Pages

शुक्रवार, ५ एप्रिल, २०१९

असं सासर सुरेख बाई!!!


असं सासर सुरेख बाई!!!

" केलेस ना आम्ही नाही म्हणत असताना लग्न??? मग आता हे घर तुझ्यासाठी बंद आहे. आम्ही नाही येणार कुठल्या मिटिंग ला" असं म्हणून तेजल च्या बाबांनी फोन कट केला.. तिची आई स्वयंपाक घरातून सगळं काही बघत होती.. आसवे गाळण्या पलीकडे तिच्या हातात काहीच नव्हते!
तेजल.. नवा प्रमाणे तेजस्वी आणि सुंदर! तिची आणि राकेश ची ओळख कॉलेज मध्ये शेवटच्या वर्षाला झाली..  हळू हळू त्याचं रूपांतर घनिष्ट मैत्री आणि नंतर प्रेम ! असा साग्रसंगीत प्रवास करत गाडी लग्नापर्यंत पोचली तेव्हा तिथे थोडीशी पंक्चर झाली! निमित्त एकमेव होते... सासूबाई! 'जात' वेगळी असल्याने त्यांनी थोडे नाक मुरडले पण थोड्या दिवसांनी मुलाची इच्छा स्वतः च्या पदरात पाडून लग्नाला होकार आला! तेजल च्या घरच्यांनी सुद्धा 'सावध ऐका पुढल्या हाका' असं मनात ठेवून लग्नासाठी तयारी दाखवली... धूमधडाक्यात लग्न सोहळा पार पडला आणि लुटुपुटू चा संसार सुरू झाला..सुरुवातीला सगळे काही अलबेल होते.. सकाळी लवकर उठायचं, चहा, नाश्ता, डबा इत्यादी.. मग राकेश ची ऑफिस ला जायची घाई आणि महाशय एकदा ऑफिस ला गेले की चार भिंतींच्या आत दोघी सासू सुना..! राकेश चं कुटुंब लहान असल्याने नणंद, जावा यांचं 'सुख' तेजल च्या वाटेला आले नाही.. एक वर्ष असं सहज गेले..  आपली मराठी भाषा सुद्धा फार चपळ आहे.. एकीकडे म्हणते 'सहवासाने प्रेम वाढते' आणि दुसरीकडे म्हणते 'अतिपरिचयात अवज्ञा'...!! या दोघींचं तसंच झालं.. एक एक गोष्ट खटकायला लागली.. 'पुढे शिकायचंय' असं तेजल ने म्हटले की 'आता काय होणार आहे शिकून?? मला गोड बातमी हवी आहे' असं 'मोठ्ठी टिकली' (सासूबाई) म्हणायच्या! तिला ऑनलाइन शॉपिंग ची भारी आवड! ते करताना पाहिल्यावर मोठय्या टिकलीच्या भुवया आकाशाला भिडायच्या! 'काय आजकाल च्या पोरी!' असा शेरा हमखास यायचा. राकेश ने मध्ये मध्यस्ती करून तेजल ला शिकवण्याची परमिशन मिळवून दिली.. पण एके दिवशी कहर झाला.. तेजल परीक्षेला जात असताना सासूबाई चक्कर येऊन पडल्या..बिचारी तेजल, काय करणार ती तरी?? बुडवली परीक्षा, बसली घरी आणि केली सासूबाईंची सेवा.. पण खरी गोष्ट आता सुरू झाली.. एकदा सासूबाईंच्या खोलीबाहेरील फरशी स्वच्छ करत असताना सासूबाईंचे फोनवर मैत्रिणीसोबत चे बोलणे ऐकले..'अगं रमा, तुझी युक्ती कामी आली.. ती नाहीच गेली पेपर ला..काय acting केली मी सांगू तुला..!!' इति सासूबाई. तेजल चा मात्र पारा चढला आणि तडक आतमध्ये जाऊन भडभडून आल्यागत सासूबाईंना बोलली.. तिचा आत्मा शांत झाला पण समोर मात्र आग पेटली होती.. हात उगारला गेला, नको नको ते शब्द ऐकू आले आणि 'संस्कार'नावाच्या हत्याराने आपले काम चोख बजावले..भरात भर एवढी की राकेश सुद्धा वैतागून दोघींची बाजू ऐकेनाशी झाला..! मग घरी असंख्य वादावादी, रडणे गागणे, शिव्या शाप.. काही विचारु नका!
मीनल.. तुमच्या आमच्या सारखीच गोड मुलगी..बिचारी चं लग्न झालं तेव्हा काही घरकाम येत नव्हते तिला.. मग सासूबाई मैदानात उतरल्या.. उचलली तलवार आणि योद्धा बनल्या.. म्हणजेच घरकामाची अ आ इ ई पूर्ण शिकवली तिला.. आज मीनल सुगरण आणि गृहकृत्यदक्ष तर आहेच पण सोबतच स्वतः चा छोटासा business सुद्धा सांभाळते!
जुई.... अगदी फुला प्रमाणे नाजूक...लग्नाची, सुखी संसाराची स्वप्न उराशी बाळगलेली!पण म्हणतात ना, नशीब मनाप्रमाणे चालत नसते.. तसंच झालं.. अर्ध्यावर सोडून गेला तिचा शेखर तिला.. ना वर्तमानाचे भान! भविष्यकाळ मात्र आ वासून उभा होता.. सासूबाई आणि सासरे सुद्धा संकटाने बिथरून गेले होते.. पण 'कूल' शेखर चे 'सुपरकूल' आई बाबा होते ते! जुई ला पुढे करिअर ला हातभार लावायचा ठरवला! तिला नाचा चं भारी वेड! आणले घुंगरू, जोडले काही मित्र/मैत्रिणी आणि सोडले तिला त्या रंगमंचावर..! कोमेजलेली जुई परत एकदा बहरली आणि तिचा सुगंध आसमंतात दरवळला! तिच्या सुपरकूल सासू सासर्यांनी तिचा बालमित्र सौमित्र सोबत तिचं थाटामाटात कन्यादान करून देऊन तिची पाठवणी केली!
हे तीन वेगळे प्रसंग! चाणाक्ष वाचकांनी विषय ओळखला असणारच! तमाम स्त्री वर्गाची दुखरी नस म्हणजे 'सासूबाई'! अनेकदा नव्या नवरीचं घरात वाजत गाजत स्वागत होते.. पण.. जेव्हा 'सासूबाई' असं लेबल लागते तेव्हा मान, अपमान, वर्चस्व, सत्ता या सारखे 'षड्रिपु' डोकं बाहेर काढतात! नंतर याचं ओझं वाढत जाते आणि नात्यामध्ये घुसमट येऊ लागते! लग्नाचा अर्थ काय हो? लग्न म्हणजे तडजोड की दोन भिन्न कुटुंब आणि त्यातील व्यक्ती यांना जोडणारा दोर? ते म्हणतात ना, भावी पती पत्नीची पत्रिका या पेक्षा सासू व सुनेची पत्रिका जुळत असेल तर घरातून सुमधुर बासरीचे सूर सदैव ऐकू येतील!
एका घरात अतिशय मॉडर्न सासूबाई होत्या.. सुने सोबत शॉपिंग, किटी पार्टी,जीन्स घालणे, वन पीस घाल, दारू (वाईन) पी असं सर्व साग्रसंगीत सुरू होते.. तिसर्याच्या नजरेत हे म्हणजे अतिशय 'सुखी' कुटुंब असं चित्र बनले असते.. पण नवरोजी.. त्यांना स्पेस चा थोडा issue येऊ लागला, दोघींमध्ये सुद्धा जळफळाट होऊ लागला.. आणि आधीच वेगळे राहिलो असतो तर एकमेकींची किंमत राहिली असती या दोघींना असं वाटू लागले..
एका घरात 'सासूबाई' या म्हणजे  कुटुंब प्रमुख! महिन्याचा पगार आला, द्या सासूबाईंना ; अमुक अमुक नातेवाईकांकडे जायचंय , विचार सासूबाईंना, रोजच्या खर्चाला पैसे हवे, घ्या सासूबाईंकडून! एक वेळ अशी आली की बिचाऱ्या सुनेला नैराश्याने ग्रासले.. मग गोळ्या औषधं यांचा मारा आणि दुसरीकडे सासूबाईंचं 'वर्चस्व' अजून रंग दाखवू लागलं!
वरील उदाहरणांवरून एक आपण स्पष्टपणे म्हणू शकतो की माणूस हा कधीच 'पूर्ण'नसतो.. त्यामुळे कुणाकडूनही अपेक्षा ठेवताना विचार करावा! संयम, मोकळेपणा,संवाद आणि मर्यादा ही नात्याची चत:सुत्री आहे ती पाळली गेली पाहिजे!
सासूने सुनेला आणि सुनेने सासूला सांभाळून घेतले पाहिजे... सुनेला तिची तिची स्पेस दिली पाहिजे.. सासू सुनेच्या नात्यांमध्ये 'आदर' असला पाहिजे... बऱ्याच ठिकाणी सासूबाई एकट्या असतात,अशा घरात नवऱ्याची कुचंबणा होते.. कुठून गोळीबार केव्हा होईल हे सांगता येत नाही..त्यामुळे बऱ्याचदा असे नवरे व्यसनाधीन होत असतात यावर वेळीच उपाय करणे उत्तम!
तेव्हा पुरुषांनो, ते म्हणतात ना, 'स्त्री ही क्षणभराची पत्नी आणि अंतकाल ची माता असते' हे डोक्यात ठेवून काही गोष्टी आत्मसात केल्या जसं की, उत्तम पटवून देण्याचं स्किल्, उत्तम स्वयंपाक करणारे हात, शॉपिंगमय डोळे, स्तुती करणारी जीभ आणि शांत राहणारं डोकं...हे पंचसूत्र तुम्हाला नक्कीच आयुष्यात जिंकवू शकते.. बाकी वर सांगितलेली सासू सुनेनी पाळायची 'चतुःसूत्री' ही सगळी अंधश्रद्धा आहे..!

सुख पर्वताएवढं




अति सुखाचा ओला दुष्काळ (लेखक प्रवीण दवणे)
..................................
सुख पर्वताएवढं

सुख ! सुख ! सुख !
सर्व बाजूंनी सुखाचा नुसता पाऊस ! सुखाचा म्हणजे सुखी असल्याच्या आभासाचा !
कारण समाधानाचा तरंग अंतरंगापर्यंत पोचण्याआधीच, सुखाचं नवं रुप, नव्या ढंगात निमंत्रण देतच असतं.

मग ते पूर्ण करण्यासाठी आटापिटा. आपण जे सोसलं ते आपल्या पुढच्या पिढीला 'अगदी काहीही सोसावं' लागू नये म्हणून बिचारी धावाधाव !

एखाद्या गोष्टीची अधीरतेनं वाट पाहणं, तिच्या अनिश्चिततेबद्दल झोके अनुभवणं. अनपेक्षिततेच्या काठावर जीवाचं काहूर उठणं आणि प्रतीक्षा मिसळलेल्या अश्रूंमध्ये सुखाचं अवचित येणं, यातली गंमत ही केवढी मजेशीर श्रीमंती असं हे सांगणं आवाक्याबाहेरचं आहे.

आता दिवाळीआधीच करंजी, होळीआधीच कुठेही पुरणपोळी, मोहोर येण्याआधीच ताजा आमरस गल्लोगल्ली कुठेही हात जोडून तयार असतो. त्या त्या सणाची, रुचीची, गंधाची वाटच पाहावी लागत नाही. सगळं कसं रेडी-मेड !

वस्तूंबाबतचं जे तेच भावनांबाबत. पटकन कुणाशीही संवाद, कधीही, कुठेही दृष्टभेट, आवडतं गाणंही व्याकूळ न करता एका बटनात कानात गुंजतंय - यातून अंत:करणाचे तगमग संघर्ष हरपले न् त्याचा गंधही !

तीच मानसिकता नव्या पालकांची. मुलांच्या भविष्यातील सारा जीवनसंघर्ष आततायी प्रेमानं पालकांनीच संपवून टाकणं यासारखा दुसरा कुठला गुन्हा असेल असं वाटत नाही. भविष्याची काळजी याचा अर्थ जगण्याचा गड चढण्याचे त्याचे मार्ग आपणच चढणं, हा नाही.

त्याला हेलिकाॅप्टरनं किल्ल्यावर सोडलं, तर रानवाटांचा अनवटपणा, खडकांचा रांगडेपणा आणि मधूनच वाहणार्‍या निर्झरणीची शीतलता त्याला कळणार कशी ?

अतिदारिद्र्याने काही पिढ्या संपल्या, आता अतिअति ऐश्वर्याचं नवंच दारिद्र्य दारात आलंय. ते दारिद्र्य प्रयत्नानं दुर्दम्य ध्यासानं संपवता तरी येत होतं, हे रत्नजडीत दारिद्र्य लाखो आयुष्याचा उष्ण कोवळा घास घेऊन संपणार, असं दिसतंय.

केवळ लग्न झालं न् मूल झालं म्हणून 'पालक' झालो, असं समजणार्‍या कोट्यवधी घरांत पुढे जिद्द हरवलेल्या तरुणाईचं मन ही मोठीच समस्या असणार आहे. अतिसुखाच्या ओल्या दुष्काळाचं सावट वेळीच कळलं तर.....


अनेक घरांत 'मागितलं की द्या!' हा एककलमी कार्यक्रम असतो आणि मग ते नाही मिळालं की क्रौर्य कुठल्या थराला जाईल याचा नेम नसतो.

केवळ 'बाईक' एवढ्यात नको; अठरा वर्षे पूर्ण होऊ दे,' असं सांगणार्‍या आजीला सतरा वर्षांचा नातू संपवतो, अशी बातमी येते, तेव्हा दरदरुन घामच फुटतो. गायत्री मंत्र वहीत लिहीत बसलेली ती मी न पाहिलेली आजी माझ्या डोळ्यांसमोर येते. या आजीनं या नातवासाठी किती वेळा ऊन-ऊन जेवण केलं असेल,
त्याची वाट पाहत ती जेवणासाठी थांबली असेल,आजारपणात रात्र-रात्रभर जपमाळ घेऊन नातवाजवळ जागली असेल. त्या आजीला जीवे मारताना या सतरा वर्षांच्या मुलाला हे काहीच आठवलं नसेल?

एवढी हिंस्त्रता एकाएकी येत नाही. आज नव्वदपंच्याण्णव टक्के घरांत या हिंस्त्रतेचा रियाज साग्रसंगीत करुन घेतला जात आहे.
ना घरात प्रार्थना !
ना घरात एखाद्या सामाजिक सेवेची साधना !
ना घरात ग्रंथवाचन !
ना पुस्तकाचं समृध्द कपाट !
ना व्याख्यानांना जाणं ! ना उत्तम संगीत !
फक्त संगणक, मोबाईल, व्हाँटसअप ते एसएमएस आणि रस्त्याच्या कडेला उभं राहून खाणं आणि हीसुध्दा नशा कमी म्हणून की काय, मैत्रीची सरहद्द ओलांडणार्‍या मजेनं सर्वनाशाची पूर्वततयारी करणं ! जीवनाची ओढ नाही म्हणून मरणाचं भय नाही !

जगलो काय न् मेलो काय, इतका बेफिकीरपणा वाढत चालला तर कुठली कर्माची महासत्ता येणार ?

आधी प्रतिष्ठापना हवी सुसंस्कृततेची, मानव्याची ! संपूर्ण विकसित माणूसपणाची !

आज भ्रष्ट राजकारणी, त्वचेचा बाजार हीच आमची कला मानणारे नट नट्या, बोगस शिक्षणसम्राट, भंपक आध्यात्मिक बाबाबापू , लबाडीनं पदव्या मिळवणारे डाॅक्टर, भेसळबाज व्यापारी हे सर्व करोडपती जरुर आहेत; पण हे सर्व समाधानी, सुखी आहेत का ?

आज समाजातल्या प्रत्येक जागरुक घटकानं होणार्‍या अपमानाच्या शक्यतेसह नव्या पिढीला सांगायला हवंमन:शांती म्हणजे काय, सुख म्हणजे काय, समाधान म्हणजे काय ? 
कुणी तरी टाळी वाजवल्यावर हजर ठेवतं ते उधार उसनवारीचं सुख म्हणजे सुख नाही. पंखातलं बळ संपवून पाखराला आयतं डाळिंब मिळण्यात कुठलं आलय सुख?

आभाळ पाठीवर घेऊन भरारीची दमछाक मिरवीत धुंडून जे फळ मिळतं तेच फळ ! दुसर्‍यानं आपल्यासाठी ठेवलेलं ते निष्फळ!
मिळण्यातल्या आनंदापेक्षा मिळवण्यातल्या धडपडीतली गंमत कळणं आवश्यक आहे. योग्य वयातच जीवनाचं प्रकाशात्मक उद्दिष्ट निश्चित करणं, ही खरी जीवनसाधना आहे. चाललंय आपलं कटलेल्या पतंगीसारखं ! त्यानं फार तर वयाचे वाढदिवस 'सेलिब्रेट' होतील, कर्तृत्वाचे वाढदिवस साजरे होणार नाहीत.

महाकवी कुसुमाग्रजांचा कोलंबस म्हणतो, 'कोट्यवधी जगतात जिवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती !'*खरंच आहे, ट्रेनच्या गर्दीत जा, बाजारात जा, सिनेमाला जा, बसमध्ये चढा, कुठेही जा, लाखो माणसं नुसती गच्च गर्दीने जगतच असतात; पण त्यातले काही चेहरे पोट भरण्याच्या आनंदा पलीकडे सुंदर जीवनाची पाऊलवाट चोखाळतात.
कुणी प्रयोगशील शेतकरी. कुणी ध्यासवंत शास्त्रज्ञ, कुणी भारतमातेला सार्थक वाटेल असा सैनिक, कुणी मन उगाळून मन उजळणारा शिक्षक, कुणी अनाथ मुलांसाठी स्वप्नांची आहुती देणारा सेवक. असाच चेहरा वेधक ठरतो, तो गर्दीत असूनही वेगळा ठरतो.

कोट्यवधी पोटार्थी किड्या मकोड्यां प्रमाणे जगायचं की वाटेवरची सर्व वादळ विजांची आव्हाने झेलत संपत्ती सुखापलीकडची ध्यासाची नक्षत्रमाला उजळायची, हे ठरवणारी जिद्द मनात निराशा फिरकूच देणार नाही.

कोलंबस पुढे म्हणतोच ना, 'नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती !' एक क्षितिज गाठलं की संपलं नाही — दुसरं क्षितिज खुणावू लागतं. तोच जीवनाचा नाविक !

आज जीवनाचे नट हजारो आहेत; जीवनाचे नाविक आज हवे आहेत ! जीवनाचे गरुड हवे आहेत ! उसनवारीचं सुख पुष्कळ झालं ! मनगटातून बहरलेलं घामाच्या गंधाचं कर्तृत्व आज हवं आहे !

मुलांना त्यांचा झरा स्वत:हून शोधू द्या ! त्यांचे पंख त्यांना उघडू द्या ! तुमच्या पैशाची हेलिकाॅप्टर्स त्यांचे पंख दुबळे करतील ! उड्डाण तर ज्याचं त्यानंच करायचं असतं ! त्यांच्या जीवनात तहानेची चव मिसळू द्या ! त्यांच्या पंखात आकाशाची साद उसळू द्या!
त्यांच्या मुळातल्या कणखरतेनं — त्यांच्या फांदीवर त्यांचं फूल त्यांच्या गंधानं उमलू द्या !
*******
लेखकप्रा. प्रवीण दवणे.
पुस्तक संदर्भ सुखपहाट

संवाद



माणसाला संवादाची गरज असते का..?  कशासाठी..? संवाद म्हणजे जिवंत पणा चे लक्षण.
समजा कुक्करमध्ये खूप वाफ कोंडली आहे...तिला बाहेर पडायला वाव मिळाला नाही...तर काय होईल...? कुकरचा स्फोट होईल... समजा एखाद्या डबक्यात पाणी साठलं आहे...आत येणारा झरा नाही...बाहेर जाणारा मार्ग नाही...तर काय होईल...आतलं पाणी आतल्या आत कुजून जाईल... वास येऊ लागेल... दुर्गंधी येऊ लागेल...मनाचंही असंच असतं...विचारांची देवाणघेवाण झाली नाही... भावनांना वाट मिळाली नाही...की मनात विकृती निर्माण होते...अन यासाठी गरज असते संवादाची.....! अन्न..,वस्त्र आणि निवारा या शरीराच्या मूलभूत गरजा असतील तर संवाद ही मनाची मूलभूत गरज आहे......
संवादाचा अभाव हे माणसांमाणसांत दुरावा निर्माण होण्याचं एक महत्वाचं कारण आहे....एकाच घरात रहाणारे भाऊबहीण.., पतीपत्नी.., पितापुत्र यांच्यात संवाद नसतो.... आपली सुखदु:ख..,भावना.., विचार यांची देवाणघेवाण करायला वाव नसतो...काय गंमत आहे बघा..,संवादाच्या खिडक्या बंद करुन माणसं ‘सहजीवन..’ जगत असतात...मग काय होतं.., मनाच्या बंद तळघरात गैरसमजाचा राक्षस जन्माला येतो आणि बघता बघता तो अक्राळविक्राळ रुप धारण करतो....संवादच संपला की उरतो तो वाद.....
संवाद म्हणजे नुसतं बोलणं नव्हे...संवाद म्हणजे विचारांची देवाणघेवाण... दुसऱ्याकडे विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी गरज असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची गरज असते...या विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्या विचारांना नवा आयाम मिळतो...आपल्या सृजनशीलतेला नवे पैलू पडतात...आपल्या ज्ञानात भर पडते.... आपल्या व्यक्तिमत्त्वाचं.., आपल्या उणिवांचं आपल्याला मूल्यांकन करता येतं....आपलं मानसिक आरोग्य सद्रुढ रहातं.... थॊडक्यात काय तर संपन्न व्यक्तिमत्वासाठी निरोगी मन आवश्यक आहे आणि निरोगी मनासाठी संवादाची गरज आहे...तेव्हा बोलूया.. ऐकूया ..समजूया ... संवाद साधू या ... चला सर्वांशी चांगला संवाद साधू या ....!!

मायक्रोवेव्ह भट्टीची कथा


मायक्रोवेव्ह भट्टीची कथा

आज बऱ्याच घराघरातून 'प्रतिष्ठेचे चिन्ह' म्हणून खरेदी केली जाणारी, 'मी मायक्रोवेव्हमध्ये शेंगदाणे भाजते/भाज्या बनवते/बटाटे उकडते','आम्ही हल्ली चहा कॉफी पण मायक्रोवेव्हमध्ये करतो.' असे शेजारणीपाजारणींना अभिमानाने सांगावेसे वाटावे अशी हीच ती 'सूक्ष्मलहरी भट्टी' उर्फ मायक्रोवेव्ह ओव्हन.

सूक्ष्म लहरींचा उपयोग खाणं शिजवण्यासाठी केला जाऊ शकतो' हा शोध मात्र योगायोगानेच लागला. १९४६ सालच्या एका दिवशी पर्सी स्पेन्सर नामक अमेरिकन संशोधक रडारसाठी लागणाऱ्या 'मॅग्नेट्रॉन' या उपकरणावर प्रयोग करत होता. अचानक त्याने पाहिले की त्याच्या खिशातला खाद्यपदार्थ वितळत होता. स्पेन्सरला वाटलं की हा नक्की मॅग्नेट्रॉनमधून निघालेल्या सूक्ष्मलहरींचा परिणाम आहे. त्याचं कुतूहल चाळवलं आणि त्याने मॅग्नेट्रॉनजवळ थोडे मक्याचे कोरडे दाणे ठेवून पाहिले. क्षणात ते तडतडून त्यांच्या लाह्या बनल्या.दुसऱ्या दिवशी स्पेन्सरने परत हाच प्रयोग करण्याचं ठरवलं. यावेळी त्याचा एक उत्साही सहकारी पण त्याच्याबरोबरच होता. त्यांनी एक अंडं मॅग्नेट्रॉनजवळ ठेवलं. अंडं काही क्षणात थरथरायला लागलं. अर्थातच अंड्याच्या आतला द्रव उष्णतेने विचलित झाल्याने ते हालत होतं. स्पेन्सरचा सहकारी जरा नीट पाहायला जवळ सरकला आणि .. त्या अंड्याचा स्फोट होऊन आतला ऐवज त्याच्या चेहऱ्यावर उडाला! जर सूक्ष्मलहरींनी अंडे इतक्या लवकर शिजले तर इतर अन्न का नाही? यातूनच आणखी प्रयोगांना चालना मिळाली. नंतर स्पेन्सरने एक धातूचं खोकं तयार करून त्यात अन्न ठेवलं आणि त्या खोक्याला ठेवलेल्या छिद्रातून सूक्ष्मलहरी आत अन्नावर सोडल्या. काही सेकंदातच अन्न गरम झालं.

स्पेन्सरच्या शोधाने खाद्यक्षेत्रात एक नवी क्रांती केली होती.
१९४७ मध्ये जगातली पहिली मायक्रोवेव्ह भट्टी 'रडारेंज' नावाने बाजारात आली. ही नवीन भट्टी आकाराने मात्र आजच्या मायक्रोवेव्ह भट्ट्यांपेक्षा बरीच अवाढव्य होती. ही अशी दिसायची ६ फूट उंचीची आणि जवळजवळ ३४० किलो वजनाची पहिली मायक्रोवेव्ह भट्टी अर्थातच सुरुवातीला या शोधाला विशेष प्रतिसाद मिळाला नाही.ही भट्टी गैरसोयीची वाटण्यामागे एक कारण हेही होतं की मॅग्नेट्रॉनचे तापमान नियंत्रित करायला पाणी वापरलं जात होतं. पण लवकरच मायक्रोवेव्ह भट्टीच्या आकारात सुधारणा झाल्या, पाण्याऐवजी शीतलनासाठी (कूलिंगसाठी) हवा वापरणारे मॅग्नेट्रॉन वापरून भट्ट्या बनवल्या. आणि मायक्रोवेव्ह भट्टीचा शोध प्रसिद्ध झाला.१९५८ च्या 'रिडर्स डायजेस्ट' मध्ये स्पेन्सरवर लेख छापून आला.मायक्रोवेव्ह भट्ट्यांच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच लोकांनी या भट्टीचे निरनिराळे कल्पक उपयोग शोधायला सुरुवात केली. बटाट्याचे वेफर मायक्रोवेव्हमध्ये वाळवणे, कॉफीच्या बिया भाजणे, शेंगदाणे भाजणे, गोठलेले मांस वितळवणे, मांस शिजवणे हे झाले खाद्यक्षेत्रातील काही उपयोग. अनेक क्षेत्रात कागद वाळवणे, चामडे वाळवणे,चिनीमातीच्या वस्तू वाळवणे,काडेपेट्यांची गुलं वाळवणे यासाठीही मायक्रोवेव्ह भट्टी वापरली जाऊ लागली.

सुरुवातीला मायक्रोवेव्ह भट्टी आणि या सूक्ष्मलहरींचे शरीरावर विपरीत परिणाम याबद्दल बऱ्याच भीतीयुक्त समजुती होत्या. पण नवनवीन सोयींबरोबर ही भीती कमी होत गेली. १९७५ पर्यंत मायक्रोवेव्ह भट्टीची विक्री बरीच वाढली होती.'सूक्ष्मलहरींनी खाद्यपदार्थ शिजतो' म्हणजे नेमकं काय होतं बरं ? जास्त वारंवारतेच्या सूक्ष्मलहरी जेव्हा खाद्यपदार्थातील पाण्याच्या रेणूंतून जातात तेव्हा 'डायइलेक्ट्रिक हिटिंग' या गुणधर्माने त्या पाण्याचे तापमान वाढते. आणि ही पाण्यातील उष्णता पदार्थ शिजवते.

१. पाण्याच्या रेणूच्या एका टोकाला धनभार आणि एका टोकाला ऋणभार असतो.(याला आंग्लभाषेत 'डायपोल' असे म्हणतात.)

२. सूक्ष्मलहरी पदार्थाच्या आजूबाजूला खेळवल्यावर विद्युतक्षेत्र तयार होते. हे विद्युतक्षेत्र सूक्ष्मलहरींची वारंवारता (फ्रीक्वेन्सी) जास्त असल्याने वेगाने दिशा(पोलॅरीटी) बदलत असते.

३. पाण्याचे रेणू विद्युतक्षेत्राच्या दिशेप्रमाणे आपली धन आणि ऋण टोके योग्य रितीने लावून घेण्यासाठी हालचाल करतात.

४. विद्युतक्षेत्र प्रचंड वेगाने दिशा बदलत असल्याने पाण्याचे रेणूही सारखी आपली दिशा क्षेत्राच्या अनुकूल बनवण्यासाठी उलटसुलट हालचाल करतात आणि या प्रक्रियेत फिरतात.

५. असे फिरणारे अनेक रेणू एकमेकांना घासतात/एकमेकांवर आपटतात. या घर्षणाने उष्णता निर्माण होते.

आज बाजारात असलेल्या मायक्रोवेव्ह भट्ट्यांत वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळे तापमान/मायक्रोवेव्हच्या शक्तीची वेगवेगळी टक्केवारी ठेवण्याची सोय असते. मूळ सूक्ष्मलहरींची वारंवारता मात्र त्यासाठी बदललीजात नाही. एकाच वारंवारतेच्या सूक्ष्मलहरी कमी/जास्त वेळ चालू बंद करून हा कमी अथवा जास्त तापमान ठेवण्याचा परिणाम साधला जातो.

मायक्रोवेव्ह भट्टीचे फायदे:

१. ठरवलेल्या शिजण्याच्या वेळेनंतर भट्टी आपोआप बंद होत असल्याने पदार्थ ठेवून विसरल्यासही आग इ. दुर्घटना घडत नाहीत, ज्या विस्तवावर पदार्थ विसरल्यास घडू शकतात.

२. पेट्रोलियम इंधनाची बचत

३. पदार्थ तळण्यापेक्षा भाजल्याने त्यात चरबीचे प्रमाण कमी.

मायक्रोवेव्हच्या काही त्रुटीही अनुभवांती आढळून आल्या:

१. उष्णनाचे (हिटींगचे) प्रमाण भट्टीच्या अंतर्भागात सर्वत्र समान प्रमाणात नाही. तसेच पदार्थ मायक्रोवेव्ह भट्टीच्या अगदी मध्यभागी ठेवल्यास तो सर्वत्र समान शिजत नाही कारण फिरणाऱ्या त्या बशीवर मध्यभागी ठेवल्याने तो फिरत नाही आणि काही भागांनाच जास्त उष्णता मिळते.

२. सूक्ष्मलहरी बर्फावर पाण्याइतक्या तीव्रतेने काम करत नाहीत, कारण बर्फाचे रेणू ठराविक रचनेत पक्के बांधलेले असल्याने ते सूक्ष्मलहरींनी हालचाल करत नाहीत. परीणामतः अत्यंत गोठलेले मांस/पदार्थ जिथे बर्फ साठलेला असेल त्या भागात लवकर शिजत नाही.

३. सुरक्षितता: मायक्रोवेव्ह भट्टीत तापलेले पाणी/द्रव बाहेरच्या भांड्याला स्पर्श केल्यास तितकेसे गरम लागत नाही पण आतून सूक्ष्म लहरींच्या उष्णतेने प्रचंड गरम झालेले असते. असे द्रव चुकून घाईने प्यायल्यास/स्पर्श केल्यास भाजण्याची शक्यता अधिक.

४. सुरक्षितता: अंडे, किंवा बंद डबा यांचा सूक्ष्मलहरींनी जास्त तापवल्यास स्फोट होऊ शकतो.

५. धातूचे भांडे/वर्ख/कपबश्यांची सोनेरी नक्षी सूक्ष्मलहरींच्या सानिध्यात प्रभावी वाहक म्हणून काम करतात व ठिणगी पडण्याची/काही विषारी वायू निर्माण होण्याची शक्यता असते.

६. तळणे ही क्रिया मायक्रोवेव्ह भट्टीत करता येत नाही.

७. भारतीय पदार्थ, ज्यात उकडणे, फोडणी, तळणे अशा बऱ्याच क्रिया अंतर्भूत असतात ते मायक्रोवेव्ह भट्टीने करायला जास्त वेळ लागतो.तरीही मायक्रोवेव्ह भट्टीची वाढती लोकप्रियता आणि पेट्रोलियम इंधनांचा भविष्यातील तुटवडा लक्षात घेता मायक्रोवेव्ह भट्टी गॅस इंधनाला मागे टाकण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

संदर्भ:
१.विकिपीडियावरील माहिती
२.एक्स्प्लेन दॅट स्टफ वरील माहिती
३.मायक्रोवेव्हचा इतिहास
४.कोलोराडोतील संकेतस्थळावरील माहिती

संत कबीर



संत कबीर

चींटी चावल ले चली,*
बीच में मिल गई दाल।
कहै कबीर दो ना मिलै,
इक ले डाल॥

अर्थात :
             मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है  देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.

तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'

     तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला.

माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात.

             साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच संपुष्टात येतो. तो मनाशी म्हणतो, 'इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो, तर काय बिघडलं असतं.'

            

     पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तुही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते (आणि ऐपतही नव्हती.)

आज असंख्य विकल्पांनी, वस्तुंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तुही भंगारात टाकू लागले आहेत.

भौतिक वस्तुंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे.

 देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं, यासाठी आहेत. नुसतं घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.

म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे समतोल तर टिकून राहतोच, माणसाचं समाधान आणि आनंदही त्यामुळे टिकावू बनतो. कबीरांच्या या दोह्यात असा मोठ्ठा अर्थ दडला आहे.

चिंता



कोणी लिहिलंय माहिती नाही, पण छान लिहिलंय.

               टेन्शन घ्यायचंच नाही...
आयुष्य बिनधास्त जगायचे... कुणाचे वाईट करायचे नाही... कुणाचे वाईट चिंतायचे नाही... कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही... फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं... काही कमी पडत नाही... आणि फरक तर अजिबात पडत नाही... कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही...  लोकांची विविध रूपे असतात... सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात... ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो...
 आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण?...

कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो... आपण त्याच्या विषयी तसेच इतरां विषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे... बोलण्यात स्पष्ट वक्ते पणा ठेवायचा...
  कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही... आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही...
फक्त स्वतः बरोबर दुसऱ्याचे हीत चिंतायचे... कुणाच्या पुढेपुढे करायचे नाही...

"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..." 
    
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन  आयुष्यातील चिंता घालवतात.

गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

गैरसमज...



गैरसमज...

स्वामी विवेकानंदांनी गैरसमज कसा निर्माण होतो हे एका कथेतून स्पष्ट केले आहे...

एका जंगलात राम-सावित्री नावाच एक जोडपं राहत असत,राम हा जंगलात जाऊन लाकूडे तोडायचा आणि ती जवळच्या शहरात जाऊन विकायचा...
काही दिवसांनी त्यांच्या घरात एक सुंदर बाळ जन्माला येत.
एक दिवस त्याला जंगलात एक निरागस आणि घाबरले मुंगूसाच पिल्लू दिसत जवळच कोणत्यातरी जंगली श्वापदाच्या हल्ल्यात त्याची आई मरून पडली होती.
राम त्या पिल्लाला घरी आणतो.
थोड्या दिवसांतच ते पिल्लू त्या घरात एखाद्या सदस्यां प्रमाणे रूळते...
एक दिवस राम नेहमीप्रमाणे जंगलात आपल्या कामासाठी न्याहारी करतो आणि  निघून जातो...
नंतर थोड्या वेळाने आपल्या बाळाला झोपवून  सावित्री  पाणी आणण्यासाठी निघून जाते.
घरात फक्त बाळ आणि ते माणसाळलेल मुंगूस...
काही वेळातच त्या घरात एक भला मोठा साप शिरला आणि तो त्या बाळाकडे चाल करू लागला...
मुंगूसाने चपळाईने सापावर झडप मारली आणि सुरु झाली लढाई...
साप पण बलाढ्य होता पण मुंगूसाने त्याच्यावर मात केली मुंगूसाचे तोंड आणि पूर्ण शरीर सापाच्या रक्ताने माखले होते...

आता मुंगूस दारात उभे राहून सावित्रीची वाट बघत होते...

तेवढ्यात सावित्री डोक्यावर हंडा घेऊन आली आणि बघते तर काय...???

मुंगूसाचे तोंड आणि पूर्ण शरीर रक्ताने माखले होते

सावित्रीच्या डोक्यात एकच विचारांच वादळ ऊटल की तीच्या बाळाचे लचके त्या मुंगूसाने तोडले आणि त्याला मारुन टाकले...

पण मुंगूस मात्र सावित्रीकडे खूप निरागसपणे बघत होते

मात्र त्याचवेळी सावित्रीने बाळाच्या नावाने एकच टाहो फोडला...
आणि

क्षणार्धात डोक्यावरील हांडा तीने त्या मुंगूसाच्या अंगावर फेकला

आणि....
घरात पळत सुटली पण घरात जाताच तीला चित्र वेगळंच दिसलं तीच बाळ अजूनही झोपलच होत.
आणि

शेजारीच तो भयानक साप रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला...

सावित्री भानावर आली आणि सर्व प्रकार तिच्या लक्षात आला तशी ती चपळाईने उठली आणि बाहेर आली पण मुंगूस बिचारे जागेवर  ठार झाले होते..

सावित्रीने पुन्हा एकदा टाहो फोडला पण यावेळी तीचे दोन्ही हात जोडलेले होते......

स्वामी विवेकानंद सांगतात जे दिसतय ते बघा...
पण त्याचाआधी जे दिसत नाही ते शोधायचा प्रयत्न करा,कारण प्रश्न हा जीवलग माणूस गमवण्याचा आहे...
कारण...
गैरसमज हे जवळच्या माणसाबद्दल होतो, आणि...तो गैरसमज वेळ निघून गेल्यावरच दुर हाेताे...!!

🎭 जबाबदारीची जाणीव असणारा कधीच हात वर करू शकत नाही!
आणि हात वर करणारा कधीच जबाबदारी सांभाळू शकत नाही....!
💐 💐
"तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे,,
जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे,,
करा तुम्ही चांगले कर्म 
सोबत तुमच्या तेच तर जाणार आहे,,
रडल्याने तर अश्रूसुध्दा परके होतात,,
हसल्याने परके सुध्दा आपले होतात,,
मला ती नाती आवडतात ज्यात
मी नाही तर आपण असतो.

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा