Pages

बुधवार, ३ एप्रिल, २०१९

"क्षमा".......!!!



"क्षमा".......!!!

पुण्याच्या आसपासचं गाव....कुटुंब ठिकठाक ...एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसुन..... साहजीकच सुनेवर सर्व भार .... आधी किरकोळ कुरबुर.... मग बाचाबाची.... त्यानंतर कडाक्याची भांडणं.... सुनेचं म्हणणं.... घरी बसुन ऐद्यासारखं खावु नका..... काम करुन हातभार लावा संसाराला ..... पण बाबा थकलेले..... शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं त्यांनी ठरवलं..... मुलानेही अडवलं नाही.....

आले पुण्यात....कुणी म्हातारा म्हणुन काम देईना  आणि भुक जगु देईना.... भिक  मागण्यावाचुन पर्याय उरला नाही....

बाहेरच मुलाला भेटुन, लाज टाकुन  बाबा विचारायचे, येवु का रे बाळा घरी रहायला ?

"बाळ" म्हणायचे, मला काही त्रास नाही बाबा, पण "हिला" विचारुन सांगतो.....

पण ....या बाबा घरी, असा निरोप बाळाकडुन कधी आलाच नाही.....!

आता बाबा अट्टल भिकारी झाले.....

झाले कि त्यांना केलं गेलं..... ?

अशीच भिक मागताना एके दिवशी माझी न् त्यांची भेट झाली....

बोलताना बाबा म्हणायचे, डाॕक्टर म्हातारपण म्हणजे नाजुक वेल हो.... वेलीवरच्या सुंदर फुलांकडे सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगाखांद्यावर खेळवणा-या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं.... वेल बघा नेहमी झुकलेली आणि वाकलेलीच असते.... कुणाचाच आधार नसतो म्हणुन.... तसंच हे म्हातारपण ..... झुकलेलं आणि वाकलेलं.... निष्प्राण वेलीसारखं.... !

बाबांची वाक्य ऐकुन काटा यायचा अंगावर माझ्याही...!

नाव पत्ता पिनकोडसहीत टाकुन पत्र पत्त्यावर पोचत नाहीत डाॕक्टर, त्याला पोस्टाचं तिकिट लावलं तरच ते पत्त्यावर पोचतं....नाहितर वर्षानुवर्षे पडुन राहतं धुळ खात पोस्टातच.... तसंच आमचं आयुष्य..! नाव पत्ता सग्गळं बरोबर पण देव आमच्यावर तिकिट लावायला विसरला, म्हणुन आम्ही इथं पडलेले....

असं बोलुन ते हसायला लागतात....

त्यांचं ते कळवळणारं हसु आपल्यालाच  पिळ पाडुन जातं.....

मी म्हणायचो, बाबा हसताय तुम्ही... पण हे हसु खोटं आहे तुमचं... तर म्हणायचे... आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं.... हसण्याचं नाटकच केलं ... आता या वयात तरी खरं हसु कुठुन उसनं आणु....???

मी निरुत्तर.... !

वाळलेल्या सुकलेल्या पालापाचोळ्यासारखं  आयुष्य झालंय... कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करतं.... टोपलीत ठेवतं.... वाटतं चला, कुणाला तरी आपली दया आली.... नंतर कळतं कि सुकलेले आहोत म्हणुन जाळण्यासाठी,  शेकोटी पेटवण्यासाठी आपल्याला टोपलीत ठेवलंय... सुकलेल्या पालापाचोळ्याचा नाहीतरी दुसरा वापर काय होणार म्हणा....?

बाबांच बोलणं ऐकुन मीच आतुन तुटुन जायचो....

काहीतरी काम करा बाबा , असं सांगुन मी त्यांना विनवायचो, पण आता उमेद गेली होती.... बाबा कामाला तयार नव्हते !

म्हणायचे , आज आहे मातीवर, उद्या मातीखाली जायचं...किती दिवस राहिलेत आता ? आज कुणी विचारत नाही ; पण उद्या मेल्यावर हेच लोक अंत्यदर्शनाला येवुन पाया पडतील.... श्राद्धाला जेवताना चांगला होता हो बिचारा असं म्हणतील...

नाटक असतं हो सगळं आयुष्यच .... प्रत्येकजण आपापली भुमिका पार पाडत असतं इतकंच.... !

इतकं असुनही एके दिवशी मी बाबांना कामाला तयार केलंच.... बॕट-या विकण्यासाठी त्यांना मदत केली.... शे पाचशे रुपये रोज कमावतात बाबा आता... भिक  मागत नाहीत.

मागच्या महिन्यात मला मिळालेला पुरस्कार याच बाबांना मी समर्पित करुन स्टेजवर यांचा सत्कारही करायला लावला होता.... !

आज हे आठवायचं कारण म्हणजे, आज मला हे बॕट-या विकताना रस्त्यावर भेटले.... मला जरा बाजुला घेवुन गेले.... म्हणाले, एक गंमत सांगायचीय डाॕक्टर .....

सुनेला कळलंय माझ्या, मी दहा पंधरा हजार कमावतो.... तर मला शोधत माझा मुलगा आला होता पुण्यात आणि म्हणाला, "हिने" तुम्हाला घरी बोलवलंय, झालं गेलं जावु दे म्हणते.... पाया पडुन माफी मागायला तयार आहे... बाबा, मला पण तुमच्या धंद्यात घ्या, एकत्र मिळुन करु."

मी स्तिमित झालो, तीन वर्षं आपल्या बापाला / सास-याला  भिक मागायला लावली.... आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली....?

डाॕक्टर काय करु सल्ला द्या...

साहजीकच मी बोललो, ज्यांनी तुमच्यावर हि वेळ आणली त्यांना थारा देण्याचा प्रश्नच नाही, त्यांना तुम्ही नाही पैसा हवाय तुमचा, आता त्यांना जवळ नका करु..... !

बाबा म्हणाले, डाॕक्टर मला कळतंय हे सगळं, पण एक सांगु ? आज मी माझ्या पोराला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसंल भिक मागताना.... चालेल तुम्हाला ?

मी माझ्या माघारी त्याला भिकारी बनवुन जाईन का ?अहो चुकतात तीच पोरं असतात..... माफ करतो तोच "बाप" असतो.....

अहो,  लहानपणापासुन प्रेम म्हणजे काय; माया म्हणजे काय , भक्ती म्हणजे काय, दया म्हणजे काय हे शिकवत आलो..... त्यातुन तो किती शिकला माहिती नाही.... बहुतेक नाहिच शिकला, नाहितर ही वेळ नसती आली माझ्यावर...असो !

पण आता आयुष्याच्या शेवटच्या  वळणावर तरी "क्षमा" म्हणजे काय हे मला त्याला शिकवु द्या डाॕक्टर ....

आता जर तो हे शिकला नाही तर तो कधीच शिकणार नाही आणि कधीच कोणाला "क्षमा" करणार नाही.....

काही नाही काही नाही तर जाता जाता एवढं तरी शिकवु द्या मला डाॕक्टर ...

असं म्हणाले ते, आणि हसत हसत चालायला लागले आणि मी बसलो मागे डोळ्यातलं पाणी आवरण्याची कसरत करत....

ध्येय




आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते.

अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो.
एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात.

खरतरं हीच वेळ असते उठायची, आणि आयुष्यासोबत स्पर्धा करायची. एक वादळ होऊन थैमान घालायची. कष्ट करायची. हव्या असलेल्या एका ध्येयासाठी कित्तेक गोष्टींचा त्याग करायची..!
एक अशी वेळ,
ज्या ज्या लोकांकडुन तुम्हाला त्रास होत आला आणि होतोय त्या लोकांची परतभेड करण्यासाठी कधीच त्यांच्यासारखं न वागता "तुझा सुड घेण्याइतकी तुझी पात्रता (लायकी) नाही" अस म्हणुन त्यांना सोडुन द्यायची.

अशा वेळी ह्याच्या-त्याच्या सांगण्यावरून चुकीचे चार निर्णय घेण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने एकच योग्य निर्णय घ्यावा.

एक वाट धरावी, एक ध्येय धरावं आणि भावनांच्या बाजाराला लाथ मारून एकट चालावं.नव्या माणसांना भेटत राहावं. त्यांच्याकडुन जे चांगलं ते घ्यावं. भावनांमधे न अडकता पुढे जात राहावं. आपली कदर कोणाला आहे-नाही ह्याच्यापेक्षाही स्वतःची स्वतंत्र सिद्धता स्वतःलाच दाखवण्यात आयुष्याचं सार्थक करावं.

ज्यांना तुमचं रडणं ऐकु नाही गेलं त्यांचे कान तुमच्या चर्चेने बहिरे होतील. ज्यांना तुमच्या वेदना दिसल्या नाहीत त्यांचे डोळे तुमच्या तेजाने आंधळे होतील. आणि तेव्हा तुम्हाला त्यांची किंचितही फिकीर नसेलं.

त्यामुळे सुडबुद्धीने स्वतःच अस्तित्व खराब करण्यापेक्षा जिथे आपल्या अस्तित्वाला जाण नाही तिथे ते ठेऊच नका. आणि जिथे आपलं अस्तित्व नाही तिथे ते अस निर्माण करा की तुम्ही थांबाल तेव्हा लोकांची आयुष्य थांबतील..!

तुमच्या वेदनांमधे इतकी शांतता ठेवा की तुमच्या आनंदात सगळीकडे राडा होईल

आयुष्याचं दही



शुभ्र दही पाहिलंकी तोंडाला पाणी सुटतं,
खायचा मोह होतो. पण चमचा बुडवला, की दही मोडणार,
थोड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं!

पण म्हणून मी ते मोडलंच नाही तर ?
At the end of the day,
ते आंबट होऊन जाईल.

अजून काही दिवस तसंच ठेवलं, तर खराब होऊन जाईल.
मग उपयोग काय त्या perfectly set झालेल्या दह्याचा ?

मनात विचार आला, आयुष्याचंही असंच असतं नाही का ?

दह्यासारखं ‘set’ झालेलं आयुष्य नक्कीच आवडेल !
पण ते आयुष्य तसंच set राहिलं तर त्यातली गोडी निघून जाईल.
सपक होईल.. वायाच जाणार ते.

त्यापेक्षा रोजच्या रोज, आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं.
आयुष्याची गोडी चाखायला तर हवीच! आयुष्य जगायला तर हवंच!

दिवसभर ते दही वेगवेगळ्या form मध्ये अनुभवायचं!
कधी साखर घालून, तर कधी मीठ,
कधी कोशिंबिरीत, तर कधी बुंदीत,
तर कधी कोणत्या ग्रेव्हीत!
कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून!
मला ना, ह्या ताकाचा हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.

अर्थात, कुठचाही अतिरेक झाला तर आयुष्य पांचटच होतं!
हरेक दिवसाच्या recipe ची नजाकत वाढवता आली पाहिजे.

मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा पूर्ण दही संपवायच्या आधी,
रोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं!
उद्याचं दही लावायला!

मग रात्री झोपण्यापूर्वी, दिवसभरात जगलेल्या lukewarm क्षणांनी ,
परत नव्यानं दही विरजायचं.

मला ठाऊक आहे रोज ही भट्टी जमेलच असं नाही.
पण नासलंच समजा कधी, कडवट झालंच समजा कधी,
तर नाउमेद न होता, नव्यानं सुरुवात करायची.

मग त्याकरता दुसर्‍याकडून विरजण मागायची वेळ आली …
तरी त्यात कमीपणा नसतो.

पण ‘दही मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं!
आयुष्य कसं ‘चवीनं जगायचं!!!

धन्यवाद!

सडेतोड




सडेतोड
  त्याचा फोन आता जवळपास सहाव्यांदा वाजत होता म्हणून त्याच्या रूममध्ये जाऊन तिने उचलला, मिनिटभर बोलत होती, तेवढ्यात तो बाथरूममधून बाहेर आला, तेव्हा त्याच्याकडे फोन देत ती म्हणाली,

- इथल्या आर्ट गॅलरीमधून कॉल आहे.
 
त्याने फोन हातात घेतला, बोलायला-ऐकायला सुरुवात केली आणि क्षणाक्षणाला त्याचा चेहरा उजळत गेला. फोन ठेऊन त्याने तिच्याकडे बघितलं तसं खुलासा करत ती म्हणाली,

- परवा इथे खाली जाहिरात दिसली, मी सगळी चौकशी करून तुझं नाव नोंदवलं. फक्त जागा नेमकी कोणती मिळेल याची धाकधूक होती, पण त्यांचा फोन आला म्हणजे मी ठरवलेलीच देत आहेत. तुझं पेंटिंग झालंय ना पूर्ण आता, त्याच्यासाठी म्हणून बोलून आले आहे.

- तू बघितलं आहेस ते पेंटिंग?

- नाही, पण मला खात्री आहे की प्रदर्शनात मांडण्याइतकं खास, सुंदर नक्कीच आहे.

- हा माझ्याबद्दलचा विश्वास आहे की तुझा फाजील आत्मविश्वास? पण असो, मला एक संधी उपलब्ध करून दिलीस त्याबद्दल - थँक्स अ लॉट.

  म्हणत त्याने पटापट आवराआवरी केली आणि आवश्यक त्या गोष्टी घेत पेंटिंग आठवणीने सोबत घेतलं आणि लगबगीने निघून गेला. तो गेला त्या दिशेने ती मात्र अचंबित होऊन अचल उभी राहिली.
------------------------------------------------------------------------------

  आजची सकाळ तिच्यासाठी वेगळीच उगवली होती. आदल्या संध्याकाळपासूनच खरंतर गोष्टी स्वप्नवत घडत होत्या. कोणत्यातरी चॅनेलवर चालू असलेला रोमँटिक मूवी एक वेगळी, तरल आठवणी निर्माण करणारी वेळ घेऊन आली होती.
  मुव्ही बघताना अगदी नकळत, हळुवार वातावरण निर्मिती झाली. मनाचा संवाद झाला की नाही, ते तिच्या लक्षात आलं नाही. मात्र, डोळ्यांचा डोळ्यांशी खूपच भावुक संवाद झाला आणि मुव्ही संपल्यानंतर झालेला एकूण संवाद आणि देहबोलीतून त्यांचा वेगळ्याच जगात प्रवेश झाला आणि त्यातील सुखाचे क्षण दोघांनी सोबतीने जगले-वेचले.
  आजची सकाळ काही वेगळी आणि खासच उगवली!
~~~~~~~~~~~~

  डायरीचे शेवटचे पान वाचून त्याने पुन्हा ती बॅगेत ठेवून दिली. नकळत एक नापसंतीची आठी कपाळावर आणि स्पष्टपणाची एक लकेर त्याच्या मनात उठून गेली. मग मात्र त्याने संपूर्ण लक्ष प्रदर्शनात झोकून देऊन तिकडेच लावलं. इतर चित्रकारांच्या कलाकृतींचा रसपूर्ण आस्वाद घेण्यात तो मग्न झाला.
------------------------------------------------------------------------------

  'मला वाटलं होतं, त्याचं एवढं मोठं सुंदर स्वप्न साकारण्यात मी मदत केली आहे तर, पूर्ण आदरासहीत, माझे वेगळ्या पद्धतीने आभार मानत तो मला त्याच्यासोबत प्रदर्शनात घेऊन जाईल. आभार मानताना माझाही गौरवपूर्ण उल्लेख करेल.
  काल संध्याकाळपासून ते आता मगाशी तो जाईपर्यंत, मनाला गुदगुल्या होतील, भविष्य सुंदर-सुरक्षित असेल असं स्वप्नरंजन चालू होतं माझं. पण त्याच्या एकूण वागण्याचा काही आदमासच लावता येत नाहीये.
  आता मात्र कोणत्याही गंभीर प्रसंगाला सामोरं जावं लागू नये!' तिचा मनातल्या मनात चालणारा संवाद शेवटी नकारात्मक विचाराशी येऊन थांबला.
------------------------------------------------------------------------------

- काल आपल्या दोघांमध्ये जो काही संवाद आणि त्यापुढची जी काही घटना घडली ती सहसंमतीने घडली, असं माझं मत आहे. तुझं काय म्हणणं आहे यावर?

  परतल्या-परतल्या ती समोर दिसताच त्याने प्रश्न केला. प्रश्न स्पष्ट असल्याने आणि आठवणीही ताज्या असल्याने तिनेही लगेच उत्तर दिलं....

- होय, माझंही तेच मत आहे.

- मग सुंदर-सुरक्षित भविष्य आणि स्वप्नरंजन, या सगळ्या गोष्टी इथे निरर्थक आहेत.

- अं... म्हणजे..... हो..... खरंतर.... होय निरर्थकच आहे.

- अडखळत उत्तर का येतंय तुझं? तू ठाम नाहीस का? आणि तू ठाम नसशील तर सांगतो, काल जे काही घडलं ते तू पुढाकार घेऊन साकारलं, असं म्हणतो मी आता. याला नकार आहे??

  त्याने तीव्रपणे विचारलं आणि ती दचकली.

- होय, मी पुढाकार घेतला.

-  गुड, आपल्या विचार-विकार-कृतीबद्दल माणसाने सडेतोड असलंच पाहिजे. तर मग तुझ्या-माझ्यामध्ये कोणतंही भावनिक किंवा खरंतर कोणतंच नातं निर्माण होऊच शकत नाही, हा माहिती आहे ना तुला. सो, स्वप्नरंजन वगैरे नकोच!

  आपला सडेतोड निर्णय देत तो तिथून निघून गेला.

©दीपाली निरंजन

मनाचा संयम


 मनाचा संयम
-----------------------
एका नगरात एक विणकर राहत होता. अत्यंत शांत, विनम्र आणि प्रामाणिक माणूस अशी त्याची ख्याती होती. त्याला क्रोध म्हणून कधी येत नसे,
तो नेहमी हसतमुख बसलेला दिसे. एकदा काही टवाळखोर पोरांनी त्या विणकराची छेड काढायची ठरवली. त्याला पिसाळून सोडल्यावर तरी तो रागावतो की नाही हे त्यांना पहायचे होते.
त्या टवाळ पोरांमध्ये एक बलाढ्य धनिकाघरचा लक्ष्मीपुत्र होता. तो पुढे झाला, तिथे ठेवलेली साडी हातात घेत त्याने प्रसन्न मुद्रेतील विणकरास विचारले की, 'ही साडी केव्हढयाला द्याल ?' विणकर उत्तरला - '
अवघे दहा रुपये !' त्याचं उत्तर ऐकताच त्याला डिवचण्याच्या हेतूने त्या घमेंडी मुलाने त्या साडीचे दोन तुकडे केले. त्यातला एक तुकडा हातात धरला आणि पुन्हा प्रश्न केला -
 'माझ्याकडे तितके पैसे नाहीत, आता त्यातले निम्मे वस्त्र माझ्या हातात आहे. याची किंमत किती ?'
अगदी शांत भावात विणकर बोलला - 'फक्त पाच रुपये !' त्या मुलाने त्याचेही पुन्हा दोन तुकडे केले. आणि पुन्हा प्रश्न केला की, 'आता याची किंमत किती ?' प्रसन्न वदनी विणकर म्हणाला - 'अडीच रुपये !'
 तो पोरगा त्या साडीचे तुकडयावर तुकडे करत गेला आणि त्या विणकराला त्यांची किंमत विचारत गेला.
 विणकर देखील त्याच्या प्रत्येक प्रश्नाला न चिडता शांत चित्ताने उत्तर देत गेला. तुकडे करून कंटाळलेला तो पोरगा अखेर म्हणाला -
'आता या साडीचे इतके तुकडे झालेत की याचा मला काही उपयोग नाही. सबब ही साडी मी घेत नाही.' यावर विणकराने मंद स्मितहास्य केले. तो म्हणाला - 'बाळा हे तुकडे आता जसे तुझ्या कामाचे राहिले नाहीत तसेच ते माझ्या उपयोगाचे उरले नाहीत. पण असू देत. तू जाऊ शकतोस...'
त्या विणकराची ती कमालीची शांत वृत्ती, प्रसन्न चेहरा आणि क्षमाशीलता त्या मुलाच्या ध्यानात आली व तो ओशाळून गेला. तो खिशात हात घालत म्हणाला - 'महोदय, मी आपल्या साडीचे नुकसान केलेलं आहे. या साडीची किंमत मी अदा करतो.
 बोला याचे काय दाम होतात ?' विणकर म्हणाला - 'अरे भल्या माणसा, तू तर माझी साडी घेतली नाहीस... मग मी तुझे पैसे कसे काय घेऊ शकतो ?
' आता त्या मुलाचा आपल्या पैशाचा अहंभाव जागृत झाला मुलगा म्हणाला, 'महोदय तुम्ही नुसती रक्कम सांगा...
मी ताबडतोब अदा करतो..
ह्या अशा साड्यांची असून असून किती किंमत असणार आहे ? तिची जी काही किंमत असेल ती मी सहज देईन, त्याने मला फरक पडणार नाही. कारण माझ्याकडे खूप पैसे आहेत. तुम्हाला मात्र एका साडीच्या नुकसानीने फरक पडू शकतो कारण तुम्ही गरीब आहात. शिवाय तुमचे नुकसान मी केलेलं असल्याने त्याचा तोटा भरून देण्याची जबाबदारीही माझीच आहे. तितकं तरी मला कळतं बरं का !'
त्या मुलाचं पैशाची मिजास दाखवणारं वक्तव्य ऐकूनही विणकर शांत राहिला. काही क्षणात तो उत्तरला -
"हे बघ बाळा, तू हे नुकसान कधीच भरून देऊ शकणार नाहीस. तू नुसती कल्पना करून पहा की,
एका शेतकऱ्याला मशागतीपासून ते कपाशीचं बीज रोवण्यापर्यंत कपाशी मोठी होईपर्यंत तिची काढणी होईपर्यंत किती श्रम घ्यावे लागले असतील. त्याने काढलेला कापूस व्यापाऱ्याने मेहनतीने विकला असेल. मग माझ्या शिष्याने अत्यंत कष्टपूर्वक त्यातून सुत कातले. मग मी त्याला रंग दिले, विणले, नवे रूप दिले . मग कुठे ही साडी तयार झाली. इतक्या लोकांची ही एव्हढी मोठी मेहनत आता वाया गेली आहे कारण कोणी हे वस्त्र परिधान केलं असतं, त्यातून अंग झाकलं असतं तर त्या कारागिरीचा खरा लाभ झाला असता. आता ते अशक्य आहे कारण तू तर त्याचे तुकडे तुकडे केले आहेत. हा तोटा तू भरून देऊ शकत नाहीस बाळा.
' मंद स्वरात बोलणाऱ्या त्या विणकराच्या आवाजात क्रोध नव्हता की आक्रोशही नव्हता. दया आणि सौम्यतेने भारलेलं ते एक समुपदेशनच होतं जणू ! त्या मुलाला स्वतःची अत्यंत लाज वाटली.
 आपण या महात्म्याला विनाकारण त्रास दिला, त्याचे वस्त्र फाडले, अनाठायी त्याचे नुकसान केले. याचे त्याला वाईट वाटू लागले.
 पुढच्याच क्षणाला त्याने त्या विणकराच्या चरणांवर आपलं मस्तक टेकवलं आणि म्हणाला, 'हे महात्मा मला माफ करा. मी हे जाणीवपूर्वक केलं याची मला अधिक शरम वाटत्ये आहे. मी आपला अपराधी आहे. आपण मला दंड द्या वा क्षमा करा.' पुढे होत विणकराने त्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला
 आणि म्हणाला, 'हे बघ मुला. तू दिलेले पैसे मी घेतले असते तर माझे काम भागले असते. पण त्यामुळे भविष्यात तुझ्या आयुष्याची अवस्था या साडीसारखीच झाली असती. ते खूप देखणं असूनही त्याचा कोणालाही तिळमात्र उपयोग झाला नसता. एक साडी वाया गेली तर मी त्याजागी दुसरे वस्त्र बनवेन.
पण अहंकाराच्या दुर्गुणामुळे तुझे आयुष्य एकदा धुळीस मिळाले की ते पुन्हा नव्याने कसे उभं करणार ? तुझा पश्चात्ताप या साडीच्या किंमतीहून अधिक मौल्यवान आहे.'
...... आपल्या सर्वांच्या आयुष्यात आता थोडंफार सुख आलंय, काहीशी समृद्धी आलीय, खिशात बऱ्यापैकी पैसा खूळखूळतोय, आपल्या घरीही आपण घरी पैसा अडका बाळगून आहोत. थोडंसं स्थैर्य आपल्या सर्वांच्या आयुष
्यात आलेलं आहे. आपल्यातल्या काहींना त्याच्या 'ग' ची बाधा ही झालीय.
ही बाधा कुणाच्या कुठल्या कृतीतून कधी नी कशी झळकेल हे आजकाल सांगता येत नाही. आजकाल जो तो कसल्या न कसल्या तोऱ्यात आहे. अनेकांना कसली न कसली मिजास आहे, घमेंड आहे, गर्व आहे, अहंकार आहे, वृथा स्वाभिमान आहे. त्यामुळे इगोची निर्मिती मोठया प्रमाणात होते आहे. अशा सर्व सज्जनांना शीतल, सौम्य शब्दात अन कोमल स्वरात समजावून सांगेल असा तो विणकर आताच्या जगात नाहीये.

  दृष्टांतातले विणकर म्हणजे संत कबीरदास होत हे वेगळे सांगणे नको...
----------------------------------------------

"विषामृत"


 "विषामृत"

हा खेळ आम्ही खेळायचो ! ज्याच्या वर राज्य आहे तो इतरांना हात लावून 'विष'म्हणायचा आणि मग विष बाधा झालेला एका जागी बसून घ्यायचा ,इतर मग राज्य असलेल्या मुलाला चुकवून त्याला हात लावून ' अमृत ' म्हणायचे आणि तो परत खेळात पुनर्जन्म झाल्या मुळे पाळायला लागायचा 😊
    पालकांवर राज्य आहे आता ,😊 आपल्या मुलाला ते विष देतात की अमृत आपण पाहुयात 😊
 " आई मी जाणार नाही स्कूल ला !"
  " सोनू ,आपण येतांना कॅडबरी खाऊ !  आता तरी जा !"
   ------- विष !!!

" मला तो बोर्ड game घेऊन दे ना आई !"
" देईन ना बेटा ,पण आधी प्रॉमिस कर तू रोज सायकल चालवणार ग्राउंड वर !"
   ---- अमृत !!!
 " बाबा ,रिमोट द्या ना मला कार्टून पहायचे आहे !"
 " अरे आयडिया आली मला ,चल तुझ्या मित्रांना घेऊन मी पण क्रिकेट खेळतो ! "
    --- अमृत !!
" आई आज आपण पिझ्झा ऑर्डर करूयात का ?"
" हो ,चालेल ना ,त्या बरोबर कॉल्डड्रिंक पण ऑर्डर करू , जर पचन होईल मग !"
----विष
 " आजी ,मला भूक लागलीय ,पैसे दे ना ,मी कुरकुरे आणतो !"
 "हे घे ! माझा लडोबा ग !"
---- विष
  
     ही काही उदाहरणे आहेत ,तुम्ही अजून आठवून पहा !😊 मी विष म्हणते कारण त्यामुळे मुलाच्या वाढी वर डायरेक्ट परिणाम होतो , ढोबळ मानाने लक्ष्यात घ्या .....
1 चॉकोलेट 1 चपाती ची भूक कमी करते , एक मोठी कॅडबरी पूर्ण दिवसाची भूक कमी करते , ह्या empty calaries असतात ,तात्पुरते energy देतात ,पण वाढीच्या दृष्टीने शून्य उपयोग !!
  गोड खावे वाटले तर मनुके , गूळ , खजूर द्या , ड्राय फ्रुट्स द्या , खारीक द्या , तिखट वाटले खावेसे तर घरी भरपूर शेंगदाणे व खोबरे टाकलेला मस्त चिवडा द्या , अजून खूप रेसिपीज आहेत त्या you tube वर पहा आणि बनवून ठेवा ,पण शक्यतो बिस्किट्स ,चॉकलेट्स चिप्स आणि तत्सम इतर फास्ट फूड देऊ नका !
  घरचे ताजे शिजवलेले अन्न --- अमृत
  बाहेरचे फास्ट फूड ---- विष !
😊😊😊��😊😊😊
 
 राज्य तुमच्यावर आहे पालकांनो , तुम्ही ठरवा काय द्यायचे ते 👍👍

पेहराव



 व्यक्तिमत्व विकास,पेहराव आणि अंतर्मन ....
(लेखिका: सुषमा सांगळे-वनवे यांच्या पुस्तकातील हा एक उतारा) (हा उतारा जसाच्या तसा शेअर करण्यात यावा अनेक वृत्तपत्रातूनही याचे प्रकाशन झाले आहे..)
आपले फर्स्ट इम्प्रेशन पाडणारा महत्वाचा कोणता घटक असेल तर अर्थातच तो म्हणजे आपला पेहराव.
पेहराव म्हणजेच आपण जे कपडे घालतो ते.
हाच पेहराव आपले व्यक्तिमत्व घडवतो. कसे ते या लेखातून पाहुयात..
      लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कपड्याची आवड असते.लहानपणी साहजिकच कपड्याबद्दल कांही समजत नसते फक्त आमक्याला असा ड्रेस आहे मला पण तसाच घे ना एवढाच हट्ट आपण आई बाबांकडे करत असतो.हळूहळू मोठे झाल्यावर टी. व्ही.सिरीयल मधील कपडे पाहून मित्र मैत्रीणींचे कपडे पाहून आपण खरेदी करू लागतो.हीच सवय मोठे झाल्यावर हि कायम राहते.यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारचे कपडे शोभून दिसतात हे पाहिलेच जात नाही.मग ते कपडे कितीही महागडे घेतले तरी त्याचा उपयोग होत नाही.
         आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मग कशा प्रकारचे कपडे घ्यावेत? ते हि सांगते जर आपण रंगाने गोरे असू तर डार्क रंगाचे कपडे नक्कीच खुलून दिसतात व रंग सावळा असेल तर फिकट रंगाची कोणतीही शेड उठावदार दिसते सहसा कपडे फ्रेश कलरचे निवडावेत उदा.स्काय ब्लू कलर,फिकट गुलाबी असे कलर कोणत्याही व्यक्तीला छानच दिसतात.लायनिंगचे कपडे शक्यतो उंच व्यक्तींनी घालू नयेत.त्यामुळे त्या अधिक उंच दिसतात तर असे कपडे कमी उंचीच्या व्यक्तींना शोभून दिसतात.तसेच साड्या खरेदी करतानाही साडी वर मोठ्या फुलांची डिझाइन असेल तर त्याने पोक्तपणाचा लूक येतो.त्याऐवजी प्लेन साडीत नाजूक वाटते प्लेन साड्या कोणत्याही वयोगटातील महिलांना उठून दिसतात.बारीक महिलांनी शक्यतो फुलणाऱ्या स्टार्च च्या साड्या निवडाव्यात त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व सुंदर दिसते.
      थोडक्यात सांगायचे तर प्रत्येक व्यक्ती हि वेगळी असते त्यामुळे त्याला जे छान दिसते ते मला हि छान दिसेल..या भ्रमात राहू नये .स्वतःला जे छान दिसतात असेच कपडे परिधान करावेत.
         आपले अंतर्मन व पेहराव यांचा खूप जवळचा संबंध आहे.आपल्या अंतर्मनाला सारखे वाटत असते कोणीतरी छान म्हणावे जर आपण आपल्या रंगाला शोभतील असे कपडे घातले तर नक्कीच आपण छान दिसू लागतो साहजिकच कळत नकळत आपल्याला आपली मैत्रीण अथवा घरचे तू आज छान दिसतेस असा रिमार्क मारतात.व आपले मन प्रसन्न होते ज्यावेळी आपले मन प्रसन्न आनंदी असते त्यावेळी आपली कार्यक्षमता व उत्साह वाढलेला असतो ज्यावेळेस आपला उत्साह वाढतो तेंव्हा आपल्याकडून उत्तम प्रकारचे कार्य घडते.म्हणूनच बऱ्याच वेळा मोठमोठ्या कंपनीत कपड्यांकडे विशेष लक्ष दिले जाते.
       बऱ्याच वेळा आपण एखाद्या व्यक्तीला काय तो बावळटच वाटतो किंवा किती अपटुडेट असते ती असेही एखाद्याला कळत नकळत लेबल लावतो म्हणजेच आपला पेहराव आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देत असतो.
      मी आता थोडेसे 30-40 वयाच्या महिलांबाबत बोलते या वयातील महिलांना सहसा उत्साह आहे असे जाणवत नाही कारण याचे हेच असते. बऱ्याच वेळा त्या सहज बोलून जातात,"जाऊ दे आता काय राहिले आहे ?,झाले ना सर्व". नेमक्या याच गोष्टीमुळे त्या स्वतः कडे लक्ष देत नाहीत व चॉईस नीट करत नाहीत परिणामी त्यांच्यातील उत्साह अधिक अधिक कमी होत जातो व त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होतो. मनाला एक मर्गळ आल्यासारखे उगीच वाटू लागते.या उलट आपल्याला शोभेल असा पेहराव त्याला साजेशी वेशभूषा ,केशभूषा केल्यास नक्कीच मनात एक उत्साह भरतो व साहजिकच घरातले हि म्हणून जातात तू एवढे काम करूनही थकत कशी नाहीस,परिणामी आपल्या कुटुंबातील वातावरण आनंदी व प्रसन्न राहण्यास मदत होते.
        लग्न प्रसंगी,सणावाराला नवनवीन कपडे का घालण्यात येतात ?कारण त्यामुळे आपले मन प्रफुल्लित व उत्साहवर्धक होते.त्यामुळे आपल्या मनाची स्थिती चांगली राहते.साहजिकच घरातील वातावरण प्रसन्न होते.मुलगी बघायला जाताना किंवा मुलगी दाखवतानाही हि त्यांच्या पेहरावाकडे विशेष लक्ष दिले जाते.तसेच महत्वाचे म्हणजे नोकरीच्या मुलाखती वेळी सुद्धा आपण पेहरावाचा बारीक विचार करतो.अशापध्द्तीने जीवनातील अत्यंत महत्वाच्या प्रसंगी पेहरावाकडे लक्ष दिलेच जाते.अगदी अंत्ययात्रेसमयी सुद्धा पेहराव पाहिलाच जातो त्यावेळी सुद्धा प्रेताला कफन म्हणून पांढऱ्या कपड्याची निवड केली जाते..
     थोडक्यात सांगायचे तर जीवनाच्या अत्यंत महत्वाच्या प्रसंगापासून ते मृत्यू नंतर हि हा पेहराव आपली साथ सोडत नाही मग अशा महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालेल का?
    मग द्याल ना लक्ष पेहरावाकडे...
लेखिका -सुषमा सांगळे-वनवे
उच्चश्रेणी मुख्याध्यापिका,साहित्यिका सिंधुदुर्ग,देवगड
मो.नं.9420312651

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा