गोष्टीला कारणीभूत असतो.लोक ज्या गोष्टी त्यांच्याकडे नाहीत त्याबद्दल सतत तक्रार करत राहतात, या तक्रारी मरेपर्यंत संपत नाहीत,तक्रारी जशा वाढत जातात तशा बऱ्याच गोष्टी मनाला पटत नाहीत मग तक्रारींच हे चक्र उत्तरोत्तर मोठमोठ होत जातं,ज्यात आपली मनःशांती नाहीशी होऊन जाते,जगण्याचा उद्देश हरवून बसतो.

सुखी आनंदी जीवनासाठी जे आपल्याकडे आहे त्यासाठी आभार मानून,वर्तमानात कृतज्ञतेने जगणं हेच मनःशांती टिकवण्याचा सर्वात सोप्पा उपाय आहे,जो भल्याभल्याना मरून ही कळलेला नसतो.

न सांगितलेली प्रेमकहाणी....



न सांगितलेली प्रेमकहाणी....
शब्दरचना:- अजय चव्हाण
तिला पहिल्यांदा कधी पाहीलं हे आता आठवतं नाही...पण ती दिसायची नेहमीचं...कदाचित तिची नि माझी वेळ एक असावी...मला अजुनही आठवतंयं जेव्हा पहिंल्यादा मला तिच्याबद्दल काहीतरी जाणवलं...
मी नेहमीसारखाच ठराविक रांगेत मेट्रोची वाट पाहत घाटकोपर स्टेशनला उभा होतो... सकाळची मस्त प्रसन्न वेळ, हवेतला गारवा थोडासा अंगाला झोंबतोय ...आजुबाजुला थोडी हालचाल आहेच पण त्यात इतरवेळी असते तशी चढाओढ नाहीये...एकदम शांतही नाहीये की, एकदम गडबडही नाहीये..कानातल्या हेडफोनमध्ये माझ्या आवडत्या गाण्याचे "आओगे जब तुम साजना, अंगना फुल खिलेंगें" सुर मनात फिल करतोय..सहज बाजुच्या रांगेत लक्ष जातं..समोरचं असलेल्या दोन इमारतीच्या फटीतुन वाट काढून कोवळी किरणे फलाटाच्या कडेला येऊन धडकू पाहतायेत...त्यातलीच काही किरणे तिच्या आंबुस- पिवळ्या पंजाबी सुटवर सांडलेली...मुळात पिवळा असलेला तिचा पंजाबी सुट सांडलेल्या किरणांमुळे सोनेरी भासतोय आणि हातभर असलेल्या गर्दीत ती जरा जास्तच उठून दिसतेय...हेच कारण असावं माझं लक्ष तिकडे जायला..ओढणी केसांवरून ओढून गळ्याभोवती व्यवस्थित सरकवलेली, एका हातात मॅचिंग पर्स, दुसर्या हातात मोबाईल, मी तिचं निरीक्षण करू लागलो... मेय बी तिला कळलं असावं... तिन झटकन वळून माझ्याकडे पाहीलं...बस् हीच ती वेळ तिची नजर माझ्या नजरेत कैद होण्याची..त्या नजरेत नक्कीच काहीतरी होतं.. काय होतं ते माहीत नाही पण मी वाहवत जात होतो...त्या सुरांचे परिणाम की, आणखी कसले ते नाही कळलं तेव्हा पण मनाच्या अंगणात नक्कीच तेव्हा फुले फुलली होती...
एव्हाना मेट्रो आली..आणि नेमकं मला तिच्या समोरच्या सीटवर जागा मिळाली...मी अजुनही तिच्याकडे पाहतोय..हे तिला कळतं होतं.. ती जाणुनबुजुन दुर्लक्ष करत होती....केसांवरची ओढणी तिने काढून केस मोकळे केले..अहाहा!...काय केस आहेत तिचे अगदी " इन जुल्फे के घने सायें में मै जिंदगी बिता लू "इतपत म्हणण्यापर्यंत...मी उगाचच घने सायें में हरवल्यासारख्या तिच्याकडे पाहतोय...गोरा उभट चेहरा,काळेशार पाणीदार डोळे, हनुवटीच्याखाली असलेला लोभस तिळ,खरंच ही म्हणजे माझ्या स्वप्नातलीच....इतकी सुंदर बरं नुसती सुंदरच नाही तर कसालाही कृत्रिम डामडौल नाही, राहणीमान एकदम साधं, कुठेच कसलाच "मी आहे" हा दिखावा नाही..खरंतरं मगाशी मेय बी मी तिच्या रूपाकडे आकर्षित झालो असेल पण खरंतरं तिच्या साधेपण्याच्या प्रेमात मी पडलो होतो... मी एकटक तिच्याकडे पाहत कसलातरी विचार करतोय हे ती मोबाईल समोर धरून चॅटिग करत असल्याचा आव आणत पाहत होती....इतक्यात "मरोळ नाका स्टेशन "अशी अनाऊसमेंट झाली तसा मी भानावर आलो आणि घाईघाईतच उतरलो...सरकत्या जिन्यावरून उतरत असताना वेळ आणि तो मेट्रोचा तिसरा डबा ह्याची नोंद माझ्या मनाने केली...मग त्याच वेळेला त्याच रांगेत बरेच दिवस "ती " दिसण्याची वाट पाहीली...पण नाहीच दिसली ती कधी....कदाचित कुठेतरी वरच्याला हे मंजुर नसावं असं समजुन मी ही तिचा विषय सोडून दिला तसंही म्हणतातच ना " मनासारखं झालं तर चांगलच आहे आणि नाहीच झालं तर अजुन चांगल आहे कारण ती ईश्वराची ईच्छा असते"
माझ्याबाबतीत नेहमी असं का होतं हा प्रश्न मला नेहमीच पडतो...म्हणजे बघा ना एखादी गोष्ट जेव्हा मला हवीहवीशी वाटते आणि ती मी मिळवण्याचा अटोकाट प्रयत्न करतो तेव्हा ती मला कधीच मिळत नाही पण तिच गोष्ट माझ्या ध्यानीमनी नसताना किंवा अपेक्षाच नसताना अलगद अगदी सहजतेने भेटते उदाहरण द्यायचं झालं तरं त्यादिवशीचीच गोष्ट तिच्या प्रेमात पडल्यानंतर तिला परत पाहण्यासाठी खुप प्रयत्न केला मी जवळपास साडेतीन आठवडे मी त्याच वेळेला त्याच रांगेत तीची वाट पाहीली तेव्हा नाही दिसली मला कधी ती..पण त्यादिवशी जेव्हा तिची वाट पाहणं मी सोडून दिलं होतं तेव्हा नेमकी मला "ती" दिसली...खरंतरं माझ्या मनातलं प्रेमाचं गुलाब कोमेजून गळूनच पडणार होतं तेवढ्यातच गारगार पाण्याच्या शिडकाव्याने ते पुन्हा टवटवीत झालं....मनात पुन्हा एक आशा निर्माण झाली...कदाचित त्या वरच्या रबला पण हेच हवं असेल...
सुट्टीचे दिवस वगळता हल्ली "ती" रोजच दिसते..मी नेहमीच पाहतो तिला एकटकं..तिच्याकडे पाहील्यानंतर हरखुनच जातो मी..आजुबाजुचा गोंगाट कानात घुसतचं नाही...कानात गुंजतात तेव्हा फक्त " आओगे जब तुम साजना अंगणा, फुल खिलेंगे" ह्या गाण्याचे सुर...मनातलं गाणं सालं हे संपतचं नाही...कधी कधी असं पिसासारखं हलकं हलकं वाटत...आकाशात उडतोय असा भास होतो...
" नैना तेरे कजरारे है, नैनो पे हम दिल हारे है..
अंनजाने है तेरे नैनो ने वादें किए कही सारे है"
जेव्हा जेव्हा माझे डोळे तिच्याकडे बघतात...तेव्हा तेव्हा माझे डोळे तिच्या डोळ्यांना हेच सांगत असतात..
तिला डे वनपासून माहीतेय मी तिच्याकडे पाहतो ते... तीही माझ्याकडे पाहते...बोलत काहीच नाही, हसतही नाही, ओळख असल्याच्या खाणाखुणाही नाही, पण तिचे डोळे माझ्या डोळ्यांना चांगले ओळखात....हे तिलाही माहीतेय ...शी कान्ट डिक्लाईन दॅट..
एक वर्ष झालं डोळ्यांनीच पाहतोय तिला...कधी कधी वाटतं समोर जाऊन सांगावं तिला मनातलं सारं...पण भीतीही वाटतेय..कसं सांगाव आणि कुठे सांगावं हा ही प्रश्न आहेच..पण प्रयत्न करायला काय हरकत आहे...अखेर थोडीशी हिंमत करून मी विचारायचं ठरवतो पण त्याअगोदर एक करायला हवं..तिचंसुद्धा मन बघायला हवं त्या अनुषंगाने दुसर्या दिवशी मी तिच्यासमोर जातचं नाही...ती त्याच रांगेत उभी आहे..तिलाही मला पाहण्याची सवय आहे का नाही हे पाहायचं...जसं तिला उशीर झाला की, मी थांबतो ती थांबते का हे बघायला हवं...हा विचार करून मी लांब उभं राहून ऑब्जर्व करतोय..बघु आता मला शोधते का..ती खरोखर मला शोधतेय..मला उशीर झाला असेल असं समजुन तिने चक्क दोन मेट्रो सोडल्या..
मला माझ्या प्रश्नाचं उत्तर न विचारताचं मिळालं..खुप आनंदी होतो मी त्या दिवशी..ह्रद्याच्या खिशात ढग भरले होते तेव्हा...एक उंच उडी मारून "याहु" करावसं वाटलं पण सावरलं स्वतःला...उद्या विचारूच असं ठरवून मी माझा प्रपोज एक दिवस पुढे ढकलला...
दुसर्या दिवशी मस्त एक गुलाब घेऊन त्याच रांगेत उभा राहीलो तिची वाट पाहतं....
ती नाही आली....
1 वर्ष 3 आठवडे 4 दिवस झाले...ती परत कधी दिसलीच नाही...एका पाऊलावर जग होतं माझं..एक पाऊलही मला पुढे टाकता आलं नाही...तेव्हा विचारलं असतं तर?? ह्या गोष्टी आता फक्त जर तरच्या झाल्या...आता काहीच अर्थ नाही ह्या गोष्टीला...तिला घेतलेलं ते गुलाब अजुन तसंच आहे माझ्या त्या कवितेच्या पानांवर....कोमजलं जरी असलं तरी त्यातल्या भावना अजुन तशाच आहेत न कळवलेल्या आणि त्या कवितेचे शब्देही आहेत तसेच तुझ्या आठवणीतले....
"एक मंद झुळुक कुठनशी येते..मन वाहवत जाते...नकळत एक नवे स्वप्नांकुर फुलते..मन उंच उंच भरारी घ्यायला लागते.. रोज एक नवी आस लागून राहते..कुठेतरी ती वाट संपते आणि आठवणीच्या पाऊलखुणा ठेऊन मन पुन्हा परतते..."
समाप्त....

आत्मविश्वास


एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. Creditors (धनको) त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावून होते.

असाच तो एका बगिच्यातील बेंचावर डोके हातांनी धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे त्याला खूप वाटत होते. अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, मला वाटते मी तुला मदत करू शकतो. वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.

व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला. त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर

करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले. काही महिन्यातच, तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला.

बरोबर एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला.

व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार आणि आपली यशाची गाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडले. चला, शेवटी तुला पकडलेच, ती ओरडून व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली, ययाने तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून. ङ्ख असे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले. व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता. त्याला काहीच कळेनासे झाले. गेले वर्षभर आपल्याजवळ 5 लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात तो करार करीत होता. अचानक त्याच्या लक्षात आले की, त्याचे आयुष्य बदलवून टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती.

तात्पर्य-आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास मिळते.

शिमगो



हे बारा गावच्या,बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा म्हाराजा....
होय म्हाराजा....🙏🏻

आज जो शिमग्याचो सण सगळे पोरा टोरा, म्हातारे कोतारे, मिळान साजारो करतत, त्यांचो तू नेहमी सांभाळ कर आणि जी काय इडा पिडा, वाकडा नाकडा आसात ता दूर कर रे म्हाराजा....
होय म्हाराजा....🙏🏻

कोणी काय कोणावर वाकडा नाकडा केला आसात तर ता भायेरच्या भायर निघान जाऊं दे रे म्हाराजा....
होय म्हाराजा....🙏🏻

कोणाक पाॅर हायत नसात तर त्याका पोरा होऊ दे, काम धंद्यात सर्वांका यश दे, पोरा टोराक शिक्षणात यश दे, कोणाचा लगिन जुळत नसात तर ता तुझ्या कृपेन जमानदे रे म्हाराजा....
होय म्हाराजा....🙏🏻

हे देवा म्हाराजा आज जो काय महाराष्ट्रात दुष्काळ पडलो हा, त्याचो तू नाय नाट कर आणि तुझ्या कृपा दुष्टीने भरभरून पाणी दे रे म्हाराजा....
होय म्हाराजा....🙏🏻

हे देवा म्हाराजा आणि जो काय आजकाल पोरीटोरींवर अत्याचार होतंत आणि जे करतत त्यांचो नाय नाट कर रे म्हाराजा....
होय म्हाराजा....🙏🏻

ह्या बगा देवाक मी नारळ देऊन सगळ्यांच्या वतीने गाराणा घातलय.

चला आता सगळ्यांनी पाया पडा आणि शिमगो खेळाक येवा.

आपणा सर्वांना शिमग्याच्या मनःपुर्वक शुभेच्छा

हत्ती




एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला.

काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एकेदिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला.

 वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली.

कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता.

 त्याने राजाला असा सल्ला दिला,"महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा." राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले,

सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला.

 त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.

ध्यानात ठेवा

निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.

 जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते ..

आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते....!

दुखावणारी माणसं !!

दुखावणारी माणसं !!
काल एका कार्यक्रमाला गेले होते.कार्यक्रम संपल्यावर बाहेर पडताना थोडा अंधार होता.प्रत्येकजण आपापलं जेवण आटपून बाहेर पडत होता. तेवढ्यात एका xyz व्यक्तीला एका प्रथितयश डॉक्टरांनी हाक मारून म्हटलं " अरे बाहेर अंधार आहे रे ,सांभाळून ! बाहेरच्या काळोखासारखा असलेला तुझा चेहरा कुणाला दिसला नाही तर आपटेल कुणीतरी तुझ्यावर ! " त्या व्यक्तीचा चेहरा एकदम पडला. चारचौघात त्याच्या रंगावरून बोलल्यामुळे मनातून खूप दुखावला गेला असावा ! काय मिळतं अशा कॉमेंट्स  करून लोकांना काय माहित!! एखाद्याच्या व्यंगावर हसणारे लोक पहिले कि कीव येते अगदी त्यांची ! बरं,हि माणसे स्वतः अगदी सर्वगुणसंपन्न असतात असंही नाही. पण ते ज्या पद्धतीने दुसऱ्याच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवतात ना ते पाहिलं कि चिडचिड होते अगदी !!
हि अश्या प्रकारची माणसं समोरच्याच्या मनाचा कधीही विचार करत नाहीत आणि बोलून झालं कि आपण काहीतरी फारच भारी काम केल्यासारखं स्वतःवर खुश होऊन हसत असतात आणि ज्याला ऐकावं लागतं तो मात्र बिचारा खजील होतोच आणि स्वतःचा आत्मविश्वासही गमावून बसतो.
लहान मुलांना पटकन त्यांच्यातला दोष दाखवण्यात  ह्या प्रकारची माणसं अगदी पटाईत असतात. एकदा मी आणि माझी लेक एका ठिकाणी गेलो होतो.एक ओळखीच्या बाई आपल्या नातीला घेऊन आलेल्या तिथे.... कुठे असतेस ,काय करतेस अशा जुजबी चौकश्या झाल्यावर माझ्या लेकीकडे बघून म्हणाल्या " अगंबाई, दातांची वेडीवाकडी ठेवण अगदी आईची घेतलेली दिसत्ये ! " त्या बाई सावळ्या होत्या तशीच त्यांची नातही सावळी  दिसत होती. म्हणून मी लगेच म्हटलं " होय ,खरंय तुमचं ,काही मुलं आईची वाकड्या दातांची ठेवण घेतात आणि काही मुलं थेट आजीचाच रंग घेतात हो ! " माझ्या बोलण्याचा रोख कळला त्या बाईंना ! राग येऊन निघून गेल्या तिथून!! बहुतेक परत कुणाला बोलणार नाहीत!!

ह्या वृत्तीची माणसं फक्त दुसऱ्याच्या व्यंगावरच बोट ठेवतात असं नाही तर त्याची एखादी दुखरी नस माहित असेल तर अगदी आठवणीने तो विषय काढून बोलणारच. माहित असतं बार का ह्या लोकांना कि समोरच्या माणसाचा मुलगा काहीही न करता घरी बसलेला आहे तरी विचारणार " असतो कुठे हल्ली ? दिसला नाही बरेच दिवसात ! म्हटलं मोट्ठी नोकरी लागलेली दिसत्ये ! " हे ऐकून आधीच काळजीत असलेली ती माउली अजूनच दुःखी होते.
लग्न लवकर न ठरलेल्या,मूल लवकर न होणाऱ्या , परीक्षेत,व्यवसायात सतत अपयश येणाऱ्यांना तर ह्या विशिष्ट प्रकारची माणसं अगदी नको करून सोडतात ! रस्त्यात ,समारंभात अगदी भाजी घेताना भेटलो आणि वेळ मिळाला तर तिथेसुद्धा तुम्हाला दुखावल्याशिवाय  हि माणसं सोडत नाहीत !!
आणि सगळ्यात जास्त वेळा टोमण्यांचा, चेष्टेचा सामना करावा लागतो तो माझ्यासारख्या जाडजूड माणसांना !! फिट असावं आणि दिसावं असं कुणाला वाटत नाही? कुणालाही आपण बेगडी ,कुरूप दिसावं असं वाटत नसतंच मुळी ! प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. पण शेवटी सगळंच काही आपल्या हातात नसतं ना! माझ्यासारख्या जाड व्यक्तींना ऐकवले जाणारे कॉमन डायलॉग कोणते माहित्ये ? " हळू हळू,खुर्ची मोडेल " , " बापरे ,भूकंप झाला कि काय " " समोर बघून चाल , तुला काही नाही होणार ती गाडी मोडेल ", " घसरू नको,रस्त्यात खड्डा पडेल मोठा ",
" जरा कमी जेव " किंवा " खा एखादी पुरी, काही नाही होणार १०० ग्रॅम  वाढून सागराला काय फरक पडेल ?" इ.इ.
कुणी अति बारीक असेल तर " फु केलं तरी उडशील " " नुसती काठी असून काय उपयोग ! ताकद नको ?"इ इ
हे सगळं जे बोलत असतात त्यांच्या आरोग्याची खरं तर बोंब असते. फिगर छान असते पण गुढघे दुखत असतात, मणके दुखत असतात, जराशा कामाने दमायला होत असतं पण हे सगळं दिसत नसतं.दुसऱ्याला मूल होत नाही म्हणून त्यांना बोलणार्यांची मुले जे दिवे लावत असतात त्याचा प्रकाश त्यांना नंतर दिसणार असतो.परीक्षेत अपयश मिळणाऱ्या मुलांना बोलणाऱ्यांची स्वतः कधी शाळेत सुद्धा विशेष प्राविण्य मिळवलेलं नसतं.पण... बोलायचं ... टोचायचं काम हि माणसं मनापासून करत असतात आणि त्यात त्यांना आनंद मिळत असतो हे विशेष !!
माझी चिपळूणची आजी ( आईची आई ) नेहमी दासबोधातले दाखले द्यायची. तिचं वाचन आणि अभ्यास प्रचंड होता. ह्या विषयावरच आमच्या एकदा गप्पा चालू होत्या तेव्हा ती म्हणाली " समर्थानी सांगितलेलं आहे तसं वागावं म्हणजे काय तर 'नाठाळाचे माथी हाणू काठी 'स्वतःहून कुणाला व्यंग दाखवून दुखावू नये पण आपलं व्यंग काढून आपल्याला कुणी दुखावलं तर त्याचं व्यंग दाखवल्याशिवाय त्याला सोडू नये. ज्याचं त्याचं माप त्याच्या पदरात घालायचं. आपलं व्यंग दाखवलं म्हणून दुःखी व्हायचं नाही उलट समोरच्याची कीव करून त्याला देव सद्बुद्धी देवो म्हणायचं .!

---यशश्री भिडे

डिफॉल्ट मोड


डिफॉल्ट मोड

डॉ. यश वेलणकर

तुम्ही तुमच्या बोक्याला, कुत्र्याला किंवा बैलाला मधुमेह, हायपरटेन्शन किंवा थायरॉइडचा त्रास होतो आहे असे पाहिले आहे का..??🤔🤔

तशी शक्यता खूप कमी आहे. माणसात मात्र हे आजार खूप वेगाने वाढत आहेत. त्याचे एक कारण आहे. आपल्या मेंदूतील एक ठरावीक भाग सतत काम करीत असतो. माणूस शांत बसलेला असतानादेखील हा भाग शांत होत नाही. हे सतत मनात येणारे विचार आपल्याला युद्धस्थितीत ठेवीत असतात. त्यामुळेच मानसिक तणाव वाढतो आणि आपल्याला वरील सर्व आजार होतात...!!

आपण शांत बसलेले असताना देखील मेंदूतील जो भाग काम करीत असतो त्याला शास्त्रज्ञांनी ‘डिफॉल्ट मोड नेटवर्कअसे नाव दिले आहे..!!

कॉम्प्युटर सुरू केला की याच मोडमध्ये तो सुरू होतो. माणसाचा मेंदू हा सुपर कॉम्प्युटर आहे. त्यामध्येही ठराविक भाग असा असतो जो आपण गाढ झोपेतून जागे झाल्याक्षणी काम सुरू करतो..!!

डिफॉल्ट मोड नेटवर्क हा शब्द २००१ साली प्रथम वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ. मार्कस राय्चल यांनी वापरला. माणूस कोणतीही कृती करीत नसताना, विचारात मग्न असताना मेंदूतील हा भाग सक्रिय असतो; पण तो एखादी कृती लक्षपूर्वक करू लागला की, या भागातील सक्रियता कमी होते असे त्यांनीच दाखवून दिले..!!

आपण कोणतेही शारीरिक काम करीत नसतो किंवा एखादे काम यांत्रिकतेने करीत असतो त्यावेळी मेंदू विचारांच्या आवर्तात बुडालेला असतो. एका विचारातून दुसरा विचार अशी ही साखळी चालू राहते, शरीर स्थिर असले तरी मन इतस्तत: भटकत असते..!!

आपला मेंदू भूतकाळातील आठवणीत किंवा दिवास्वप्ने पाहण्यात गुंतलेला असतो. त्यासाठीच मेंदूत ऊर्जा वापरली जात असते. विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे महत्त्वाचे काम आहे; पण ते काम सतत होत राहिले तर मेंदू थकतो, कंटाळतो, नैराश्याचा शिकार होतो..!!

मेंदूतील या भागाला विश्रांती कधी मिळते, माहीत आहे..??🤔🤔

माणूस एखादी शरीर कृती लक्ष देऊन करू लागतो किंवा तो शरीराने काम करीत नसला तरी माइंडफुल असतो, सजग असतो त्यावेळी मात्र हा भाग शांत होतो आणि टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क (टीपीएन)सक्रिय होते. श्रमजीवी माणसात ज्यावेळी त्यांचे त्यांच्या कामावर पूर्ण लक्ष असते. त्यावेळी डिफॉल्ट मोड नेटवर्कला थोडी विश्रांती मिळते..!!

कुंभार त्याचे मडके तयार करीत असतो, त्यावेळी त्याच्या मेंदूतील हा मोड बदलला जात असतो. कारण मडके करण्याच्या कृतीवर त्याला एकाग्र व्हावे लागते..!!

बुद्धिजीवी माणसात मात्र असे होत नाही, शिकवताना, हिशेब करीत असताना किंवा कॉम्प्युटरवर काम करीत असताना मेंदूत विचार असतातच. किंवा तुम्ही मिक्सरमध्ये चटणी वाटत असता त्यावेळी मेंदूतील विचार चालूच राहतात आणि डिफॉल्ट मोड काम करीतच राहतो. मग त्याला विश्रांती कशी मिळेल..??

सजगतेने आपण ज्यावेळी श्वासामुळे होणारी छाती किंवा पोटाची हालचाल जाणतो किंवा त्याक्षणी येणाऱ्या बाह्य आवाजावर लक्ष केंद्रित करतो, त्यावेळी डिफॉल्ट मोड शांत होतो. माणूस श्वासाचा स्पर्श जाणू लागतो त्यावेळी त्याच्या मेंदूतील टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क काम करू लागते...!!

आपल्या मेंदूच्या लँटरल प्री फ्रन्टल कॉरटेक्समध्ये लक्ष केंद्रित करणारे केंद्र असते, ते यामुळे सक्रिय होते. श्वासामुळे होणारी छातीची किंवा पोटाची हालचाल तुम्ही जाणत असता त्यावेळी मेंदूतील इन्सूला नावाचा भाग सक्रिय होतो आणि डिफॉल्ट मोड शांत होतो. मन काही क्षण वर्तमानात राहते त्यावेळी मेंदूतील विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळते...!!

विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे वैशिष्ट्ये आहे; पण सतत येणारे विचार मेंदूला थकवतात, तो थकवा दूर करण्यासाठी काही काळ हा "डिफॉल्ट मोड" बदलणे आवश्यक आहे..!!

त्यासाठीचा एक साधा उपाय करून पहा..!!

शांत बसा, एक हात छातीवर, दुसरा पोटावर ठेवा. तुम्ही काहीही करीत नसलात तरी तुमचे शरीर श्वासोच्छ्वास करते आहे. त्यामुळे छाती किंवा पोट हलते आहे. तुमचे सर्व लक्ष तुमच्या हातांवर ठेवा आणि नैसर्गिक श्वासामुळे छाती अधिक हलते आहे की पोट हे जाणा..!!

ज्यावेळी ही हालचाल समजते त्यावेळी तुमच्या मेंदूतील डिफॉल्ट मोड शांत झालेला असतो, त्याला विश्रांती मिळत असते. जो श्वास तुम्हाला समजतो तो चांगला श्वास, गुड ब्रेथ..!!

असा
अर्धा मिनिट, एक मिनिट, पाच - दहा श्वास, त्यावर लक्ष केंद्रित केलेत की मेंदूतील डिफॉल्ट मोडला विश्रांती मिळून तुम्ही ताजेतवाने व्हाल. किती साधा आणि सोपा उपाय आहे.!!

फक्त त्याची आठवण होणे थोडेसे अवघड आहे. दर दोन तासांनी काही सजग श्वास घ्यायचे असा संकल्प करून त्यासाठी प्रयत्न करून पहा आणि कळवा मला...!
 गुड ब्रेथ मेंदूला ताजेतवाने करतो. दिवसभरात किमान तीन-चार वेळा श्वासाची हालचाल जाणायची असे ठरवता येईल??

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा