Pages

शनिवार, २० जून, २०२६

पावसाचे पत्र

 

पावसाचे पत्र

rain talks


प्रिय माणसा,

                कधी मी लवकर येतो तर कधी उशीरा. गेल्यावर्षी लवकर आलो. तर तुम्ही मला शिव्यांची लाखोली वाहीलीत. लग्न कार्य कधी करायचं म्हणून सोशल मिडीयावर मिम्सचे पीक आणलेत. नदया नाले ओसंडून वाहू लागले. पूर आले. घरं, जनावरं, शेती वाहून गेली म्हणून मी दोषी ठरलो. रस्ते तुंबले, गटारे तुंबली सगळा दोष मलाच. काय तर म्हणे ओला दुष्काळ आला. सारं काही माझ्यावर सोपवून तुम्ही मोकळे झालात.

                म्हटलं येवढा तुम्हाला त्रास होतोय तर जरा जावं उशीरा. तुम्हाला नाही का येत कंटाळा. तेंव्हा जाता न कधीतरी उशीरा कामावर. तुम्ही करता ते चालतं पण मी केलं तर ते पाप ठरतं. खरचं आता हया सगळयाचा मला त्रास होतोय. नेमकं कुणाचं ऐकाव तेच कळत नाही. एकीकडे मी यावे म्हणून देवाकडे साकडे घालता. बेडकाचे लग्न लावून देता. बोंबा मारता. बरं मी आलो की पुन्हा तुम्हाला त्रास होतो. काही जणांना तर मी फक्त मस्त भिजायला हवा असतो. किंवा पिण्याच्या पाण्यापुरता फक्त तलावात पाहीजे इतरत्र नको. काहींना चिखल हवा असतो तर काहींना नको असतो. म्हणून म्हणतो आता तुमचाच कंटाळा आलाय. सारख आपलं ते लहरी लहरी आहे म्हणून हिनवणं. अगदी वैतागून गेलो आहे.

                मी तेंव्हाही लहरी होतो, आता ही आहे आणि पूढेही राहणार आहे. हा माझा स्थायी भाव आहे. तुमच्या तालावर नाचायला मी काय माणूस आहे होय. तुम्हाला मी फक्त गरजेनुसार आणि सोयीनुसार हवा आहे. अगदी माणसांसारखा. पण मी तसा नाहीये. उगाच बोंबा मारण्यापेक्षा एकदा माझा स्वभाव जाणून घ्या. एकीकडे तुम्हाला माझी लेकरं नकोशी झालेत. होय झाडे माझी लेकरे आहेत. जिथे लेकरे जास्त तिथे मी जास्त रेंगाळतो, अडतो आणि बरसतोही. प्रेमाचा वर्षाव लेकारांवर नाहीतर कुणावर तुमच्यावर करणार. नुसती सिमेंटची जंगले उभी केलीत त्याच्यानं नाही मला पाझर फुटत. थांबावस वाटतच नाही. ती हवेच्या झोतावर झुलणारी झाडे दिसली की त्यांना अगदी कवेत घ्यायला मी येतोच. तुम्हाला जमिनीवर आता झाड नको आहे. फक्त कुंडयात हिरवळ हवी आहे. सगळं कसं तुम्हाला तुमच्या ईच्छेनुसार आणि गरजेपुरत हव  असतं. आप मतलबी कुठले.

                पुर्वीही मी असाच होतो. पण कुणीही कुरकुर केली नाही. स्वभाव समजून घेतला होता. नदी नाल्यांचा प्रवाह, हवामानाचा अंदाज आणि निसर्गाच्या नियम समजून उमजून माणसे राहत होती. त्यांनी घरेही तशीच बांधली. अगदी डोंगर कपारीत बांधली. पाण्याची सोय आणि नैसर्गिक उपलब्धता हयाच्या अंदाजाने तुमच्या पुर्वजांनी घरेदारे बांधली. शेतीवाडी केली. गुण्या गोविंदाने नांदली. पोटापरुते पिकवले. आनंदाने पिढी गेली.

                पण आता तुम्हाला नुसता भुकेचा डोंब उसळलाय. भस्मासुरासारखा जमिनी काबीज करुन त्यावर सिमेंटची जंगले उभारलीत. चकचकीत राहायला आवडत ना, पण मला नाही आवडत. मला त्या धरणीशी पहिल्यांना भेटताना जो मातीचा सुगंध उठतो ना तो हवाहवासा वाटतो.  पण तुम्ही तर मातीच शिल्लक ठेवली नाहीत. डोंगरच्या डोंगर पोखरुन वाटोळे करुन टाकलेत. आणि दोष मात्र मला म्हणजेच पावसाला देता. पृथ्वीवर असा एकमात्र जीव तू आहेस तो गरजेपेक्षा जास्त साठा करतो. बघा जंगलातला वाघही पोट भरले असेल तर शिकार करीत नाही. जमिनीखाली राहणारी मुंगीही केवळ पावसाळयापुरती अन्न धान्याची तजवीज करते. पण माणुस नुसता बोकाळला आहे. आत भोग कर्माची फळ.

                बघुया भेटूया थोडयाच दिवसांत

                                                                                                              आपलाच लहरी

                                                                                                                      पाऊस


रविवार, २४ मे, २०२६

लक्षाधिश व कोटयाधिश अधिक असणारे देश मोनॅको

 

लक्षाधिश व कोटयाधिश अधिक असणारे देश मोनॅको

monaco country. 
monaco country


      असा देश जिथे तेथील नागरीकांना आयकर म्हणजेच income tax दयावा लागत नाही. पण त्याऐवजी  कारखान्यात काम करणाऱ्या कामगार व मालक यांना इन्शुरन्स टॅक्स द्यावा लागतो. इतर देशातील व्यक्तींनी येथे जागा घेतल्यास कर द्यावा लागतो. अपवाद फक्त फ्रान्स मधील नागरीकांना आहे.

हया देशात मोटारींच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच महिला फुटबॉल स्पर्धाही होतात. जगातला सर्वात जुना राष्ट्रध्वज हया देशाचा आहे.

उत्पन्नाचे मोठे साधन म्हणजे कॅसिनो जुगार. येथे पर्यटक कॅसिनो खेळतात पण स्थानिक नागरीकांना कॅसिनो मध्ये येण्यास बंदी आहे. या देशाचे शेजारी देश फ्रान्स व इटली हे आहेत. त्यामुळे मिळते जुळते सामाजिक व भाषिक साम्य आढळते. येथील नागरीकांना आपला देश सोडून इतर देशात स्थालांतरीत होऊ नये असे वाटते. या देशातून अन्य देशांत स्थालांतर करणाऱ्यांची संख्या हजारामागे चार एवढी कमी आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढ ही समस्या या देशापुढे आहे.

देश विदेश

      देश विदेश   


   

Vatican city

जगातील आकारमान व लोकसंख्याच्या दृष्टीने सर्वात लहान असणारा देशाचे नाव आहे व्हॅटीकन सिटी. इटली हया देशाच्या अगदी जवळ म्हणजे एक पाऊल इटलीत तर दुसरे पाऊल व्हीटीकन सिटीत एवढा लहान देश आहे. हा देश इटली बरोबर झालेल्या करारानुसार दि.11 फेब्रुवारी 1929 रोजी स्वतंत्र झाला आहे. हया देशात जास्त काळ राहण्यास व नागरिकत्व घेण्यास मनाई आहे. तेथील चर्चमधील सेवा करणाऱ्या लोकांनाच नागरीकत्व देण्यात येते. केवळ त्या देशातील आई-वडील आहेत व जन्म घेतला म्हणून नागरीकत्व मिळत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे सन 2013 च्या आकडेवारी नुसार एकूण 572 व्हॅटीकन नागरीकांपैकी महिला नागरिकांची संख्या केवळ 30 होती. सन 2002 पासून या देशाने स्वतंत्र स्वत:ची  नाणी व चलनी नोटा काढल्या आहेत. प्रमुख उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे पर्यटनातून मिळणारे उत्पन्न. येथील प्रसिध्द म्युझियम कडून उत्पन्न मिळते. त्याचप्रमाणे टपाल तिकिटे, नाणी, स्मरणिका, इ. मधून उत्पन्नाची साधने आहेत. येथील हवामान भुमध्यसागरी असल्यामुळे थंड आहे. जुलै महिन्यात कमाल तापमान 24 अंश से. पर्यंत जाते. ऑक्टोबर ते मे महिन्यात पाऊस पडतो. आकारमान कमी असल्यामुळे येथे विमानतळ नाही. मुख्य रस्ता 1.05 कि.मी. लांब, 0.85 किमी रुंद आहे. येथील टपाल सेवा सर्वात कार्यक्षम व तत्पर समजली जाते. जगप्रसिध्द मोनालिसा चित्र काढणारा चित्रकार लिओनार्दो याच देशातला.

रविवार, ३ मे, २०२६

रत्नदुर्ग किल्ला व त्यावरील शिवसृष्टी रत्नागिरी जिल्हयात पर्यटनासाठी एक छान स्पॉट

 रत्नदुर्ग किल्ला व त्यावरील शिवसृष्टी रत्नागिरी जिल्हयात पर्यटनासाठी  एक छान स्पॉट

    Ratnadurg Fort, Bhagvati port, Ratnagiri



           हल्ली कोकणात पर्यटक व चाकरमानी मोठया संख्येने अगदी एक-दोन दिवसांच्या सुट्टीतही फिरायला येत आहेत. बऱ्यापैकी झालेले रस्ते आणि कोकणातील बीचेस, किल्ले,देवस्थाने अगदी फुलुन जातात. जिल्हयात असणाऱ्या वेगवेगळया ठिकाणामध्ये आणखी एक ठिकाणी भर पडली आहे. इतिहासातील शौर्याची आठवण करुन देणारे आणि पुलकित करणारे असे ठिकाण म्हणजे रत्नदुर्ग येथील शिवसृष्टी. रत्नागिरी शहरापासून थोडयाच अंतरावर रत्नदुर्ग हा किल्ला आणि त्यावर भगवती देवीचे मंदीर आहे. खाली भगवती बंदर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी उभारण्या आली आहे शिवसृष्टी. पण त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी अंधार पडण्याची वाट बघावी लागेल. कारण अंधारात खुप छान सजावट व प्रतिकृती अगदया खऱ्या वाटतात.




            छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या इतिहासातील मोजके गड आणि त्यांचे सरदार यांची प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि त्यासमोर त्यांची थोडक्यात माहिती फलक लावले आहेत. क्यूआर कोड वापरुन त्याची माहिती इंटरनेटवरही उपलब्ध आहे.

            त्याचप्रमाणे शिवरायांचे विश्वासू व पराक्रमी सरदार बाजी प्रभू देशपांडे, कान्होजी आंग्रे यांचे पुतळे व थोडक्यात माहिती फलकावर दर्शविणेत आली आहे. तसेच युध्दनौकेची प्रतिकृती अगदी बारकाव्यांसह उभारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिवकालीन खेडी कशी होती. तेथील लोकांचे राहणीमान, वेशभुषा, अ. बारकाव्यासह उभारण्यात आले आहे. हे सर्व पाहताना एक ते दीड तास सहज निघून जातो. बाहेर पडताना केवळ पर्यटन म्हणून नव्हे तर अभिमानाने छाती भरुन येते आणि इतिहासातील ती पाने डोळयासमोर येतात. एकदा नक्कीस भेट दयावी असे हे ठिकाण आहे.   

सोमवार, १६ मार्च, २०२६

कोकण रेल्वे मार्गावर खास उन्हाळयासाठी कोकणात समर स्पेशल konkan railway summer special

 कोकण रेल्वे मार्गावर खास उन्हाळयासाठी कोकणात समर स्पेशल गाडयांचे वेळापत्रक

konkan railway summer special


कोकणात जाण्यासाठी झालेली गर्दी लक्षात घेता अखेर कोकण रेल्वे प्रशासनाने विशेष उन्हाळी गाडी जाहीर केली आहे. कोकण रेल्वेवर धावणार विकली स्पेशल गाडी. उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी तसेच पर्यटकांसाठी कोकण रेल्वेने आणखी एका विशेष उन्हाळी गाडीची घोषणा केली आहे.

गाडी क्र.01106 ही गाडी आठवडयातून एकदा पनवेल ते मडगाव धावणार आहे. दि.17.05.2026 पासून ही गाडी दर रविवारी मडगाव येथून दुपारी 4.30 वा. सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटे 04.00 वा पनवेल येथे पोहोचेल.

गाडी क्र.01105 ही गाडी दि.18.05.2026 पासून ही गाडी दर सोमवारी पनवेल येथून पहाटे 5.45 वा. सुटेल. ती त्याच दिवशी सायंकाळी 6.10 मि. मडगाव येथे पोहोचेल.

या गाडीला थांबे – माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली,  विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम व करमाळी

या गाडीला एकूण  23 डबे आहेत. Three Tier AC - 03 Coaches, Sleeper - 11 Coaches, General - 07 Coaches






रविवार, १५ मार्च, २०२६

मनातलं गाव

 मनातलं गाव

मनातलं गाव


सद्या इराण, इस्त्राईल व अमेरिका अण्वस्त्र युध्द सुरु आहे. शहरांमध्ये गॅस सिलेंडर तुटवडा झाल्याच्या बातम्या सतत चॅनेलवर सुरु आहेत. सोशल मिडीयावर मिम्स टाकल्या जात आहेत. अनेक हॉटेल बंद करावे लागले आहेत. तसेच उर्वरित बंद होण्याच्या मार्गावर आहेत. काहीजण चुलीचा पर्याय म्हणून वापर करु लागले आहेत. अक्षरश: टाळेबंदी होण्याची वेळ आली असल्याचे संकेत मिळत आहेत.

            छोटया मोठया शहरांमध्ये हाहाकार उडाला आहे. सिलेंडर मिळाला नाही तर काय करायचे या विचाराने पहाटे ऊठून गॅस एजन्सी समोर रांगा लावून लोक उभे आहेत. काही ठिकाणी रांगा लावूनही सिलेंडर मिळत नसल्याने लोकांमध्ये आपापसात तंटे होताना दिसत आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी चुली पेटवायला सुरुवात केली. पण मोठमोठया सोसायटया आणि उच्चतम इमारती यांचे काय?

              हीच परिस्थीती कोरोनामध्ये आली होती. आपण कितीही विकासाची फुशारकी मारली तरीही परावलंबी आहोत हे वेळोवेळी सिध्द होत आहे. पैसा कमवण्यासाठी कितीही धावपळ केली तरी थकलेल्या जीवाला निवांतपणा हा गावातच मिळतो. ज्यांनी जन्मत: गावचं पाहिले नाही त्यांना नाही कळणार. पण ज्यांनी गावाचं जीवन अनुभवले आहे, त्यांना हयाची जाणीव आहे.

                तिकडे कोकणासारख्या हिरवळीत ग्रामीण जीवन मात्र नित्यनियमाने सुरु आहे. पुर्वीही होतं आताही आहे आणि पुढेही राहील. कारण कोकणातील खेडी स्वयंपुर्ण आहेत. म्हणजे इथे गरजा कमी आहेत. ग्रामीण भागातल्या जनतेची स्पर्धा इतर जगाशी नाही. पोट भरण्यापुरते जेवण मिळतंय तेही स्वत: पिकवलेलं. वेगवेगळया ऋतुत तयार होणारा रानमेवा अर्धे पोट भरतो. मग अगदी नदी किंवा समुद्रातील मासे असोत किंवा जंगलातील करवंद, जांभूळ, आंबा, फणस, अळू, कण्हेरी, अटकं, नीवं अशी कितीतरी नावे आहेत.

               रानाता लाकूटफाटा आहे. मॉलची गरजच नाही.  गरजा सिमीत पण निसर्गाशी संलग्न. त्यामुळे अजुनही डोंगराळ भागात डॉक्टरांचे दवाखाने नाहीत. चायनीज, बेकरी पदार्थ, बाहेरचे जेवण, वातानुकुलीत एंत्रे, महागडे कपडे, श्रीमंतीचे प्रदर्शन, फुशारकी, हया गोष्टींना इथे थारा नाही. इथे फक्त निसर्गाच्या संपर्कात निसर्गाशी जुळवून घेत जीवन जगता येतं. खरचं जगता येत.

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

सोशल मिडीया आणि आपण: ‘लाईक्स’ च्या दुनियेत हरवलेले आपले ‘लाईफ!’

 सोशल मिडीया आणि आपण: लाईक्स च्या दुनियेत हरवलेले आपले लाईफ!’

social media


           रस्त्याने जाता जाता एक मोबाईलचे स्क्रीन गार्ड विकणारा फेरीवाला दिसला. त्याच्याकडे सद्या कोणीही गिऱ्हाईक नव्हते. आजुबाजूला लोक येत जात होते. तो खाली मान घालून बसला होता. मोबाईलमधील रीळ बघण्यात दंग होता. पुढे बघितल तर भाजीवाला भाजी गिऱ्हाईकाला भाजी पिशवीत भरता भरता भाजीवर ठेवलेल्या मोबाईलमध्ये रीळ बघत आहे. गिऱ्हाईकाला पटकन पळवण्याच्या मानसीकतेत. मनात विचार आला काय हे वेड लावून ठेवलंय संगळयांना. खऱ्याखुऱ्या जगापेक्षा त्यातील माणसापेक्षा आजकाल आपल्याला आभारी जगच अधिक प्यारे झालेय का?

             लहान मुलांपासून तर आजी आजोबां पर्यंत जो तो गुंतलेला. आजच्या डिजीटल युगात आपली सकाळ सुर्योदयाने कमी आणि व्हाटस्अप नोटीफीकेशनने जास्त होते. डोळे उघडल्या उघडल्या आपण देवाचे दर्शन घेतो की नाही माहित नाही पण मोबाईलचे दर्शन मात्र नक्की घेतो.

सोशल मिडीयाने जग जवळ आणले हे जरी खरे असले, तरी आपल्या शेजारी बसलेल्या माणसाला विसरत चाललो आहेात का? हा विचार करण्याची आता वेळ आली आहे.

1.      स्टेटसच्या नादात स्थिती विसरलो का? status

हल्ली एखादया छान हॉटेलमध्ये गेल्यावर पदाथ जिभेला लागण्यापूर्वी तो कॅमेऱ्यात कैद होतो. चव कशी आहे यापेक्षा फोटोला लाईक्स किती मिळतील, यातच आजचा आनंद सामावलेला दिसतो. तीच गत एखादया सुंदर ठिकाणी गेल्यावर तिथला आनंद उपभोगण्यापेक्षा फोटो आणि रीळमध्येच सगळे अडकलेले. आपण नक्की कोणासाठी जगतोय? स्वत:साठी की फॉलोअर्सना दाखवण्यासाठी?

2.      स्क्रॉलींगचे चक्रव्युह- scrolling

फक्त 5 मिनीटे रील बघतो असे म्हणून आपण मोबाईल हातात घेतो आणि कधी तासभर निघून जातो, हे कळतही नाही. प्रत्येकाला आयुष्य हे वेगवेगळे दिलेले आहे. जेवढे काही आयुष्य आहे त्यातील सुंदर क्षण अनुभवण्यापेक्षा हया आभासी जगासाठी आपण आपला वेळ फुकट घालवत आहोत याची जाणीवही नसते. हे एक असे चक्रव्युह आहे ज्यातून बाहेर पडणे प्रत्येकाला कठीण जात आहे. यामुळे आपली एकाग्रता कमी होत चालली आहे आणि कामाचा वेगही मंदावला आहे.

3.      तुलना: दु:खाचे मुळ कारण

दुसऱ्याचे फिरण्याचे फोटो, नवीन गाडी किंवा महागडे कपडे बघून आपल्याला वाटू लागते की आपलेच आयुष्य किती नीरस आहे. पण लक्षात ठेवा, सोशल मिडीयावर प्रत्येकजण फक्त त्याचे बेस्ट व्हर्जन दाखवत असतो, पडद्यामागचा संघर्ष आणि दु:ख कोणीच पोस्ट करत नाही. सोशल मिडीयावर दाखविलेले व्हिडीओ खरच सगळे सत्य असतात का? मुळात व्हिडीओ का पोस्ट केला आहे? खरचं काहीतरी द्यायला की काहीतरी कमवायला?

4.    डिजीटल डिटॉक्सची गरज

मोबाईल पूर्णपणे सोडून द्या असे कोणीच म्हणणार नाही. पण दिवसाला काही वेळ नो गॅजेट झोन असायला हवा. कितीही म्हटले तरी जगा बरोबर जावंच लागतं. पण काही प्रमाणात आटोक्यात ठेवू शकतो ना. हे जग सोडण्यापूर्वी जे जे काही पहायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे तो कधी घेणार. सतत मोबाईल वापरामुळे झोप अशांत होते. त्यामुळे काही सवयी आपल्याला लावून घ्याव्यात.

·         जेवताना मोबाईल बाजूला ठेवा

·         झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास स्क्रीन बंद करा

·         आभासी मित्रांपेक्षा प्रत्यक्ष भेटणाऱ्या मित्रांना वेळ द्या

 

निष्कर्ष : social media

सोशल मिडीया हे एक उत्तम साधन आहे, जर ते मर्यादित वापरले तर! आपण सोशल मिडीयाचे मालक व्हायचे की गुलाम, हे आपल्याच हातात आहे. मोबाईल लॉक करा, बाहेर पडा आणि खऱ्या जगाचा आनंद घ्या. कारण खऱ्या आयुष्यात फिल्टर्स नसतात, पण तरीही ते खूप सुंदर असते!

 तुम्ही दिवसातला किती वेळ सोशल मिडीयावर घालवता? कमेंटसमध्ये नक्की सांगा.

पृथ्वी गोलच का आहे? – विज्ञान, इतिहास आणि काही आश्चर्यकारक तथ्ये

  पृथ्वी गोलच का आहे? – विज्ञान, इतिहास आणि काही आश्चर्यकारक तथ्ये "पृथ्वी सपाट असती तर काय झालं असतं?" हा प्रश्न कधीतरी प्रत्ये...

आणखी पहा