Pages

रविवार, ७ एप्रिल, २०१९

“असेही पालक असतात !”


 “असेही पालक असतात !”

चार दिवसांपूर्वी एका पालकांची भेट झाली. दोन्ही पालक सुशिक्षित आणि शिक्षकीपेशात. मुलगी इयत्ता अकरावीत. ही मुलगी शिकते त्या काॅलेजचा अकरावीचा रिझल्ट मागच्या आठवड्यात लागला आणि त्यात मुलगी सर्व विषयांमध्ये नापास झाल्याचं कळलं.

मुलगी एकदम डोकेबाज. घरी जाऊन बराच थयथयाट केला. रडून गोंधळ घातला. मग मुलीचे पालक काॅलेजमध्ये ‘हिसका दाखवायला गेले आणि तोंडात मारल्यासारखे परत आले. कारण, वर्षभर मुलगी काॅलेजलाच गेली नाही आणि कोणत्याच परीक्षेलाही बसलेली नाही, हे चारचौघात उघड झालं. “अकरावी म्हणजे फार काही विशेष नसतं, थोडंफार इकडं-तिकडं चालतंच असा सल्ला इतरांना देणारे हे पालक स्वत:च्याच मुलीच्या नापास होण्यामुळं मात्र प्रचंड अस्वस्थ झाल्याचं जाणवत होतं.

ते दोघेही मुलीला घेऊन भेटायला आले. मुलगी भलतीच हुशार. ती म्हणाली, “ मी रोज काॅलेजला जात होते, प्रत्येक लेक्चरला बसत होते. पण तरीही काॅलेजने माझी प्रेझेन्टीच लावली नाही.” हे तिचं बोलणं सपशेल खोटं आहे, हे मला समजत होतं. मी तिला तिच्या शिक्षकांची नावं विचारली तर तिला सांगताच येईनात. तिनं लगेच रडायला सुरूवात केली. थोडा वेळ गेल्यावर मी तिला काॅलेजचं टाईमटेबल विचारलं. तेही तिला सांगता आलं नाही. तिनं पुन्हा रडायला सुरूवात केली. तिला काॅलेजविषयी काहीच सांगता येईना, हेही उघड झालं. मी तिला इव्हीएस आणि फिजिकल एज्युकेशन विषयी विचारलं, पण तिला हे विषयसुद्धा माहित नव्हते. आता काय करायचं?

मी तिच्याशी बोलायला सुरूवात केल्यावर अनेक गोष्टी लक्षात आल्या. मुलीनं घरी बिनधास्त ठोकून दिलं होतं की, काॅलेजमध्ये गेलं नाही तरी चालतं. ती कोचिंग क्लासलाही जात नव्हती. पालकांना यातलं काहीच माहित नव्हतं. पुढं हेही लक्षात आलं की, मुलीनं कोचिंग क्लासची फी भरण्याकरता घरून पैसे घेतले होते आणि ते पैसे तिने विविध प्रकारच्या खरेदीवर उडवून टाकले. रक्कम पाच आकडी होती. पण या गोष्टीचा घरी पत्ताच नाही.

या मुलीला शंभर रूपये पाॅकेटमनी आणि शंभर रूपये पेट्रोलकरता असे एकूण दोनशे रूपये दररोज मिळतात. या पैशांचं ती काय करत होती, याविषयी आईवडील काहीही सांगू शकले नाहीत.
पुढं तर हेही लक्षात आलं की, या मुलीची तीन-चार फेसबुक अकाऊंट्स होती. आईवडीलांना त्यातलं फक्त एकच अकाऊंट माहित होतं. तिच्या इतर अकाऊंट्स वरचे तिचे फोटो पाहून तर मीच माझे डोळे मिटून घेतले. वर्षभरात ती कुठे-कुठे फिरली, रात्री कुठे-कुठे फिरत होती, कोणाकोणाबरोबर फिरत होती, याचं समग्र दर्शन पालकांना घडलं. आपल्या मुलीकडे वेगवेगळी ४-५ सिमकार्ड्स आहेत हेही पालकांना नव्यानेच समजलं. किती धक्कादायक आहे हे सगळं?

पालक म्हणून आपलं आपल्या मुलांकडे किती लक्ष आहे आणि वास्तवात ते किती असायला हवं, याची जाणीव पालकांना करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. मुलांच्या ‘ब्राईट करिअरच्या मागे लागलेले पालक केवळ मार्कलिस्टच पाहत राहतात, पण एक माणूस म्हणून आपलं मूल कसं आहे आणि ते कसं असायला हवं, हे त्यांनी ठरवायला नको का? आपली मुलं मोठी झाली, काॅलेजला गेली, म्हणजे आपली जबाबदारी संपली, असं पालकांना वाटतंय का?

पालकांना काऊन्सेलिंगची नितांत आवश्यकता आहे..!

©मयुरेश डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख,
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

शुक्रवार, ५ एप्रिल, २०१९

“बूँद से गयी, वह हौद से नहीं आती !”



“बूँद से गयी, वह हौद से नहीं आती !”

आपल्यापैकी अनेकांचा असा ग्रह असतो की, जो वयानं मोठा त्याचंच म्हणणं योग्य. ‘मी तुझ्यापेक्षा चार पावसाळे अधिक पाहिलेत.’ किंवा ‘केस पांढरे झालेत ते उगीच नाही असे “अनुभवांचे बोल तरुण मंडळींना नेहमी ऐकवले जातात. पण, खरं सांगायचं तर, हे अर्धसत्य आहे. ‘आयुष्य अधिक जगणं म्हणजे आयुष्याचा अनुभव अधिक असतो आणि म्हणून प्रत्येक गोष्टीत आपलं मत प्रमाण मानलं गेलं पाहिजे असा दावा कुणी करू नये आणि तसा हट्टसुद्धा कुणी करू नये. कशी गंमत असते पहा – फार हट्ट करणा-या, रुसून-फुरंगटून बसणा-या माणसांना आपण “अरे, तू काय लहान आहेस का? “ असं म्हणतो ना. मग आपणच प्रौढत्वाची रेषा ओलांडून गेल्यावर असंच कसं काय वागायला लागतो, याचा विचार वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर उभी असलेली मंडळी करणार आहेत की नाही?

भारतात पूर्वीच्या काळी आश्रमव्यवस्था अस्तित्वात होती. एक उत्तम सामाजिक संतुलनाचं ते उदाहरण होतं. आपणच ते संतुलन बिघडवून टाकलं. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चार आश्रमांमध्ये व्यक्तीचं आयुष्य विभागलेलं होतं. ‘संन्यासाश्रम हा चतुर्थ आश्रम प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा जो अविभाज्य भाग होता, त्याचं खरं स्वरूप आणि त्याची आवश्यकता आपण पुन्हा एकदा जाणून घेण्याची आवश्यकता आहे. मायेचे, मोहाचे, महत्वाकांक्षांचे सगळे पाश तोडून टाकून, उर्वरित आयुष्य अत्यंत शांत आणि संयमाने व्यतीत करावे, असं या आश्रमाचं स्वरूप. मुलं, नातवंडं, पतवंडं ही सगळी नाती त्यागून, आयुष्यभर कमावलेल्या स्थावर-जंगम संपत्तीवर समाधानाने उदक सोडून आपण उर्वरित काळ स्वतःशी संवाद करण्यात आणि ईश्वरचिंतनात घालवावा, ही या आश्रमाची अपेक्षा. आहार, विहार, वास्तव्य या सगळ्या बाबतीत अत्यंत साधेपणा स्वीकारला जात असे. अभक्ष्य भक्षण, मद्य, मदिरा, मदिराक्षी, राजवस्त्रे, दागदागिने, सत्ता, अधिकार या सगळ्या गोष्टी त्याज्य असत.

व्यक्तीच्या आयुष्यातले हे सर्व आश्रम वयानुसार निश्चित केलेले होते. त्या शारिरीक वयाच्या आधीच पुढच्या आश्रमात प्रवेश करणे समाजसंमत नव्हते. मात्र, वयानुसार ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थाश्रम स्वीकारायलाच हवा, असे बंधन घालता येत नसे. गृहस्थाश्रम स्वीकारणे हा ज्या त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा भाग होता. परंतु, गृहस्थाश्रमाचा त्याग कधी करणे योग्य ठरेल, याविषयीची मार्गदर्शक तत्वे निश्चित झालेली होती. सांसारिक जबाबदा-या, मुलाबाळांची आयुष्यं मार्गी लावणं, त्यांच्या संसाराची घडी नीट बसवणं, नातवंडांचं सुख अनुभवणं आणि संपूर्ण समाधानानं निवृत्त होणं हा मार्ग पत्करायचा की, गृहस्थाश्रमात प्रवेश न करता आजन्म ब्रह्मचर्याचं आचरण करावं, हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य व्यक्तींना होतं. अनेक व्यक्ती आजन्म ब्रह्मचारी राहतही असत. पण, गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर त्यातील अपेक्षित जबाबदा-या पूर्ण केल्यानंतर त्या आश्रमात राहता येत नसे. व्यक्ती आपणहून या सगळ्या जंजाळातून आपली सोडवणूक करून घेत असत.

स्वेच्छेने निवृत्त होणे ही वृत्तीच आता लोप पावत चालली आहे, असे वारंवार माझ्या निदर्शनास येते. लोक अधिकारच सोडायला तयार होत नाहीत. माझं घर, माझा संसार, माझा मुलगा, माझी मुलगी यातून माणसांना बाहेरच पडायचं नसतं. ‘हे सगळं माझं आहे आणि माझंच राहणार हा हट्ट सोडतच नाहीत. वाद, तक्रारी, कुरबुरी सुरु होतात, त्या इथेच. नव्या पिढीच्या हातात सगळी सूत्रं द्यावीत आणि त्यांना त्यांची जबाबदारी व्यवस्थित समजावून सांगून आनंदानं बाहेर पडावं, हे आता घडतच नाही. शरीराची गात्रे थकत चालली तरीसुद्धा माणसे त्यांचा घरादारावरचा अधिकार सोडायला तयार होत नाहीत. असं का घडत असावं?

कृतज्ञतेचा निर्देशांक


कृतज्ञतेचा निर्देशांक

असंच एकदा एक मासिक चाळताना त्यातील एका लेखामधील एका वाक्याने मला विचारमग्न केलं. आयुष्यातली सकारात्मकता या विषयावरचा तो लेख होता. मूळच्या इंग्रजीमधील लेखामधील ते वाक्य असं होतं;  "Sometimes, try calculating your gratitude index in life, you will realize how lucky you are!". (कधीतरी तुमच्या आयुष्यातील कृतज्ञता निर्देशांक मोजण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती नशीबवान आहेत ते!). मला 'कृतज्ञतेचा निर्देशांक' ही कल्पनाच भन्नाट आवडली. जसं स्टॉक मार्केट मध्ये स्टॉक इंडेक्स किंवा ट्रेडिंग इंडेक्स असतात आणि त्यांच्या मूल्यावरून बाजाराची तब्येत ठरवली जाते, तसाच  कृतज्ञताभावनेचे चढउतार मोजणारा हा कृतज्ञता निर्देशांक आपल्या मानसिकतेची तब्येत ठरवू शकेल असं मनात आलं.       लगेच माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु झालं की माझ्या आयुष्यातल्या कृतज्ञता कशा मोजायच्या? कृतज्ञता निर्देशांक कसा ठरवायचा? आणि तो दैनंदिन जीवनात कसा आणायचा? अधिक विचार केल्यावर मला काही कल्पना सुचल्या त्या अशा; 

१. माझ्या निसर्गदत्त संपदांबद्दल कृतज्ञता मानणे : म्हणजे धडधाकट शरीर मिळालं, धडधाकट अवयव मिळाले, विचारी संवेदनशील मन मिळालं, या बद्दल कृतज्ञता बाळगणे. मला लक्षात आलं की धडधाकट शरीर असणं, कार्यक्षम अवयव असणं हे आपण गृहीत धरतो, पण कार्यक्षम डोळ्यांची किंमत नेत्रविहीन व्यक्तींना विचारात घेतलं तर कळेल, धडधाकट हातपायांची किंमत अपंगांना विचारात घेतलं तर कळेल. संवेदनशील विचारी मनाची किंमत मनोरुग्णांची परिस्थिती पाहून कळेल. आणि एकदा हा मुद्दा लक्षात आला की निरोगी, सुदृढ  शरीराबद्दल आपोआप कृतज्ञता मनात दाटून येईल. 

२. मला मिळालेल्या नात्यांच्या बाबतीत कृतज्ञता मानणे : आपल्याला लाभलेले माता, पिता, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या, मावशी आपलं विस्तारित कुटुंब यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणे. ही नाती जन्म झाल्यावर आपल्याला सहज मिळतात म्हणून खूप वेळा किंमत नसते आपल्याला. छोट्या छोट्या कारणांनी रुसवे फुगवे धरतो आपण. पण या नात्यांची किंमत अनाथाश्रमात वाढणाऱ्या मुलांना पाहून कळेल. त्यांच्या डोळ्यात मायेचा एका स्पर्शासाठी आसुसलेली व्यथा दिसली की लक्षात येतं की सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करून झाल्यावर नमस्कार करण्यासाठी आईवडील असणं हे किती भाग्याचं लक्षण आहे ते. भांडायला, खेळायला, एकत्र वाढायला भावंडं असणं, हट्ट पुरवायला, लाड करायला मामा, काका, मावशी, आत्या असणं याची जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणं इतक्या महत्वाची नाती खचितच आहेत ही. 

३. मला मिळालेल्या साधन संपदेबाबत कृतज्ञता मानणे : म्हणजे राहायला घर असणं, घरात सुखसोई असणं, निजायला अंथरून असणे, पांघरायला पांघरून असणे, घालायला कपडे असणे, अभ्यासाला पुस्तक वह्या मिळणे, चांगल्या शाळेत शिक्षण मिळणे, चवीपरीने खायला मिळणे. जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी अर्थार्जनाची प्रतिष्ठीत सोय असणे अशा एक नाही अनेक गोष्टीं कृतज्ञता बाळगण्या सारख्या नाहीत का? चहा थोडा गार झाला तर चिडतो मी. पण वनवासी पाड्यावर गेलं की लक्षात येतं की मुळात जगण्याची धडपड म्हणजे काय असते. दोन वेळच्या भरपेट जेवणाची किंमत काय? थंडी वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी गरम कपडे सोडाच पण किमान कपडे असणं याची किंमत किती?  या साऱ्या गोष्टी मला सहज मिळाल्या आहेत तर मी याबाबत कृतज्ञता नको का बाळगायला? 

४. माझ्या आयुष्यात आलेल्या इतर माणसांविषयी कृतज्ञता मानणे : मला तळमळीने शिकवणारे शिक्षक, मार्गदर्शक, शेजारी पाजारी, आपले फॅमिली डॉक्टर, ड्राइवर, कामवाली मावशी, कचरा घेऊन जाणारी बाई, बिल्डिंगचा वॉचमन अशा एक नाही अनेक व्यक्तींबद्दल जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणे महत्वाचं नाही का?

विचार करू लागलो आणि ही यादी लांबच लांब होऊ लागली. यातून एक जाणवलं की ज्या ज्या गोष्टींमुळे माझं जीवन सुसह्य झालं आहे, सुरळीत झालं आहे, सुखावह झालं आहे त्या त्या प्रत्येक वस्तू, व्यक्ती, परिस्थितीबद्दल मनात दररोज जो  कृतज्ञताभाव निर्माण होईल त्यावरून त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक ठरवायचा. हा कृतज्ञता निर्देशांक मला दररोज जागृत ठेवणं, इतकच नाही तर वाढत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे.   त्यासाठी मी एक उपाय शोधून काढला आहे. जी जी व्यक्ती माझ्या संपर्कात येईल त्या व्यक्तीला शक्यतो संधी शोधून "धन्यवाद" देण्याचा परिपाठ अंमलात आणला आहे. सकाळच्या दुधवाल्यापासून ते दररोज घरचा कचरा नेणाऱ्या बाई पर्यंत सगळ्यांना ते जेव्हा समोर येतील तेव्हा "थँक यू" असं ठरवून म्हणण्याची सवय स्वतःला लावून घेतो आहे. अगदी कुठे जात असेन, आणि रिक्षा केली तर उतरल्यावर पैसे देऊन झाल्यावर रिक्षावाल्याचा खांद्यावर हलकेच थाप मारून आवर्जून "थँक यु" म्हणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो. गम्मत म्हणून अशा किती जणांना मी दिवसभरात "थँक यु" म्हटलं याची माझ्यापुरती नोंद ठेऊन त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक दररोज रात्री निजण्यापूर्वी मी काढण्याचा प्रयत्न करतो. इतर कुठल्याही निर्देशांकासारखा  दररोजचा हा आकडा कमी जास्त होतो खरा, पण एकूण कृतज्ञता निर्देशांकाचा महिनाभराचा आलेख (ग्राफ) हा चढता असला पाहिजे याचा प्रयत्न मात्र जरूर करतो. 

या सगळ्या खटाटोपानंतर मला स्वतःला एक मोठा फायदा असा जाणवला की ज्यांना मी धन्यवाद देतो त्या व्यक्तींना बरं वाटत असेलही  मनात, पण माझ्या दृष्टिकोनातून पाहता माझं मन एका अनामिक समाधानाने भरून जातं. पाय जमिनीवर राहतात, माणसं जपली जातात, आणि सर्वात महत्वाचं की या सर्व व्यक्तीत वसणाऱ्या हृदयस्थ परमेश्वरापर्यंत प्रत्येकवेळी माझं थँक यू आपोआपच पोहोचतं ...

म्हणूनच ज्याने मला हे जीवन दिले, मला जगण्यासाठी श्वास दिला, पोटासाठी अन्न दिले त्या परमेश्वराला थँक्यू म्हणण्यासाठी मी दिवसाच्या चोवीस तासातील किमान चोवीस मिनिटे दिली पाहिजेत. भगवंताचे नामस्मरण हीच त्याच्या प्रती व्यक्त होणारी कृतज्ञता! आणि ह्याचा कृतज्ञता निर्देशांक माझा मीच मोजण्याची सवय मला लावून घ्यायला हवी 

कुळाचार



#कुळाचार

एका वाड्यातली गोष्ट.चार पिढ्या आधीची हं.
नऊवारी सासू आणि नऊवारी सून असलेल्या काळातली.
घरात पैपाव्हणे,द्विपदचतुष्पद सहितं असं म्हणताना खरोखर ते असायचे घरात त्या काळातली. घरात कुळधर्म कुळाचार अगदी जसंन् तसं पाळणारं घर ते,आणि पापभिरू सासवा सुना !

एका कुळाचाराच्या दिवशी सूनबाई देवाचे नैवेद्य वाढत होत्या केळीच्या पानावर.तेवढ्यात सासूबाईंची हाक आली आणि पाठोपाठ सूचना!'
सूनबाई,मांजरीची पोरं टोपलीखाली झाक हो.आणि मगच नैवेद्य ठेव देवापुढे'
#नऊवारीतील सूनबाई त्या काळातल्याच होत्या.
खालमानेने फक्त मान हलवून हो म्हणणार्या.दरवर्षी हीच सूचना!

पुढे सूनबाई सासूबाई झाल्या.त्यांच्या सूनबाई घरी आल्या. कुळधर्म कुळाचार तेच होते.सासूबाईंनी छान तयार केलं होतं सूनबाईंना!त्याही सूचना द्यायच्या.'नैवेद्य देवापुढे ठेवण्याआधी मांजरीची पोरं टोपलीखाली झाक हो!'

पुढे या सूनबाईंना #सहावारी सून आली.नोकरी करणारी.पण कुलाचार तेच होते.आणि सूचनापण तीच.सूनबाईसुद्धा ऐकायच्या.मांजरीची पोरं टोपलीखाली झाकायच्या नैवेद्य देवापुढे ठेवण्याआधी.

आता तो वाडा पडला.तिथे मोठा टॉवर झाला.मंडळी ब्लॉकमधे रहायला गेली.घरातले द्विपद होते पण चतुष्पद नाहीसे झाले. आता काय करायचं!प्रश्न पडला!तोवर पाचवारी सूनबाई सासूबाई झाल्या होत्या आणि त्यांची #पंजाबी ड्रेस सूनबाईपण आली होती.कुळाचाराच्या दिवशी त्या हळूच म्हणाल्या,
"माझ्या सासूबाई सांगत असत,मांजरीची पोरं टोपलीखाली झाकून मग नैवेद्य दाखवायचा.आता गं ?
मांजरच नाही तर पोरं कुठली आणायची झाकायला.काहीतरी बाई पूर्वजांच्या पद्धती एकेक!'
पंजाबी ड्रेसवाली सूनबाई हुशार!
ती म्हणाली ,"आहो सासूबाई,काळजी कशाला करता?
आहे ना आपली ट्रेडिशन मग करूया की आपण.
तुळशीबाग कशाला आहे मग!"
सूनबाई तुळशीबागेत जाऊन चिनीमातीची मांजरं आणि छानशी डेकोरेटेड टोपली घेऊन आल्या.आणि टोपलीखाली चिनी मातीची मांजरं झाकून  ट्रेडिशनली नैवेद्य दाखवायला लागल्या!😀
 संपली गोष्ट!

आता आपण विचार करूया.वाड्यात रहाणारी मांजर,दारातली कुत्री ही घरातले सदस्य होते तेव्हा.मांजरीची पोरं नैवेद्याच्या ताटात लडबडायला येणार हे नक्की. म्हणून आधी ती टोपलीखाली झाकायची आणि मग पान देवापुढे ठेवायचं!
आता हेतू लक्षात घेतलाच नाही नुसती मान डोलवली!
मग पुढे त्यातला हेतू लोप पावून त्याची रूढी झाली!
अशा पडतात रूढी!
पूर्वजांचे हेतू नीट समजून न घेता आचरले की!
म्हणून आपण जी परंपरा जपतो तिचा हेतू,अर्थ लक्षात घेऊन भावपूर्णतेने ,अर्थपूर्णतेने आचरली की काही झुगारावं लागणार नाही इतकी छान आहे आपली संस्कृती!

"गणित आयुष्याचे"

"गणित आयुष्याचे"

भारतीयांचे सरासरी आयुर्मान ७० वर्षे 
(सन २०१७ च्या शासकीय आकडेवारीनुसार)

आता आयुष्याचे गणित पाहू..

३६५ × ७०  = २५,५५० दिवस

वयाची पहिली २.५ वर्षे - सभोवतालातून शिक्षण
३६५ × २.५ = ९१२ दिवस

वय वर्षे २.५ ते २१ -  बालवाडी ते पदवी शिक्षण.
३६५ × १८.५ = ६७५२ दिवस

वय वर्ष २१ ते २३ - २ वर्षे पदव्यूत्तर शिक्षण
३६५ × २ = ७३० दिवस

वय वर्ष २३ ते ५८
३६५ × ३५ = १२,७७५ दिवस

वय वर्ष ५८ ते  ७०
३६५ × १२ = ४३८० दिवस

आयुष्याचे एकूण दिवस = २५,५५०

आयुष्याचे एकूण तास = ६,१३,२००

काम
प्रत्यक्ष कामाचे तास = वय वर्ष २३ ते ५८
३६५ × ३५ = १२,७७५ दिवस
३५ वर्षातील एकूण रविवार दरसाल ५२ × ३५ =१८२० दिवस
३५ वर्षातील एकूण सुट्या दरसाल किमान २० × ३५ = ७०० दिवस
प्रत्यक्षात कामाचे दिवस =
१२, ७७५ - १८२० - ७०० = १०,२२५ दिवस
प्रत्यक्षात कामाचे तास रोज ८ तास याप्रमाणे
१०, २२५ × ८ = ८१, ८०० तास
आयुष्याचे एकूण तास - ६,१३,२००
प्रत्यक्ष कामाचे तास - ८१,८००
आयुष्यभरातील प्रत्यक्ष कामाची टक्केवारी = १३ पुर्णांक ३४

झोप
आयुष्याचे एकूण दिवस = २५,५५० × किमान ८ तास
(आळस - दुपारची वामकुक्षी - कामाच्या ठिकाणच्या डुलक्या वगळता)
२,०४,४०० तास
अर्थात आयुष्यातील ८५१६ दिवस
आयुष्यभरातील झोपेची टक्केवारी = ३३ पुर्णांक ३३

रोजची वैयक्तिक नित्यकर्मे
(जेवण-अंघोळ इत्यादी)
आयुष्याचे एकूण दिवस = २५,५५० × किमान २ तास
५१,१०० तास
२१३३ दिवस
आयुष्यभरातील नित्यकर्मावरील वेळेची टक्केवारी = ८ पुर्णांक ३३

आयुष्यभरातील प्रत्यक्ष कामाची टक्केवारी = १३ पुर्णांक ३४ + आयुष्यभरातील झोपेची टक्केवारी = ३३ पुर्णांक ३३ + आयुष्यभरातील नित्यकर्मावरील वेळेची टक्केवारी = ८ पुर्णांक ३३ = ५५%

मग १०० - ५५ = ४५ % अर्थात ११, ४९७ दिवस म्हणजेच २,७५,९४० तास जातात कुठे?

आजारपण, कामावर जाण्यायेण्यासाठी खर्च होणारा वेळ, मनोरंजन, वाचन, व्यायाम, शुभाशुभ कार्ये यावर ४५ टक्यांपैकी जरी ५० % वेळ खर्च होतो असे गृहित धरले तरी १,३७, ९७० तास अर्थात ५७४८ दिवस खर्च होतात.

आयुष्यातील २२ पुर्णांक ५० टक्के अर्थात १,३७, ९७० तास अर्थात ५७४८ दिवस कुठे खर्च होत आहे?

आयुष्याच्या प्रत्यक्ष कामाच्या वेळेची टक्केवारी = १३ पुर्णांक ३४

आयुष्यातील वायफळ वेळ वाया जाण्याची टक्केवारी = २२ पुर्णांक ५०

आयुष्यातील १,३७, ९७० तास अर्थात ५७४८ दिवस "नसत्या वायफळ चर्चा-राजकारण-एकमेकांची उणीधुणी- जात-पात-पक्ष-निष्ठ-नेता-निवडणूका-निकाल" यावर वाया घालवल्यावर कसे होणार? कसे बनणार यशस्वी? कसा करणार आपला देश प्रगती? कसा होईल आपला देश महासत्ता?

आयुष्यभरातील एकूण वेळेपैकी केवळ १३ पुर्णांक ३४ टक्के वेळ कामधंदा करून सामान्य मध्यमवर्गीय व्यक्ती किमान वनबीएचके फ्लॅट, एक चारचाकी गाडी, पंचवीस तीस लाख फिक्स डिपाॅझीट आणि साधारणपणे देशाला १०,००,००० रूपये कर भरतो.

तर आयुष्यातील वायफळ वेळ वाया जात असलेल्या २२ पुर्णांक ५० टक्के वेळेपैकी १३ पुर्णांक ३४ टक्के वेळ योग्य कामासंबधी सार्थकी लावल्यास जास्त पैसे साठवून व जास्त कर भरून स्वतःची व देशाची दुप्पट प्रगती करू शकेल. तसेच उरलेला वेळ पर्यटन, छंद, प्रत्यक्ष समाजसेवा यावर खर्च केल्यास आयुष्याच्या क्षितिजावर सुवर्णसूर्योदय निश्चितच उगवेल.

मग नक्कीच.. नव्हे आपोआपच होऊ आपण महासत्ता..

आता कसे वागायचे ते आपले आपणच ठरवावे..

श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक

श्रीमंत



बिल गेट्स पेक्षा श्रीमंत कोण आहे.
कुणीतरी बिल गेट्सना विचारलं, की तुमच्या पेक्षा श्रीमंत कुणी आहे का?
ते म्हणाले, हो एकच आहे.
बर्याच वर्षांपूर्वी माझी नोकरी गेली होती आणि त्यानंतर मी न्यूयॉर्क विमानतळावर गेलो. मी तेथे वृत्तपत्रांचे शीर्षक वाचले. मला त्यापैकी एक आवडले आणि मला ते विकत घ्यायचे होते. पण माझ्याकडे सुटे पैसे नव्हते. मी सोडून दिले, अचानक, एक सावळा मुलगा मला बोलावून म्हणाला, "आपल्यासाठी हे घ्या वृत्तपत्र." मी म्हणालो, पण माझ्याकडे सुटे पैसे नाहीत. तो म्हणाला, "काही हरकत नाही, मी तुला हे मोफत देतो आहे"
योगायोगाने ३ महिन्यांनंतर मी पुन्हा तिथे गेलो. ती गोष्ट पुन्हा अगदी तशीच घडली आणि त्याच मुलाने पुन्हा एकदा मला आणखी एक वृत्तपत्र मोफत दिले.
मी म्हणालो, मी स्वीकारू शकत नाही. परंतु तो म्हणाला, "मी हे तुला माझ्या नफ्यातून देतोय"
१९ वर्षांनंतर जेंव्हा मी श्रीमंत झालो तेंव्हा मी त्या मुलाला शोधण्याचा निर्णय घेतला. सुमारे दीड महिन्यानंतर मी त्याला शोधले. मी त्याला विचारले, तू मला ओळखलेस? तो म्हणाला, "होय, आपण प्रसिद्ध बिल गेट्स आहात."
मी म्हणालो, तु खूप वर्षांपूर्वी मला दोनदा मोफत वृत्तपत्र दिले होतेस. आता मला ते भरुन काढायचे आहे. मी तुला जे पाहिजे ते सर्व देईन. सावळा तरुण माणूस म्हणाला, "आपण ते भरपाई करू शकत नाही!"
मी म्हणालो, का? तो म्हणाला, "मी तुम्हाला स्वतः गरीब असताना जे दिले, ते तूम्ही स्वतः श्रीमंत झाल्यावर मला कसे परत देऊ शकता?"
बिल गेट्स म्हणाले, मला वाटते की तो सावळा तरुण माझ्यापेक्षा श्रीमंत आहे.
आपल्याला दान करण्यासाठी श्रीमंत असण्याची किंवा श्रीमंत होण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आपल्यात दानत असायला हवी

जलधार



महोत्सव - जलधार

कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं. कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. नजर पोचणार नाही इतक्या उंचीवरून पाण्याचे प्रचंड प्रपात कोसळतात. तरीसुद्धा पाणी अभंग राहातं. त्याचा स्फटिकासारखा प्रवाह होऊन तो पुन्हा जगाला आनंदच देतो. पाण्याऐवजी एखादा दगड जर कुणी वरून सोडला तर त्याचं काय होईल सांगतेस का?’

मी ह्या विचारानेच अवाक् झाले होते. उंचावरून खाली येणारे झरे, त्यांचं धबधब्यात झालेलं रूपांतर, हे सगळं प्रवास करताना मी अनेकदा पाहिलं होतं. त्यावेळेला हे विचारही मनात आले नाहीत. बाबांनी मला प्रश्न विचारला, पण उत्तराची वाट न बघता ते म्हणाले, ‘कोमलतेत ताकद असते ती ही अशी. पावसाचं पाणी तर आकाशातून पडतं. माती वाहून जाते, नद्यांना पूर येतात, भलेभले खडक झिजतात. पाणी वाहातच राहातं. फुलंही पाण्यासारखीच कोमल असतात. एक दगड भिरकावला तर दहा-बारा फुलं खाली पडतात.ज्या दगडामुळे फुलं वेचायला मिळाली तो दगड कुणी घरी आणत नाही. आपण फुलंच आणतो. ती कोमेजतात. पण एवढ्याशा आयुष्यात तुम्हाला सुगंधच देतात. फुलांचं आयुष्यच अल्प. पाण्यामध्ये सामर्थ्य कुठून येतं, ह्याचा विचार केलास तर तुला कळेल की त्यामागे सातत्य असतं. प्रवाहात एखादा खडक आला तर पाणी त्याच्याशी झुंज देत बसत नाही, थांबत नाही, स्वत:ची वाट शोधून बाजूने निघून जातं. ह्या वाहण्यात सातत्य असल्यामुळेच खडक हळूहळू लहान होत जातो आणि प्रवाह रुंदावत जातो. सातत्य म्हणजे काळ. काळाचं सामर्थ्य मोजता येणार नाही. अशा जबरदस्त शक्तीची साथ एवढ्याशा दिसणाऱ्या जलधारेच्या पाठीशी असते. तुझ्या संसारात तुझा जोडीदार कसा असेल, त्याची तुला साथ मिळेल की नाही, दोघांच्या संवेदना एकरूप होतील की भिन्न असतील ते सांगता येणं अशक्य आहे. लग्नाची आमंत्रणपत्रिका म्हणजे संपूर्ण संसाराचं चित्र नव्हे. मंगलपत्रिकेतले शब्द वर्षावनुर्षं तसेच राहातात. त्यांचा दगड होतो म्हणालीस तरी चालेल. संसारातले शब्द रोज बदलत जातात. कोणतेही शब्द ऐकावे लागले तरी त्या स्त्रीजवळ त्या शब्दांचं रूपांतर गीतात करायचं सामर्थ्य असेल, तर तिला मी जलधारच म्हणेन. साथीदाराला सुधारण्याच्या खटाटोपात पडू नकोस. त्याच्या दृष्टिकोनातून त्याचं वागणं योग्यच असतं. तिथे डोकं आपटत बसण्यापेक्षा त्याला वळसा देऊन पुढे जाणं चांगलं. जलधार हो, वाहात राहा.’  तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा विचार आत्मसात झाला.

-व. पु. काळे

किती सुंदर विचार...... सतत वाहात राहा... कितीही अडीअडचणी आल्या तरी बिथरुन न जाता, न थांबता सतत वाहात राहायचं त्या निर्मळ जळासारखं.. वाहाणं हा पाण्याचा धर्म... तोच आपण आपल्या आयुष्यात आणणं कठीण जरी असलं तरी असाध्य नक्कीच नाही. आलेल्या आनंदाच्या क्षणाचा जसे आपण उत्स्फूर्तपणे  आस्वाद घेतो तसेच प्रत्येक दुःखाच्या क्षणी न डगमगता त्याला तेवढ्याच उत्स्फूर्तपणे सामोरे जाणे.... हा पाण्याचा धर्म आपण आपणांत आणू या... 😃👍👍

-रेखा वैद्य



एखादी व्यक्ती जाता-जाता जेव्हा आपल्याला अपेक्षित नसलेला कॉमेंट करते. तेव्हा त्यांच फक्त नवल वाटतं. पण केव्हातरी सगळ्या आयुष्याचा पट उलगडुन बसण्याचा क्षण येतो तेव्हाच त्या माणसाचे खरे विचार समजतात. पृष्ठभागावरुन नुसतचं वाहुन गेलेलं पाणी किती आणि जमिनीने धरुन ठेवलेलं किती हे ’बोअरवेल खणल्याशिवाय कळत नाही. वर्ष संपलं की आपण नवीन Calender आणतो. काही वाणसामानाबरोबर फुकट येतात. कधीकधी Calender साठी आपण अनावश्यक वस्तुही घेतो. प्रत्येक महीन्याला वेगवेगळं चित्र असलेलं, कधी जाहीरपणे लावता न येणारं किंवा लावता येणारं, भारी Calender ही आपण पळवलेलं असतं. कितीही आकर्षक आकर्षक म्हटलं तरी त्याच नाविन्य किती काळ? नाविण्याइतकी चटकन शिळी होणारी दुसरी कोणतीही वस्तु नसेल. भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्‍या रिकाम टेकड्यांना Calender वर कुठलही चित्र चालतं. व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत, तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात. प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र, वेगळा विचार, वेगळी प्रगती, वेगळं शिखर. तो पट जेव्हा जेव्हा उलगडला जातो तेव्हाच समोरच्या माणसाला जाणवतं की, प्रत्येक श्वासाचं दाम मोजुन श्याम विकत घेणारी गदिमांची नायिका आणि समोरचा माणुस एकच आहे. बुद्धी, मन आणि शरीराच दान करुन ह्या माणसाने Calender चा कालनिर्णय स्वतः विकत घेतला आहे.
~ टीम वपु विचार

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा