Pages

गुरुवार, २८ मार्च, २०१९

पार्टी


पार्टी सुरु होती.
धांगडधिंगा, गप्पा, आवाज, गाणी  असलं बरंच काही चाललं होतं.
मधूनच कोणालातरी नाचण्याची लहर आली.
आणि पाहता-पाहता सगळेजण सामील झाले. फक्त एक सोडून.

तो तसाही शांत-शांत असायचा.
हुशार होता, कुणाशी फारसं बोलायचा नाही.

"अरे चल ना, मजा येते नाचायला.." ती म्हणाली.
"मला नाच येत नाही, force करू नकोस", तो भीती वाटावी एवढ्या ठाम आवाजात बोलला.

सगळे पार्टीत मश्गुल असताना तो केव्हातरी तिथून निघाला, कोणालाही न सांगता.
घरी येताना, त्याच्या डोक्यात विचार चालले होते, 'काय ते फिदीफिदी हसतात, फालतू जोक्स मारतात आणि नाचतात. मला नाही आवडत, it's of no use...'

तो असं म्हणत गेला, ज्याने त्याच्याशिवाय कुणालाही फरक पडला नाही.
तो तुटत गेला, इतरांपासून.
एकटा होत गेला.
पुस्तक, लेखन ह्यांत रमत गेला. व्यासंग वाढवत गेला.  पण कुणालाही easily reachable तो नव्हता म्हणून ती मैत्री, जुनी नाती, sharing आणि मजा मात्र हरवत गेली.

कधीकधी त्याला मित्र आठवतात, जुने दिवस आठवतात आणि आता तसं नाही म्हणून तो हळहळतोही..
पण मित्रांच्यात गेल्यावर हे जाणवत राहतं कि आपण त्यांच्यापासून तुटलोय..

असे अनेकजण असतात. लोक येणार, मस्ती होणार म्हटलं कि ह्यांच्या कपाळावर रेषा जमू लागतात.
खूप कमी जणांशी त्यांचं जमतं. मग ते कामात झोकून देतात, चिडचिडे होतात, प्रत्येक गोष्टीला नावं ठेऊ लागतात. त्यांना काहीतरी सिद्ध करायचं असतं. काय, हे बहुदा. त्यांचं त्यांना सुद्धा कळलेलं नसतं.  

का कुणास ठाऊक, पण असं वाटतं कि त्यांनी त्यांच्याच भोवती मोठ्या-मोठ्या भिंती बांधून घेतल्या आहेत...
त्याच्या आत त्यांच्याशिवाय कुणालाच प्रवेश नाही.
त्यांना लोक नको असतात असं नाही; पण मित्र-नातेवाईक सगळे एका अंतरावर.
दु:खाने कोसळणं नाही तसं खूप आनंदून जाणं आणि खळखळून हसणंपण नाही...

अशा लोकांच्या बाबतीत वाटत राहतं, काय हरकत आहे, एक दिवस वय सोडून वागायला?
आपल्या भिंतीना एक खिडकी करून बाहेर पाहायला?
सगळे नसतात व्यासंगी, तुमच्याएवढे...
हुशारही नसतात... perfect तर अजिबातच नसतात...
पण आनंदात राहण्यासाठी व्यासंग आणि हुशारीची गरज नसतेच मुळी...
जरा, आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येतं, कि आनंदाला तर शोधण्याची पण गरज नसते,
तो कुठेही असतोच...अगदी दु:खात सुद्धा असतो...

जसा मोठ्या-मोठ्या पुस्तकांत आणि चांगल्या कलाकृतीत असतो,
तसाच फालतू जोक्स आणि नाचण्यातपण असतो.
 जसा चर्चासत्रामध्ये असतो, तसाच तो पार्ट्यांमध्ये असतो.
तसाच एखाद्या परक्या माणसासाठी  पटकन डोळे भरून येण्यात सुद्धा असतो.

आपण मोकळे झालो कि, तो असा कुठेही भेटू शकतो,
पण बांधून ठेवलं तर फक्त काही ठराविक गोष्टींत.

आपल्या आजूबाजूच्या आवडीनिवडींच्या भिंती पाडून मोकळे झालो कि, आपण आनंदात राहण्याचे चान्सेस वाढवतो. सजीव होतो.

आता नेमकं काय करायचंय हा शेवटी ज्याचा-त्याचा प्रश्न...


बुधवार, २७ मार्च, २०१९

सावली


आपल्यातील प्रत्येकाला आयुष्यात राज्य हवं असतं पण त्यासाठी स्वत:वर डाव घ्यायला आवडत नाही..नेहमीच आपला डाव कुणीतरी घ्यावा म्हणून यासाठी प्रत्येकजण कुणाचीतरी वाट पाहत असतो.सभोवतली इकडून तिकडून फिरणार्या सोयऱ्यातून कुणीतरी पुढे येईल ही आपली इच्छा काही केल्या फलद्रूप होत नाही.मग आपण इथल्या माणसांच्यामध्ये माणुसकी उरली नाही म्हणून खेद व्यक्त करतो.

कधी भावना उरात मावेनाशा झाल्या की त्यातून बंडखोर काव्याची निर्मिती होत जाते.आपल्या शब्दांच्या कधी लाह्या होतात आणि आकाशातल्या सगळ्या चांदण्याची कधी जागा घेतात हे आपल्याला समजत नाही.मधूनच तत्वज्ञानाचे नवनवे फंडे आपल्या हातून जन्माला येतात.

आपण या सगळ्यात एक साधी गोष्ट विसरून जातो की मुळात रखरखत्या उन्हात आपल्याला सावली मिळावी म्हणून नेहमी कुणीतरी ऊन झेलायलाच हवे असा काही दंडक होऊ शकत नाही.कधीतरी आपणसुद्धा आपल्या उन्हाची ख्याली-खुशाली विचारायला हवी.आपल्या उन्हानां आपल्याकडून होणाऱ्या विचारपुसेची आस लागून राहिलेली असते.बाकी सगळ्यांच्या स्पर्शापेक्षा त्यांना आपल्याकडून एक फुंकर अपेक्षित असते.आणि हे त्यांचे मागणं काही वावगं म्हणता येणार नाही.

साऱ्या जगात कितीही कौतुक झाले. मानपत्रे मिळाली तरी गावाकडल्या पाठीवरल्या थापेपुढे त्यांना मोल नसते.आपल्याला आपल्या उन्हापेक्षा शेजारच्या अंगणातली सावली जादा भाजून काढत असते.जगात उन्हाच्या भाजण्यावर औषध मिळू शकते.पण सावलीच्या भाजण्याला काही कुठे आराम मिळत नाही.

दुसरं असं होतं की आपल्याला सावली देणाऱ्या झाडाच्या फांद्या वठल्या की आपण त्यांचा हात अलगद सोडून देतो.आतापर्यंत केवळ त्यांच्यामुळे प्रत्येक नाजूक घडीला आपण सहीसलामत सुटलो याबद्दल आपल्याकडे कसलाही कृतज्ञपणा असत नाही.आणि कित्येकदा आपल्या कानावर पडणाऱ्या हाकांना आपण कृतघ्नपणे टाळून टाकत असतो. इथले सगळे व्यवहार केवळ देवाण-घेवाण अशा दोन बाजू असणार्या नाण्याच्या इशाऱ्यावर चालते हे सोयीस्करपणे विसरून जात असतो.

दिलेल्या कडू गोळीच्या कडवटपणाचे वास्तव आपण स्वीकारत नाही. त्याला सामोरे जायची आपण हिंमत दाखवीत नाही.सत्य हे नागडे असायला हवे हे सत्य आपल्याला पचनी पडत नाही.वेगवेगळ्या वेशभूषा करून आपण कुणाला फसवीत होतो.याचं उत्तर आपल्या मानगुटीवर बसते तेव्हा आपल्या गोवऱ्या स्मशानात गेलेल्या असतात. आपण त्यावेळी स्वत:वर डाव घेण्यासाठी कबूल होऊन कितीही आर्जवे करीत गेलो तरी हाती काही लागत नाही.

" तेंव्हा गणित बिघडायला लागतं "



" तेंव्हा गणित बिघडायला लागतं "
----------------------------------------------

मी म्हणतो तसंच
सर्वांनी वागलं पाहिजे
असा आपला अट्टहास जेंव्हा सुरु होतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

आज पर्यंत माझा कोणताच अंदाज चुकला नाही
इतका मी भविष्याचा correct अंदाज घेऊ शकतो
तेंव्हा माझ्या निर्णयाला कुणी विरोधच करायचा नाही
असा अहंकार जेंव्हा खूप वाढीस लागतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

एवढं " मी " सागळ्यांसाठी केलं
तरीही
कुणीच त्याची नोंद घेत नाही
चार माणसात कुणी
आमचं कौतुकही करत नाही
अशा अपेक्षांचं ओझं
जेंव्हा आपण इतरांवर टाकायला लागतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

या घरात/ऑफिसात फक्त " मीच " शहाणा आहे
या ऑफिस मध्ये फक्त " मीच " सिन्सीअरली काम करतो आणि बाकीचे सगळे कामचुकार आहेत
हा व्यवसाय जो भरभराटीस आला तो केवळ " माझ्यामुळे " !
इतरांना त्याचं काहीच देणं घेणं नाही असा भ्रम जेंव्हा वाढीस लागतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

मी जसं वागतो
तसंच इतरांनी वागावं
हेच खावं , तेचं प्यावं
इतके वाजताच झोपावं
तितके वाजताच उठावं
अशी नाना तऱ्हेची
अनावश्यक बंधन घालून
जेंव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणायला लागतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

म्हणून आपल्या अवती भवतीच्या माणसांना स्वातंत्र्य द्या
थोडा मोकळा श्वास घेऊ द्या
नातू झाल्यावरही पोराला
लहान समजू नका !

पदोपदी इतरांचा आपमान करू नका
आपलं मत जरूर नोंदवा
पण आग्रह करू नका
आपल्या मतापेक्षा इतरांच मत ग्राह्य धरल्या गेलं तर राग राग , चीड चीड करू नका
कधी तरी का होत नाही

त्याने तर सांगितले नाही, मला माहीती दिली नाही असा भ्रम जेंव्हा वाढीस लागतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

दुसऱ्याचंही कौतुक करा
मग बघा जगणं किती छान , आनंदी , सोप्प वाटायला लागतं
आणि सगळी गणितं कशी जुळून यायला लागतात .....!!

शनिवार, १६ मार्च, २०१९

विश्वास


.सुंदर बोधकथा...

तो वाळवंटात हरवला होता. त्याच्या जवळच पाणी संपलं त्यालाही दोन दिवस झाले होते. आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हेc त्याला दिसत होतं, जाणवत होतं. हताश होऊन तो सभोवताली दूर दूर पर्यंत जेवढी नजर जाईल तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पहात होता. त्याची नजर अर्थातच पाणी शोधत होती.
तेवढ्यात त्याला काही अंतरावर एक झोपडं दिसलं. तो थबकला. हा भास तर नाही? नाहीतर मृगजळ असेल. पण काही असो, तिकडे जाऊया, काही असेल तर मिळेल असा विचार करत पाय ओढत स्वतःच थकलेलं शरीर घेऊन तो निघाला. काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो भास नव्हता, झोपडी खरोखरच होती. पण ती रिकामी होती, कोणीच नव्हतं तिथे आणि ती तशी बऱ्याच दिवसांपासून, कदाचित वर्षांपासून असावी असं वाटत होतं.
पाणी मिळेल या आशेने तो आत शिरला. आणि समोरच दृष्य पाहून तो थबकलाच. माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची स्थिती झाली.
तिथे एक हातपंप होता आणि त्याचा पाईप जमिनीत शिरला होता. त्याच्या लक्षात आलं जमिनीखाली पाणी आहे. हा पाईप तिथेच गेलाय. त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला. पुढे सरकत त्याने हातपंप जोराजोरात वरखाली करायला सुरवात केली. पण काहीच झालं नाही. पाणी आलंच नाही. नुसतात पंपाचा आवाज येत राहिला. अखेर हताश होऊन तो मटकन खाली बसला. आता आपलं मरण त्याला जास्त प्रकर्षाने जाणवले.
तेवढ्यात त्याचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडेे गेलं. परत एक अत्यानंदाची लहर उठली. बाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून व्यवस्थित सिल केलेली होती. चटकन तो पुढे सरकला. त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली तेवढ्यात बाटलीवर लावलेल्या एका कागदाकडे त्याचे लक्ष गेले.
त्यावर लिहिले होते "हे पाणी पंप सुरू करण्यासाठी वापरा आणि तुमचं काम झाल्यावर ही बाटली परत भरून ठेवायला विसरू नका."
तो चक्रावलाच. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं. काय करावं? या सुचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळं व्हावं? की सुचनेप्रमाणे करावं?
समजा, सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतलं आणि पंप खराब असेल तर?, पंपाचा पाईप तुटला असेल तर?, खालचं पाणी आटून गेलं असेल तर? पाणी वायाच जाईल... सगळा खेळ खल्लास...
पण सुचना बरोबर असतील तर?... तर भरपूर पाणी...
पाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावा की नाही यावर त्याच मत ठरेना.
शेवटी मनाचा निर्धार करत थरथरत्या हातांनी त्याने ते पाणी पंपात ओतले. डोळे मिटून देवाचा धावा केला आणि पंप वरखाली करायला सुरवात केली. हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच पाणी यायला सुरवात झाली. भरपूर पाणी येतं होतं. त्याला काय करू नी काय नको असं झालं. ढसाढसा पाणी प्यायला तो. स्वतः जवळच्या बाटल्या पण काठोकाठ भरल्या त्याने. तो खुप खुश झाला होता.
शांत आणि पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष आणखी एका कागदाकडे गेले. तो त्या परिसराचा नकाशा होता. त्यावरून सहज लक्षात येत होतं की तो मानवी वस्तीपासून अजून खुप दूर होता. पण आता निदान त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा तरी समजली होती.
त्याने निघायची तयारी केली. सुचनेप्रमाणे ती बाटली भरून सिलबंद करून ठेवली.
आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतः लिहीली.
"विश्वास ठेवून हे पाणी पंपात ओता, पाणी येतच" आणि तो पुढे निघाला.
----तात्पर्य--
*ही गोष्ट आहे देण्याचं महत्व सांगणारी.
काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं हे अधोरेखित करणारी.
काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं, आनंददायी असतं.
त्याही पेक्षा जास्त प्रकर्षाने ही गोष्ट विश्वासाबद्दल सांगते. विश्वासाने केलेले दान खुप आनंद देते.
आपल्या कृतीमुळे फायदा होईल याची खात्री नसतानाही त्याने विश्वास दाखवला.
काय होईल माहिती नसताना त्याने विश्वासाने अज्ञातात उडी मारली.
या गोष्टीतले पाणी म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी.
त्यांच्याकरता वेळ द्या आणि त्याच्या बदल्यात कितीतरी जास्त पटीने आनंदाची झोळी भरून घ्या

ऑप्टिशियन्स प्राईज...


ऑप्टिशियन्स  प्राईज...... #संगीताशेंबेकर

तुम्ही कधीही  ऑप्टिशियन कडे जा...चष्मा   बनवायला...किंवा रिपेयर ला....सगळ्यात तुम्हाला काचेत डिस्प्ले करतील खूप साऱ्या डिझाइन्स....तुम्हाला एखादी छान आवडते मग तुम्ही त्याची किंमत विचारता....तो दुकानदार तुम्हाला एक अशी किंमत सांगतो जी कि तुम्हाला फारच कन्व्हीन्सिंग असते....मग तुम्ही  त्या  फ्रेमला नक्की करता....आणि  तुम्हाला कळतं कि ही फक्त "लेन्स" ची किंमत होती......बाजूची फ्रेम अधिक पैशात निवडायची ...मग तरी तुम्ही बार्गेन करता असुदे..फायनली चष्मा छान दिसेल....आणि असे करत करत अँटी ग्लेअर ..आणि असे काही काही निवडत अंदाजे पाचशे रुपयापासून सुरवात झालेली तुमची आवड अठराशे रुपयात जाऊन थांबते....तुम्हाला कळतही नाही तुम्ही किती  हो हो हो म्हणत पुढे गेलात ....एकाच वस्तूची किंमत पाच वेळा बदलली तरी तुम्ही निर्णय बदलत नाही.....
असेच काही नात्यांचेही असते आपल्या जीवनात ...सं
एखादी शेजारीण....खूप काही निरनिराळी वागते आपण तरीही बोलत नाही....कारण कंपनी हवी असते तिची...एखादी ऑफिसातील व्यक्ती खूप काही करते खटकण्यासारखं पण आपण बोलत नाही कारण तिथे वैर नको असते आपल्याला....एखादी नातेवाईक व्यक्ती तसंच करते   पण काही स्पेसिफिक कारणाने आपण दुर्लक्ष करतो.....आणि निमूट राहतो.....ही सगळी ऑप्टिशियन प्राईज नाती आपण नकळत सांभाळत असतो.......जगण्यासाठी ..... #संगीताशेंबेकर

शुक्रवार, १५ मार्च, २०१९

हजार सेल्फ्यांचे घडे (कथा)



हजार सेल्फ्यांचे घडे (कथा)

----
ती जेव्हा जन्माला आली तेव्हाच तिच्या आईवडलांना तिची काळजी वाटू लागली होती.
या काळजीमागचं कारण होतं, तिचं सौंदर्य. तिचे डोळे पाण्यासारखे नितळ आणि लकाकणारे होते. तिची त्वचा तुकतुकीत, मुलायम आणि तेजवान होती. नाक सरळसोट होतं. जिवणी पातळ, पण ओठ जरासे जाड होते. जणू मद्याच्या कुप्याच असाव्यात. रात्री ती गाढ झोपली की, तिच्या मंद श्वासोच्छ्वासातून गंध प्रसवायचा. म्हणूनच तिचं नाव निशिगंधा असं ठेवण्यात आलं.
निशिगंधा वयात येऊ लागल्यावर तर तिच्या सौंदर्याच्या बहराला उधाण आलं. तिच्या वक्षांना गोलाई आली, उभार आला. तिचे काळेभोर चमकते मोकळे केस सारखे वार्याचवर उडू लागले. मांड्यांना भरदारपणा येऊन त्या पुष्ट झाल्या. हिच्याशी संभोग केल्यावर निर्माण होणारा वंश किती सुंदर असेल, असा विचार त्यांच्याही नकळत तरुणांच्या मनात येऊ लागला.
निशिगंधाच्या आईवडलांना हे सगळं समजत होतं. तिने कुणाही ऐर्यासगैर्या्च्या प्रेमात पडून, पोट काढून आपल्याकडे येऊ नये असं त्यांना वाटत होतं आणि या काळजीने त्यांच्या मनांना हजार घरं पडत होती. निशिगंधा क्लासला, शाळेत जायला निघाली की, ते रोज देवाकडे प्रार्थना करायचे की आज तिला प्रेमात पडण्यापासून वाचव. ती सुखरूप घरी येऊ दे.
मी सेल्फी – 00999. आत्ताच मी फ्रंट कॅमेर्‍यातून आलेय. आणि तुम्हाला सांगते, मी एवढी सुंदर आलेय, एवढी सुंदर आलेय की फेसबुकवर मला २५६ लाइक्स त्यात ७६ लव्ह्ज आणि वॉव्ज मिळालेत. आणि आत्ताच हाफ सेंचुरी झालीय कमेंट्सची!
चेहरा जरा वळवलेला. केस मोकळे. काळ्या लिपस्टिकचा पाउट. नजर थेट कॅमेर्याआत. कॅमेर्याकचा कोन वरून आहे. डोळ्यांखाली आयलायनर. आकाशी निळा पुलओव्हर. छातीची किंचित घळ दिसतेय. सोनेरी चेन चमकतेय. पार्श्वभूमीवर खोल दरी आणि हिरवट रंग...
आणखी एक लव्ह – रियानचं. काही लाइक्स – अंकुश, फरहान, निमा आणि देवीचं. २६० पूर्ण! हुर्रे!
एकदा पहाटे निशिगंधाच्या आईवडलांना, एकाच वेळी, एकच स्वप्न पडलं. एक बिनचेहर्‍याचा दाढीवाला साधू त्यांना म्हणाला, ‘हे बघा, निशिगंधा नुसतीच सौंदर्यवती नाही, तर बुद्धिमानही आहे. त्यामुळे ती सहजासहजी कोणाच्याही प्रेमात पडणार नाही. निश्चिंत रहा. एक गोष्ट मात्र नक्कीच चिंता करण्यासारखी आहे.’
कोणती?’
तिचं स्वतःवर असलेलं प्रेम आणि त्याचा तिच्या बुद्धिमत्तेवर असलेला अंमल. ती स्वतःच्या प्रेमात एवढी गुरफटलेली असते की आजूबाजूचं काही पाहूच शकत नाही. त्यात त्या मोबाइल फोनमुळे आणखीन भरच पडली आहे. ती सारखी सेल्फ्या काढत बसते. त्या काढताना तिला स्थल-कालाचं भान राहत नाही. त्यामुळे तिच्या नशीब आहे ते असं – आजपासून ती जेव्हा कधी हजारावी सेल्फी काढेल, तेव्हा तिच्या स्वप्रेमाचा घडा भरेल. तत्क्षणी त्या हजाराव्या सेल्फीत ती जख्ख म्हातारी दिसेल.’
मी कॅमेराबंद झाल्यावर वाटलं की, चला आता या फोनच्या गॅलरीत आपण सुरक्षित राहणार, निदान काही काळ तरी. पण मग समजलं की, माझ्याआधी सोळा सेल्फ्या आल्या आहेत. मी सतरावी. सतरा म्हणजे खतरा. चांगला नसतो म्हणे हा नंबर. पण सेल्फ्यांना कसला आलाय चॉइस?
ही एक आली अजून,’ 00990 ओरडली. ‘या स्वागत आहे तुमचं मॅडम.’
मी गप्पच. मला नक्की काय वाटत होतं हे माझं मलाच समजत नव्हतं. आपण काय बोललं पाहिजे किंवा कसं वागलं पाहिजे हेही कळत नव्हतं. मी जेव्हा सगळ्या सेल्फ्यांकडे नीट पाहिलं, तेव्हा आश्चर्यचकित झाले. बर्‍याच जणी थोड्याफार प्रमाणात माझ्यासारख्याच दिसत होत्या. 00991मध्ये चेहरा नीट दिसत नव्हता, तो अस्पष्ट होता. हात हलला असणार. तर  00992मध्ये पाउट नव्हता. हसणं जरा जास्तच होतं. जवळपास सगळेच दात दिसत होते. से चीज! 00993 आणि 00995 अगदी माझ्यासारख्याच होत्या. तिळ्या बहिणी! तर 00989 आणि 00990मधले भाव एवढे गंभीर होते, की आधीचे फोटो कुणाचेतरी वेगळ्याचेच वाटावेत.
00993 माझ्या डोळ्यांत डोळे घालून म्हणाली, ‘तूच दिसत्येस ती भाग्यवान सेल्फी!’
म्हणजे?’ मी विचारलं.
अगं, बघ की, तुझ्यानंतर आणखीन कुठे सेल्फ्या आल्यायेत? याचा अर्थ तिचं समाधान झालेलं दिसतंय तुझ्यावर.’
ओह, येस.’ काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलले.
अभिनंदन!’ 00994 पुटपुटली. तिचा आवाज कापत होता. ती घाबरली होती. ‘आम्हाला किती मजा येत होती इथे. वाटलं ती तशीच येत राहील यानंतरही... पण आता...’
मी त्यांना आणखी काही विचारणार, तोच कशाच्यातरी आत ओढल्यागत 00994 खेचली गेली आणि विरून गेली. 00996चंही तसंच झालं. 00997चंही तसंच. आणि मग असंच होत गेलं. माझ्यासारख्याच दिसणार्‍या 00993 आणि 00995 यांनी निषेधाचा स्वर लावला. ‘आमच्यात काय वाईटे? आम्ही तर...’ आणि शेवटी, मी सेल्फी 00999 एकटीच उरले. आणि माझ्यासोबत होते, फोनच्या गॅलरीतले इतर काही फोटो.
त्या दिवसापासून निशिगंधाचे आईवडील तिच्या हातात कमीत कमी मोबाइल फोन कसा राहील हे पाहू लागले. ते मुद्दामहून तिच्यापासून फोन लपवून ठेवू लागले, किंवा फोन दिला तरी कॅमेर्‍याचं अॅप कुलूपबंद करून ठेवू लागले. शाळेत असेपर्यंत त्यांच्या या सगळ्या युक्त्या चालून गेल्या. पण कॉलेजात गेल्यावर मात्र निशिगंधाला आपले आईवडील मुद्दाम आपल्याला फोटो काढण्यापासून प्रतिबंध करत आहेत हे कळून चुकलं. तिने मित्राच्या मदतीने कॅमेर्‍याचं कुलूप उघडण्यासाठीचा पासवर्ड शोधून काढला. पण आपल्या आईवडलांचं मन दुखावलं जाऊ नये, म्हणून तिने त्यांना त्याबद्दल काहीच सांगितलं नाही. ती घराबाहेर पडली, की कुलूप उघडत असे.
माझ्याबरोबरच्या सेल्फ्यांचं जे झालं, ते पाहून मला वाईट वाटत होतं. मी थोडी उदास झाले होते. तेवढ्यात, मागच्या वर्षी कॉलेजच्या साडी डेला काढलेल्या फोटोने माझं लक्ष वेधलं, ‘शेवटी तू राहिलीस तर एकटीच. कॉन्ग्रॅट्स!’
मी आजूबाजूचे फोटो पाहत ते कसे असतील, कसे बोलतील याचा अंदाज बांधत होते. मला मघाशी त्या सेल्फ्यांचं काय झालं असावं, हा प्रश्न सारखा बोचत होता. मी नुसतंच थँक्स म्हणाले.
गावाला गेल्यावरचा झोपाळ्यावर बसलेला फोटो कुत्सितपणे म्हणाला, ‘अभिनंदन. पण तरी आनंदाने उड्या नको मारूस फार! इथे कधी कुणाचं काय होईल काहीही सांगता येत नाही, कळलं!’
मघाशी काय झालं असेल त्या सेल्फ्यांचं?’ मी मनातला प्रश्न विचारून टाकला.
साडी डे फोटो मला म्हणाला, ‘ते एक मोठं कोडंच आहे. काहींच्या मते त्या खूप मोठ्या पेनड्राइव्ह किंवा हार्डडिस्कमध्ये जातात. आणि मग तिथे पडून राहतात. मग कधीतरी कोणीतरी त्यांना पाहतं आणि मग तिथूनही त्यांना जावं लागतं. मग त्यांचं काय होतं हे कोणालाच माहीत नाही. काहींच्या मते एक फ्लॅश लाइट त्यांना खाऊन टाकतो. आणि मग त्या कायमच्या जातातच. काहींचं मत जरा वेगळंय, त्यांचं म्हणणंय की फ्लॅशच्या झोताने खाल्ल्यानंतर पुन्हा वेगळ्या रूपात त्या इथे येतात. पुन्हा जातात आणि पुन्हा येतात. आता या सगळ्यातलं खरं काय हे कोणालाच नाही ठाऊक.’ 
मी नुसतीच मान हलवली. तोच आईवडलांसोबतचा फोटो बोलू लागला, ‘पण तुला कदाचित थोडं अधिक काळ राहता येऊ शकतं इथे. तुझं नशीब चांगलं असेल तर...’
कसं काय?’
आता माझंच बघ. शक्यतो मला अजून काही काळ तरी डिलिट केलं जाणार नाही. किंवा आठवण म्हणून ठेवून दिलं जाईल कुठेतरी.’
हं... पण माझं नशीब तुझ्यासारखं असेल असं वाटत तरी नाहीये.’
तुझंही असू शकतं. समजा, तू सोशल मीडियावर गेलीस, तर निदान थोडा वेळ तरी तू अमर!’
फेसबुक अॅप उघडलं गेलं.
झोपाळ्यावरचा फोटो म्हणाला, ‘भारीये. मोठ्ठ्या जगात चाललीयेस तू! ऑल द बेस्ट!’
मस्त पावसाळा होता. पावसाच्या एकामागोमाग एक सरी येत होत्या. हवा ओलीगार झाली होती. निशिगंधाच्या कॉलेज ग्रुपपैकी सगळ्यांनाच क्लासमध्ये जायचा भयंकर कंटाळा आला होता. अचानक त्यांनी जवळच्याच गडावर जायचं ठरवलं. सगळ्यांनी आपापल्या स्कूटर काढल्या आणि वेगाने कूच केलं.
निशिगंधाने आपली स्कूटी कॉलेजमध्येच ठेवली आणि ती मित्राच्या बाइकवर बसून निघाली. पावसाने ओले झालेले केस, भिजून नितळ झालेला चेहरा, त्यामुळे अधिकच चमकणारे डोळे, अंगाला घट्ट बसलेले ओले कपडे... स्वतःचं हे वेगळंच, ‘फ्रेश रूपडं पाहून निशिगंधा स्वतःच्या अजूनच प्रेमात पडली आणि गडावर पोचायच्या आधीच तिने स्वतःचे फोटो काढणं सुरू केलं.
गडावर ढग उतरले होते. पाऊस भुरभुरत होता. सगळीकडे हिरवंगार झाल्याने डोळे सुखावत होते. त्याने उद्दीपित झालेल्या निशिगंधाचं सटासट फोटो काढणं सुरूच होतं. ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटो काढत होती. कधी या झाडामागे, कधी त्या खडकावर, तर कधी आडवाटेला जाऊन. फोटो काढण्याच्या भरात तिच्याही नकळत ती आपल्या ग्रुपपासून अलग झाली आणि कोणत्यातरी वेगळ्याच वाटेला लागली.
मी खेचली गेले, तशी मी घाबरले. वाटलं, फ्लॅश लाइटच्या प्रकाशात आपणही विरून जाणार. पण तसं काहीच झालं नाही. मला एका चौकटीत बसवलं गेलं. मग क्रॉप करण्यात आलं. ब्राइटनेस, कॉन्ट्रॅस्ट, सॅच्युरेशन असं काय काय बदलण्यात आलं. ब्युटिफिकेशनने माझे डोळे थोडे मोठे झाले, तर गाल आणि चेहरा गुळगुळीत झाला. हनुवटी जरा वर उचलली गेली. पाउट आणखीन मोठा झाला. मग माझ्यावर वेगवेगळी फिल्टर्स चढवून बघितली गेली. कधी ब्लॅक अँड व्हाइट, कधी रेट्रो, कधी सेपिया. आणि मग शेवटी पिवळट-नारिंगी सेपियाचं फिल्टर चढवून पांढरी क्रूकेड फ्रेम माझ्यावर डकवण्यात आली. आणि सेव्ह केलं. आता माझं नाव थोडं बदललं. नवीन अवतार, नवीन नाव – 00999-EDX .
शेवटी निशिगंधाच्या ४३५६ फ्रेंड्समोर मला ठेवण्यात आलं. पहिले काही क्षण, मी गोंधळले, बावचळले. पण मला भारीही वाटत होतं. एक, दोन, तीन लाइक्स, मग लव्ह्ज, मग वॉव्ज. कमेंट्स.... काही मिनिटांत मी फेमस झाले. ढिगाने लाइक्स, कमेंट्स येऊ लागल्या.
ती वाट वेगळीच होती. तिथली झाडं देवदारांसारखी उंचच उंच होती. हवा दाट, अधिक ओली आणि गार होती. आणि हा गारवा सुखद नव्हता, तर बोचरा होता. उजेड अंधूक, करडा होता. पार्श्वभूमीवर सारखे घारींचे चीत्कार ऐकू येत होते.
काही क्षण निशिगंधाला आपण भरकटलो आहोत असं वाटलं खरं, पण तेवढ्यात एका आवाजाने तिचं लक्ष वेधलं. ‘किती सुंदर आहेस तू!’
निशिगंधाने इकडेतिकडे पाहिलं, तिला कोणीच दिसलं नाही.
अगं इकडे बघ, तुझ्या हातात, तुझा मोबाइल. तुझ्या सौंदर्याच्या जादूने मला वेड लागलंय. मी तुझ्या प्रेमात पडलोय. पार बुडालोय. मला माझं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचंय. प्लीज, हो म्हण.’
काय? तुझ्यासोबत? एका फाल्तू मोबाइलसोबत. आपली लायकी ओळखून तरी बोलायचंस! फोटो काढायचं काम कर... चल, फुट्...’ असं म्हणून तिने एक पाउट काढला आणि मोबाइल फोन आपल्यासमोर धरला.
००
इथले फोटो कॅमेर्‍यातल्या गॅलरीसारखे नाहीयेत. जरा आगाऊ आणि स्वतःला जास्तच शहाणे समजणारे आहेत. कोण जास्त चांगलं दिसतं याची सारखी तुलना करत राहतात.
शॉर्ट्स घातलेला फोटो मला म्हणाला, ‘मला तर पहिल्या तीस सेकंदात यापेक्षा दुप्पट लाइक्स मिळाले होते!’
हिमालयातल्या बर्फातला फोटो म्हणाला, ‘मला एक कळत नाही, हिच्यात आहे तरी काय एवढं? साधाच तर फोटो आहे. तरी लोक वेड्यासारखे करतायत. माझ्यात काहीतरी तरी आहे, पण हे असे तर लाख असतात हल्ली.’
तोच पंजाबी ड्रेसमधला फोटो म्हणाला, ‘अगं असं काय करतेस, पाउट किती मोठाय बघ! आवडणारच ना मग! आम्ही मात्र कायमच किरकोळीत लाइक्स मिळवणार!’
बरोब्बर,’ रियानबरोबरची सेल्फी, सूर्यास्ताचा फोटो, मित्रमैत्रिणींबरोबरचा ग्रुप फोटो, बहिणीच्या लग्नात काढलेल्या मेंदीचा फोटो, थर्टी फर्स्टच्या पार्टीचा फोटो अशा सगळ्यांनीच एका सुरात म्हटलं.
माझ्यासारखेच असलेले हे फोटो मला ज्या प्रकारे टोमणे मारत होते, माझ्याशी बोलत होते, त्याने वाईट वाटत होतं. तर दुसरीकडे, फ्रेंड्सनी मात्र माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यामुळे मी हुरळून गेले. मी विचार करू लागले की, आता पर्मनंट प्रोफाइल फोटो म्हणून आपली निवड नक्की होणार! आपणच तर सर्वांत बेस्ट फोटो आहोत. येस! मग आपल्याला या सगळ्या फोटोंपुढे तोरा मिरवता येईल. मग आपण व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम, स्नॅपचॅटमध्येही जाऊ. आणि मग खरोखरच अमर होऊ! कदाचित आपण इतके आवडू की आपली प्रिंट काढली जाईल, त्याला फ्रेम लावली जाईल आणि बेडशेजारच्या टेबलावर ठेवलं जाईल... ‘वॉव!’ मी स्वतःलाच म्हणाले, ‘तू अशी नुसतीच येऊन निघून जायला जन्मली नाहीयेस. तू वेगळी आहेस सगळ्यांपेक्षा, म्हणून तर आज इथे आहेस. कमॉन!’
भटकता भटकता निशिगंधा उंचच उंच झाडांचा भाग मागे टाकून एका पठारावर आली. तिथे लहानसहान झुडपं होती आणि एका झुडपाच्या शेजारी एक मोठ्ठा काळा खडक होता. निशिगंधाला तो पाहताक्षणीच आवडला. ‘व्वा, ऑसम. त्या दगडावर उभं राहून सेल्फी हवाच.’
ती धावत त्या खडकाकडे गेली. त्यावर बसून तिने फोटो काढले. त्यांचा क्लिक-क्लिक असा आवाज होत होता आणि तो आवाज तिच्या कानांना सुखावत होता.
अचानक, इतका वेळ कुंद, पावसाळी असलेलं वातावरण बदललं. बोचरं ऊन पडलं. तापदायक ऊन. आणि त्याच्या धगीने खडकामागे असलेला धुक्याचा दाट पडदा हां-हां म्हणता विरून गेला. खाली खोल दरी दिसू लागली. तो खडक दरीच्या अगदी कडेवर होता. दरीत गच्च अरण्य परसलेलं होतं.
वॉव,’ असं म्हणून निशिगंधा खडकावर उभी राहिली. तिने एक सेल्फी घेतला, मात्र ती प्रतिमा पाहून तिचा चेहरा आक्रसला, डोळे विस्फारले आणि ती काही क्षण जागच्या जागी थिजून गेली. तिच्या तोंडून ऊं एवढाच एक हुंकार निघाला.
हाय...’ माझी तंद्री भंगली. पाहिलं, तर नवी सेल्फी आली होती – 01000. 
आणि मी त्या सेल्फीकडे पाहतच राहिले. मला जे दिसत होतं त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. असं कसं घडलं असावं?
01000ने विचारलं, ‘काय झालं? पुढे काय?’
मी गप्पच.
ती निशिगंधाची हजारावी सेल्फी होती आणि त्यात ती जख्ख म्हातारी झाली होती. तिचे केस झडून गेले होते, टक्कल पडलं होतं. डोळे म्लान, पूने भरले होते. चेहर्‍यावर रबरट सुरकुत्यांचा चिकट जाड थर जमा झाला होता. नाकातून पिवळा शेंबूड गळत होता, आणि तो कोरड्या, फाटलेल्या ओठांतून येत असलेल्या रक्तात मिसळला होता.
हा धक्का महाप्रचंड होता. तिथल्या तिथे वीस वर्षांचा निशिगंधाला हृदविकाराचा तीव्र झटका आला आणि तिचा तोल जाऊन ती सरळ दरीत पडली.
मी कशीबशी तिला म्हणाले, ‘मला माहीत नाही... पण तू अशी... कशी...?  काहीतरी गडबड...’ मला  काय होत होतं हे समजत नव्हतं.
01000 माझ्याकडे एकटक पाहू लागली आणि मी तिच्याकडे. काही मिनिटांच्या फरकाने जन्मलेल्या आमच्यात जमीनअस्मानाचा फरक होता. त्या काही मिनिटांत शंभर वर्षं झरकन सरून गेली असावीत असं वाटत होतं. तोच फ्लॅश लाइट चमकला...
अंतःप्रेरणेने निशिगंधाच्या आईवडलांना जे घडलं होतं, ते समजून चुकलं. त्यांनी एकमेकांचे हात घट्ट धरले आणि डोळे मिटले. पुन्हा तो बिनचेहर्‍याचा दाढीवाला साधू त्यांना दिसू लागला. ते म्हणाले, ‘तुमची भविष्यवाणी खरी ठरली. आमची मुलगी तर गेली, पण तिच्या कहाणीचा शेवट असा व्हायला नको. नाहीतर, सगळ्या मनुष्यजातीवर विपरित परिणाम होईल. प्लीज, या कहाणीचा शेवट बदला. काहीतरी करा.’
त्यांच्या कळकळीच्या विनंतीमुळे साधूचं मन द्रवलं. तो म्हणाला, ‘ठीक आहे. मी उःशाप देतो.’
त्यानंतर निशिगंधा ज्या ठिकाणी मरून पडली होती, तिथे पांढर्‍या रंगाची, मंद सुगंध असणारी फुलं उगवून आली. लोक त्यालाही ‘निशिगंधा म्हणू लागले. ती फुलंही निशिगंधासारखीच सुंदर होती. पण त्या सौंदर्याखाली दबून राहिलेली खरी कहाणी मात्र लोक विसरून गेले,  सेल्फ्यांचे घडे भरत राहिले, आणि कड्यावरून खाली पडून, समुद्रात-धरणात बुडून लोक मरत राहिले मरत राहतील!
----
(पूर्वप्रकाशित - मुराळी नियतकालिक)
---
- प्रणव सखदेव

गुरुवार, १४ मार्च, २०१९

नदी सारखं जगावं

नदी सारखं जगावं 


आयुष्य कठीण अजिबात नसतं . .

कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं...

कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नसतो . .

कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो . .

कधी जागा नसते . . कधी जागा असून स्पेस नसते . . कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची उब नसते . .

कधी डब्यात आवडती भाजी नसते . . कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते . . दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते . .

कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो . . कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्या सारखे वाटते . .

कधी काही शब्द कानावर पडतात . . कधी नको ते शब्द कानावर आदळतात . .

कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात . .

कधी आपण कसे वागायचे समजत नाही . . कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही . .

कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही . . कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही . .

कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही . . कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही . .

कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही . .

कधी समोरचा /ची आपल्याला अकारण हक्काचा /ची वाटू लागते . . कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो . .

कधी पैसा असला कि नात्यांच्या मोह होतो आणि नाती असली की त्यांच्या गरजा -मौज पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमुसतो

. . . यात अजून ४-५ गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो ??

ताण घेतला तर तणाव . .
आजचे भागले म्हणून आनंद आणि
उद्याच काय म्हणून चिंता
आयुष्य कठीण करते .

आपण नदी सारखं जगावं . . सतत वहात राहाव्.......
या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा