Pages

मंगळवार, २ एप्रिल, २०१९

बाबाचे पैसे


बाबाचे पैसे

व्योम आता पाच वर्षाचा होईल 4-5 महिन्यात, त्याला वेळीच वस्तूंची पैशाची किंमत कळायला हवी असे अलीकडे वाटू लागलंय मला. आणि त्याचा परिणाम म्हणून तो जेव्हा काही फेकतो, मोडतो, तोडतो, पडतो.. बेजबाबदार पणे ढिल्ला वागतो, तेव्हा तेव्हा मी त्याला त्या त्या वस्तू विषयी, 'त्याला किती पैसे पडतात माहितीये का?.... बाबाला किती काम करावे लागते पैसे कमावण्यासाठी!.. हे जे तुटलं ना अत्ता त्या पैशात तू गेमिंग झोन मधे किती गेम खेळू शकला असतास माहितीये का.. अशा आशयाचे डायलॉग चिपकवत असतो.

(माझा मलाच राग येतो नंतर खरं तर प्रत्येक वेळी. त्याला एवढे बोललो म्हणून प्रासंगिक... जेमतेम साडे चार वर्षाच्या मुलाकडून मी किती अपेक्षा ठेवतो असा वैचारिक.... आणि पैसे कामावण्याकरता खूप कष्ट करावे लागतात असा भीतीयुक्त विचार त्याच्या मनात रुजवत मी कदाचित खूप मोठी चूक करतोय, असा अंतर्मुख करून लाज वाटायला लावणारा मूलभूत विचार मनात येतो नेहेमी)
तरी पालथ्या घड्यावर पाणी या न्यायाने त्याच्या वागण्यात काहीही फरक पडत नाही, आणि माझ्या तेच आणि तसेच चुकीचे बोलण्यातही. असो

तर.. परवा असेच त्याच्या खेळण्यांपैकी काहीतरी एक त्याने पाडले आणि ते तुटले. मी पुन्हा माझी कॅसेट चालू केली. तो माझ्याकडे बघत होता, ऋचा त्याच्या मागे बसलेली. त्याला कळणार नाही अशा प्रकारे तीने मला सांगितले की ते खेळणे त्याला गेल्या आठवड्यात एका मित्राच्या बिर्थडे चे गिफ्ट म्हणून मिळाले... हे कळल्यावर माझा जोम आपोआपच ओसरला आणि विषय संपवायचा म्हणून मी आवरते घेतले.
माझे सगळे बोलून झाल्यावर तो म्हणाला, डोंट वरी बाबा.. हे तुटले तर श्रे च्या बाबाचे पैसे वाया जातील, तुझे नाही अरे.

मी पुन्हा एकदा निरुत्तर.

सुबोध पुरोहित

चेहरा.


 "डॉ .हिला चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काहीतरी द्या ना !..

"त्या तरूणीची आई सांगत होती.

"*ग्लो येण्यासाठी म्हणजे ?

"चेहरा उजळण्यासाठी !...चेहरा असा चमकला पाहिजे."

"मग कानाजवळ दोन छोटे छोटे  एल ई डी  बल्ब लावा की ! सेलवरचे ! चेहरा आपोआप उजळेल."

"डॉक्टर ,तुम्ही चेष्टा करताय हं !"

"नाही ,मी सीरियसली बोलतोय, चेहरा उजळण्यासाठी हा सर्वात चांगला उपाय आहे !"

"तसं नाही हो .....सध्या तिला बघायला रोज पाहुणे येताहेत.तेव्हा चेहरा चांगला दिसायला पाहिजे ना ! पाहा ना, चेहरा कसा निस्तेज दिसतोय ! एखादी क्रीम ,एखादा साबण असलं काहीतरी मिळालं तर बरं होईल. चेहऱ्यावर जरा  तेज यायला पाहिजे !"

Dr हसले

"का हसला ?"तिनं विचारलं.

"तू आधी काय वापरत होतीस?".

"फेअर अँड लव्हली ,फेअरएवर ,फेअरग्लो अशा बऱ्याच क्रीम लाऊन झाल्या ; पण फरक कशाचाच नाही !पाच वर्षांपासून हे नाही ते किंवा ते नाहीतर हे लावत असते पण थोडा तरी फरक पडावा ?काडीचाही फरक नाही."

"बरोबर आहे ; पडणारच नाही.चेहरा आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी याचा उपयोगच नाही.

👉🏻त्यासाठी  माणसाजवळ आत्मविश्वास असला पाहिजे.

👉🏻चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं.

👉🏻मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.

👉🏻मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो.

👉🏻मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो.

👉🏻मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात

👉🏻तुमचा चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो.जसे तुमचे विचार तसा तुमचा चेहरा."

"आता काय बोलावं ?"

👉🏻"पाहा ना !इथं आल्यापासून तुमची मुलगी अजून एकही शब्द बोललेली नाही.सगळं तुम्हीच बोलताय !
👉🏻माणसानं घडघड बोललं पाहिजे ,
👉🏻खळखळून हसलं पाहिजे,
दिलखुलास विनोद केले पाहिजेत ,
👉🏻मनसोक्त रडलं पाहिजे

!थोडक्यात स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवलं पाहिजे.👉🏻त्यासाठी वाचन पाहिजे ,चिंतन पाहिजे ,खेळ पाहिजे.हे सगळं जवळ असेल तरच चेहरा सुंदर !...

👉🏻..आजपासून हे सुरू कर आणि मग बघ कसा फरक पडतो ते !.......

👉🏻👉🏻लोक धबधबाच बघायला का जातात ? लोकांना पाण्याचं  साठलेलं डबकं का आवडत नसावं  ? माणसाचंही धबधब्याप्रमाणेच आहे ! चैतन्यमय व्यक्तिमत्व सगळ्यांनाच आवडतं !.....आणि असं व्यक्तिमत्व म्हणजेच तेजस्वी
चेहरा !

👉🏻👉🏻व्यक्तिमत्व खुलवा चेहरा , आपोआप तेजस्वी होईल. जे लोक आरशाचा कमीत कमी उपयोग करतात तेच लोक जास्त सुंदर असतात।  
अगदी मस्तच !! 👌👌👌

कशासाठी, कोणासाठी आणि किती?


कशासाठी, कोणासाठी आणि किती?... विनीत वर्तक

परवाच एका मित्राशी बोलण झाल. कॉम्प्यूटर क्षेत्रात उच्च पदावर काम करत असणारा हा मित्र अमेरिकेत जाऊन तिथलाच अमेरिकन बनला आहे. नेहमीच अमेरीकेच गुणगान तोंडावर असलेला हा मित्र तिथल्या सिविक सेन्स, स्वच्छता, अनेक मुलभूत सोयीसुविधांन बद्दल अगदी भरभरून बोलत असतो. आमचे ह्यावर शाब्दिक वाद हि होतात पण ते मैत्री पुरते. अमेरिकेत नवरा बायको दोघेही कमावते. पैश्याची अडचण नाही. इकडे भारतात हि एका सुखवस्तू कुटुंबातून एकुलता एक म्हणून आपल आयुष्य जगून अमेरिकन झालेल्या माझ्या मित्राच्या पायाशी सगळीच सुख लोळण घेत होती. पण कुठे तरी काही तरी माशी शिंकते हे त्याला नेहमीच जाणवत होत.

नक्की काय हे त्याला हि कळत नव्हत. असच फोनवर बोलताना विषय निघाला सुखाची व्याख्या काय? मी म्हंटल आर यु ह्यापी? त्यावर तो म्हणाला एस ऑफ कोर्स अस का विचारल? म्हंटल नाही पण ते जाणवत नाही. त्यावर त्याच म्हणन जाणवत नाही म्हणजे काय? म्हंटल अरे सगळ जे तु सुख मोजतो आहेस त्याची परीमाण काय? म्हणजे समजल नाही. मी म्हंटल तुझ्या मते सुख काय? पैसा, आरामाच आयुष्य, सगळी भौतिक सुख तुझ्या पायाशी लोळण घेत आहेत. वर्षातून एकदा कुटुंबासोबत फिरण आणि मज्जा. त्या सोबत काम करून जमा होणारा पैसा म्हणजे सुख. पण हे सगळ कशासाठी, कोणासाठी आणि किती?

ह्या माझ्या प्रश्नाने तो थोडा विचारात दिसला. अरे तुझ्या आई बाबांचा एकुलता एक मुलगा. सुखवस्तू कुटुंबातून येताना तुझ्या सगळ्या इच्छा, हट्ट पूर्ण करून आई- वडिलांनी चांगल शिक्षण दिल. तु हि त्यांच्या ह्या पाठिंब्याचा आधार घेत खूप उंचावर गेलास. त्यांच्या विश्वासाला सार्थ करत उत्तुंग यश कमावलस. आपल्या जोरावर सातासमुद्रा पार एका वेगळ्या देशात आपल्या कर्तुत्वाने आपल स्वतःच अस्तित्व निर्माण केलस. तिकडेच तुझ्या आयुष्याची जोडीदार, सहचारिणी निवडलीस. आई – बाबांनी अगदी आनंदाने अक्षता टाकून तुमच लग्न लाऊन दिल. पण ह्या नंतर परिस्थिती बदलली. तु अमेरिकन झालास. नव्या नवलाईत रमलास म्हणून आई बाबांनी दुर्लक्ष केल. काही वर्षांनी एका नवीन पाहुण्याला तुझ्या आयुष्यात आणलस. तेव्हा तुला आई- बाबांची आठवण झाली का तर दोघेही नोकरी करताना चिमुकल्या जिवाचा सांभाळ करणार कोण?

मग बायकोने युक्ती लढवली. आई – बाबांना अमेरिका दाखवायच्या बहाण्याने तु त्यांना अमेरिकेला नेलस. ते हि बिचारे चिमुकल्या जिवाला बघण्याच्या बहाण्याने पटकन तयार झाले. पूर्ण आयुष्य भारतात एका छोट्या शहरात काढल्यावर त्यांना कोणती हौस होती अमेरिका बघण्याची? पण एकुलता एक मुलगा नेतो आहे म्हंटल्यावर ते हि पटकन तिकड आले. दोन तीन जागा दाखवून तु आणि तिने आपल त्यांना ८-९ महिने ठेवून घेतल ते आपला फायदा करण्यासाठी. त्यांनी हि आपल्या नातवासाठी सगळ अगदी मनोभावे केल जस तुझ केल होत. त्यात कोणताही स्वार्थ आणि अपेक्षा नव्हती.

वर्ष होत आल. गरज संपली. ते पुन्हा माघारी आले. पुढली वर्षे अशीच जात राहिली. दिवसातून काय ते दोन फोन कॉल आणि ट्रान्सफर केलेले पैसे हे करून तुझ कर्तव्य संपल अस मानून तु दिवस मोजत राहिलास. यायची इच्छा असूनही बायकोच्या अधिकारापुढे तुझ काहीच चालल नाही. इकडे आई – बाबांची तब्येत दिवसेंदिवस खंगत जात होती. पण रोज काय सांगणार आणि सांगून पण तुला त्रास देऊन तुझ्या सुखी आयुष्यात त्यांना मिठाचा खडा व्हायच नव्हत. त्यामुळे ते हि न बोलता खेचत राहिले आयुष्य. आता २-३ वर्ष झाली न त्यांनी तुला बघितल न त्यांच्या छोट्या जिवाला. तु मात्र कुटुंब घेऊन जग फिरत राहिलास. पण त्याचं जग मात्र हिरावून घेतलस.

आज कुठे आहेत रे ते? काल मला काकू दिसल्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांना शोधत फिरत होत्या. हातात बरेचश्या फाईल होत्या. काका एका बेड वर निपचित पडून होते. कुठे जायच, कोणाला भेटायच, काय सांगायच काहीच कळत नव्हत. मी बघितल्यावर त्यांची मदत केली. साध लिफ्ट च बटन दाबायच ते हि कळत नव्हत. इकडून तिकडे फिरत होत्या. त्यांची हि अवस्था बघून मला स्वतःचीच लाज वाटली रे. त्या मोठ्या घरात हे दोन म्हतारी माणस एकेमेकांना आधार देऊन कस जगत असतील रे? एकेकाळी तुझ्या हसण्याची, रडण्याची, आवाजाची सवय असलेल ते शांत घर आज त्यांना खायला उठत नसेल का रे? ह्या उतरत्या वयात तुझ्या आधाराची गरज भासत नसेल का रे? सगळ सोडून मायेची गरज भासत नेल का रे? तु कुठे आहेस रे ह्या सगळ्यात? कुठेच नाही.

आपण धावतो आहोत फक्त घाण्याला जोडलेल्या बैलासारखे. कोणासाठी, कशासाठी आणि किती ह्याचा कुठलाच विचार न करता. काय मिळवतो आहोत? काय निसटते आहे? ह्याचा कसलाच विचार न करता फक्त आपण पुढे जात आहोत. भौतिक सुखांच्या मागे. ते खरच सुख आहे का? ह्याचा विचार तु कर? जमल्यास एकदा ये. भेट त्यांना. कदाचित ते जायच्या आधी तुला सुखाचा अर्थ समजेल. माझा फोन कट झाला होता. मी त्या फोन कट झालेल्या टोन ला ऐकत रिसिव्हर खाली ठेवला.    

ता. क. :- ह्या गोष्टीचा अर्थ माझ्या कोणत्याही मित्राशी लावू नये. ह्या गोष्टीतील पात्र काल्पनिक असून कोणाशी जुळल्यास निव्वळ योगायोग समजावा.

अबोल माणूस



अबोल माणूस-  एक निर्जन बेट......!  क्लीन कम्युनिकेशन इज  एॅन   आर्ट....!

आपल्या जन्माच्या वेळीही  खणखणीत टाहो फोडून या जगात येणारा माणूस इतर प्राण्यांहून वेगळा ठरतो ते त्याला निसर्गाने वरदान म्हणून दिलेल्या वाणी आणि वाचेने....ही त्यालाच दिलेली विशेषता आहे कि त्याची जगाची समज जशी जशी वाढेल तशी तशी त्याला वाचेच्या मदतीने शब्द आणि वाक्य रचना करता येते.....हत्ती .. घोडे ...वाघ सिंह या सगळ्या प्राणीमात्रात आणि त्याच्यात इथे पहिली प्रगतीची फारकत होते....   आपल्या शास्त्रात वाणीला "ब्रम्ह"..म्हटलं आहे....शब्द कधीच लोप पावत नाहीत....निसर्गात चिरंतन राहतात... ध्वनी कानाने ऐकून त्याची वाचा आणि वाणी होणे हे प्रगत लक्षण आहे ...मानवाच्या  मेंदूचे.
वाणी आणि वाचा याचा वापर जरी आपल्याला उपजत असला तरी कालमानाप्रमाणे प्रत्येक माणूस त्याचा वापर निरनिराळा करताना दिसतो...जन्मापासून कळण्याच्या वयापर्यंत उस्फुर्त असलेला हा प्रवास विचारांचे अडसर आले कि ठरतो कसा होणार ते...समज मग विचार आणि मग स्वभाव जडण घडण...या पायर्यांनी पुढे जाणारा हा प्रवास बोलका आणि अबोल...मोकळी वाणी कि दबका मितभाषी माणूस होणार हे ठरतं....स्वानुभव ...आजूबाजूचे वातावरण ...आणि माणसाने माणसाला बोलण्याचे केलेलं मार्गदर्शन....याचा पहिला प्रभाव पडतो...मग पुढे जाऊन बोलणे आणि त्याला मिळणार प्रतिसाद  हे ठरवतो कि त्याची बोलण्यात प्रगती होणार कि वाचा वापरायलाच तो माणूस  घाबरणार....आणि तिथेच एक गाठ पडते....माणूस जेव्हा शब्दांचा आधार घ्यायला घाबरतो तिथे त्याची उस्फुर्त विचार निर्मिती निराळा मार्ग घेते....वाचेला विचारांचा आणि समजुतींचा अडसर येतो....बोलणे म्हणजे चूक ही धारा बनते ..एकतर अशी व्यक्ती अगदी अबोल होते किंवा कटू बोलणारी होत जाते....तिथे रोखतो आहोत निसर्ग आपण हे त्या व्यक्तीला कळते पण ते पत्करून  ती अबोलपणा स्वीकारते ...अव्यक्त राहणे सुरक्षित वाटू लागते ... काम होतंय ना रोजचं..? मग कशाला बोलायचं..? अशा मताचा पगडा ठाम होत जातो मनात....आणि मग ती व्यक्ती  मनातही काही गोष्टी विचार करणे थांबवते....कुणी काही बोललेच तरच ती काही बदल करते आपल्यात अन्यथा..चलने दो   ...तत्वावर आयुष्य पुढे जातेच.... आम्ही अबोल असू तर राहू देत आमचं काही अडत नाही.....हे ठाम होत जातं....पण अशा व्यक्तीच्या आजूबाजूच्या व्यक्ती जर विरुद्ध  ऊर्जेच्या निघाल्या तर तिथे मग अडथळ्यांची शर्यत सुरु होते....अबोल आई आणि बोलकी मुले....अबोल वडील व बोलकी आई...अबोल भाऊ व बोलकी बहीण...अशा जोड्या दिसतात आपल्याला...नवरा बायको या नात्यात मात्र या  सिद्धीचा  कस लागू शकतो.... अबोलपणा हा निर्जन बेटा सारखा असतो....तिथे सगळं असतं....पण नेमकी वर्दळ हरवलेली असते....आपली वाचा आणि वाणी जर आपल्याला योग्य जागी मदत करत नसेल आणि हे आपल्याला जाणवत असेल तर यावर नक्कीच काही बदल होत जातो पण जर लक्षात आलंच नाही किंवा लक्षात येऊनही मान्य केलंच नाही तर मात्र तो माणूस समृद्ध असूनही  आपल्या माणसांच्या मनाच्या स्टेशनवर पोचत नाही....समोर दिसतो..जाणवतो..पण स्वच्छ वाणीचा माणूस जसा पारदर्शी नाती  निभावत दुसऱ्यांनाही चांगले भाव देऊ शकतो तसा हा माणूस देऊ शकत नाही....मनातले विचार जर शब्दात वापरू शकत नसू आपण तर नक्कीच कुठेतरी वायरिंग अपूर्ण राहते आणि हवी ती ऊर्जा निर्माण होत नाही.....ऊर्जेचा नियमच आहे इथून समोर गेली तर समोरून येते....म्हणजे यावी तरच ऊर्जेचे वर्तुळ पूर्ण होते....अन्यथा  उदासीन ऊर्जा राहते तिथे......एका हरवलेल्या निर्जन बेटासारखी.....!  आपण माणूस आहोत....कुठल्याही मार्गाने नीट व्यक्त झालो तर शरीराने आणि मनाने हेल्दी राहता येतं..... नक्कीच  समृद्ध बेट होऊ....ऊर्जा छान वापरू....आणि  सुदृढ राहू....क्लीन कम्युनिकेशन इज  एन   आर्ट....! .शुभास्ते पंथानः.....  #संगीताशेंबेकर

सोमवार, १ एप्रिल, २०१९

तीन गाळण्या



बोधकथा- 
तीन गाळण्या

सैक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,
" अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास माहीत आहे की नाही ? "

" भल्या माणसा , थोडा वेळ थांब , " सैक्रेटिसने त्याला थांबवले .
" कोणतीही गोष्ट ऐकण्यापूर्वी मी ती माझ्या तीन गाळण्यातून गाळून घेतो व नंतर ऐकतो ."

" तीन गाळण्या ? काय , आहेत तरी काय त्या?"

" हे पहा , माझे पहिले गाळणे आहे , माहितीची सत्यता ! तुम्ही जे मला सांगणार आहात ते स्वत: पाहिले आहे काय ? "

" नाही , मी ऐकले आहे ." तो माणूस बोलला .

" ठीक आहे ." सैक्रेटिस म्हणाला .
" आता दुसरे गाळणे . मला असे सांगा की ते माझ्या मित्राबद्दल चांगले आहे की वाईट आहे?"

" ओ ..... खरे तर ते चांगले नाही !" तो माणूस बोलला .

" म्हणजे तुम्ही अशी गोष्ट सांगणार आहात जी माझ्या मित्राबद्दल वाईट आहे , मात्र तिच्या सत्यतेबद्दल तुम्हाला कांही माहीत नाही ! बरोबर ? " सैक्रेटिसने विचारले .
" ठीक आहे . आता आपण तिसरे गाळणे लावूया . कदाचित त्यातुन तुम्ही खरे उतराल ."

" तिसरे गाळणे आहे उपयुक्ततेचे ! तुम्ही जे मला सांगणार आहात ते माझ्यासाठी फायद्याचे आहे का ? "

" खरे तर नाही !" तो माणूस बोलला .

" हे पहा ," सैक्रेटिस म्हणाला ,
" जी गोष्ट माझ्या फायद्याची नाही ,
माझ्या मित्राबद्दल चांगले सांगीत नाही
आणि जी खरी किंवा खोटी हे माहीत नाही , अशी गोष्ट ऐकून मी काय करणार ?
म्हणून तुम्ही ही मला अजिबात सांगु नका . बाय ! "

.....आणि सैक्रेटिसने आपले काम पुढे चालू केले .

मित्रानो , कोणाबद्दल ऐकण्यापूर्वी या तीन गाळण्या अवश्य वापरा . तुमचा बहुमोल वेळ वाचेल आणि मित्र / सहकारी /नातेवाईक / आप्तेष्ट यांच्याबद्दलचा गैरसमज होणार नाही . आयुष्य सुखी होईल !!

आत्मविश्वास



Working on Self realisation Group ह्या समुहावरील श्री. अनिल झा यांच्या मूळ हिंदी लेखाचा स्वैर मराठी अनुवाद.

सोऽहं शिवोहं !!
–––––––
एक भिकारी होता. एकदा रेल्वेच्या एका डब्यात भीक मागताना त्याला सुटाबुटातील एक इसम दिसला. त्याला पाहून भिकाऱ्याने  असा विचार केला की हा बराच श्रीमंत दिसतोय, याला भीक मागितली तर आपल्याला चांगली भीक मिळेल. भिकारी त्याच्यापाशी जाऊन भीक मागू लागला. भिकाऱ्याने त्याला भीक मागितली तेव्हा त्याच्याकडे बघून तो शेटजी म्हणाला, "तू तर नेहेमी इतरांना काहीना काही  मागतच फिरतोस, पण कधी कुणाला कांही देतोस तरी का?" तेव्हा तो भिकारी म्हणाला, "शेठजी, मी एक भिकारी आहे. मी नेहेमीच लोकांना भीक मागतच फिरतो. कुणाला कांही देण्याची माझी काय ऐपत असणार?"
"अरे, तू जर कुणाला कांहीच देऊच शकत नाही तर तुला भीक मागण्याचाही कांही अधिकार नाही. मी स्वतः व्यापारी आहे, आणि माझा व्यवसाय देण्या-घेण्याचा आहे. भिकेच्या बदल्यात तुझ्यापाशी मला देण्यासारखे कांही असेल तरच मी तुला भीक देईन." शेटजी उत्तरले.
इतक्यात स्टेशन आले आणि ते शेटजी स्टेशनवर उतरून निघून गेले. इकडे भिकारी शेठजीच्या बोलण्यावर विचार करू लागला. शेठजींनी दिलेले उत्तर त्याच्या मनात घोळू लागले. त्याच्या मनात आले की शेटजी म्हणाले ते बरोबर असावे. मी कुणाला भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकत नाही, म्हणूनच मला अधिक भीक मिळत नसावी. पण शेवटी मी तर पडलो भिकारी, मी लोकांना काय देऊ शकणार? पण मग मी तरी किती दिवस लोकांना कांही ना कांही दिल्याशिवाय केवळ भिकच मागत राहायची?

बराच वेळ विचार करून भिकाऱ्याने मनातल्या मनात विचार केला की यापुढे जी कुणी व्यक्ती आपल्याला भीक घालील त्याला कांही ना कांही मी जरूर देईन. पण काय द्यायचे? जी व्यक्ती स्वतःच भिकारी आहे, ती व्यक्ती इतरांना खरेच काय देऊ शकेल? दिवसभर हाच एक विचार त्याच्या मनात घोळत होता पण त्याला उत्तर सापडत नव्हतं.
विचारांच्या तंद्रीतच तो दुसऱ्या दिवशी स्टेशनपाशी बसला होता. तेव्हढ्यात त्याचे लक्ष स्टेशनजवळील फुलांच्या झाडांकडे गेले. ती फुलांनी फुललेली झाडी बघून त्याच्या मनात विचार आला की भीक देणाऱ्या लोकांना आपण त्या बदल्यात ही सुंदर फुलं द्यायला काय हरकत आहे? आपला हा विचार त्याला भलताच भावला आणि त्याने लगेच कांही फुले तोडून पिशवीत भरून घेतली. 
    तो गाडीत शिरला आणि नेहेमीप्रमाणे भीक मागू लागला. जो कुणी त्याला भीक घालीत असे त्याला तो आपल्या पिशवीतील कांही फुले काढून देत असे. ती सुगंधी, ताजी फुले बघून लोक खुश होऊ लागले. आता आपण सुद्धा लोकांना भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकतो ही भावना त्याला सुखावू लागली. आपण फक्त भीक मागतो ही भावना दूर झाली.
       कांही दिवसांतच त्याच्या लक्षात आले की त्याला आता अधिक भीक मिळू लागली आहे. तो रोजच्या रोज स्टेशनजवळील फुलझाडांची फुले तोडत असे आणि जो पर्यंत त्याच्यापाशी फुले असतील तोपर्यंत लोक भीक घालीत असत आणि फुले संपली की लोकसुद्धा भीक देत नसत. आता हे रोजचेच झाले होते. असेच एक दिवस गाडीत भीक मागत असतांना त्याला तोच सुटाबुटातील मनुष्य पुन्हा दिसला. तो लगेच त्याच्यापाशी गेला आणि म्हणाला, "शेटजी, आज बघा मला तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत. तुम्ही मला आज भीक दिलीत तर बदल्यात मी तुम्हाला कांही फुले देईन." शेटजीने त्याला भिकेमध्ये कांही पैसे दिले आणि त्याने बदल्यात दिलेली सुंदर फुले ठेवून घेतली. भिकाऱ्यातील हा बदल बघून शेटजी खुश झाले होते. ते म्हणाले, "व्वा! क्या बात है? आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास." एव्हढं बोलून तो शेटजी गाडीतून स्टेशनवर उतरून चालता झाला. पण त्या शेटजीने बोललेले एक वाक्य, “आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास, त्याच्या मनात घर करून गेलं. तो सतत याच गोष्टीचा विचार करू लागला आणि मनातल्या मनात तो खुश होऊ लागला. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसू लागली. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक गुरुकिल्लीच आपल्या हाती लागली आहे असे त्याला वाटू लागले.

विचार करीतच तो गाडीखाली उतरला आणि आकाशाकडे नजर टाकीत तो स्वतःशीच मोठ्याने उद्गारला, "नाही, मी भिकारी नाही व्यापारी आहे, व्यापारी. मी सुद्धा त्या शेटजीसारखा एक छान व्यापारी होऊ शकतो. मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो." आसपासचे लोक चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहू लागले. त्यानंतर तो भिकारी त्या स्टेशनवर पुन्हा कधी दिसला नाही.

साधारणपणे एक वर्षानंतर याच स्टेशनवर दोन सुटाबुटातील माणसे आली आणि सोबतच गाडीत चढली. दोघांची नजरानजर झाली. त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्या माणसाला हात जोडून नमस्कार केला आणि स्मितहास्य करीत विचारले, "ओळखलंत मला?

आता त्याच्याकडे पाहत तो दुसरा माणूस उत्तराला, "नाही, मला कांही आठवत नाही. आपण बहुधा पहिल्यांदाच भेटत आहोत."

पहिला : "नाही, नाही! शेठजी. जरा आठवा. आज आपण तिसऱ्यांदा भेटतो आहोत."

दुसरा : "असं? मला तर कांही आठवत नाहीये. या आधी दोन वेळा आपण एकमेकांना कधी भेटलो होतो?"
पहिला माणूस हसून उत्तरला, "ह्या आधी दोन्ही वेळेला आपली भेट ह्याच स्टेशनवर आणि याच गाडीत झाली होती. पहिल्या भेटीत तुम्ही मला जीवनात कशाला महत्व आहे हे सांगितले आणि दुसऱ्या भेटीत मला मी कोण आहे हे सांगितले होते. आठवतंय?" आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून मी आज फुलांचा एक व्यापारी झालोय आणि माझ्या व्यवसाच्याच संदर्भात मी आज दुसऱ्या गावी जातोय. पहिल्या भेटीत आपण मला निसर्गाचा नियम सांगितला होता की आपल्याला कांही मिळवायचं असेल  तर आपल्याजवळचं कांहीतरी द्यावं लागतं. हा देण्याघेण्याचा नियम खरोखरच फार उपयुक्त आहे आणि मला तो पूर्णपणे पटलेला आहे. मीच मला नेहेमी भिकारी समजत राहिलो. यापलीकडे मी कांही विचार केलाच नव्हता. दुसऱ्या भेटीत तुम्ही मला मी व्यापारी झाल्याचं मला जाणवून दिलं. आणि मग मात्र मला असं पक्केपणे वाटू लागलं मी भिकारी नाही, व्यापारी आहे. हा आत्मविश्वास तुम्ही माझ्यात जागवलात. आज मी खरंच एक चांगला व्यापारी झालोय."

भारतीय ऋषीमुनींनी बहुधा ह्यासाठीच माणसाला स्वतःची ओळख करवून देण्यावर नेहेमीच जोर दिलेला
शेवटी सगळं कांही मनाच्या समजुतीवर अवलंबून आहे. भिकारी जो पर्यंत स्वतःला भिकारी समजत होता तोपर्यन्त तो भिकारीच राहिला. जेव्हा आपण व्यापारी असल्याचे तो समजू लागला तेव्हा तो खरंच व्यापारी बनला. जेव्हा आपण आपल्याला, आपण सत्यस्वरूपात कोण आहोत  हे खऱ्या अर्थाने अनुभवायला लागू, तेव्हा मग आणखी समजण्यासारखं राहिलंच काय? होय ना? जे आपण जाणतो,ते आपण सर्व जगुयात.

माहेर



वहिनी अगदी पारंपारिक पद्धतीने आली आणि बोहल्यावर चढली निमूट सप्तपदी पूर्ण करून दादाचा हात धरून विना तक्रार दादाच्या साध्या घरात आली , सामावली...

पण तरी माहेर काही तिचं सुटलं नाही.
सासरी जे घडेल त्याच्या वरचढ तिच्या माहेरी घडलेलं असायचं.

                           त्यात कुणाला कधी खटकलं नाही, कारण एरवी तिचं वागणं अगदी सालस आणि समजूतदार होतं..

तिचं माहेरही होतच तसं तालेवार; त्यानी हसतमुखाने मुलगी या साध्या घरी दिली ती केवळ माणसं बघूनच.
त्यामुळे त्यांच्याकडूनही कधी आगाऊपणा झाला नाही की अवमान झाला नाही.

वर्षातून दोनदा वहिनी माहेरी जायची

त्यात एकदा दादा तिला आणायला जायचा...हे आता आमच्या लहानपणापासून माहीत झालं होतं.

    ती माहेराहून आली की पुढचे काही दिवस तिच्या बोलण्यातून सतत माहेरचे वारेजंग दाखले ऐकावे लागायचे..

     अर्थात ते ऐकण्यासारखेच असायचे. त्यांचा भलामोठा वाडा, त्यांची लांबचलांब पसरलेली बाग, फुलांचा ढीग, बागेशी येणारे मोर, वाट चुकून आलेली हरणं सगळंच स्वप्नवत वाटावं असं !
म्हणजे ही स्केटींग करण्यात मनमुराद वेगावर स्वार होणारी  मुलगी दादाच्या सोबत इथल्या घरात स्थिरावलीच कशी ?
याचं आश्चर्य वाटतं.   ???

मधे तिचे भाऊ लंडनला शिक्षण पूर्ण करून आले आणि माहेरच्या गप्पा आणीकच वाढल्या... आम्हालाही ते ऐकायला आवडायचंच कारण तो परिसर, ती माणसं आम्हाला काही परकी नव्हती..

मी दहावीत नापास झालो तेव्हा आईचं काही न ऐकता वहिनी मला तिच्या माहेरी घेऊन गेली होती.
म्हणाली,"आता चार दिवस माणसं येऊन उगीच भंडावून सोडतील..."

चित्रपटात कसं पाहुणे आले की ती घरची बाई नोकराला सांगते- "इन्हें इनका कमरा दिखाओ.." किंवा
जवळचा कोणी असेल तर "आओ, मैं तुम्हे तुम्हारा कमरा दिखाती हूँ" असं म्हणून दृश्यातून एक्झीट घेते..

पन्नाशी उलटली तरी मला या वाक्याचं अजूनही अप्रूप वाटतं..

वहिनीचं माहेरही तसंच चौसोपी होतं !
त्यात वहिनी माहेरची मोठी लेक ! त्यामुळे तिनेच त्या घराला एक शिस्त लावली होती..
मी वहिनीचा पाहुणा म्हणून माझीही त्या घरात खूप बडदास्त ठेवली गेली,मलाही माझी वेगळी खोली मिळाली होती. माझी "दहावी नापास होणं" एका अर्थी "सेलिब्रेट" केलं जात होतं..

म्हणजे एकूण काय अशी आमची मेघना वहिनी आणि तिचं माहेर हे आमच्या साठी एक अप्रूपच होतं..
मधल्या वर्षात दादाने पण खूप प्रगती केली. वहिनीच्या माहेराशी तुलनाच होऊ शकत नाही, पण तरी आमच्या परीने त्याने आसमान को हाथ छू लिये...

पण एक जाणवायला लागलं वहिनीचं माहेराविषयी बोलणं कमी झालं. कधी बोललीच तरी त्यात पहिल्या सारखा आग्रह राहिला नव्हता.

           मध्ये तिच्या माहेरचा जुना वाडा पाडून त्याहून आलिशान बंगला बांधला गेला. दोन्ही भावांची आॅफिसेस बंगल्याच्या आवारातच समाविष्ट केली होती...

वास्तुशांतीला मावशी सकट सगळेजण गेले होते. मलाही बोलावलं होतं पण जायला जमलं नाही.

पण तिथूनच वहिनी एकदम गप्प झाली...

शेवटी न राहवून मी वहिनीला विचारलंच,
"म्हंटलं, हल्ली तू माहेरच्या घराबद्दल भरभरून बोलत नाहीस?"

ती खिन्नपणे म्हणाली,"काय बोलू?"

"काय झालं?" मी विचारलं.

ती म्हणाली,"तसं पाहिलं तर काहीच झालं नाही..
सगळं रीतीला धरून झालं
पण ती रीत मला मान्य करायला त्रास होतोय."

क्षणभर गप्प राहून
ती म्हणाली,"आम्ही मुली सासरी येऊन माहेर मनात जपत असतो  आपण आता त्या घराला परके झालो हे आमच्या लक्षातच येत नाही...आणि माहेरचे लेक परकी झाली हे गृहीतच धरून चलतात...
खूप यातनामय आहे हे!"

"वहिनी, नीट सांग."
मी काकुळतीला येते म्हणालो..

तशी ती म्हणाली,
"काही नाही रेsssss
आधी वाडा होता त्यात माझी स्वत:ची खोली होती.. मला माझ्या खोलीचं कौतुक होतं. घरचेही त्या खोलीला ताईची खोलीच म्हणायचे."

"मग आता?"
मी नं राहवून विचारलं.

"आता इतका आलिशान बंगला बांधला. एक मजला वाढवला पण त्यात मला कुठेच जागा नाही....

म्हणजे शंतनू (धाकटा भाऊ) आता दहा बारा वर्ष लंडनला जायचाय तरी त्याची रूम आहे; ...आईबाबांची रूम असूनही आईची एक वेगळी रूम आहे, दादाच्या दोन्ही मुलांना वेगवेगळ्या रूम्स ..

पण ताईची जागा या घरात अबाधित आहे असं कोणालाच वाटलं नाही..
मी सहज विचारून गेले 'माझी रूम?'

तर शंतनू म्हणाला,'गेस्टरूम आहे ना... शिवाय स्टडीरूम आहेच.'

जागा होती पण सामाऊन घेणं जे म्हणतात ते
त्यांच्या लक्षातही आलं नाही...

मग मी मनापासून या घराकडे वळले या घरची होऊन गेले..

पण ही रीत मी मोडेन आपण जेव्हा बंगला बांधू.
मी छकुलीचं लग्न झालं तरी तिची रूम तिला हवी तशी राखून ठेवेन...

गेस्टरूम मधे पाहुणे उतरवायचे...
आपल्या लेकीबाळी नाही.
त्या दुसर्‍या घरी गेल्या तरी...
त्या आपल्याच असतात."

.....वहिनी भरभरून बोलत राहिली मी ऐकत राहिलो...

- चंद्रशेखर गोखले...👏💐
(Memory sharing)

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा