Pages

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

कारण घाम गळत नाही


कारण घाम गळत नाही
         लहानपणी शाळेत जाण्यासाठी अनवाणी चार पाच किलोमिटर डोंगर दऱ्यातून, काटयाकुटयातून पाऊलवाटेन जाव लागे. घाम गळत होता. खिशातल्या मळकट रुमालाने पुसला जायचा. रुमालाचा रंग ही बहुधा दाट असायचा. कारण मळला हे लवकर कळू नये म्हणून.
        आता मी ऑफीसला जातो. बस मधून, लोकल मधून, कार मधून किंवा स्वत:च्या वाहनातून. आता घाम गळत नाही. कपाळावरचा दोन थेंब घाम लगेच पुसला जातो. कपाळावरच्या घामाचे दोन थेंब माणसाला गबाळा ठरवतात. खिशातल्या रुमालाचा रंग पांढरा आहे. रोज धूतला जातो.
        शाळेत जाताना शाळेचा ड्रेस एकच असल्याने सांभाळून ठेवला जायचा. पितळेच्या तांब्यात निखारे भरुन तो शर्टवर फिरवला की झाली कडक इस्त्री.
        आज मी ऑफीसला जाताना ऋतु नुसार कपडे वापरतो. उन्हाळयात पांढरे कपडे, पावसाळयात दाट रंगाचे कपडे. कपडयांना इस्त्री लाँडरीत होते. कारण मी घाम गाळत नाही.
        चालून चालून पायाची कातडी इतकी जाड व्हायची की कोणत्याही काटयाला भीक घालत नव्हती. आज मी वेगवेगळया चप्पल घालतो. टॉयलेटसाठी वेगळी, थोडया अंतरावर जाण्यासाठी निराळी, ऑफीससाठी निराळी आणि हो खास कार्यक्रमासाठी निराळी.
       पोटच्या खळगीसाठी घाम गाळून रात्री निवांत झोप येत होती. आज पोटाच्या घेरासाठी व्यायामशाळेत पैसे देऊन घाम गाळावा लागतो. त्याचाही फारसा उपयोग होत नाही. मग विविध औषधे, गोळया, डायटींग करावा लागतो. पुर्वी पैसा कमी असल्याने चैनीचे पदार्थ मिळत नसत. जीभेचे चोचले पुरवायला नव्हे तर पोट भरायला अन्न्‍ खात होतो. आज चव बघुन जेवतो. ताव मारतो.
घाम गाळल्यामूळे सडकून भूक लागायची. भूकेला चव नसायची. मीठ भाकरी पर्णब्रम्ह होते. भरल्या पोटी शांत झोप लागायची.
आज ऑफीसमधल्या चकचकीत वातावरणात घाम गळत नाही. एसीत तर मूळीच नाही. रात्री शांत झोप लागत नाही. नुसता डोकयाला ताप. पोटाचा घेर मात्र सुटला आणि डोक्याचा ताण नव्हे टेन्शन मात्र वाढले. हो. हल्ली मी मराठी शब्दापेक्षा इंग्लिश शब्दृ नेमका चपखल बसतो. टेन्श्न म्हटले की जरा जास्तच भावना पोहोचतात. मग काय टेन्शनलाही उपाय आहेतच की, गुत्ता, बार.
छे छे खरच मी काय कमावल? की गमावल.
होय ! मी घाम गमावला.

                                        एस.एस. मणवे

रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९

मानव


मानव


            विस्तवाचा शोध लागला.  कांतडीं पाघरूं लागले.  त्याचबरोबर प्रकट वाणीहि जन्मली.  बोलायला लागण्यापूर्वी ते आधीं गाऊं लागलें असावेत.  ज्या वेळेस त्यांना अस्वस्थ व असुखी वाटत असे त्या वेळेसे ते सारे एकदम दु:खानें किंचाळत ; जेव्हां एकादी सुंदरशी शिकार त्यांना मिळे, किंवा स्वच्छ सूर्यप्रकाश पडे, तेव्हां ते आनंदानें आवाज करीत.  हळूहळू या सर्वांतून अतुटक असें 'क' वर्गांतील गान निर्माण झालें.  त्यांच्यांतील जे अधिक प्रतिभावान् व प्रगतिशील होते ते आपल्या मनांतील नवीनच उगवलेले विचार अधिक स्पष्टतेनें प्रकट करूं लागले.  आपल्या आवाजांत भर घालून, त्याला कांहीं जोडून, ते विचार प्रकट करूं पहात.  अशा रीतीनें मानवी भाषेंतील पहिली अक्षरें जन्मास आलीं.

            वाणीमुळें ज्याप्रमाणें मनुष्यप्राणी इतर प्राण्यांपासून पृथक् झाला, त्याचप्रमाणें हत्यारांच्या व नानाविध यंत्राच्या शोधामुळेंहि हा गुहेंतील मानवप्राणीं मानवेतर प्राण्यांपासून निराळा झाला.  आणि पहिलें यंत्र म्हणजे आपला हात.  आपल्या या हातानें फेंकतां येतें हा अगदीं आरंभींचा अति महत्त्वाचा शोध.  हातानें जवळच नव्हे, तर लांब अंतरावरसुध्दां दगड मारतां येतो हा शोध ज्या आदि काळांतील एडिसननें लाविला त्याचें मानवजातीवर फार ॠण आहे.  तो अज्ञात असा एडिसन अत्यन्त बुध्दिमान् असला पाहिजे.  संकृति व सुधारणा त्याची अत्यंत ॠणी आहे.  मारण्याची जी सुंदर कला तींत त्या वेळेपासून मनुष्य इतर प्राण्यांच्या सदैव पुढें राहिला !

            वस्तु कशी फेंकावी हें कळतांच फेंकण्याच्या निरनराळ्या वस्तूंचा-अधिक प्रभावी हत्यारांचा-शोध होऊं लागला.  दगडधोंडे व काठ्यालाठ्या त्याला अपुर्‍या वाटूं लागल्या.  आपलें भक्ष्य अधिक सहजतेनें मारतां यावें म्हणून घांसून घांसून अणकुचीदार काठी तो करूं लागला.  दगडांनासुध्दां धार लावून त्यांचे सुळके तो करी.  मृतपशूंचें कांतडें सोलून काढण्यासाठीं, तसेंच मांसखंड करण्यासाठीं या पाषाणी हत्यारांचा उपयोग मनुष्य करूं लागला.  स्वत:साठीं व कुटुंबातील इतरांच्यासाठीं तो अशा प्रकारें मांस तोडी.
           आणि अशाच रीतीनें हळूहळू प्रगति होत आजचीं वाफेचीं यंत्रें जन्मलीं.  विद्युद्यंत्रें जन्मलीं.  हे शोध लागणें ही गोष्ट आश्चर्याची नसून हे शोध लागायला इतकीं हजारों वर्षे लागलीं हें आश्चर्य होय.  वास्तविक चारपांचशें वर्षांतच हें शोध लागले पाहिजे होते.  परंतु यासंबंधीं पुढें बोलूं.  सध्यां मानवजातीच्या त्या आरंभींच्या प्रगतीसंबंधींच बोलूं.  हीं जीं पहिलीं ओबडधोबड हत्यारें मानवानें निर्मिलीं, त्यांच्या साहाय्यानें दोन गोष्टी त्याला करतां येऊं लागल्या.  स्वत:चें संरक्षण करणें व दुसर्‍यास मारणें.  परंतु आपल्या ह्या अगतिक व एकाकी प्रयत्नांनीं तो या दोन्ही बाबतींत फारशी प्रगति करूं शकला नाहीं.  आपणाहून अधिक सामर्थ्यसंपन्न अशी एकादी वस्तु त्याला पाहिजे होती ; त्या सामर्थ्यसंपन्न शक्तिचें साहाय्य त्याला हवें होतें.  'आणि अत्यंत महत्त्वाचा असा एक शोध लावण्यांत त्याला यश आलें.  मानवानें ईश्वराला निर्मिलें.  देवाचा किंवा अनेक देवांचा शोध लागला.
             देवाचा शोध कसा लागला याविषयीं नाना उपपत्ती आहेत.  परंतु सर्वांत अधिक शक्य अशी पुढील उपपत्ति वाटते.  मानवप्राणी स्वत:च्या छाया पाण्यांत बघत.  स्वप्नांत आपल्या मित्रांच्या आकृती ते बघत.  आपणां सर्वांस जणूं दोन शरीरें आहेत असें त्यांना वाटलें.  एक हें दैनंदिन इंद्रियगम्य शरीर, ज्याला आपण हातांनीं स्पर्श करतों; आणि विशिष्टच प्रसंगीं कधींकधीं दिसणारें व बहुधा नेहमीं अदृश्य असणारें असें तें दुसरें छायामय शरीर.  मनुष्य मरतो तेव्हां त्याचें तें स्थूल शरीर पुरलें जातें; परंतु त्याचें तें दुसरें छायामय शरीर नष्ट होत नाहीं.  तें स्वप्नांत आपणांस दिसतें, भेटतें.  तें छायामय शरीर कोठेंतरी जिवंत असलेंच पाहिजे.
          समजा, एकाद्या जातीजमातीचा प्रमुख मनुष्य मेला.  तो जिवंत होता तेव्हां त्याला सारे भीत ; परंतु आतां मेल्यावर तो अधिकच भीतिप्रद झाला.  कारण त्याचें तें छायाशरीर आतां अदृश्य असणार.  छायाशरीरधारी तो नायक कधीं येईल व हल्ला करील तें कळणारहि नाहीं.  आपण कदाचित् त्याला असंतुष्ट केलें तर काय होईल, काय न होईल, असें या दुबळ्या व दुर्दैवी मानवाला वाटे.


मराठा लाइट इन्फंट्रीचा गौरवशाली वारसा


मराठा लाइट इन्फंट्रीचा गौरवशाली वारसा -


- लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर
Maharashtra Times: Feb 4, 2018

भारतात अडीचशे वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट आहेत. त्यातली 'मराठा लाइट इन्फंट्री' ही एक अत्यंत मानाची रेजिमेंट. ब्रिटिश काळात मुंबई प्रांतामध्ये बॉम्बे नेटिव्ह सिपॉयच्या रूपात 'मराठा'ची स्थापना झाली. त्यावेळी फर्स्ट मराठा म्हणजेच जंगी पलटण आणि सेकंड मराठा म्हणजे काळी पाचवी अशा दोन बटालियन होत्या. या दोन्ही रेजिमेंटनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात मोठा पराक्रम गाजवला. ब्रिटिशांनी युरोपात मिळवलेल्या विजयाचे खरे शिल्पकार हेच मराठे होते. दुसऱ्या महायुद्धात इटली व जर्मनीच्या सैन्याशी लढताना इटलीमधील सँग्रो येथे ब्रिटिश सैन्य अडकले होते. त्यांना सोडविण्यासाठी फर्स्ट मराठाचे सैनिक विद्युतवेगाने तब्बल ४० किलोमीटरचे अंतर पायी कापत पोहोचले आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी ब्रिटिशांची सुटका केली. त्याच कामगिरीमुळे मराठा बटालियन ही लाइट (विद्युतवेगाने काम करणारी) बटालियन म्हणून ओळखली जाऊ लागली. त्याचवेळी सँग्रो नदीच्या किनाऱ्यावर सॅपर्स पूल उभारत असताना जर्मन फौजांनी केलेला हल्ला मराठ्यांनीच परतवून लावला.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दाखविलेल्या अतुलनीय शौर्यासाठी व्हिक्टोरिया क्रॉस हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार मराठा रेजिमेंटचे नामदेव जाधव आणि यशवंत घाडगे (मरणोत्तर) या दोघांनाही मिळाला. घाडगे यांनी सिटा डे कॅस्टेलो येथे जर्मन मशिनगनधारी सैनिकांना कंठस्नान घातले. मात्र, छातीवर लागलेल्या गोळीमुळे त्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. तर शिपाई नामदेव जाधव यांनी एकट्यानेच सेनिओ नदीच्या तीरावर पराक्रम गाजवत जर्मनीची दोन ठाणी ताब्यात घेतली.
 दुसरे महायुद्ध संपल्यानंतर मराठा बटालियनने ब्रह्मदेशातही मोठा पराक्रम गाजवला. त्यांचा पराक्रम पाहून ब्रिटिशही थक्क झाले. ज्या मराठ्यांनी आपल्याला विजयश्री मिळवून दिली, त्यांचा पराक्रम पाहता आणखी अधिक काळ आपल्याला भारतावर सत्ता गाजवणे शक्य नाही, हे त्यांना कळून चुकले आणि त्यांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्यलढ्याशी मराठा बटालियनचा थेट संबंध नसला, तरी त्यांचे युद्धकौशल्य आपल्यावर भारी पडेल, याची जाणीव ब्रिटिशांना होणे यात मराठा बटालियनचे मोठे योगदान आहे. उत्तर व दक्षिण कोरिया युद्धातही मराठा बटालियनचे मोठे योगदान होते.

स्वातंत्र्यानंतर गोवा मुक्ती संग्रामावेळी आदेश मिळताच बेळगावमधील मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे सैनिक बेळगाव, वेंगुर्लामागे गोव्यात पायी गेले आणि त्यांनी पोर्तुगीजांना पराभूत करत माघारी जाण्यास भाग पाडले. तसाच पराक्रम त्यांनी दमण दीव येथेही गाजवला. १९६२च्या युद्धात सिक्कीममध्ये मराठाची तुकडी आघाडीवर होती. १९६५ च्या युद्धात अमृतसर वाघा येथून आत प्रवेश करत पाकिस्तानी हद्दीतील बुर्ज नावाच्या ठाण्यावर कब्जा करणारी तुकडी मराठाचीच होती. पुण्यात ज्यांच्या नावाने साळुंके विहार हा परिसर ओळखला जातो, त्या पांडुरंग साळुंके यांना याच लढाईसाठी महावीरचक्र मिळाले होते. हडपसरमधील लष्करी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचा परिसर असलेला ठक्कर विहार हा परिसर ज्यांच्या नावे ओळखला जातो, त्यांनी मिझोराम नागालँडमध्ये बंडखोरांशी लढताना गाजवलेल्या पराक्रमासाठी त्यांना अशोकचक्राने सन्मानित करण्यात आले होते. १९७१ च्या युद्धात तत्कालिन पूर्व पाकिस्तानात मराठा लाइटच्या सैनिकांनी आपल्या पराक्रमाने सर्वांना थक्क केले. मेजर नांबियार आणि लेफ्टनंट कर्नल ब्रार यांना ढाकाच्या लढाईसाठी वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील कर्नल संभाजी पाटील यांच्या २२ मराठाच्या तुकडीने असामान्य धैर्य दाखवत हिली प्रांत ताब्यात घेतला ढाक्यावर कब्जा केला. या विजयाचे श्रेय या तुकडीलाच जाते. त्याचवेळी लाहोरकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावरील नैनाकोट हे पाकिस्तानातील अत्यंत मोक्याचे ठाणे मराठाच्याच तुकडीने आपल्या विलक्षण पराक्रमाच्या जोरावर ताब्यात घेतले. या लढाईसाठी पुण्यातील कर्नल सदानंद साळुंके यांना वीरचक्राने सन्मानित करण्यात आले.

काश्मीर असो वा अरूणाचल, राजस्थान असो वा सियाचिन अशी एकही सीमा नाही, जिथे मराठाची तुकडी तैनात नाही. अगदी संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेतही मराठाची कामगिरी अत्यंत उजवी राहिली आहे. गरिबी, मागासलेपणा, भ्रष्टाचार याचा जवळून अनुभव घेतलेले आपले सैनिक अशा ठिकाणी अन्य परकीय सैन्याच्या तुलनेत उत्तम कामगिरी करतात, याची दखल संयुक्त राष्ट्रांनीही घेतली आहे.

भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्येही मराठा रेजिमेंटच्या सैनिकांचा समावेश आहे. सेकंड पॅराच्या तुकडीनेही उत्तम काम केले आहे. सर्जिकल स्ट्राइकसारख्या अत्यंत अभिमानास्पद कारवाईतही मराठाच्या सैनिकांचा समावेश होताच. कर्नल वाय. बी. शिंदे यांनीच पहिली स्पेशल फोर्सेस बटालियन सुरू केली. अलिकडे २००८ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर हेलिकॉप्टरमधून दोरीने खाली उतरून दहशतवाद्यांवर हल्ला चढविणारी पहिली व्यक्ती ही मराठाचेच कर्नल होते.

असा हा मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास आहे. आपल्या पूर्वजांची ही कर्तबगारी आपल्याला माहिती हवी, आपण ती पुढच्या पिढीला सांगायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठाचे दैवत आहे. बोल श्री शिवाजी महाराज की जय ही आमची युद्धघोषणा आहे. आपण शिवाजींचे बच्चे आहोत, आपल्यामुळे त्यांच्या नावाला बट्टा लागता कामा नये, हेच मराठा रेजिमेंटमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या प्रत्येकाला शिकवले जाते. बाकी चपळता, उत्तम शरीरसंपदा, काटकपणा, गनिमी कावा आणि युद्धकौशल्य त्यांच्याकडे असतेच, त्याच्या बळावरच मराठा लाइट इन्फंट्री आज देशाच्या सर्व सीमा सांभाळण्यात आघाडीवर आहे, आणि यापुढेही राहील.

अशीही परंपरा

सध्या ईशान्य भारतातील लष्कराच्या एका अत्यंत महत्त्वाच्या संस्थेत कार्यरत असलेल्या ब्रिगेडिअर संग्राम मोहिते यांच्यारूपाने साताऱ्याच्या मोहित्यांची सहावी पिढी लष्करात आणि मराठा लाइटमध्ये सेवा देत आहे. हे कुटुंब शिवछत्रपतींचे सरसेनापती हंसाजी हंबीरराव मोहित्यांचे वंशज आहेत. मराठाला २५० वर्ष होत असताना या कुटुंबाने १२० वर्षाहून अधिक काळ मराठामध्येच सेवा बजावली आहे. वीरचक्र विजेते कर्नल सदानंद साळुंके यांचा मुलगा ब्रिगेडिअर समीर देखील मराठामध्येच कार्यरत आहे. मला स्वत:ला सहा मराठाचे नेतृत्व करायला मिळाले त्यानंतर माझ्या मुलानेही याच तुकडीचे नेतृत्व केले. सध्या तो मराठाच्याच माध्यमातून संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेच्या मोहिमांत कार्यरत आहे.


सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१९

दृष्टी


दृष्टी


एका देवळाच्या मागे एक दलदलयुक्त तळे असते. त्यात खूप सुंदर कमळे उमललेली असतात. त्या कमळान्मुळे परिसर खूप सुंदर दिसत असतो. येणारा जाणारा प्रत्येक जण कमळांची प्रशंसा करत असतो.
एक दिवस त्यातील एक कमळ स्वतःची स्तुती ऐकून खूष होते. त्याचवेळी त्याच्या मनात येते मी इतके “सुंदर पण हे काय?! माझ्या आजूबाजूला इतकी घाण, अस्वच्छता. याने माझे सौंदर्य कमी होत आहे. आणि सारखा असाच विचार करून ते कमळ दुःखी होऊ लागते. मग ते देवाकडे तक्रार करते. देवा तू मला असं चिखलात का ढकललं? ते काही नाही तू मला लवकर एका सुंदर तळ्यात रहायला जागा दे. देव त्याला समजावतो पण ते कमळ काही ऐकत नाही.
मग देव त्या कमळाची रवानगी एका राजवाड्यातल्या स्वच्छ तळ्यात करतो. तिथे पण जाणारा येणारा प्रत्येक जण त्या कमळाची स्तुती करतो. अन तळे स्वच्छ असल्याने तिथली माणसे, राजपुत्र छानछान म्हणून त्या कमळाला हात लावून ओरबाडू लागतात. त्या कमळाला आता पूर्वीपेक्षा जास्त त्रास होतो. मग ते देवाकडे जाऊन क्षमा मागते. मग देव त्याला समजावतो अरे तुझ्या आजूबाजूला चिखल हे तुझ्या संरक्षणार्थ व हिताचे आहे. कुठलीही गोष्ट उगाच नसते. कमळाला ते पटते आणि ते पूर्वीसारखे जुन्या तळ्यात आनंदाने राहू लागते.
थोडा विचार केला तर आपल्या आजूबाजूचे होणारे दुःख, त्रास हे आपले बळ वाढवणारे व हिताचेच असते. पण अहंकारामुळे आपण ते दुर्लक्षितो. थोडे आत्मनिरीक्षण, संयम बाळगला तर अशा दुःखरुपी चिखलात पण आपण आनंदाने व समाधानाने कमळासारखे दिमाखात उभे राहू शकतो.
तात्पर्य:- " दृष्टी दूषित असेल तर अमृताचे सेवन केले तरी त्याचा योग्य परिणाम दिसून येणार नाही. म्हणून दृष्टी अंतत: हेतू शुद्ध असावयास हवा, तरच सुयोग्य परिणाम अनुभवास येईल.


गुरुवार, १७ जानेवारी, २०१९

माणसाने वय वाढल्यावर जेष्ठ व्हावे. म्हातारे नाही.....!


 click on image

माणसाने वय वाढल्यावर जेष्ठ व्हावे. म्हातारे नाही.....!
-------------------------------- 
एक मनोगत
••••••••••••••••

आई किंवा वडील किंवा दोघंही - अत्यंत हट्टी आणि Troublesome ठरणं...त्यांचं सुनेला आणि मुलालाही जीव नकोसा करणं ह्याचा परिणाम म्हणून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात होणं - अशीही काही घरं आहेत.

कित्येक घरात, आई सुनेला स्वयंपाकघराचा संपूर्ण ताबा द्यायला नाखूष असते. सून त्या योग्यतेची असूनही.
तर बापसुद्धा "तुला काय कळतंय"असं मुलाला म्हणत, आपल्याच काळात वावरत असतो. त्या घरातल्या मुलांनी काय करावं ? मुलगा व सून (सालस असूनही), उत्तम प्रकारे नोकरी करत असतात व उदंड पैसे घरात आणत असतात, तरी त्यांना 'आपल्या काळी असं नव्हतं' म्हणून आपल्याच तालावर नाचवायचं, हे कितपत बरोबर आहे.....?
नीट आजुबाजूला पाहिलं तर अशी घरं खूप दिसतील.
अर्थात प्रत्येक घरात जाऊन, प्रत्येकाशी बोलून, त्यांचे खरे प्रॉब्लेम्स समजतीलच असं नाही, पण अंदाजाने ३०% आईवडील त्यांच्या अहंकारी वागण्यामुळे खरोखरच वृद्धाश्रमात ठेवण्याच्या योग्यतेचे असतात, हे नाकारून चालणार नाही. बरेचदा केवळ 'लोक काय म्हणतील' या विचारांनी ती मुलं आपापल्या आई/वडिलांना कसे तरी, मन मारून, सहन करत सांभाळत असतात. तेव्हा नाण्याला दुसरी बाजूही समजून घ्यायला हवी. दरवेळी मुलानांच दोष देऊन मातृपितृ प्रेमाचे कढ समाजाने काढणे कितपत योग्य आहे...?

जवळजवळ प्रत्येक माणसात एक अवगुण लपलेला असतो . तो म्हणजे, सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स. हा अवगुण तेव्हाच ठरतो, जेव्हा ती व्यक्ती, दुस-या कोणालाही, आपली जागा घेऊ देत नाही तेव्हा. मग ते घर असो, ऑफीस असो, दोन माणसातलं नातं असो किंवा दुसरी व्यक्ती आपली अपत्य असोत. सख्खी आई सुद्धा, मुलीशी जमवून घेत नाही. बाप सुद्धा, मुलगा जर जास्त हुशार निघाला तर मुलाचा दुस्वास करतो. आणि हे उघड उघड नसतं, ते केवळ त्याच व्यक्तीलाच समजतं. म्हणून ते दु:ख दुस-यालाही सांगता येत नाही... सांगून समजत नाही. पण ज्याचं जळतं त्यालाच ते कळतं.

यावर उपाय म्हणजे दोन्ही पिढयांनी अहंगंडाच्या आहारी न जाता दोन दोन पावलं मागे येण्याचा समजूतदारपणा दाखवला तर प्रश्न सुटण्यास मदत होईल.

वय वाढणे हा निसर्गक्रम आहे म्हणून आपण स्वत:ला ‘आता आपण म्हातारे झालो असे म्हणू नका. ज्येष्ठत्व व म्हातारपण यांतील फरक समजून घ्या.

* म्हातारपण इतरांचा आधार शोधीत असते, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देते.

* म्हातारपण लपवावेसे वाटते, तर ज्येष्ठत्व दाखवावेसे वाटते.

* म्हातारपण अहंकारी आणि हेकेखोर असते, तर ज्येष्ठत्व अनुभवसंपन्न, विनम्र व संयमी असते. विचारले तरच ज्येष्ठ व्यक्ती सल्ला देते वा सुचविते.

* म्हातारपण जीवनाच्या संध्याछायेत मरणाची वाट पाहत दिवस काढते, तर ज्येष्ठत्व संध्याछायेत उष:कालाची वाट पाहत बालांच्या क्रीडा, तरुणांचे दीपवणारे कर्तृत्व कौतुकाने पाहत आनंदाने, समाधानाने जीवन जगते.

* म्हातारपण तरुणांच्या जीवनात लुडबुड करते, तर जेष्ठत्व तरुणांना त्यांच्या मताप्रमाणे जगण्याचा अवकाश देते.

* म्हातारपण 'आमच्या वेळी असे होते...' अशी किरकिर लावते, तर जेष्ठत्व बदलत्या काळाशी जुळवून घेते.

* म्हातारपण आपली मते तारुणाईवर लादू पहाते, तर जेष्ठत्व तरुणाईची मते जाणून घेते.

* म्हणूनच ज्येष्ठांनो, मानाने, आनंदाने, समाधानाने जगा. तुमचा अनुभव व ज्ञान सामाजिक बांधिलकी म्हणून कुटुंबाला  आणि समाजाला द्या.म्हातारे होऊ नका तर जेष्ठ व्हा.

* चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या तरी कपाळावर (नापसंतीच्या आठय़ा) स्पीड ब्रेकर्स पडू देऊ नका. आपली दु:खे उगाळीत बसू नका. मितभाषी व्हा. जीवन आनंदी व सुंदर आहे. जगाबरोबर जगण्याचा प्रयत्न करीत राहा.

मित्रांनो, प्रत्येक घरातील जेष्ठांनी असे राहायचा प्रयत्न केला तर संध्याछायांना न भिता त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांनाही समृद्ध जीवन जगता येईल, आणि त्यांच्या जीवनात आनंदाचा झरा वाहू लागेल, हे निश्चित....!

व्हाटस्ॲप वरून.



रविवार, ९ डिसेंबर, २०१८

कंडक्टर....


मला भावला, म्हणून पाठवला...

कंडक्टर....

आज बऱ्याच दिवसांनंतर बार्शी ते पांगरी असा एस. टी. चा प्रवास केला. अख्खा संसार डोक्यावर, तर कुणी खांद्यावर घेऊन चाललेली अनेक नानाविध माणसं इथे मला पाहायला आणि अनुभवायला मिळतात. आजचाही अनुभव असाच काहीसा होता. अहमदपूर डेपोच्या गाडीत बार्शीहून बसलो. रविवार असल्याने गाडी हाऊसफुल्ल झालेली. त्यातच गाडीच्या दारातून माणसंच पुढे जात नव्हती. मला वाटले, आता कंडक्टर येऊन तणतण करतोय की काय; पण झाले उलटेच!
त्या दरवाज्यातून काका, मामा, दादा थोडी जागा द्या! असं म्हणत एक ऐन पंचविशीतले कंडक्टर गाडीत चढले.
गाडी तर माणसांनी भरून वाहत होती. अशात कंडक्टर सीट तरी थोडीच रिकामी राहणार?
तिथेपण एक आजीबाई, आजोबा आणि ताई बसलेल्या! कंडक्टरला बघून त्या उठू लागल्या. तेवढ्यात कंडक्टर बोलले, "बसा आज्जी, मी उभा राहतो". मी पण दरवाज्याजवळच एक हात अँगलला धरून उभाच होतो. साहेब पांगरीला किती तिकीट हाय ? मी विचारले. मशीनवर बटने दाबून लगेच तिकीट फाडून ते म्हणाले, "द्या तेवीस रूपये"! माझ्याकडे तर बरोब्बर बावीस रूपयेच होते. एक रूपया शोधून सापडेना! तेव्हा कंडक्टर मला म्हणाले, "राहू द्या, नसला तर मी भरतो"!
त्यांच्या या उत्तराचे मला फार कौतुक वाटले. खरं म्हणजे कंडक्टरची नोकरी अंगाचा खुळखुळा आणि डोक्याचे दही करणारी; अशातही संयम ठेऊन आनंदाने कार्य करणाऱ्या एका युवा कंडक्टरला पाहून मी सुखावलो. एकूणच प्रवाशांना मदत करण्याची त्यांची वृत्ती वीस किलोमीटरच्या प्रवासात जाणवली. इथून तिथून माझ्यासोबतच उभे राहिलेले कंडक्टर साहेब घारीत एक जागा झाल्यावरच बसले. पांगरीत गाडी आल्यावर मी उतरताना "साहेब, एक सेल्फी काढू द्याल का, तुमच्या सोबत" असे विचारल्यावर गाडीतले सर्व प्रवासी माझ्या तोंडाकडे टकामका बघायला लागले!
मी सर्वांना सांगितले, "असे कंडक्टरच देशाला कंडक्ट करत आहेत. मला यांच्याबद्दल अभिमान वाटतो, म्हणून सेल्फी काढतोय!" सेल्फी काढताना प्रवाशांनी वाजवलेल्या टाळ्या आणि कंडक्टर साहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून प्रवासाचा शीण निघून गेला. गाडीतून खाली उतरून दरवाजा ढकलला, तोच दरवाज्या शेजारील खिडकीतून कंडक्टर साहेबांना आनंदाश्रू पुसताना पाहिले. आजवरच्या माझ्या जीवन प्रवासात असाच आनंद देत-घेत आलोय म्हणूनच या प्रेमाचा हकदार झालोय!
भारत महासत्ता होईल तेव्हा होईल, पण आजवरच्या भारताच्या जडणघडणीत एस. टी. ड्रायव्हर, कंडक्टर आणि ट्रक ड्रायव्हर, क्लीनर्सचे खूप मोठे योगदान आहे. आजही रोज अर्ध्याहून जास्त ग्रामीण भारत यांच्याच जीवावर इकडून तिकडं अन् तिकडून इकडं फिरतोय. परंतु चतुर्थ श्रेणीतल्या या लोकांना हिरो म्हणायला अजूनही आमच्या सिस्टीमचा ईगो कमी नाही झालेला!
तुटपुंज्या पगारावर रोज हजारो माणसांचे बोलणे खायचे, खड्ड्यांतून गाडीचे हेलखावे खायचे, जर हिशोबात काही गोंधळ झाला, तर वरिष्ठांच्या कारवाईचे ओझे पण वाहायचे आणि यातूनही प्रवासी देवो भवः म्हणायचे!
खरंच हे ग्रेट आहे.
विषय एक रुपयाच्या मदतीचा नव्हता, ती करण्यामागच्या वृत्तीचा होता.
विषय सीटवर बसण्याचा नव्हता, तर बसलेल्यांना न उठवण्याचा होता.
विषय हक्काच्या जागेचा नव्हता, तर हक्काची जागा गरजूंना दिल्याचा होता.
विषय तिकिटाचा नव्हता, तर ते तिकीट हातात देताना केलेल्या स्मितहास्याचा होता.
विषय सेल्फीचा नव्हता, तर आपल्यासाठी कष्ट उपसणाऱ्या नोकरदारांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा होता.
विषय फक्त कंडक्टरचा नव्हता, तर एका माणसाच्या माणुसकीचा होता!
                                           
                                          लेखक अनामिक 


मायेचा ओलावा


मायेचा  ओलावा

सहलीची सूचना वर्गावर्गातून फिरली होती.सहलीला येणा-या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षकांकडे नावे येत्या शनिवार पर्यंत द्यायचीहोती.सहलीला प्रत्येकी दोन हजार रुपये खर्च येणार होता.शाळेतील मुलामुलींनी आपापली नावे द्यायला सुरुवात केली होती.सातवीतील गौरीची सहलीला जायची खूप ईच्छा होती.
सहलीला जाऊन नवीन ठिकाणांची माहिती मिळवावी.प्रेक्षणीय स्थळे डोळे पाहण्याचा आनंद घ्यावा असे तिला वाटत होते.शाळेतून घरी आल्यावर तिने आईजवळ सहलीला जायचा हट्ट धरला.
आई,मला सहलीला जायचं आहे.माझ्या वर्गातील सर्वच मुलेमुली जात आहेत.” असा सूर काढत गौरी हिरमुसून बसली.आजपर्यंत तिने कधीच काही आग्रहाने मागितले नव्हते.जे खायला मिळाले ते खाल्ले.
जसे कपडे आणले तसे कपडे घातले.दुस-यांनी वापरून टाकलेले कपडेसुध्दा आनंदाने परिधान केले.जुन्या वह्यांची उरलेली पाने शिवून अभ्यासासाठी वापरली.बाजारातील जुन्या पुस्तकांना कधीच नावे ठेवली नाहीत.
वर्गातील,शाळेतील मुलामुलींशी अभ्यास सोडून इतर बाबतीत कधी स्पर्धा केली नाही.शाळेतील सर्वात हुशार व समंजस विद्यार्थीनी म्हणून शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी तिची पाठ थोपटली होती.आई काळजीत पडली.
दोन हजारांची सोय कशी लावायची याचा विचार करू लागली.मोलकरीणीचे काम करून कसेबसे पोट भरता येते.शिल्लक चोचले पुरवता येत नाहीत.हे तिला ठाऊक होते.एकुलत्या एका लेकीला सहलीला पाठवायचा निर्धार तिने केला होता.लेकीचा बाप जिवंत असता तर त्याने गौरीला सहलीला पाठवलेच असते.
एक-दोन घरी हातउसणे मागितले पण काही फायदा झाला नाही.पैशांची काहीच सोय लागत नव्हती.काय करावे तिला काहीच सुचत नव्हते.घरातील लाकडाच्या जुन्या पेटीजवळ ती हतबल होऊन बसली.गौरीच्या आईला कोणताच उपाय सापडत नव्हता.
नवरा देवाघरी जाऊन आठ वर्षे उलटली होती पण चार सोन्याचे मणी अन् एक पदकाचे मंगळसूत्र तिच्या डोळ्यासमोर तरळले.तिने पेटीतून मंगळसूत्र काढले.साडीचा पदर कमरेत खोसला.लगबगीने सोनाराचे दुकान गाठले.
सौभाग्याची आठवण म्हणून जपलेली वस्तू काळजावर दगड ठेऊन मोडली अन् दोन हजार रुपये आणले.सकाळी गौरीला शाळेत जाताना पैशे द्यायचे असे तिने ठरवले.सकाळ झाली.कामाला जाण्याआधी आईने गौरीच्या हातात दोन हजार रुपये ठेवले.
आई कामाला निघून गेली.गौरीला पैसे मिळाले.तिला खूप आनंद झाला.आईने एवढे पैसे कुठून आणले असतील? हा प्रश्न तिला पडला. आपणास सहलीला जायला मिळणार असल्याने तिने भरभर कामे आटोपून शाळेत जायला निघाली.
तिने नीशाला शाळेत सोबत चालण्यासाठी आवाज दिला.दोघी शाळेकडे निघाल्या.सहलीला येत असल्याची बातमी तिने नीशाला सांगितली.नीशालाही आनंद झाला.”काल संध्याकाळी तुझी आई माझ्या घरी आली होती.माझ्या बाबांनी तुझ्या आईला पैसे दिले.”नीशाचे बोलणे ऐकून गौरी सुन्न झाली.
गौरीच्या अंगातील त्राण संपला.डोक्यात विचारांचे वादळ सुरू झाले.नीशाला शाळेत जायचे पुढे जायला सांगून ती मागे परतली.थेट सोनार काकाच्या घरी पोचली.
काकांशी अदबीने बोलली.चौकशी केली.मंगळसूत्र मोडून आईने आपल्यासाठी पैसे आणल्याचे तिच्या लक्षात आले.आईचे समर्पण,त्याग समजण्याइतकी ती मोठी झाली होती.
तिने विनवणी करून मंगळसूत्र परत घेतले.पैसे परत केले.संवेदनशील गौरीचा समंजसपणा पाहून काकांनाही नवल वाटले.शाळा आटोपून गौरी घरी आली.आई स्वयंपाक करत होती.भाजी शिजली होती.
भाकरी थापणे सुरू होते.तव्यावरची भाकर काढली. चुलीतील आर बाहेर काढला.भाकर शेकायला ठेवत गौरीला विचारू लागली.”भरलेस काय गं,सहलीचे पैसे? कधी जाणार आमची लाडोबाई सहलीला?” गौरीने आईकडे नजर टाकली.तिच्या पापण्या नकळत भिजल्या.आपसुकच ती आईच्या कुशीत शिरली.रडायला लागली.
“का रडतेस,काय झालं?” असे विचारताच तीने सहल रद्द झाली म्हणून सांगितले.
आईने पदराने गौरीची आसवे पुसली.
गौरीने रडत रडत आईचे मंगळसूत्र आईच्या हातावर ठेवले.हातात मंगळसूत्र बघून आईने गौरीला घट्ट मिठी मारली.
दोघीही ‘मायलेकी एकमेकींना घट्ट पकडून रडू लागल्या.



A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा